Monday, January 8, 2018

चला, माणूस होऊ या!



पुण्यात नुकतीच ‘एल्गार’ परिषद झाली. 
‘एल्गार’ म्हणजे काय?
...तर ‘बेसावध क्षणी शत्रूवर केलेला आकस्मिक हल्ला’ म्हणजे ‘एल्गार’!
मग आता या परिषदेचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं? त्यांचे शत्रू कोण? आणि त्यांच्याविरूद्ध एल्गार पुकारण्यासारखं काय घडलं?
तर याचंही उत्तर सोपं आहे.
आपल्या राज्यात आणि देशात मोठं सत्ता परिवर्तन घडलं. नव्या सत्ताधार्‍यांच्या विरूद्ध केलेला ‘हल्लाबोल’ म्हणजे हा ‘एल्गार!’
कोणी याला ‘हल्लाबोल’ म्हणतं तर कोणी ‘एल्गार!’
फक्त शब्दातच काय तो बदल! भावना मात्र त्याच! 
त्यात विरोध आला, द्वेष आला, सूड आला!!
मग हा सूड उगवण्यासाठी पुढाकार कोण घेणार?
युद्धात ‘मास्टर माईंड’ कोणीही असू द्यात; काही प्यादे मात्र पुढं करावे लागतात. 
ते लढतात, लढवतात, मरतात, मारतात! 
महाराष्ट्रातल्या या ‘रणभूमी’त यांनी पुढं केलं ते गुजराती आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना! 
जिग्नेशला कॉंग्रेसचा जोरदार पाठिंबा! 
आणि हो! बरोबर ओळखलंत... खालीद तोच! 
त्यानंच वेळोवळी देशविघातक भूमिका घेऊन दहशतवाद्यांना, देशद्रोह्यांना सातत्यानं मदत केलीय. अफजल गुरूच्या समर्थनार्थ उभं असताना ‘भारत तेरे तुकडे होंगे...’ अशा घोषणा देणारा हा उमर!
जिग्नेशला निवडणुकीसाठी ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांनी अर्थसाह्य केल्याचे फोटोही मध्यंतरी ‘व्हायरल’ झाले होते.
मग या मंडळींनी पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या या परिषदेत सहभाग घेतला. त्यांना म्हणे ‘पेशवाई’ संपवायचीय.
यांची भूमिका म्हणे ‘धर्मनिरपेक्ष’ असते. 
ब्राह्मणांना झोडपणे म्हणजे यांचे पुरोगामित्व! 
आणि जात-पात न मानण्याचं आवाहन करत, मुख्यमंत्र्यांची जात काढत, त्यांच्या नेतृत्वाला ‘पेशवाई’ ठरवणं ही यांची जातीनिरपेक्ष भूमिका!
सध्या देश ‘गुजराती’ लोकांच्याच हातात आहे. मोदी असोत किंवा शहा! या नेत्यांसोबत संघर्ष करणं येरागबाळ्याचं काम नाही. 
पराक्रमाची परंपरा सांगणार्‍या अनेकांनी त्यांच्यापुढं नांग्या टाकून सपशेल शरणागती पत्करलीय.
मग यांना कन्हैयाकुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी असे ‘प्यादे’ लागतात! अल्पावधीत कॉंग्रेस गवतासारखे उगवलेेले हे कर्तृत्वशून्य लोक यांचे ‘नेते’ झाले. म्हणून त्यांची सर्वप्रकारची बडदास्त राखणं हे पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍यांचं कर्तव्यच! 
या जिग्नेशचा आवाका तो केवढासा?
परावलंबी बांडगुळाची वाढ तशी फारशी होत नसतेच! 
त्यामुळं शनिवारवाड्यावर होणार्‍या या एल्गार परिषदेकडं माध्यम प्रतिनिधींपैकी कोणी फारसं फिरकलं नाही.
आपापल्या विचारधारा पुढं दामटत सुरू असलेलं हे सरळसरळ राजकीय युद्ध आहे.
त्यातून चांगलं काही घडेल अशी अपेक्षा ठेवताही येणार नाही.
द्वेषाच्या पायरीवर उभारून कधी क्रांती घडत नसते. त्यामुळं एकमेकांशी संवाद साधायला हवा. 
मात्र असा संवाद साधला तर यांच्या स्वार्थाची पोळी भाजली जाणार नाही. त्यामुळं यांनी सुरू केलं द्वेषाचं राजकारण!
या जिग्नेशच्या विकृत मनोवृत्तीची आणि आगलाऊ स्वभावाची कल्पना असल्यानं एक युवक या परिषदेला गेला. 
अक्षय बिक्कड हे त्या विचारी तरूणाचं नाव! 
अक्षयचे काही लेख आपण यापूर्वी ‘चपराक’च्या अंकात वाचले आहेतच. मागच्या म्हणजे डिसेंबर 2017 च्या ‘चपराक’ मासिकाची मुखपृष्ठ कथाही त्याचीच होती. यापूर्वी त्यानं आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन ‘पारंबी’ या दिवाळी अंकाचं संपादन केलं होतं.
अक्षयनं जिग्नेशचं सर्व भाषण ऐकलं. ते संपूर्ण भाषण रेकॉर्डही केलं. त्यात जिग्नेशने आणि एल्गार परिषदेच्या आयोजकांनी उपस्थितांची माथी भडकवली. अत्यंत प्रक्षोभक भाषा वापरत ‘दोनशे वर्षापूर्वीच्या पेशवाईच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची’ अपेक्षा व्यक्त केली. 
गेली वर्षभर त्यांचं हे नियोजन सुरू होतं. 
1 तारखेला कोरेगाव भीमाला काहीतरी विध्वंसक घडणार हे अक्षयनं गेल्याच आठवड्यात त्याच्या फेसबुक पेजवर स्पष्टपणे नोंदवलं होतं. त्याविषयी एकानं लिहिलेल्या पुस्तकातील एका पानाची प्रतही त्यानं शेअर केली होती. मात्र तिकडं कोणीच लक्ष दिलं नाही.
धोक्याची पूर्वसूचना मिळूनही काहीच कारवाई न करणारे बघे हे सुद्धा आपल्यापुढचं मोठं संकटच आहे. 
अक्षय हे भाषण रेकॉर्ड करून थांबला नाही. त्यानं जिग्नेश आणि खालिद यांच्याविरूद्ध अधिकृत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला आणि अनेक माध्यमे खडबडून जागी झाली.
हे रेकॉर्डिंग कुणाकडंच नव्हतं. त्या परिषदेला माध्यम प्रतिनिधींपैकी कुणी उपस्थितही नव्हतं.
अशा गढूळ वातावरणात तडफडत राहण्याऐवजी अक्षयनं कृतिशिलता दाखवली. त्याची सर्वत्र दखल घेतली गेली. आंबेडकरी बांधवांपुढं भडक भाषणं देऊन ही सर्व गँग निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्या बंगल्यावर 31 डिसेंबरची पार्टी साजरी करत होती हे अक्षयनं मांडलं. 
कोरेगाव भीमाला जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. मात्र अशा ‘द्वेष निर्मिती कारखान्याचे’ काय? संभाजी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर ऍट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. खरेच यात त्यांची काही भूमिका होती का? किंबहुना असे काही घडविण्याची त्यांची क्षमता तरी आहे का? हे सर्व यानिमित्त पडताळून पाहिलं पाहिजे.
उमर खालिद म्हणाला, ‘‘1808 च्या लढाईचा इतिहास आपल्याला पुन्हा घडवायचा आहे. आजची लढाई ही संविधानिक मार्गाने होणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल...’’ म्हणजे तुम्हाला पुन्हा सशस्त्र लढाई करायची आहे का? कोरेगाव भीमाला जे घडले त्यात अशा वक्तव्याचा काहीच वाटा नाही?
या सर्व प्रकारानंतर अक्षयची जात शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर झाले. त्याची काहीच पाश्वर्भूमी न कळल्यानं अनेकजण बिथरले. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर आमदार कपिल पाटील यांनी अक्षयला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत ‘भाजपनं योग्य माणसाची नेमणूक करावी’ अशी अक्कल पाजळली. अक्षयसारख्या तरूणाच्या सतर्कतेवर असे आक्षेप घेणं आणि त्याची कुणाकडून तरी ‘निवड’ झालीय म्हणणं हास्यास्पद आहे. अशी निवड फक्त कॉंग्रेसमध्ये होऊ शकते. राहुल गांधी यांच्या निवडीनं त्यांनी ते सिद्धही केलं आहे. अक्षय बिक्कड हा आमचा फक्कड मित्र अशा कुणाच्या ‘निवडी’तून पुढे येणार्‍यापैकी नाही.
महत्त्वाचं म्हणजे याच कार्यक्रमात समर महंमद खडस नावाच्या एका पत्रकारानं बराच आरडाओरडा केला. अक्षयचं धाडस त्यांना चांगलंच झोंबलं होतं. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यापूर्वीच ‘स्मार्ट मित्र नव्हे; पिसाळलेलं कुत्रं’ असं ठामपणं लिहित खडस यांची ओळख करून दिली होतीच. ‘‘जिग्नेश यांचं भाषण ऐकून आंबेडकरी जनतेनं ही दंगल केली का?’’ असा एकच प्रश्‍न खडस विचारत होते. याचं उत्तर अक्षयनं नाही तर तपास यंत्रणांनी द्यावं. यात मेलेला मात्र दलित नव्हता इकडं आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही.
‘‘तुम्ही काय एकट्यानं भाषण ऐकलं का?, आम्ही तुमचं कीर्तन ऐकायला बसलोय का? आँ....!!, तुम्हाला इंटरप्रिटेशन काय कळतं?, तुमचं वय, अनुभव काय? तुम्ही बोलताय का?’’ असे अनेक बालीश प्रश्न विचारून खडस यांनी पुरोगामित्वाचे चेहरे आणि मुखवटे दाखवून दिले. जगातले सगळे प्रश्न केवळ आपल्यालाच कळतात आणि त्याची उत्तरंही आपणच देऊ शकतो अशा ढोंगी आविर्भावात ही मंडळी असतात.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे नारे देणारे आज देशभक्तीचा आव आणत आहेत आणि खर्‍या देशभक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. यांचे बुरखे फाडण्यासाठी अक्षयप्रमाणेच अनेक तरूणांनी पुढं येणं गरजेचं आहे. अक्षयसारख्या तरूणांचा आवाज दाबणं कुणाच्याही तीर्थरूपांना शक्य नाही; कारण ही तरूणाई कुणालाच बांधील नाही. त्यांचं सामाजिक भान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी असायला हवं. या सगळ्या प्रकारात अक्षय एकटाच असला तरी त्याच्या प्रामाणिकपणासोबत आपण सर्वांनी ठामपणं उभं रहायला हवं. त्यानं एकट्यानं जे पाऊल टाकलंय त्याला बळ देत आपण तो एकटा नाही हे सिद्ध करायला हवं. हे आपलं सामाजिक कर्तव्यच आहे.
कोरेगाव भीमाचा इतिहास या अंकात या विषयाचे अभ्यासक संजय क्षीरसागर यांनी दिला आहेच. ‘मिथकप्रियतेचे बळी’ या लेखातून संजय सोनवणी यांनीही भाष्य केलंय.
जातीपातीला खतपाणी घालणारे, त्यावर राजकारण करणारे इतर पक्षाला ‘जातीयवादी’, ‘हिंदुत्ववादी’, ‘धर्मवादी’ अशी बिरूदं लावून मोकळे होतात. भालचंद्र नेमाडे यांच्यासारखा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेता लेखक जातीसंस्थेचं समर्थन करतो तेव्हा त्यांच्या पाठिशी उभे राहणारे, विविध जातींच्या आरक्षणासाठी मागच्या कित्येक वर्षात समाजासमाजात फूट पाडणारे, जातीजातीचे मेळावे घेऊन द्वेष पेरणारे जातीअंताची भाषा करतात. इतरांना वेगळे ठरवून भांडणं लावतात, कोेरेगाव भीमासारख्या दंगलीही पेटवतात. 
महाराष्ट्रातले नेते शरद पवार यांनी ‘आधी पेशव्यांची निवड व्हायची, आता पेशवे निवड करतात’ असे भाष्य केलेच होते. ब्राह्मण समाजाविरूद्ध रोष निर्माण करून अशा नेत्यांनी मराठ्यांना भडकवले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही हे लक्षात आल्यावर दलितांना चिथावणी दिली. खरंतर ब्राह्मण, मराठा, दलित अशा वर्गवारीत न अडकता आपण माणूस म्हणून एकत्र यायला हवं. असं झालं तर यांचं पोट कसं भरणार? यांची दुकानदारी चालू ठेवायची तर द्वेषाला खतपाणी घालण्याला पर्याय नाही.
याच कोरेगाव भीमाला शरद पवारांच्या कारकिर्दीत कशी दंगल झाली होती? मुंबई बॉम्बस्फोटांची साखळी मालिका कशी झाली? पवारांसोबत विमानातून कोण कोण गुन्हेगार पळाले हे सारे महाराष्ट्राला नव्यानं सांगण्याची गरज नाही. संभाजी ब्रिगेडसारख्या विघातक संघटनांना कृतिशीलतेतून संपवण्यासाठी एक संभाजी भिडे गुरूजी पुढं आले आणि यांची सटकली. त्यांनाच ते ‘दहशतवादी’ ठरवून मोकळे! 
गेल्या काही वर्षात आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार झाल्यात. बरं, या कोणत्याही जातीतील बांधव एकत्र येऊन फार काही विधायक घडवतात, संघटित होऊन सकारात्मक पेरतात असेही नाही. केवळ इतरांचा द्वेष करणे आणि आपल्या नसलेल्या श्रेष्ठत्वाचे गोडवे गाणे हेच यांचे इतिकर्तव्य झाले आहे. 
शिक्षण, विज्ञान यातून सुसंस्कृत होण्याऐवजी आपण पुन्हा रानटी होत चाललो आहोत. हे थांबवायचं असेल तर स्वतःपासून सुरवात करायला हवी. जे झाले ते झाले. ते आपल्याला बदलता येणार नाही. यापुढं तरी आपण आपल्या भल्याचा विचार करायला हवा. नव्या पिढीपुढं काही चांगले आदर्श ठेवायला हवेत. त्यांच्या मनात प्रेम आणि बंधुत्वाची रूजवात करायला हवी. अनेक महापुरूषांनी, संतांनी आपल्या माणुसकीची जी शिकवण दिलीय त्याचा अंगिकार करायला हवा. ‘माणूस’ होण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. वानराचा नर झालाय, आता नराचा नारायण व्हायला हवा. पुन्हा पशुत्वाकडं जाणं बरं नाही.
या प्रक्रियेत म्हणूनच अक्षय बिक्कडसारख्या धैर्यवान तरूणांची गरज आहे. असा बेडरपणा सगळ्यात आला पाहिजे. जे चांगले ते स्वीकारायला हवे. वाईट ते अव्हेरायला हवे. घटना कितीही लहान असू द्या किंवा मोठी! आपण नेहमी सत्याची कास धरायला हवी. किमान त्या वाटेनं जे कोणी जात आहेत त्यांच्या पाठिशी तरी भक्कमपणे उभं रहायला हवं. म्हणून अक्षय आम्ही तुझ्या सोबत होतो, आहोत आणि भविष्यातही राहू, इतकंच! सूज्ञास अधिक सांगणे न लगे!
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२