Sunday, July 30, 2017

पुस्तक हेच मस्तक



कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही त्या देशात किती कारखाने आहेत, किती धरणे आहेत, किती प्रयोयशाळा आहेत, किती संशोधन केंद्रे आहेत, त्या देशात किती वनसंपत्ती, खनिजसंपत्ती आहे यावर ठरते असे म्हणतात. त्याचबरोबर त्या राष्ट्रात अफाट प्रतिभेचे किती कवी आहेत, किती चित्रकार आहेत, किती संगीतकार आहेत या व अशा गोष्टीही महत्त्वपूर्ण ठरतात. ज्ञानोबा-तुकोबांसारख्या अनेक वैश्विक तत्त्वचिंतकांची परंपरा लाभलेला आपला महाराष्ट्र त्यादृष्टिने खरोखरच समृद्ध आणि भाग्यवान आहे, असे म्हणावे लागेल.

‘तरणे बॉण्ड’ कवी रमेश गोविंद वैद्य म्हणतात की, विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि सह्याद्री हे मराठीचे पंचप्राण आहेत. जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत हा प्राण आपल्या श्वासाश्वासात, नसानसात राहील; आणि जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत मराठीला आणि मराठी भाषेला मरण नाही. त्यामुळे ‘मराठी भाषा संपेल’ अशी कोल्हेकुई करणार्‍यांनी मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याऐवजी ही भाषा, ही संस्कृती आणखी समृद्ध कशी होईल याचे चिंतन करावे. मराठी भाषा लयाला जात असल्याची चर्चा अनेक वर्षापासून होते. एकेकाळी पुण्यात ‘मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे का?’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी इतिहासाचार्य राजवाडे व्यासपीठावर आले आणि म्हणाले, ‘‘अरे, या विषयावर चर्चा कसली करताय. जर मराठी भाषा मृत्युपंथाला लागली असेल तर तिची तिरडी बांधा आणि स्मशानात नेऊन अंत्यसंस्कार करा. तसे नसेल आणि या भाषेत थोडी जरी धुगधुगी असेल तर असल्या वांझोट्या विषयावर चर्चा करण्याऐवजी सगळ्यांनी एकत्र या आणि मराठी भाषेत प्राण फुंका.’’

रामायण-महाभारतापासून ते ज्ञानेश्वरी-गाथेपर्यंत अनेक ग्रंथांनी मराठी माणसाला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसवले आहे. मातृभाषा असलेली संस्कृत आणि राजभाषा असलेली मराठी ही आपली अस्मिता आहे. या भाषांच्या संरक्षणाचा ठेका जणू आपणच घेतलाय अशा तोर्‍यात जाहिरातबाजी करणार्‍या महाराष्ट्र शासनाकडून मात्र मराठीची गळचेपी होतेय. भाषेच्या विकासासाठी, समृद्धीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत, याचा आढावा घेतल्यास पदरात नैराश्यच येते.

स्वतंत्र भारतात आजही साक्षरता अभियान राबवावे लागते आणि तरीही निम्म्याच्या आसपास जनता अडाणी आहे. हे चित्र बदलणे सहज शक्य आहे. मात्र तसे झाले तर वर्षानुवर्षे याच मराठी माणसांच्या जिवावर सत्ता उपभोगणार्‍या आणि अंदाधुंदी माजवणार्‍यांच्या खुर्चीखाली सुरूंग पेटतील. भ्रष्टाचार, महागाई आणि गुन्हेगारी यामुळे मस्तवाल बनलेल्यांना चाप बसेल. शिकलेल्या लोकांची स्वयंप्रज्ञा जागृत झाली तर यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळेच यांना अडाणी जनता हवीय. मराठी भाषा सक्तीची न करणे, ग्रंथालयांना-प्रकाशकांना सहकार्य न करणे, मराठी शाळांना परवानगी नाकारणे, शासकीय स्तरावर भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न न करणे हे कशाचे द्योतक आहे? सहिष्णू वृत्तीच्या मराठी लोकांच्या जिवावर बेगुमानपणे निवडून येऊन सत्ता आणि संपत्तीची फळे उपभोगणार्‍यांची कारस्थाने आमच्या लक्षात का येत नाहीत?

अशा बिकट परिस्थितीतही चांगले मराठी वाचक तयार होत असताना शासनस्तरावर कोणते विशेष उपक्रम राबवले जातात? काही साहित्यिकांना, कलाकारांना तुटपुंजे मानधन, अनुदान मिळतेही; पण ते पुरेसे नाही. कलाकारांना, साहित्यिकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी काही विशेष उपक्रम राबवावेत. ब्रिटिश लोक म्हणतात की, ‘‘एकवेळ आम्ही आमचे साम्राज्य देऊन टाकू, पण आमचा शेक्सपिअर आणि आमचे क्रिकेट आम्ही कोणालाही देणार नाही.’’ आपल्या मातीचे खेळ, आपल्या मातीतले साहित्यिक यांच्याविषयी आपल्या मनात असा उदात्त दृष्टिकोन केव्हा तयार होणार?     

प्रत्येक मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषाविषयक,  संस्कृतीविषयक धोरणांचा जाणीवपूर्वक व आवर्जून अभ्यास करावा. महाराज भाषेविषयी किती आग्रही होते हे अनेक घटनांवरून दिसून येते. त्यांनी कलावंतांची कधीही उपेक्षा केली नाही. कवी भूषण यांचा त्यांनी केलेला गौरव आपणास ज्ञात आहेच. छत्रपती संभाजीराजांनीही हा वारसा चालवला. ते स्वतः उत्तम कवी होते. अनेक कवी, लेखक त्यांच्या सानिध्यात होते. हाच आदर्श आजच्या राजकारण्यांनीही ठेवावा. 

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री असतानाचा एक किस्सा! एक जवळचा मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेला. त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि यथायोग्य स्वागत केले. त्यांच्या घरातील आतल्या तीन चार खोल्या एकदम साध्या होत्या. जमिनीवर एक चटई अंथरलेली. एक पाण्याचा माठ आणि काही पुस्तके असे गरजेइतकेच सामान त्या खोल्यातं होते आणि बाहेरच्या तीन चार खोल्या मात्र एकदम आलीशान होत्या. उत्तम रंगरंगोटी, शोभेच्या वस्तू, महागडे फर्निचर, घराबाहेरील मैदानात बाग आणि त्यात तयार केलेले सुंदर कारंजे असे वैभव पाहून बघणार्‍यांचे डोळे दिपून जात. याबाबतचे कुतूहल वाटल्याने मित्राने त्याबाबतची विचारणा केल्यानंतर बाबासाहेबांनी केलेला उलगडा फारच मार्मिक होता. ते म्हणाले की, ‘‘आतील साध्या खोल्या माझ्या वापरासाठीच्या आहेत. मात्र देशभरातून मला भेटायला येणार्‍या माझ्या लाखो बांधवांसाठी बाहेरचा दिखाऊ डोलारा उभारलाय. त्यांना कळायला हवे की, शिक्षणाने माणसाची प्रगती होते. असे ऐश्‍वर्य वाट्याला येते. सर्व दुःख, दारिद्य्र आणि दैना दूर पळते.’’  

बाबासाहेबांसारख्या महापुरूषांच्या नावावर राजकारण करणार्‍यांनी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

एका सम्राटाची कथा सांगितली जाते. त्याने मोठा प्रदेश जिंकला. भरपूर संपत्ती मिळवली. शेवटी मरताना त्याने काही आप्त-स्वकीय आणि मित्रांना जवळ बोलावून सांगितले की,‘‘माझ्या प्रचंड धकाधकीच्या आयुष्यात मी अनेक उठाठेवी केल्या. भरपूर पैसा, संपत्ती मिळवली. मात्र या क्षणी माझ्या हयातीत मी वाचलेली सात-आठ पुस्तकेच मला आठवतात. वाचनानंदाच्या या समाधानामुळेच मी सुखाने मरणाला सामोरा जातोय.’’ 

चांगले संस्कार रूजवून समाजस्वास्थ्य राखण्यासाठी आणखी दर्जेदार पुस्तके प्रकाशित व्हायला हवीत. लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आदींना शासनाने विशेष सोयी-सवलती द्यायला हव्यात. अज्ञान दूर सारून सुसंस्कृत आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी राजकारणातील चांगल्या नेत्यांनी लक्ष द्यायला हवे. असे झाले तर राजकारणाचा धंदा करणार्‍यांना कात्रजचा घाट दिसेल.

असे म्हणतात की, ज्या प्रदेशात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरे मरतात. काहीवेळा माणसेही मरतात. मात्र जिथे संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते.
म्हणूनच संस्कारांचा दुष्काळ पडू नये, यासाठी वाचनसंस्कृती वाढायला हवी. आपल्या देवघराप्रमाणेच प्रत्येकाच्या घरात सकस आणि दर्जेदार पुस्तकांचा संग्रह असायलाच हवा. जीवनात आनंद निर्माण करणार्‍या आणि जगणं समृद्ध करणार्‍या पुस्तकांसारखा मित्र नाही. शेवटी पुस्तकच विचारी माणसाचं मस्तक असतं हेच खरं! 
 - घनश्याम पाटील 
7057292092

Tuesday, July 25, 2017

नेमेची येते संमेलन...!



दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. यंदाचे संमेलनही महाराष्ट्राबाहेर होणार असल्याचे सांगितले जात असून त्यासाठी निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, सुप्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर, नागपूर येथील लेखक रवींद्र शोभणे, ‘अक्षरमानव’चे राजन खान, डॉ. किशोर सानप आदींची नावे चर्चेत आहेत. 

संमेलनाचा अध्यक्ष कोण व्हावा? संमेलन कोठे भरावे? त्यात कोणाकोणाला निमंत्रण द्यावे? परिसंवाद, कवीसंमेलन आदी कार्यक्रमात कुणाकुणाला सहभागी करून घ्यावे? जेवणाचा ‘मेन्यू’ काय असावा? या व अशा विषयांवर भांडणार्‍यांना यानिमित्ताने थोडेफार महत्त्व येते. यापूर्वी पंजाब येथील घुमानमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी ‘अमराठी भागात भरणार्‍या साहित्य संमेलनाला किती लोक उपस्थित राहू शकतील आणि सामान्य वाचकाला, रसिकाला या संमेलनातून काय मिळणार?’ हा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला होता. प्रकाशक परिषदेने तर या संमेलनावर बहिष्कारच टाकला होता. त्यावेळी ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी मी व माझे ‘चपराक’चे सहकारी तिथे जाणार; कारण धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा आहे’ असे सांगत आम्ही ही कोंडी फोडली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला तशी मोठी परंपरा आहे. एखाद्या विशिष्ट भाषेचे संमेलन एखाद्या लोकप्रिय उत्सवासारखे भरते अशी ‘मराठी’ ही जगातील एकमेव भाषा आहे. या रसाळ भाषेची महती प्रत्येकानेच गायली आहे. ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ अशा शब्दांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीचा गौरव केला आहे. मुळात संस्कृत ही भाषा अमृतासारखी आहे. मात्र या भाषेशीही पैज लावून ती जिंकण्याची क्षमता फक्त आणि फक्त मराठीतच आहे. त्यामुळे ही भाषा अधिक तजेलदार व्हावी, मराठी साहित्य तळागाळातील वाचकांपर्यंत पोहोचावे, ही भाषा अधिक समृद्ध होऊन तिचा सर्वांगीण विकास व्हावा, लोकांचे भाषाप्रेम अधिक वृद्धिंगत व्हावे यादृष्टिने ही संमेलने लक्षवेधी कामगिरी पार पाडतात. 

पहिलं मराठी साहित्य संमेलन 1878 साली भरलं होतं. ते ‘ग्रंथकारांच संमेलन’ मानलं जाई. खेड्यापाड्यातल्या लोकांसाठीचं, अशिक्षितांसाठीचं ते संमेलन होतं. मात्र जसजशी या संमेलनाला रसिकमान्यता मिळत गेली, सामान्य वाचकांचा पाठिंबा मिळत गेला, त्याला प्रतिष्ठा मिळाली तेव्हापासून साहित्यिकांचे हेवेदावे आणि अंतर्गत राजकारण सुरू झाले. साहित्यिकांना आरशासमोर उभे केल्यास ते आमच्या पवार साहेबांचेच जुळे बंधू वाटावेत इतका संभ्रम निर्माण होतो. तिथेही साहित्यिक डावपेच सुरू झाले आणि मग या परिस्थितीचा फायदा उचलत आमच्या राजकारण्यांनी तिकडे ‘पूरक व्यवसाय’ म्हणून लक्ष घातले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ‘आपण साहित्य संमेलनात येताना राजकारण्याचे जोडे मांडवाबाहेर काढून ठेवले आहेत’, असे तळमळीने सांगितले आणि पुढे हाच कित्ता काहींनी गिरवला. सांगलीत झालेल्या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे तेव्हाचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला आणि व्यासंगी संपादक उत्तम कांबळे यांच्या नावाची त्यासाठी शिफारस केली. त्यांच्या मनाचा हा मोठेपणा पाहून प्रसारमाध्यमांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र पुढे संमेलनात सर्व राजकारण्यांचाच प्रभाव दिसून आला. पिंपरीच्या साहित्य संमेलनात धनलक्ष्मीची गजबज, श्रीपाल सबनीस यांच्यासारखा वाचाळ संमेलनाध्यक्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावे गळे काढणार्‍यांकडूनच ‘चपराक’च्या अंकांची केली गेलेली जप्ती हे सारे उभ्या महाराष्ट्राने बघितलेच आहे.

मराठी भाषेचे संवर्धन आणि संगोपन साहित्य संमेलनामुळेच होते, असा ग्रह निर्माण झाल्याने विद्रोही साहित्य संमेलन, समांतर साहित्य संमेलन, महानगर साहित्य संमेलन, दलित साहित्य संमेलन, विविध विभागीय साहित्य संमेलने, विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठानची साहित्य संमेलने, इतकेच काय उपेक्षितांचेही साहित्य संमेलन येथे मोठ्या उत्साहात भरू लागले. त्यातील कवीसंमेलने, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने, कथाकथन आदी कार्यक्रमांना सामान्य रसिकांचा मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता निश्चितच समाधान वाटते. आपलं वाड्.मयविश्‍व समृद्ध झालंय, सामान्य वाचकांपर्यंत पोहोचतंय याची प्रचिती यातून येते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विरोध असणारी काही संकुचित विचारांची माणसे अशी साहित्य संमेलनेच बंद करण्याची मागणी रेटून धरतात. ‘कोण लेकाचा कोणाची देशसेवा पाहतो, तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो’ या म. भा. चव्हाणांच्या कवितेनुसार काहीजण पर्यायी संमेलन घेण्याची भाषा करताहेत. काहींना तर पर्यायी साहित्य महामंडळही स्थापन करायचंय. एकच काय, अनेक पर्यायी साहित्य महामंडळे निर्माण झाली तरी सामान्य वाचक, लेखकाला काहीही फरक पडणार नाही. उलट पर्याय निर्माण झाल्याने नवोदितांनाही त्यात स्थान मिळेल आणि त्यांची गुणवत्ता वाढेल अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही. 

आत्तापर्यंतचा इतिहास आहे की, ज्या ज्या राज्यांवर, प्रदेशांवर वा देशांवर इतर भाषिकांनी राज्य केले, वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी, त्या त्या भाषेचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. मग साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर झाले तर मराठी भाषा सर्वदूर नाही का पोहोचणार? सर्व प्रसारमाध्यमे या संमेलनाची योग्य ती दखल घेतील, ही वस्तुस्थिती आहे. घुमानच्या संमेलनाने ते दाखवून दिले आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्राबाहेर संमेलन होत असल्याने जे नाराज झाले आहेत आणि साहित्य संस्था व महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या मौजमजेसाठीचा हा अट्टहास वाटतो त्यांनी वस्तुस्थिती बघितली पाहिजे.

राहिला प्रश्न अमराठी भागातील पुस्तक विक्रीचा. अमराठी भागात संमेलन झाल्यास पुस्तके विकली जाणार नाहीत, प्रकाशक, ग्रंथविक्रेते तिथपर्यंत जाऊ शकणार नाहीत असा सूर काहींनी लावलाय. आमच्या एका प्रकाशक मित्राने तर सांगितले की, त्या लोकांना रामायण, महाभारत, हरीविजय, दासबोध, तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी, भगवत गीता, हरीपाठ आणि स्वामी, मृत्युंजय अशी काही ठराविक पुस्तके सोडली तर इतर पुस्तके माहितीसुद्घा नाहीत. ते अन्य अपरिचीत पुस्तके विकत काय घेणार? अहो, अन्य पुस्तके त्यांना माहिती नाहीत म्हणून तर अशा संमेलनांची नितांत गरज आहे. यातून मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी पुस्तकांची ओळख त्यांना होणार आहे व पुढे कोट्यवधी रूपयांची ग्रंथ खरेदी शक्य आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनही नेहमीच वादंग माजते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया असल्याने अनेक मान्यवर साहित्यिकांनी त्यापासून चार हात दूर राहणेच पसंत केले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर, कवीवर्य मंगेश पाडगावकर आदी दिग्गज मंडळी इथल्या व्यवस्थेमुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, याबद्दल खंत व्यक्त केली जाते. ती रास्तही आहे. मात्र या निवडणुकप्रक्रियेत अनेक त्रुटी असल्या तरी ही निवडणूक लोकशाही व्यवस्थेने होते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत मतांचा आणि प्रामुख्याने बहुमताचा मान राखायलाच हवा. त्यांचा सन्मान करायला हवा.
अध्यक्षपदाबाबत आणखी एक सुचवावेसे वाटते. अध्यक्षपदाची उमेदवारी ही फक्त साहित्यिकांचीच मक्तेदारी नसावी. अगदी वर्षानुवर्षे ग्रंथालय चळवळीचे निष्ठेने काम करणारा एखादा सामान्य कार्यकर्ता, कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी निःस्वार्थ वृत्तीने संत साहित्य पोहचविणारा एखादा कीर्तनकार, भारूडे, भूपाळी, पोवाडे म्हणणारा एखादा कलाकार, पुस्तक विक्रेता, नवनवीन लेखक - कवींना पुढे आणणारा प्रकाशक, व्यासंगी शिक्षक यांनाही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी देण्यास हरकत नसावी; कारण मराठी भाषा जिवंत ठेवण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे. आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक प्रतिभावंत या फंदात न पडल्यामुळे काही छोटे साहित्यिक निवडणूक रिंगणात उतरले आणि अध्यक्षपद भूषविल्याने पुढे ते मोठे झाले ही सुद्धा वस्तस्थिती आहे. अशावेळी आम्ही वर जे काही मांडले आहे ते वाचून नाके मुरडण्याऐवजी संबंधितांनी गांभिर्याने विचार करायला हवा. 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, July 23, 2017

प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत



छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रांतीकारी योद्धे! त्यांच्या केवळ स्मरणाने अंगात वीरश्री संचारते. युद्धकलेत त्यांचा आदर्श जागतिक पातळीवर गौरवाने घेतला जातो. सध्या आपल्याकडे महाराजांना जातीपातीत वाटण्याचे कारस्थान वेगात सुरू असताना त्यांच्या पराक्रमाची परंपरा खंडित होतेय की काय, असे चित्र आहे. महाराज बघायचे तर त्यांची तलवार बघा! असा पराक्रमी राजा पुन्हा होणे नाही!! त्यांच्या गनिमीकाव्याचा अभ्यास जगभर सुरू असताना आपण मात्र त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस संकुचित करत आहोत. आपल्या स्वार्थापोटी आपण इतिहासाचा किती निर्दयीपणे बळी देतोय याचीही जाणीव दुर्दैवाने आपल्याला नाही. अशा भीषण वातावरणात एक माणूस मात्र अव्याहतपणे आयुष्यभर केवळ शिवचरित्रावर काम करतोय. त्यांचा ध्यास, श्वास केवळ आणि केवळ महाराज आहेत. अतिशय त्यागी आणि समर्पित भावनेने त्यांनी शिवचरित्रासाठी स्वतःला वाहून घेतल्याने ते शिवमय झाले आहेत. राजांचा धगधगता इतिहास प्रभावीपणे मांडणार्‍या आणि नव्या पिढीत ऊर्जेचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या या एकमेवाद्वितीय प्रेरणास्त्रोताचे नाव म्हणजे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे! या आठवड्यात म्हणजे नागपंचमीला ते वयाच्या 96 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी ‘चपराक’च्या संपूर्ण टीमसह बाबासाहेबांची भेट घेतली. आदल्या दिवशी रात्री साडेबाराला ते दिल्लीहून आले होते. प्रवासाच्या थकव्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे असे आम्हास वाटले. मात्र त्यांचा उत्साह पाहून आम्ही अचंबित झालो. दरवेळी ते महाराजांच्या प्रत्येक मोहिमेची, त्यांच्या मोठेपणाची इतक्या तपशीलवार माहिती देतात की कुणीही थक्क होऊन जाईल. त्यांची स्मरणशक्ती तर अफाट तल्लख आहे. सनावळीसह ते जेव्हा इतिहासाचे वर्णन करतात तेव्हा आपण शिवकाळात कधी गेलोय हे आपल्यालाही कळत नाही. बाबासाहेबांनी हजारो व्याख्यानं दिली. ‘जाणता राजा’सारखं महानाट्य निर्माण करून त्याचे प्रयोग जगभर केले. शिवसृष्टी साकारली. विपुल लेखन केलं. इतकं सगळं करूनही अहंकाराचा वारा त्यांच्या जवळपासही दिसत नाही. या सर्वाचे श्रेय ते महाराजांच्या कर्तबगारीला देतात. बाबांच्याच शब्दात सांगायचे तर ते म्हणतात, ‘‘शिवाजीमहाराजांसारख्या थोर पुरूषाचे मी गुणगान करतो म्हणून तुम्ही येता. मी जर ‘क्रूड ऑईलचे उपयोग’ या विषयावर बोललो असतो तर तुम्ही इतक्या प्रचंड संख्येनं आला असता का?’’

तर परवाच्या भेटीची गोष्ट सांगत होतो. वयाच्या 96 व्या वर्षात पदार्पण करत असताना एखादा माणूस काय करू शकतो? इतरांचे माहीत नाही पण बाबासाहेब अजूनही शिवकालच साकारत आहेत. सध्या त्यांचा सुरू असलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, ‘चित्रमय शिवकाल.’ काही कलावंतांकडून त्यांनी राजमाता जिजाऊसाहेबांपासून सर्व शिवकालीन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या फोटोवरून मोठ्या आकारात चित्रं करून घेतली आहेत. ती चित्रं इतकी जिवंत आहेत की आपल्याशी आता संवाद साधतील असे वाटावे. नव्या पिढीसाठी चित्रांच्या माध्यमातून शिवकाल साकारण्याचे काम ते करत आहेत आणि आम्ही कपाळकरंटे मात्र त्यांचे मोल अजूनही लक्षात घेत नाही. त्यांना मी विचारले, ‘‘बाबासाहेब, कदाचित आमची पिढी तुमच्यासारखं काही भव्यदिव्य करू शकणार नाही. इतकं लेखन करू शकणार नाही. गड, कोट, किल्ले पाहणार नाही. मग आम्ही काय करावे?’’
त्यावर त्यांनी एका शब्दात उत्तर दिले, ‘‘अभ्यास!’’ 

आजच्या पिढीला अभ्यासाची गरज आहे हे त्यांनी ठासून सांगितले. केवळ अफजलखानाचे पोट फाडले, शाहिस्तेखानाची बोटं छाटली याचाच आपण डांगोरा पिटतो. महाराजांची नीतिमत्ता, त्यांची कर्तबगारी, त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन यावर काम झाले पाहिजे असे त्यांना वाटते. ते म्हणतात, ‘‘शिवाजी महाराजांचं आरमार मस्कतला गेलं होतं - मस्कतला! आमच्या आरमारात हे सांगितलं जातं का? हे शिकवलं जातं का? याची चित्रं काढली पाहिजेत. आमच्या पोरांच्यामध्ये ही ऊर्मी निर्माण झाली पाहिजे. जिथं आम्हाला समुद्रात पाच कोसांच्या पलीकडे जाता येत नव्हतं तिथं आम्ही मुंबईपासून हजार मैल दूर गेलो. मस्कतला धडक दिली. भगवे झेंडे तिथपर्यंत गेले. तिथपर्यंत आमचं आरमार गेलं.’’

इतिहासातील सत्कृत्यांच्या व सत्पराक्रमांच्या स्मृती प्रेरणेसाठी कायमच्या जतन करायच्या असतात असा बाबासाहेबांचा आग्रह असतो. महाराजांची युद्धनीती, मुत्सद्दीपण, समय सूचकता, सर्वधर्म आत्मीयता, न्यायनिष्ठुरता, कर्तव्यदक्षता, गोरगरीबांविषयी कळवळ, माणसांची पारख याविषयीच ते बोलत असतात. शून्यातून ब्रह्मांड कसं निर्माण करावं हे सांगणारं जीवन म्हणजे शिवचरित्र याची ओेळख बाबासाहेबांनी मराठी माणसाला करून दिली.

मध्यंतरी राज ठाकरे यांनी त्यांची एक प्रगट मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विचारले, ‘‘बाबासाहेब, शिवाजीमहाराजांच्या जन्मतिथीवरून कायम वाद होतात. त्यांची जयंती नक्की कधी साजरी करावी?’’
यावर त्यांनी सांगितले, ‘‘रोज जरी महाराजांची जयंती साजरी केली तरी कमी पडेल. त्यानिमित्ताने तुमच्या मनात महाराजांचे स्मरण होईल हे काय थोडे आहे? असे वाद घालत बसण्यापेक्षा महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांचा एखादा तरी गुण, एखादा तरी अंश आपल्यात कसा येईल सासाठी प्रयत्न करा.’’

बाबासाहेबांनी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, साता समुद्रापार अगदी युरोप, अमेरिकेतही हजारो व्याख्यानं दिली. त्यातून मानधनाचे जे पैसे मिळाले ते वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक काम करणार्‍यांना अर्पण केले. महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यावर त्यासोबतची रक्कमही त्यांनी वैद्यकीय सेवेसाठी दिली. शिवाजीराजांच्या नावावर ‘धंदा’ आणि ‘राजकारण’ करणार्‍यांनी डोळे सताड उघडे ठेवून हे पहावे. 

मुंबईला एकदा बाबासाहेबांच्या भाषणानंतर पुलंच भाषण होतं. त्यावेळी पुलं म्हणाले, ‘‘या व्याख्यानानंतर माझं भाषण म्हणजे गंगास्नानानंतर नळाखाली स्नान करण्यासारखं आहे.’’

नरहर कुरूंदकरांनी त्यांच्याविषयी लिहिलं आहे, ‘‘आजवर इतिहासाप्रमाणे रंजक चरित्र नव्हते. आता आपल्या सुदैवाने असे चरित्र उपलब्ध आहे. इतिहासाशी अत्यंत प्रामाणिक असणारे आणि रंजक, काव्यमय असणारे शिवचरित्र लिहिण्याचा एक यशस्वी प्रयोग शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांनी केला आहे.’’

‘राजा छत्रपती’ या बाबासाहेबांच्या ग्रंथाविषयी लिहिताना आचार्य अत्रे म्हणतात, ‘‘हे शिवचरित्र सार्‍या महाराष्ट्रानं अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत सुटावं इतकं सुंदर आणि बहारदार झालेलं आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की काव्य, इतिहास आहे की नाट्य याचा प्रत्येक शब्दागणिक वाचकांना भ्रम पडतो नि वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे की इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो.’’

बाबासाहेब एका लेखातून समजून घेणं शक्य नाही. मात्र त्यांच्या सूनबाई डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी ‘शिवशाहिरांचे वाङमयीन ऐश्‍वर्य’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांचे हे पुस्तक नागपूरच्या साहित्य प्रसार केंद्रानं प्रकाशित केलं असून ते प्रत्येकानं आवर्जून वाचलं पाहिजे.

जाताजाता एक किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो. काही विकृत लोक त्यांच्याविषयी वाटेल त्या अफवा अधूनमधून परसवत असतात. एकदा त्यांच्या निधनाची बातमी कोणीतरी समाजमाध्यमात टाकली. औरंगाबादमध्ये एकानं तर श्रद्धांजलीचा फ्लेक्सही लावला. लोकांनी नेहमीच्या मूर्खपणानं ते सर्वत्र पसरवलं. त्यावेळी बाबासाहेबांचं मुंबईत व्याख्यान सुरू होतं. पत्रकारांच्या व्हाटस ऍपला त्या फ्लेक्सचे फोटो आले. व्याख्यान संपल्यावर एका पत्रकारानं धाडस करून त्यांना हे सांगितलं आणि त्यावर चक्क त्यांची ‘प्रतिक्रिया’ही विचारली. 

बाबासाहेब क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकारांना म्हणाले, ‘‘असं कसं होऊ शकतं? मी तर पुढच्या दोन वर्षाच्या कार्यक्रमाच्या तारखा लोकांना दिल्यात...’’ याला म्हणतात हजरजबाबीपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन! 

बाबासाहेबांचा शंभरावा वाढदिवस राजगडावर उत्साहात साजरा करायचा आहे. आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादानं हा वैखरीचा स्वामी अजूनही जगभर शिवव्याख्यानं देतो आहे. महाराष्ट्राला समृद्ध करण्यात ज्या थोड्याथोडक्या माणसांनी हातभार लावलाय त्यात बाबासाहेब अग्रणी आहेत. 

‘राजा शिवछत्रपती’च्या लेखनाविषयी ते म्हणतात, ‘‘शिवचरित्र हे कुणा एका व्यक्तीचे चरित्र नाही. ते चरित्र म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. समाजधर्म आहे. शत्रूशी कसे वागावे आणि स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी मित्राच्या जीवाला जीव कसा द्यावा हे सांगणारे ते एक शास्त्र आहे. तत्त्वज्ञान आहे. विद्वत्ता गाजविण्यासाठी आणि शाली-मशालीचा मान मिळविण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. मी हे शिवचरित्र एका सूत्रान्वये लिहिलेले आहे. ‘शिवाजीराजा... एक प्रेरक शक्ती’ हे ते सूत्र होय...!’’

अशा या महान शिवचरित्रकाराचा सहवास, त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि अतिशय जिव्हाळ्याने त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही म्हणूनच माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला आयुष्याची सार्थकता वाटावी असेच त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Monday, July 17, 2017

आधी संजय सोनवणी खोदा!!


आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या मातीचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. महापुरूषांची अवहेलना हाही युगानुयुगे चालत आलेला विषय! म्हणूनच अनेक प्रतिभावंत कायम दुर्लक्षित राहतात. त्याउलट ज्यांची काहीच योग्यता नाही त्यांना मात्र आपण अनेकदा अकारण डोक्यावर घेऊन नाचतो. लोककवी मनमोहन यांच्या भाषेत सांगायचे तर,

‘‘येथे स्मारके बांधली जातात
कालच्या गझल-कव्वालीवाल्यांसाठी
आणि त्याच डांबरी रस्त्याने
उद्याचा कालिदास असलेला मनमोहन जातो
अनवाणी पायाने
आणि म्हणतो भुरट्या संपादकाला
घेतोस का पाच रूपयांना कविता?
शरम तुला हवी समाजा,
जन्माचे कौतुक
ताटीवर पाय ताणल्यावर का तू करणार?’’

हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी! 

कोण आहे हा माणूस? काय केले नाही या माणसाने?

ते मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की, ज्यांची पुस्तके अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये ‘संदर्भ पुस्तक’ म्हणून ठेवण्यात आली. त्यांनी पुस्तकांची शंभरी गाठलीय. त्यात जवळपास 85 कादंबर्‍या आहेत. जातीसंस्थेचा इतिहास आहे. हे झाले प्रकाशित पुस्तकांचे! अप्रकाशित असलेल्या, अर्धवट लिहिलेल्या अशा कादंबर्‍या तर त्यांच्या घरात किती मिळतील हे त्यांनाही सांगता येणार नाही. साहित्याची थोडीफार आवड असणार्‍यांनी त्यांच्या घरी जाऊन एकदा खोदकाम केले पाहिजे.

संजय सोनवणी यांच्याविषयी अनेकांचे मतभेद असतील. ते असावेत. किंबहुना माझेही आहेत. मात्र हा माणूस अतिशय निरागस आहे. निरागसता आणि बुद्धिमत्ता यांचा संगम त्यांच्या ठायी असल्याने त्यांचे माणूस म्हणून असलेले चांगूलपण आपण नाकारू शकत नाही. 

त्यांच्या कादंबरीचा नायक चिनी पंतप्रधानांच्या मुलीशी प्रेम जुळवतो, पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची हत्या करतो, मृत्युनंतर ‘कल्की’ बनून जगावर लक्ष ठेवतो, संपूर्ण महाभारत उलटे करतो, छत्रपती संभाजीराजांच्या अटकेपासून हत्येपर्यंतच्या 39 दिवसांचे प्रभावीपणे वर्णन करतो, पानिपतच्या लढाईचे ‘संजया’प्रमाणे वर्णन करतो, अखेरचा हिंदू सम्राट कुमारपालच्या इतिहासाची दखल घेतो, मराठीत प्रथमच ‘क्लिओपात्रा’ ठामपणे मांडतो आणि राजीव गांधींच्या हत्याकांडाची ‘मृत्युरेखा’ही उलगडून दाखवतो. एक-दोन नाही तर तब्बल 85 कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. त्या कादंबर्‍यांच्या विषयांचा आवाका जरी बघितला तरी सोनवणी यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास वेगळे काही सांगावे लागणार नाही.

या महान कादंबरीकाराने अनेक कथाही तितक्याच ताकदीने लिहिल्या. त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह आणि भाषेचे संशोधन आणि अभ्यास करणार्‍या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारे ‘भाषेचे मूळ’ ही पुस्तके आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केली आहेत. आता त्यांच्या काही कादंबर्‍या आम्ही पुन्हा वाचकांच्या भेटीस आणत आहोत.

त्यांनी ‘दहशतवादाची रूपे’, ‘भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य’, ‘कार्पोरेट व्हिलेज’, ‘महार कोण होते?’ अशा वेगळ्या विषयांवरील पुस्तकेही लिहिली. महाराजा यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्यावर विपुल लेखन केले. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची ओळख मराठी माणसाला करून दिली. सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडला. घग्गर नदीवर संशोधनात्मक लेखन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले. इतक्यावर थांबतील तर ते संजय सोनवणी कसले? त्यांनी ‘पुष्प प्रकाशन’ची स्थापना करून अनेक अस्सल पुस्तके प्रकाशित केली. कित्येकांना लिहिते केले आणि लेखक म्हणून सन्मानही प्राप्त करून दिला.

प्रारंभी म्हटल्याप्रमाणे या माणसाने काय केले यापेक्षा काय केले नाही? असा प्रश्न होऊ शकतो. त्यांनी अमेरिकेत कंपनी सुरू केली. जम्मू काश्मीरला जाऊन उद्योग केला. गडचिरोलीत आठ वर्षे पूर्ण तोट्यात कारखाना चालवला. का चालवला? तर त्यांना वाटले, नक्षलवादाला समर्थपणे उत्तर द्यायचे तर आधी त्या लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले पाहिजे. अमेरिकन रेडीओवर मुलाखत दिली. त्यात त्यांना विचारले गेले, ‘जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी देश कोणता?’ भारतीय माणूस या नात्याने त्यांना ‘पाकिस्तान’ असे उत्तर अपेक्षित होते. मात्र यांनी ठामपणे सांगितले की, ‘जगातल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी देशातून तर मी आता तुम्हाला मुलाखत देतोय.’

अमेरिका, चीन, पाकिस्तान अशा वेगवेगळ्या राष्ट्रांवर आजवर मराठीत किती जणांनी असे विपूल लेखन करण्याचे धाडस केलेय? तितका आवाका आणि अभ्यास केवळ संजय सोनवणी यांनी दाखवून दिलाय. म्हणूनच त्यांची पुस्तके इंग्रजीतही ‘बेस्ट सेलर’ ठरली. 

संजय सोनवणी यांनी ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी’सुद्धा चालवली. त्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांचा तपास केला. तो लेखनीत उतरवला. मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. अभिनय केला. गाणी लिहिली. संगीत दिले. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरूंगवासही भोगला. व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होऊनही पुन्हा नव्याने हसत उभे राहिले. जिद्द सोडली नाही. 

भूमिका घेणारे लेखक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांनी वाघ्याचे आंदोलन पेटवले. तो पुतळा पुन्हा तिथे बसवायला भाग पाडले. 

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर द्वेषातून आरोप सुरू झाले तेव्हा त्यांच्या बाजूने सशक्तपणे लढणारे एकमेव संजय सोनवणी होते. हिंदुत्त्वावादी विचारधारेला विरोध असूनही जे न्याय वाटते तिथे कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ योग्यायोग्यतेचा विचार करून तटस्थपणे स्वतःला झोकून देणारे संजय सोनवणी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे ठरतात.

सोलापूर येथे झालेल्या पहिल्या आदिवासी-धनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी असंख्य व्याख्याने दिलीत. जमेल त्या पद्धतीने सर्वांचे संघटन केले. शेतकरी प्रश्नावर ते तुटून पडतात. ‘ऍट्रॉसिटी कायदा रद्द केला पाहिजे’ म्हणून त्यांनी लढा उभारला. कसलीही पर्वा न करता ते विविध नियतकालिकातून आणि वृत्तवाहिन्यांवरून ठाम भूमिका घेत असतात. आजवर त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून एकही पुरस्कार स्वीकारला नाही. 

एकेकाळी पुण्यात ‘मराठी भाषा मृत्युपंथाला लागलीय का?’ या विषयावर परिसंवाद झाला होता. अजूनही अशी चर्चा सातत्याने होते! पण त्याकाळी इतिहासाचार्य राजवाडे यांनी या चर्चेच्या व्यासपीठावर येऊन ठणकावले, ‘‘अरे, मराठी भाषा मेलीय असे वाटत असेल तर चर्चा कसली करता? तिची तिरडी बांधा आणि स्माशानात नेऊन तिला जाळून टाका! मात्र त्यात थोडीजरी धुगधुगी दिसत असेल तर असे नामर्दासारखे गळे काढत बसू नका. तिच्यात जिद्दीने प्राण फुंका...’’

संजय सोनवणी यांचीही भूमिका अशीच आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांवर फोडले की आपल्याला पापमुक्त झाल्यासारखे वाटते. त्यामुळे संजय सोनवणी कृतिशील आहेत. ते काही बोलत बसत नाहीत. यातच त्यांचे मोठेपण आहे. चांगला विचार देण्यासाठी सत्तेची गरज नसते. नाहीतर स्वामी विवेकानंद सत्तेत गेले नसते का? तसेच काम सोनवणी करत आहेत. 

लोककवी मनमोहन यांचा केवळ एक शब्द बदलून त्यांच्याच भाषेत सांगतो, 

भविष्यात, 
जेव्हा कधी दगडाचे भाव कमी होतील, 
तेव्हा, 
पुतळा माझा उभारणार्‍यांनो, 
आधी संजय सोनवणी खोदा!!

- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

भय इथले संपत नाही!



आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली झाली. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, या लढ्यात जे हुतात्मे ठरले, त्यांनी राष्ट्रहिताचे जे स्वप्न बघितले, ते पूर्ण होईल असेच सर्वांना वाटते. मात्र आमच्या राज्यकर्त्यांनी हा विश्वास खोटा ठरवला. पारतंत्र्याच्या बेड्या निखळून पडल्या असल्या तरी आम्ही आज पूर्णपणे गुलाम आहोत. ‘भय इथले संपत नाही’ हे वास्तव कोण नाकारणार? 

जहाल आणि मवाळ गटाच्या देशवासीयांनी ब्रिटिश राजवट उलथवून लावली. अनंत अडचणींचा सामना करत, प्रचंड हालअपेष्ठा सहन करत इंग्रजांना हुसकावूल लावले. 15 ऑगष्ट 1947 ला ‘युनियन जॅक’ उतरवला गेला आणि लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. तेव्हा आम्हाला मुक्त झाल्यासारखे वाटले; मात्र आजची देशाची परिस्थिती पाहता वाटते की, ती तर फक्त ‘जामिनावर’ची सुटका होती. आजही आम्ही खितपतच पडलोय. राज्यकर्ते कोणीही असले तरी या जुलूमात भरडला जातोय तो सामान्य माणूसच!  
  
स्वातंत्र्याची प्रौढी मिरवताना आजही आमच्या देशात शिक्षितांपेक्षा अशिक्षितांचेच प्रमाण मोठे आहे. पूर्वी दरोडे पडायचे, लुटालूट व्हायची;  पण आजच्या राजकारण्यांची संघटित गुन्हेगारांची जी टोळी आहे त्यापेक्षा ते क्रौर्य नक्कीच कमी होते. पूर्वी गुरूकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून गुरू शिष्य परंपरा जपत शिष्यांचा सर्वांगीण विकास घडायचा. आज ‘डोनेशन’च्या नावावर लाखो रूपये देऊनही फक्त यंत्रवत विद्यार्थी तयार होत आहेत. एखाद्या विषयाचा अभ्यास करून नोकरी-व्यवसायाच्या शोधात वणवण भटकत आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तर अक्षरशः जीवनच बेसूर करून टाकलेय, अन्नाचे ढीग उभारलेत, मात्र ते बेचव आहेत. अंगप्रदर्शन करतानाच इतके किळसवाणे प्रकार पहावे लागतात की, स्वतःचीच स्वतःला लाज वाटावी. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भावना चव्हाट्यावर आणून त्याचा बाजार मांडताना कोणालाच वैषम्य वाटत नाही. प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामाईंचा वारसा सांगणार्‍या देशात ‘आपले किती बॉयफ्रेंड आहेत’ हे मोठ्या चवीने सांगणार्‍या युवती पाहून आश्‍चर्य वाटते.

देव-धर्म, नीती-अनीति, चांगले-वाईट या व अशा गोष्टी मान्य करू नकात! कोणत्याही धर्मग्रंथाविषयी, साधू-संतांविषयी, देव या संकल्पनेविषयी आदर बाळगू नकात; पण एक ‘चांगला माणूस’ म्हणून जगण्याचे सौजन्य तरी तुम्ही दाखवणार की नाही? 

व्यभिचारामुळे अनेक गंभीर रोग जडताहेत. सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापायी मानसिक स्वास्थ्य हरवतेय. व्यसनाच्या आहारी जाऊन आयुष्याची राखरांगोळी होतेय. खोटे बोलून, विश्वासघात करून सुखाची झोप हरवतेय. मग हे सारे करायचे कशासाठी? आपल्या हव्यासापोटी होणारे अधःपतन आपल्याच डोळ्यांनी आपण बघायचे का?
  
लोकशाही व्यवस्थेने आपल्याला स्वातंत्र्य दिले असेलही; पण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना आपण आपले ‘स्वत्व’ विसरतोय. मेंढ्याच्या कळपात राहून सिंहसुद्धा मेंढपाळाच्या मागे गुमाने जातोय.
अद्भूत कलाकौशल्य आणि अफाट सामर्थ्य असलेली आजची तरूणाई भरकटतेय का? क्षणिक मोहापायी अक्कल गहाण ठेवणार्‍यांचा हा देश नाही. या राष्ट्रात संस्कृतीचा पाया भक्कम आहे. मग वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, महागाई यामुळे आम्ही का त्रासलोय? एखाद्या उघड्या नागड्या बाईने मदमस्त ठुमके घ्यावेत यासाठी संबंधित घटक कोट्यवधी रूपये मोजत आहेत आणि आमच्या खिशातून त्याची वसुलीही करत आहेत. 

आपल्या देशात अपघातात मरणार्‍या तरूणांची संख्या पाहून भल्या-भल्यांना भोवळ येईल. मनाने कमजोर होत चाललेले तरूण आत्महत्येचा पर्याय का स्वीकारतात? हे अपयश कुणाचे? याची नैतिक जबाबदारी कुणी स्वीकारेल किंवा स्वीकारणार नाही! मात्र आपले काय? ही अराजकता, हे भय पाहून आपल्या धमन्यातील रक्त का उसळत नाही? 

जागतिकीकरणाच्या रेट्यात एकीकडे सर्व आधुनिक साधने, सोयी-सुविधा, प्रगत तंत्रज्ञान, माहितीचे जाळे आपल्यासाठी खुले झाले आहे; तर दुसरीकडे याच सर्व गोष्टींच्या दुष्परिणामामुळे आम्ही खिळखिळे होत चाललोय. आजच्या परिस्थितीत सत्यवादी राजा हरिश्चंद्र नसेलही; पण म्हणून आम्ही आमचे चांगुलपण का सोडावे? जग जिंकण्याची उमेद आणि तितकी क्षमता असणारे आमच्याकडे कमी का आहेत?

व्यापारी मनोवृत्तीच्या राजकारणी दलालांकडे दुर्लक्ष करून आपण आपली गुणवत्ता सिद्ध करावी. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून द्यावी. जे चांगले आहे ते स्वीकारावे आणि जे चुकीचे आहे ते धिक्कारावे. ब्रिटिश लोक म्हणतात की, ‘‘एकवेळ आमच्या शत्रूला आम्ही आमचे साम्राज्य देऊ पण आमचा विल्यम शेक्सपिअर आणि आमचे क्रिकेट आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.’’ 

ज्यांनी आपल्यावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले त्यांच्या या विचारधारेचा अभ्यास करावा. आपल्या मातीतले खेळ, आपल्या मातीतले कलाकार यांना सन्मान द्यावा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून काय चांगले आणि काय वाईट ते ठरवावे. ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणण्यास कोणीही धजावणार नाही, असे राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प आपण करूयात. या संकल्पसिद्धीसाठी लागणारे मूलतत्त्व आपल्या संस्कृतीत ठासून भरले आहे, हे आपणास थोड्याशा अभ्यासानेही लक्षात येईल.

परवाच पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील एक बातमी वाचली. धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे हे एक अंध दाम्पत्य. तीन वर्षापूर्वी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. ती डोळस आहे. मात्र समाजातील अंधपणा त्या निष्पाप जिवाने अजून बघितला नाही. तिचे नाव समृद्धी! या अंध दाम्पत्याच्या या पोटी ‘समृद्धी’ आल्याने आपल्या ‘भिकार’ समाजाचे रूप पुन्हा एकदा उघडे पडले. कोणीतरी लोखंडे कुटुंबियांचा एक फोटो काढला. त्याखाली मजकूर टाकला की, ‘समृद्धी ही लहान मुलगी पिंपरीमधील अजमेरा वसाहत येथे दिसली आहे. मात्र ज्या दाम्पत्याकडे ही मुलगी आहे ते म्हणतात की, मुलगी आमची आहे. ही गोष्ट पटण्यासारखी नाही. हा फोटो इतर ग्रुपमध्ये पाठवा. काय माहीत, कोणाची चिमुरडी असेल त्यांना पुन्हा भेटेल...’

हा संदेश आणि फोटो महाराष्ट्रभर वायू वेगाने पोहोचला. त्यामुळे या अंध दाम्पत्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला. जिथे जिथे हे अंध जोडपे दिसेल तिथे तिथे लोकानी यांना सळो की पळो करून सोडले. त्यांचे जगणे कठीण केले. त्यांचे कळकट मळकट कपडे बघून त्यांच्यावर संशय घेतला जातो. ही त्यांचीच मुलगी आहे हे त्यांना सिद्ध करत बसावे लागते. धर्माची आई, त्यांचे शेजारी सर्वजण त्यांची करूण कहाणी सांगतात, मात्र त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. ही आपल्या समाजाची शोकांतिका! 

जगण्या मरण्याशी संबधित असंख्य विषय असताना आपण अशा गोष्टींचे भांडवल करतो. गोरगरीबांना अकारण छळतो. ही मानसिकता अजूनही जात नाही हे केवढे मोठे दुभार्र्ग्य! इतके सारे असूनही आपल्या गोष्टी मात्र महासत्तेच्या! अशाने आपला देश कसा महासत्ता होईल? 

देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्षे झाली तरीही आपल्याला अजूनही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. रस्ते, वीज आणि पाणी या समस्या अजूनही सुटत नाहीत. शैक्षणिक क्रांती घडूनही बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही. खाकी आणि खादीच्या अनेक ‘प्रतापांमुळे’ अजूनही गुन्हेगारी आटोक्यात येत नाही. उलट हे सारे काही वाढतच चाललेय. एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे दुर्दैवी सत्र सुरूच आहे. दुसरीकडे राजकारणी नावाची जमात त्यांच्यावर कायम अन्यायच करतेय. वर ‘लोककल्याणकारी’ राज्य कसे आहे याचाही डांगोरा पिटला जातो. त्याहून वाईट समाजाच्याच एका घटकाचे वाटते. त्याची याला कसलीच खंत वाटत नाही. एक असा मोठा वर्ग आहे की त्याने कधीच शेतीत पाऊल टाकले नाही. शिक्षण संपवून नोकरीला लागलेल्या एका पिढीला अजूनही गाय दूध कशी देते, पेरणी कशी केली जाते, नांगरणी-कोळपणी हे काय प्रकार आहेत, गहू-ज्वारीचे पिक कसे येते, भात लागवड कशी केली जाते या कशाचाच गंध नाही. रानात धारं धरणे काय असते हे त्यांना  पुस्तकात वाचूनही माहीत नाही. त्यांची नाळ इथल्या मातीशी कशी जोडली जाणार? त्यांना फक्त उत्तम शिक्षण घेणे आणि सर्व सुखे उपभोगणे हेच माहीत. गलेलठ्ठ पगाराची नोकरी करावी, दारात परदेशी बनावटीची गाडी असावी, एखादी गोरी-गोमटी पोरगी आयुष्यात यावी इतकीच त्यांची स्वप्ने आहेत. बाकी कशाशीही त्यांना देणेघेणे नाही. 
म्हणूनच भय इथले संपत नाही! 

हे भय जोपर्यंत संपणार नाही, आपण निर्भय होणार नाही, इतरांच्या सुख-दुःखाचा विचार करणार नाही, ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती सोडून सामान्यांच्या सहवेदना अनुभवणार नाही तोपर्यंत आपण ‘माणूस’ म्हणवून घेण्यास नालायक आहोत. तसेही, या जनावरांच्या बाजारात श्वापदांची कमतरता कधी नव्हतीच मुळी!

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Monday, July 10, 2017

मी का लिहितो?



‘दरवळ’मधील मागच्या आठवड्यातला लेख वाचून नांदेडहून एका वाचकाचा फोन आला. त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही ग्रामीण लेखकांसाठी काय करता?’’ त्यांना मी सांगितले, ‘‘लेखक हा लेखक असतो. तो ग्रामीण, नागरी असा भेद करता येत नाही. लेखकाची जात, धर्म, प्रांत, लिंग हे व असे फुटकळ निकष पाहून आम्ही साहित्य स्वीकारत नाही. तरी ‘उपेक्षित ते अपेक्षित’ या न्यायाने पुण्या-मुंबईच्या वर्तुळाबाहेरील अनेक लेखकांची पुस्तके आम्ही मोठ्या संख्येने प्रकाशित केलीत. आमच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याची माहिती मिळू शकेल.’’

इतके सांगूनही त्यांचे समाधान होईना! त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही समाजसुधारणेसाठी काय लिहिलेय?’’

आता मात्र माझी सटकली. मी त्यांना विचारले, ‘‘मी समाजसुधारणेसाठी लिहितो हे तुम्हाला कोणी सांगितले? मी त्यातला ठेकेदार नाही.’’

त्यावर त्यांनी विचारले, ‘‘मग तुम्ही लिहिता कशासाठी?’’

क्षणाचाही विलंब न करता मी सांगितले, ‘‘मी माझ्या आनंदासाठी लिहितो.’’

त्यावर ते दुखावले गेले. त्यांनी सांगितले, ‘‘असे करू नकात! समाजसुधारणेसाठी लिहा.’’

त्यांचा सल्ला ऐकून मी फोन बंद केला.

खरंच लेखक कशासाठी लिहितात? त्यांनी लिहिल्याने समाज सुधारतो? गीता, कुराण, बायबल, गुरूग्रंथसाहिबा यापासून ते आपल्याकडील ज्ञानेश्‍वरी, रामायण, महाभारत, भागवत अशा धार्मिक ग्रंथाच्या वाचनाने कोणी फारसे सुधारत नाही. अनेक नामवंत तत्त्ववेत्यांची चिंतनशील, वैचारिक पुस्तके वाचून कोणी सुधारत नाही. धर्मग्रंथावर हात ठेवून न्यायालयात धडधडीत खोटे बोलणार्‍यांचा आपला देश! तो वाचनाने सुधारेल? मग लेखक लिहितात कशासाठी? जागतिक साहित्याचा विचार करता रोज एक-दोन नव्हे तर हजारो पुस्तके प्रकाशित होत आहेत. त्याची तडाखेबंद विक्रीही होतेय. या साहित्यातून समाज खरंच सुधारतोय का, हा मात्र चिंतनाचा विषय आहे.

कोणीतरी म्हटलंय, ‘‘आपला देश तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही.’’ मग लिहायचे कशासाठी? प्रत्येकाची त्यामागची कारणे वेगळी असू शकतात.

संस्कृत काव्यशास्त्राचे सर्वश्रेष्ठ विद्वान आचार्य मम्मटांनी सांगितल्याप्रमाणे लेखन हे स्वान्तसुखाय आहे का? त्यातून अर्थप्राप्ती होते का? मानसिक समाधान मिळते का? या निर्मितीच्या कळा सहन करून काय साध्य होते? ‘का लिहितो?’ याप्रश्नाची प्रत्येकाची उत्तरे आणि कारणे वेगवेगळी असू शकतात. 

वाचक हे सारे का वाचतात? हा त्याहून वेगळा प्रश्न! 

कोणी समाधानासाठी वाचतं. कोणी माहिती मिळवण्यासाठी वाचतं. कोणी ज्ञान मिळवण्यासाठी वाचतं. (होय, माहिती आणि ज्ञान यात खूप फरक आहे.) माझी एक मैत्रिण तर झोप येण्यासाठी वाचते. तिचे म्हणणे आहे, ‘‘चार बोजड पाने वाचली की झोप कधी येते कळतच नाही.’’

त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे, लिहिणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्या सुदैवाने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाचनाची प्रत्येकाची अभिरूची वेगळी असू शकते पण वाचक झपाट्याने वाढत आहेत. लिहिते हातही आपल्या सर्जनाचा आविष्कार सातत्याने दाखवून देत आहेत. जागतिक प्रवाह बदलत चालले असतानाचा नवी पिढी कसदार लेखन करतेय.

आम्ही ‘चपराक’कडून अनेकांची पुस्तके प्रकाशित केली. त्यात नवोदितांचे प्रमाण लक्षवेधी आहे. (‘चपराक’ने पुस्तक प्रकाशित केले की खरंतर कोणी ‘नवोदित’ राहत नाही.) त्यातही आम्ही अनेक पत्रकारांची पुस्तके प्रकाशित केलीत. सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, श्रीराम पचिंद्रे, संजय वाघ, सुभाष धुमे, श्रीपाद ब्रह्मे, सुभाषचंद्र वैष्णव, रमेश पडवळ अशा कितीतरी पत्रकारांची नावे उदाहरण म्हणून सांगता येतील. 

परवा इंदूरचे लेखक विश्वनाथ शिरढोणकर आमच्याकडे आले होते. त्यांचे ‘मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता’ हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक आम्ही प्रकाशित केलेय. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रमाण पाहून त्यांनी विचारले, ‘‘लेखकांची भाषा आणि पत्रकारांची भाषा यात काय फरक असतो?’’

त्यांना सांगितले, ‘‘पत्रकार हा फक्त घडलेली घटना सांगण्याचे काम करतो. क्वचितप्रसंगी त्यावर भाष्य करून समाजाला बर्‍यावाईटाची जाणिवही करून देतो. लेखक त्याचे विचार लालित्यपूर्ण शब्दात मांडतो. पत्रकार माहिती देतात, लेखक निर्मिती घडवतात. अर्थात आम्ही ज्या पत्रकारांची पुस्तके प्रकाशित केलीत ते सर्व उत्तम लेखक आहेत.’’

यावर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही प्रकाशक आहात. मग लेखक आणि पत्रकार यांच्या भाषेत नेमका काय फरक असतो हे एखाद्या उदाहरणासह सांगा.’’

त्यांना म्हणालो, ‘‘सोपे आहे. पत्रकार लिहिल, ‘आठ वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत आमचे वाचक आहेत.’ हेच वाक्य एखादा चांगला लेखक लिहिल, ‘‘वदनी कवळ घेताच्या वयापासून ते वदनी कवळी घेताच्या वयापर्यंत सर्व वाचक आम्ही जोडलेत!’’

मी अनेक स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रासाठी लेखन करतो. त्यावर माझ्या एका मैत्रिणीने उपहासाने सांगितले, ‘‘तुझे मोठ्या वृत्तपत्रातील लेखन अभिमानाची बाब आहे; पण छोट्या वृत्तपत्रांसाठी तू का लिहितोस? ते असे कितीसे लोक वाचतात?’’

तिला सांगितले, ‘‘सत्य सांगण्याचे काम छोटी वृत्तपत्रेच करू शकतात. उलट त्यांना आपण बळ द्यायला हवे. राहिला विषय वाचकांचा, तर माझे लेखन त्या वृत्तपत्राचे एकमेव वाचक असलेले संपादक वाचतात की हजारो, लाखो वाचक वाचतात याच्याशी मला कर्तव्य नाही. मी माझ्या आनंदासाठी लिहितो.’’

त्यावर तिचे समाधान झाले नाही. मीही विषय सोडून दिला. 
एकदा मी तिला एक भयंकर एसएमएस केला. ती पळतच माझ्याकडे आली. मी शांतपणे म्हणालो, ‘‘जास्त त्रास करून घेऊ नकोस! तुझ्याशिवाय आणखी कोणी वाचले नाही ना ते? मग आता विसर आणि ते डिलीट कर. अशा छोट्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही.’’

ती म्हणाली, ‘‘अरे कसे विसरायचे? मी अस्वस्थ झालेय त्यामुळे.’’

तिला म्हणालो, ‘‘हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर! जो संदेश फक्त तुझ्याशिवाय आणखी कोणी वाचला नाही, वाचणारही नाही त्यामुळे तू इतकी अस्वस्थ झालीस. मग वृत्तपत्र भलेही छोटे असेल, तुलनेने त्याचे वाचक खूप कमी असतील, पण त्यांच्यावर माझ्या लेखनाचा परिणाम होतो ना? मी समाजसुधारणेचा ठेका घेतला नाही. समाज बदलूही शकत नाही. मात्र एखाद्या वाचकाला माझे लेखन आवडले, त्याच्या अडचणीत मार्ग मिळाला, त्याचे नैराश्य दूर झाले तरी तो माझ्या लेखणीचा विजय आहे. त्या एकमेव वाचकांसाठी म्हणून मी लिहितो.’’

पोरींना असे वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले की पटते हा माझा अनुभव. तिलाही हे पटले. तेव्हापासून ती मला ‘कुठे लिहितो आणि का लिहितो’ असे अविवेकी प्रश्न विचारत नाही.

अनेक लेखकांचा समज असतो की, आपले साहित्य प्रकाशित झाले की त्यावर वाचकांच्या उड्या पडणार, पुस्तके हातोहात खपणार, प्रकाशक मालामाल होणार! बाबांनो, असे काही नसते! तुमच्याकडे सांगण्यासारखे, मांडण्यासारखे काही असेल तर जरूर लिहा. परिणामांचा विचार न करता विचारांचा परिणाम घडवा. शब्दांच्या, अक्षरांच्या प्रेमात पडलात तर सुखी व्हाल. उत्तम आणि कसदार वाचनाने मन एकाग्र होते. लेखनाने मन मोकळे होते. मनात खूप काही साठवून त्याचे डबके होऊ द्यायचे नसेल तर लिहित रहा. प्रवाही राहिलात तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरूस्त राहाल. वाचन, लेखन ही साधना आहे. त्याचे फळ मधुरच मिळते!

- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Sunday, July 9, 2017

चांगुलपणा वृद्धिंगत व्हावा!



देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची एक गोष्ट सांगितली जाते. ते तेव्हा कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यावेळी त्यांना साठ रूपये महिना मानधन मिळायचे. यावरच त्यांचे घर चालायचे. एकदा त्यांचा एक जवळचा मित्र त्यांच्याकडे आला. तो म्हणाला, ‘‘माझ्या बायकोची तब्येत अचानक खूप बिघडलीय. तिला दवाखान्यात न्यायचे आहे. त्यासाठी पन्नास रूपये तातडीने उसने द्या!’’

शास्त्रीजींनी ते ऐकल्यावर हतबलता दाखवली. ते म्हणाले, ‘‘मला जे मानधन मिळते त्यात आमचे घर कसेबसे चालते. आम्ही वेगळा धनसंचय केला नाही. तरी तुम्ही घाबरू नकात. आपण आणखी कुणाला विचारू! मी त्याची व्यवस्था करतो.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून शास्त्रीजींच्या पत्नी ललिताजी आत गेल्या. त्यांनी पन्नास रूपये आणले आणि त्या सद्ग्रहस्थांना  दिले. ते आनंदाने निघून गेले.

ते जाताच शास्त्रीजींनी विचारले, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललिताजींनी सांगितले, ‘‘तुम्ही मला घरखर्चासाठी दर महिन्याला जे साठ रूपये देता त्यातून मी पाच रूपयांची बचत करते. 55 रूपयात काटकसरीने घर चालवल्यावर जे पाच रूपये उरतात त्या बचतीतून मी हे पैसे दिले. जर ते एखाद्याच्या गरजेला कामाला येणार नसतील तर त्या बचतीचा उपयोग काय?’’

ते ऐकून शास्त्रीजींनी त्यांच्या पत्नीचे कौतुक केले. त्या घरात जाताच त्यांनी कागद पेन घेतला आणि कॉंग्रेस वर्किंग कमिटीला पत्र लिहिले. ‘‘माझे घर दरमहा 55 रूपयात चालत असल्याने पुढच्या महिन्यापासून माझ्या मानधनातील पाच रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूला द्यावेत....’’

असे होते शास्त्रीजी! आज हा किस्सा ऐकून अनेकजण त्यांनाच वेड्यात काढतात. हा विनोद वाटावा इतक्या आपल्या संवेदना बधीर झाल्यात. एखादा अधिकारी ‘प्रामाणिक’ आहे हे आपल्याला वारंवार सांगावे लागते. म्हणजे प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चाललेल्या काळात आपल्याला या गोष्टीचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे मुुंबई उच्च न्यायालयातील एक घटना! 

जळगाव येथील रहिवासी असलेल्या वैभव पाटील या विद्यार्थ्याने 2011 साली अभियांत्रिकीतून पदवी पूर्ण केली. त्याने अभ्यासक्रमातील पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर मित्राच्या सांगण्यावरून वीस हजार रूपयांना विकत घेतला होता. त्यानंतर त्याचा त्याला पश्चाताप झाला आणि अपराधीपणाची भावना निर्माण झाली. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने त्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचारही घेतले. आपल्या हातून चूक घडलीय म्हणून त्याने कुठे नोकरीही स्वीकारली नाही. शेवटी त्याने ‘आपली पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घ्यावी’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सत्याची कास धरण्याची शिकवण देणार्‍या न्यायव्यवस्थेने त्याची ही प्रांजळ मागणी मात्र फेटाळून लावली. इतकेच नाही तर ‘तुझ्याप्रती आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे. जे झाले ते विसरून आयुष्यात पुढे जा’ असा सल्लाही वैभव पाटीलला दिला.

‘फसवूणक करून शैक्षणिक पदवी मिळवल्याच्या मुद्यावरून ती रद्द करण्याची वा काढून घेण्याची तरतूद कायद्यात नाही’ असे स्पष्टपणे सांगत न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या प्रकरणात पेपर फोडण्यासाठी कुणाला पैसे दिले हे मात्र वैभव सांगायला तयार नाही. ‘आपल्यामुळे त्यांना त्रास नको’ असे त्याचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयही हे मान्य करतेय. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतानाच शिक्षण क्षेत्रातील पावित्र्य संपुष्टात आणून त्याचा बाजार मांडणार्‍यांना मात्र सगळेजण पाठिशी घालत आहेत. पेपर फोडण्यासाठी त्याने कोणाला पैसे दिले हे उघड व्हायला हवे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कारवाईही व्हायला हवी. यात वैभवची भूमिका फक्त ‘माफीच्या साक्षीदाराची’ असू शकते. अशा कामासाठी पैसे देणे आणि घेणे हा गुन्हा असताना केवळ तो स्वतःहून पुढे आल्यामुळे त्याच्याविषयी सहानुभूती दाखवणे,  अन्य गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे सगळेच शंकास्पद आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.

‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये’ हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलतत्त्व आहे. निरपराध्याला शिक्षा होऊ नये हे तर खरंच! मात्र ‘शंभर गुन्हेगार’ सुटण्याची खात्री असल्यामुळेच आपली कायदेव्यवस्था, न्यायव्यवस्था अक्षरशः काही धनाड्यांच्या हातातील बाहुलं बनली आहे. समोर आलेल्या साक्षी, पुराव्याच्या आधारे गुन्हेगाराला कठोर शासन करणे हे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिने आवश्यक आहे. कायद्याविषयीचा धाक कमी झाल्यानेच अनेक गंभीर घटना आपल्याकडे सर्रासपणे घडताना दिसतात. 

पूर्वी हाणामारी किंवा खूनासारखी घटना घडल्यास अनेकांचा थरकाप उडायचा. तपास यंत्रणा कसून कामाला लागायच्या. लोकात भीतिचे वातावरण असायचे. सध्या मात्र मोठ्यात मोठे गुन्हेही किरकोळ वाटू लागले आहेत. आजूबाजूला खून किंवा त्यापेक्षा मोठे हत्याकांड घडले तरी लोक चहा-कॉफीचे घोट घेत हसर्‍या चेहर्‍याने त्यावर चर्चा करताना दिसतात.

‘वकील, पोलीस हे व असे घटक आपल्याला कोणत्याही गुन्ह्यातून सोडवण्यासाठीच असतात! आपल्याकडे त्यांच्या तोंडावर फेकण्याएवढे पैसे असले की सगळे झाले’ अशी मानसिकता तयार झाली आहे. सामान्य माणसांना चिरडणारा सलमान खान किंवा देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याबद्दल शिक्षा भोगून बाहेर पडलेला संजय दत्त म्हणूनच आजच्या पिढीचा आदर्श असतो. रस्त्यावरचा सिग्नल मोडल्यावर किंवा नो एंट्रीत घुसल्यावर शे-दोनशे रूपये चिरीमिरी दिली की आपली सहज सुटका होते हे माहीत असल्याने अनेकजण  वाहतूकीचे नियम पाळत नाहीत. 

आपला देश बदलतोय हे तर खरेच! पण जोपर्यंत मूलभूत सुधारणा होत नाहीत तोपर्यंत वरवर झालेल्या बदलांना फारसा अर्थ नसतो. मागे एकदा एका तत्त्ववेत्याने बोलताना सांगितले होते की, ‘आपल्याकडे एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर जेव्हा दुसर्‍या बाजूला न पाहता एखादा पादचारी बिनधास्तपणे रस्ता ओलांडू लागेल त्यावेळी लोकशाहीच्या दृष्टिने आपण एक पाऊल पुढे टाकले असे समजावे.’ जे नियम आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी केलेत त्याचेही पालन आपण करत नाही. काहींना अतिरेकी विधान वाटेल पण सिग्नल मोडल्यावर त्याच्यावर तातडीने 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण एखाद्याच्या बेशिस्तीमुळे आणि नियमबाह्य वर्तनाने समोरच्या निरपराध्याचा जीव अकारण जातो. सीमेवर आपले जेवढे जवान दरवर्षी मारले जातात त्याच्या कितीतरी पट माणसे आपल्याकडे रस्ते अपघातात मरतात, असे एक सर्व्हेक्षण मध्यंतरी प्रकाशित झाले होते. या गोष्टी मात्र आपण फारशा गंभीरपणे घेत नाही. 

‘लोक बदललेत’ असे म्हणताना त्या ‘लोकात’ आपणही येतो याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. व्यवस्था भ्रष्ट झाल्याने प्रामाणिकपणे जगणे हीच अनेकांसाठी शिक्षा ठरते. जोपर्यंत चांगुलपणावर विश्वास आहे तोपर्यंत आपली संस्कृती भक्कमपणे तग धरून आहे असे समजावे. हे चांगुलपण किंवा त्यावरील विश्वास संपला तर आपण संपलो. म्हणून चांगल्या गोष्टींची कदर करायलाच हवी. ते करताना जे काही चुकीचे घडतेय त्यावरही अंकुश लावायला हवा. 

वैभव पाटील या विद्यार्थ्याने पैसे देऊन पेपर विकत घेतला आणि अभियांत्रिकीची पदवी मिळवली ही घटना आपल्या शिक्षणव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. वैभव संबंधित गुन्हेगारांची नावे सांगत नसल्याने त्याच्या हेतूबाबतही शंका घ्यायला वाव आहे. मात्र तो जर पश्चातापाने खरोखर त्रस्त असेल आणि त्याच्या चांगुलपणाने त्याला साद दिली असेल तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी असू शकत नाही. आपल्या हातून घडलेली चूक, घडलेला गुन्हा मान्य करायला, तो स्वीकारून त्यात सुधारणा करायला धाडस लागते. 

वैभव त्याचा पेपर वीस हजार रूपयात घेतल्याचे सांगतो. अशा घटना सर्वत्र आणि सर्रासपणे आढळून येतात. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या घरीच काही विद्यार्थी आदल्या दिवशीचा पेपर दुसर्‍या दिवशी सोडवताना जागीच सापडले होते. त्याचे पुढे काय झाले हे आम्हास कळले नाही. मात्र आपल्याकडे राज्यकर्त्यांचे जे होते तेच त्या नगरसवेकाचे, संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे आणि विद्यार्थ्यांचे झाले असणार!
माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये असे म्हणतात! आपण त्याच त्या चुका वर्षानुवर्षे करीत आहोत. म्हणूनच इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी गत आजच्या तरूणाईची झाली आहे. यातून बाहेर पडायचे तर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीबरोबरच आपल्यातील वाईट प्रवृत्ती, अप्रामाणिकपणा दूर सारून चांगुलपणा वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याकडील व्यवस्था, यंत्रणा, सामाजिक संस्था, माध्यमे आणि ‘ज्ञानकेंद्रं’ ठरतील अशा अन्य व्यक्ती आणि संस्थांनी यापुढे यासाठीच काम करणे गरजेचे आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

Tuesday, July 4, 2017

पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?



पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतून प्रकाशन संस्था चालवताना अनेक गमतीशीर अनुभव येतात. कथा, कविता, कादंबरी, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, नाटक अशा सगळ्या प्रकारची पुस्तकं आम्ही ‘चपराक’ तर्फे प्रकाशित केलीत. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ अशी आवई सर्वत्र दिली जात असतानाच आमची सातत्याने येणारी पुस्तकं पाहून अनेकजण आमच्याकडे पुस्तक प्रकाशनाविषयी विचारणा करत असतात. त्यात ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ हा एक प्रश्न अटळ असतो. 

ज्यांच्या कधी चार ओळीही वाचल्या नाहीत, जे कधी कुठे भेटलेही नाहीत ते फोन करतात आणि पहिलाच प्रश्न विचारतात, ‘‘आम्हाला पुस्तक काढायचंय... खर्च किती येतो?’’

त्यांना मी सांगतो, ‘‘बाबा रे! अजून मुलगी बघितलीही नाही. तिची आधी गाठ घाल. आम्ही एकमेकांना बघू आणि पुढचे ठरवू! स्थळ आहे इतकंच कळल्यावर थेट बारशाच्या कार्यक्रमाचीच विचारपूस कशाला करतोस?’’ त्यावर ते जरा थांबतात आणि मग संहिता पाठवतात.  

सध्या बहुतेक लेखकांना प्रकाशक म्हणजे ‘प्रिंटर’ वाटतो. त्याला द्या पैसे आणि हवे ते पुस्तक घ्या छापून! 

हे असे का व्हावे? मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या नावे गळे काढणारे यावर शांत का? अनेक प्रकाशकांचा हा ‘धंदा’ असतो म्हणून ते बोलत नाहीत. मग याची नेमकी सुरूवात कशी झाली? हे लोन इतके का वाढले? त्यामुळे मराठी भाषेचे काही नुकसान झाले की फायदाही झाला? या सगळ्याचा मुळातूनच विचार करणे गरजेचे आहे.

काही प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक त्यांच्या वेळेनुसार आणि हौस म्हणून अधूनमधून ‘काहीबाही’ लिहित असतात. ते पुस्तक स्वरूपात यावे असे त्यांना किंवा त्यांच्या खुशम्हस्कर्‍या चमच्यांना वाटत असते. पुस्तक आले की सगळीकडे लेखक म्हणून ‘मिरवता’ येते. चार ठिकाणी प्रकाशन सोेहळ्याच्या बातम्या येतात. पुस्तकांची परीक्षणं छापून येतात. संबंधित विभागात बढतीचीही शक्यता असते. गेला बाजार चार-दोन सटरफटर पुरस्कारही मिळतात. मग ही संधी का सोडायची असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी एखादा प्रकाशक गाठला जातो. पाच-पन्नास हजार रूपये देऊन त्याच्याकडून पुस्तक प्रकाशित करून घेतले जाते आणि मग त्यांचे ‘साहित्यिक योगदान’ विविध माध्यमांद्वारे सातत्याने ‘ठसवले’ जाते. त्यासाठी काही प्रकाशकांनी चक्क ‘रेट कार्ड’ छापून घेतलेय आणि प्रकाशन समारंभापासून ते त्याची निर्मिती, जाहिरात याबाबतचे दर त्यात दिलेत.

यापुढे जाऊन काही प्रशासकीय अधिकारी तर विविध सरकारी योजनांना ही पुस्तके लावतात. आपल्या अधिकारांचा वापर करून अनेकांना ती विकतही घ्यायला लावतात. थेट ‘लाच’ स्वीकारण्याऐवजी आपण ‘वाचनसंस्कृतीचा’ कसा प्रसार करतोय हे सांगितले जाते. मग त्यांच्या आवृत्यावर आवृत्या निघतात. काहीवेळा त्यातील निवडक भाग शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला जातो. आजच्या अभ्यासक्रमातील बराचसा रद्दाड मजकूर बघितल्यावर कुणाचीही त्याची खात्री पटेल. कवी म. भा. चव्हाण म्हणतात,

कोण लेकाची कोणाची देशसेवा पाहतो
तू मला ओवाळ आता, मी तुला ओवाळतो! 

वाचकांच्या हाती त्यातून काय येते? तर मराठी साहित्याविषयी उदासीनता आणि आपल्या साहित्य क्षेत्राविषयीचा राग! त्यामुळे अशा प्रसिद्धीची चटक लागलेल्या लेखकांनी आणि गल्लाभरू प्रकाशकांनी मराठी साहित्याचे मोठे नुकसान केलेय, हे वास्तव मान्य करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे ‘पुस्तकासाठी खर्च किती येतो?’ असा प्रश्न आला की व्यक्तिशः मला त्यांच्या साहित्यिक दर्जाविषयी शंका येते. अर्थात अनेकदा नवलेखकांना याविषयीची माहितीही नसते, त्यामुळेही हा प्रश्न विचारला जात असावा.

काही लेखक ‘तुम्ही मानधन देता का?’ असाही प्रश्न विचारतात. त्यांचे मला कौतुक वाटते. चांगल्या साहित्याला मानधन देणे हे प्रकाशकांचे कर्तव्यच आहे आणि ते आम्ही देतो! आमचे अनेक लेखक याबाबतची साक्ष देतील! 

आता आमच्या कामकाजाविषयी थोडक्यात सांगणे गरजेचे आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय पुस्तके प्रकाशित करताना त्याचा ‘गुणात्मक दर्जा’ हा एकमेव निकष आम्ही बघतो. नवोदित-प्रस्थापित, जात-धर्म, प्रांत, लेखकाचे वय, लिंग अशा बाबीही बघण्याची कुप्रथा या पवित्र क्षेत्रात सुरू झालीय. त्यामुळे हे सांगणे आवश्यक वाटते. वेगळ्या विषयांवरील, सांस्कृतिक संचित पेरणारी पुस्तके आम्ही चोखंदळपणे निवडलीत आणि लेखकांचा पूर्ण सन्मान राखत, आकर्षक स्वरूपात ती प्रकाशित केलीत. त्याची जाहिरात आणि वितरण यासाठी प्रचंड कष्ट उपसलेत. म्हणूनच नवोदितांच्या पुस्तकांच्याही चार-चार, पाच-पाच आवृत्या अल्पावधितच प्रकाशित होण्याचा विक्रम घडला. अशी पुस्तके लेखकांना आणि आम्हाला पैसा व प्रतिष्ठा मिळवून देणारी ठरली.
काही कवितासंग्रह, नाटके आम्ही पदरमोड करून प्रकाशित केली. त्यांचे निर्मितीमूल्य सोडाच मात्र प्रकाशन समारंभाचाही खर्च निघाला नाही. अशा पुस्तकांचे कर्ज फेडत राहिल्याने हातातील अन्य दर्जेदार कलाकृतींवर निश्चितच अन्याय झाला. 

मग व्यावसायिक तडजोडी स्वीकारत आम्हीही यातून मध्यममार्ग काढला. आम्हाला आवडलेल्या आणि आम्ही निवडलेल्या विषयांवरील पुस्तके आम्ही आमच्यातर्फे प्रकाशित करतो. त्यातून लेखकांचेही समाधान होईल याला प्राधान्य देतो. मात्र काही पुस्तके दर्जेदार असूनही ती बाजारात कितपत चालतील याची खात्री नसते. साहित्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असलेल्या कवितांचा क्रम तर विक्री व्यवस्थेत गृहितच धरला जात नाही. त्यामुळे ज्या लेखकांची पुस्तके आम्हाला प्रकाशनयोग्य वाटली आणि त्यांची काही गुंतवणूकीची क्षमता आहे त्यांच्याकडून माफक निर्मितीमूल्य घेऊन त्याबदल्यात तितक्या रकमेची पुस्तके त्यांना द्यायची व पुस्तक प्रकाशित करायचे. यातील काही प्रती लेखकांनी विकत घेतल्याने होणार्‍या नुकसानीचा भाग तुलनेने कमी होतो. हे करतानाही पुस्तकाचा दर्जा, व्याकरण, मांडणी, मुखपृष्ठ, कागद, छपाई, बाईंडिंग आणि नंतर त्याचे वितरण यात कसलीही तडजोड केली जात नाही. पुस्तकाचा आशय आणि विषय आम्हाला आवडला तरच ते प्रकाशनासाठी निवडले जाते आणि आवश्यक तिथे संपादकीय संस्कार करून  ते पुस्तक जास्तीत जास्त परिपूर्ण कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतात.

या माध्यमातून एकच सांगावेसे वाटतेय, तुम्ही जर उत्तम लिहित असाल तर प्रकाशक मिळत नाहीत, प्रकाशनासाठी पैसे नाहीत अशा गोष्टींचा विचार करू नकात! तुमचे साहित्य आमच्यापर्यंत पाठवा. ते योग्य वाटले तर त्याला न्याय देणे ही आमची जबाबदारी! मराठीत सर्वाधिक पुस्तके प्रकाशित होत असताना ती केवळ ‘संख्यात्मक’ न ठरता ‘गुणात्मक’ही ठरावेत यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करूयात! 

त्यामुळे ‘पुस्तक प्रकाशनाला खर्च किती येतो?’ याची  अनाठायी भीती न बाळगता आधी तुम्ही जास्तीत जास्त चिंतनशील, प्रबोधनपर, रंजक, अभ्यासपूर्ण लिहा आणि ते आमच्यापर्यंत पाठवा. 

त्यासाठी संपर्क - ‘चपराक प्रकाशन’, 617, साईकृपा, पहिला मजला, शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ,  पुणे 411 002. दूर. 020-24460909.
websait : www.chaprak.com

Saturday, July 1, 2017

धडाकेबाज महेश भागवत


स्वातंत्र्यानंतर खाकी आणि खादी हीच आपल्या देशाची ओळख झाली. मात्र हे दोन्ही घटक इतके बदनाम झाले की लोक खाकी आणि खादीवाल्यांचा सर्वाधिक तिरस्कार करू लागले. त्यांना शिव्या घालू लागले. यांच्यातीलच काहींनी हे क्षेत्र पुरते बदनाम केले. असे असले तरी या क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोकानी या क्षेत्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सगळंच काही संपलेलं नाही हा विश्वास निर्माण केला आणि चांगुलपणाच्या जोरावर सामान्य माणसाच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. खाकीतला माणूस जेव्हा सामान्य माणसाच्या भल्यासाठी अहोरात्र एक करतो तेव्हा व्यवस्थेवरचा, यंत्रणेवरचा विश्वास दृढ होतो. वर्दी अंगावर असतानाही एखादा माणूस सामान्य माणसात मिसळून काय करू शकतो हे पहायचे असेल तर राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याकडे पहावे. हैदराबादच्या जवळच असलेल्या तीन पोलीस आयुक्तालयांमध्ये राचकोंडाचा समावेश होतो.

महेश भागवत 1995 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे. त्यांचे आईवडील शिक्षक. पाथर्डीच्या विद्यामंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हील इंजिनिअरींग केलं. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील अनेक अधिका-यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत. त्यांनी मानवी तस्करीच्या विरूद्ध जो लढा उभारला त्याची दखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. अमेरिकेच्या गृहखात्याने नुकतेच त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज ऍवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. भारतात विविध क्षेत्रातील सात जणांना हा पुरस्कार दिला गेलाय. गोव्याचे पोलीस आयुक्त आमोद खान यांना 2005 साली, 2009 साली आंध्रप्रदेशच्या एस. उमापती यांना, मुंबईतील पीटा न्यायालयाच्या न्यायधीश स्वाती चव्हाण, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यर्थी, पद्मश्री डॉ. सुनिता कृष्णन यांना हा सन्मान देण्यात आला होता. भागवत यांच्यासह जगभरातील सात पोलीस अधिका-यांचा यंदा या सन्मानाने गौरव करण्यात येणार असून हा सन्मान मिळवणारे ते भारतातील तिसरे पोलीस अधिकारी ठरले आहेत.

वॉशिंग्टन येथे 2017 चा ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. अमेरिका हा अहवाल प्रकाशित करते. त्या अहवालात भागवत यांनी मानवी तस्करी विरोधात केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. अमेरिकेची यंत्रणा या विषयावर सर्वेक्षण करते. जे देश मागे आहेत त्यांना याबाबतचा अहवाल देऊन सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येतात. यंदा अमेरिकेचे सेक्रेटरी आणि राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार युवांका ट्रम्प यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले व त्यांनी स्वतः हे पुरस्कार दिले. 

2004 ला महेश भागवत सायबराबाद क्षेत्राचे पोलीस उपायुक्त होते. सायबराबाद हा हैदराबाद येथील अत्यंत संवेदनशील भाग. चारमिनारही याच परिसरात येतो. त्यावेळी त्यांची रात्रपाळी असायची. एकदा त्यांना एका रिसॉर्टची माहिती मिळाली. मुंबई आणि कोलकत्याच्या मुली तिथे वेश्या व्यवसायासाठी यायच्या. भागवतांनी तिथे छापे मारले. कुणाला संशय येऊ नये म्हणून 15 दिवस त्या मुली हैदराबादला  स्कूल बसने यायच्या. रात्री हा उद्योग चालायचा. जुन्या आंध्रातून मुली भारतातल्या ब-याच शहरात पाठवल्या जायच्या. 

2004 साली त्यांची नलगोंडा पोलीस अधिक्षकपदी बदली झाली. तिथे असताना त्यांना एक भयंकर प्रकार कळला. डोंबारा  (डोंबारी) या जातीत जन्मलेल्या प्रत्येक मुलीने आणि महिलांनी  वेश्या व्यवसायच करायचा अशी तिथे प्रथा होती. त्याठिकाणी यादगिरीगुट्टा नावाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. तिथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. भागवतांनी सुरूवातीला छापे टाकून मुली पकडल्या. कुंटणखाने बंद केले. मग त्या पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, ‘‘आम्हाला पर्यायी काम द्या... आम्ही हे थांबवतो.’’ 

या महिलांसाठी त्यांची मुलंच ग्राहक शोधून आणायचे. त्या मुलांना त्यांचा बाप कोण हेही माहीत नसायचं. ही मुलं इतर मुलींनाही या व्यवसायात आणायची. त्यावर भागवतांनी कठोर कारवाई केली. ‘आसरा’ नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यात जिल्हाधिकारी, महसूल खातं, शिक्षण खातं, ग्रामीण विकास यंत्रणा, ओबीसी कॉर्पोरेशन, अशासकीय सदस्य म्हणून स्वयंसेवी संस्था, इंडियन रेडक्रॉस आणि जवळपासचे उद्योग यांचा सहभाग करून घेतला. या प्रकल्पाची दोन सूत्रं होती. एक तर या बायकांची सुटका करणं आणि दुसरं त्यांना जे प्रवृत्त करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणं. मग त्यातून बाहेर पडलेल्या बायकांचे बचत गट तयार केले. त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं. तीन-तीन महिन्यांचे उद्योग प्रशिक्षण दिले. जवळपासच्या उद्योगात काहींना रोजगार मिळाला. यांची चार-पाच वर्षापासून ते पंधरा वर्षांपर्यंतची मुलं होती. ती शाळेत जात नव्हती. म्हणून त्यांच्यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा सुरू केली. निवासी शाळा होती ती! त्यात 65 मुलं होती. एक वर्ष ती शाळा चालल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना रेग्युलर शाळेत टाकले. 

या महिलांची 10-15 तरूण मुलेही होती. त्यांना पोलीस हेड क्वॉर्टरमध्ये प्रशिक्षण देऊन खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून नोक-या मिळवून दिल्या. यांचे पुनर्वसन केल्यानंतर 90 टक्के वेश्या व्यवसाय थांबला. मुख्य म्हणजे त्यांच्या हद्दीतील गुन्हे कमी झाले. 2006 साली त्यांच्या या प्रकल्पाला अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे दोन पुरस्कार मिळाले. त्यासाठी  महेश भागवत आणि त्यांचे एक पोलीस निरीक्षक बॉस्टनलाही जाऊन आले. 

त्यानंतर सीआयडीला पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली. तिथं आल्यावर एक प्रकल्प आला. यू. एन. ओ. डी. सी आणि भारताचं गृहमंत्रालय या दोघांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी पाच राज्यं निवडली. त्यात पोलिसांना प्रशिक्षित करणं, स्वयंसेवी संस्था, पोलीस यांना एका छत्राखाली आणणं, त्या व्यवसायातून सोडवलेल्या महिलांना स्वावलंबी करणं, त्यांना त्रास न देता त्यांना उद्युक्त करणा-यांवर, त्यांच्या जीवावर जगणा-यांवर कठोर कारवाई करणं असा तो प्रकल्प होता. हा पहिला प्रकल्प हैदराबादला सुरू झाला. मग त्यांनी नियोजनबद्ध काम केलं. हैदराबाद येथून मुली मुंबई, भिवंडी, पुणे, गोवा, बंगलोर, दिल्ली इथं कुंटणखान्यात नेल्या जात होत्या. चंद्रपूर, यवतमाळ, वनी इथं चालणार्‍या वेश्या व्यवसायावर भागवतांनी छापे मारले. पहिली कारवाई जानेवारी 2007 मध्ये भिवंडीला हनुमान टेकडी परिसरात केली. त्यात अनेक बायकांची सुटका झाली. त्यातील अल्पवयीन मुलींना स्वयंसेवी संस्थांकडे दिले. त्यावेळी  एका राज्यातून दुस-या राज्यात काम करताना कसे करायचे, एकमेकांना कशी मदत करायची, गुन्हेगारी कमी होण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा त्यांनी अभ्यास केला. पुरावे कसे गोळा करायचे, नंतर सर्वत्र छापे कसे मारायचे याचे प्रशिक्षण त्यांनी दिले. महिलांचे पुनर्वसन केले. त्यातून लेखनही सुरू केले. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या मानवी तस्करीच्या अभ्यासक्रमात महेश भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा समावेश आहे. 

 2009 साली त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली. तिथं त्यांच्या हद्दीत चार जिल्हे होते. तिथून सगळ्यात मोठा वेश्या व्यवसाय चालायचा. सिंगापूर, मलेशिया, दुबई मद्रास, बंगलोर, दिल्ली इकडं महिला पाठवल्या जायच्या. म्हणून पुन्हा तिथं तेच काम सुरू केलं. त्यावेळी त्यांनी दुबईहून दोन मुलींची सुटका केली. एका मुलीला सिंगापूरला पाठवलं जात होतं. त्यावर वेळीच कारवाई करून तिची सुटका केली आणि संबंधितांना दहा वर्षांची शिक्षाही झाली. कुंटणखाने बंद केले. ‘पीटा’चा कायदा 1956 पासून आहे. 1986 पासून तो अंमलात आला. हा पीटाचा कायदा खूप प्रभावी आहे. त्यात  लहान मुलींना घेऊन कुणीकुंटणखाना चालवत असेल तर तीन वर्षासाठी तो सील करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांना दिलेत. ते सील केल्यावर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. दुर्दैवानं हा कायदा वापरण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे नसते. तो कायदा वापरायला आणि कुंटणखाने सील करायला भागवत आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरूवात केली. 

तेलंगणातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात चद्दापूरम् नावाचे गाव आहे. या गावाचा दोनशे ते तीनशे वर्षाचा कुंटणखान्याचा इतिहास आहे. ते कुंटणखाने भागवतांनी बंद केले. लॉजेस, ब्युटी पार्लर येथील वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई केली. त्यानंतर 1 जुलै 2016 ला त्यांची पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हा लक्षात आलं की या व्यवसायाचंही स्वरूप आता बदललंय. इकडंही ऑनलाईन सुरू झालंय. वेश्या व्यवसायाठी वेबसाईट वापरल्या जातात. त्यावर नंबर दिले जातात. मागणी असेल त्याप्रमाणे मुली पाठवल्या जातात. मग त्यांनी त्यावर लक्ष ठेवलं. शंभरएक मुलींची त्यातून सुटका केली. दोनशे-अडीचशे ठिकाणी कारवाई केली. इतक्या मोठ्या स्वरूपात प्रथमच कारवाई झाली.

भागवतांनी बालकामगार विरोधी अभियानही सुरू केलं. विटभट्ट्यावर ओडिसाची मुलं येतात. त्यांना सहा महिन्यासाठी हजार-दोन हजार रूपये दिले जातात आणि त्यांच्याकडून दिवसरात्र काम करून घेतलं जातं. त्यांचे काही पालक सोबत असतात. काहीवेळा बोगस पालकही या मुलांबरोबर येतात. त्या विटभट्ट्यावर छापे मारून आजवर 498 मुलांची सुटका केली. नंतर त्यांना शाळेत घातले. ‘ओडिया’ ही यांची मातृभाषा. म्हणून ओडिसातून शिक्षक आणले आणि त्यांना शिक्षण दिले. हे सगळं काम पुढं आल्यानं त्यांना हा पुरस्कार मिळाला. ‘‘तेलंगण सरकार आणि पोलीस दलाने मानवी तस्करी संपुष्टात आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याचा हा गौरव आहे,’’ असं महेश भागवत सांगतात.

प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने उंच व्हावी अशी त्यांची कर्तबगारी आहे. त्यांच्या अचाट कर्तृत्वाला, धाडसाला, जिंदादिलपणाला सलाम! 
- घनश्याम पाटील, 
संपादक, प्रकाशक, 'चपराक', पुणे
7057292092
ghanshyam@chaprak.com

इतरही दर्जेदार लेख वाचण्यासाठी भेट द्या - www.chaprak.com