Saturday, February 25, 2017

ही राजभाषा असे!

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला यात दिवसेंदिवस प्रगती होत असताना आपण 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करतो. ज्यांनी मराठीला सौंदर्यपूर्ण साज चढवला अशा कुसुमाग्रजांचा म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांचा जयंतीदिन हा ‘भाषा दिन म्हणून साजरा करणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात आणि देशात नव्या पर्वाची नांदी लागलेली असताना, जातीय आणि प्रांतीय अस्मिता टोकदार बनत चाललेल्या असताना आपल्यापुढे भाषेच्या संवर्धनाचे मोठे आव्हान आहे. एकीकडे मराठीत रोज उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित होत आहेत, नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत, नाटकाचे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत आहेत, प्रवचन-कीर्तनासारख्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमतेय आणि दुसरीकडे ‘वाचक नाहीत’, ‘मुलं मराठी बोलत नाहीत’ अशा आवया दिल्या जात आहेत. शहरी भागातील एक ठराविक वर्ग सोडला तर अजूनही रोजच्या जीवनात मराठीचाच वापर केला जातो आणि संवादाचे प्रमुख माध्यम मराठीच आहे. तरीही मराठी ‘संपल्या’ची अफवा पसरविली जाते! यापुढे तो दखलपात्र गुन्हा ठरवायला हवा.
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा ठेका आपणच घेतलाय, असा ‘समज’ असणारे काही राजकीय पक्ष, साहित्य संस्था, ठराविक साहित्यिक आणि मुख्यत्वे मराठीतील प्राध्यापक मंडळी, नियतकालिके यांनी मराठीचे वाटोळे करण्यात मोठा हातभार लावलाय. काही अपवाद वगळता, आजच्या मराठीच्या प्राध्यापकांचे वाचन पाहता या परिस्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकेल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही अनेकदा कोणी ना कोणी मराठीचे प्राध्यापकच असतात. वर्षानुवर्षे साहित्यिक निष्ठेने विविध संमेलनाला हजेरी लावणारा रसिक, संपूर्ण हयात मराठी भाषेचे अध्यापन करणारा  एखादा तत्त्वनिष्ठ शिक्षक, कीर्तनाच्या माध्यमातून रंजन आणि प्रबोधन करणारा एखादा कीर्तनकार, ‘लावणी’सारख्या माध्यमातूनही मराठी भाषा जिवंत ठेवण्यास हातभार लावणारी एखादी कलावंत, दुर्गम भागात वाचनसंस्कृती टिकून रहावी यासाठी अहोरात्र कार्यरत असलेला ग्रंथालय चळवळीतील एखादा कार्यकर्ता, किंबहुना उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारा कुणी प्रकाशक किंवा कष्टपूर्वक ती सर्वत्र वितरित करणारा विक्रेता यांच्यापैकी किंवा अशांपैकी कोणी एखादा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला काय हरकत आहे? यांनीही मराठी भाषा जिवंत ठेवण्यात मोठे योगदान दिलेच आहे की! प्राध्यापकीय वर्तुळात अडकलेला साहित्याचा हा केंद्रबिंदू इकडे वळला तर आपली भाषा अजून सशक्त होऊ शकते.
‘चांगले ते स्वीकारायचे’ आणि ‘वाईट ते अव्हेरायचे’ ही आपली वृत्ती असायला हवी. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात इतर भाषेतले अनेक शब्द मायमराठीने स्वीकारले आहेत. त्यावरून वादंग घालण्याऐवजी भाषा अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठीतच बोलणे, मराठीतच लिहिणे याला आपण प्राधान्य द्यायला हवे. अनेकजण आपली ‘सही’ सुद्धा मराठीत करत नाहीत. बहुभाषिकता ही काळाची गरज आहे. इतर भाषांचा मुळीच द्वेष करू नये; मात्र आपली भाषा आणखी समृद्ध व्हावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी नाही का?
प्रकाशक या नात्याने मी भाषेबाबत आग्रही असतो. आमच्याकडे अनेक लेखक त्यांची संहिता पाठवतात. त्यात हिंदी, इंग्रजी आणि अन्य भाषेतील अनेक शब्दांचा भडिमार असतो. ती संहिता मी हमखास नाकारतो. एका विख्यात लेखकाने त्यावरून माझ्याशी वाद घातला. ते म्हणाले, ‘‘मी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकात सातत्याने लिहितो. आजवर मला कोणीही भाषेवरून कधी बोलले नाही. काही नामवंतांचे विचार ‘कोट’ करायचे असतील तर इंग्रजीला पर्याय नाही...’’
बराच वेळ समजावून सांगूनही त्यांना त्याचे महत्त्व पटत नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘‘ठीक आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या एखाद्या वृत्तपत्रात तुम्ही तुमचा लेख छापून आणा आणि त्यात मध्ये मध्ये मराठी शब्द पेरा...’’
ते म्हणाले, ‘‘हे कसे शक्य आहे? ते असे काही छापणार नाहीत...’’
‘‘मग मराठी नियतकालिकांनी तुमच्या लेखनातील इंग्रजी शब्द, वाक्यं आणि काहीवेळा उतारेच्या उतारे का छापावेत?’’
त्यावर ते निरूत्तर झाले.
आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याच्या जतन आणि संवर्धनासाठी आपणच तर पुढाकार घ्यायला हवा. बरं, इंग्रजी वापरण्याच्या दुराग्रहापोटी आपण अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थही पडताळून पाहत नाही. उदारहरणच घ्यायचे झाले तर ‘मिसेस’ या शब्दाचे घेऊया! ‘बायको’साठी मिसेस हा शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरला जातो. ‘ऑक्सफर्ड’ हा जगन्मान्य शब्दकोश आहे. यात ‘मिसेस’चा अर्थ काय दिलाय ते पहा! मूळ शब्द ‘मिस्ट्रेस!’ त्याचा अपभ्रंश झालाय ‘मिसेस.’ मराठीतला अर्थ काय दिलाय माहीत आहे का? तो आहे - रखेल, अंगवस्त्र किंवा लग्न न करता ठेवलेली बाई!
हे असे का झाले? कारण त्यावेळी इंग्रजांचे जगावर राज्य होते. इतर देशात राज्य करताना त्यांच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी ज्या बायका ठेवायचे त्यांना ते ‘मिसेस’ म्हणायचे. लग्नाच्या बायकोसाठी इंग्रजीतला योग्य शब्द आहे ‘वाईफ.’ आपल्याकडे मराठीत बायको, अर्धांगिनी, भार्या, पत्नी, खटलं, बायडी असे कितीतरी शब्द असताना आपण अभिमानाने सांगतो की, ‘ही माझी मिसेस...’ त्यांना काय बोलावे?
मराठीला दुसरा रोग लागलाय द्विरूक्तीचा. त्यातही अनेकवेळा इंग्रजी शब्दांचा आधार घेतला जातो, काहीवेळा मराठीतही द्विरूक्ती होते. उदहारणार्थ - गाईचे गोमूत्र! आता गोमूत्र काय बैलाचे असणार का?, महिला लेखिका, महिला नगरसेविका असे शब्दही सध्या सर्रासपणे वापरले जातात. ‘लेखिका’ म्हटल्यावर ती ‘महिला‘ आहे हे सांगणे किती हास्यास्पद! पिवळं पितांबर, गोल सर्कल, लेडिज बायका, चुकीची मिस्टेक झाली असेही शब्द आणि वाक्य ऐकायला मिळतात. पाठिमागचे ‘बॅकग्राऊंड’ किंवा ‘सरकारी जी. आर.’ असे शब्दही प्रचलीत होत आहेत. माझा एक मित्र सांगतो, ‘‘मी रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो...’’ त्याला म्हणालो, ‘‘आम्ही रात्री मॉर्निंग वॉक करतो.’’ आणखी एक मित्र नेहमी सांगतो, ‘‘काल रात्री माझी नाईट होती...’’ आता यांच्याकडे ‘दिवसा’ही ‘नाईट’ असेल बहुतेक! अशा कितीतरी शब्दांनी आपण आपल्या भाषेच्या हत्येचे सत्र सुरू ठेवले आहे.
मध्यंतरी एका अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्याचा मला दूरध्वनी आला. तो म्हणाला, ‘‘दादा, मी तुमचे लेखन नियमित वाचतो. तुम्ही खोटे लिहिणार नाही, याची मला खात्री आहे; पण शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचा खरंच ‘मर्डर’ केलाय का हो? हे तुम्ही ठामपणे लिहिलेय म्हणजे तुमच्याकडे काहीतरी पुरावा नक्की असेल...’’ क्षणभर मला घामच फुटला. सध्या माझ्या लेखनात सोयीस्कर फेरफार करून किंवा काहीवेळा चक्क माझे नाव टाकूनही त्यांना हवा असणारा मजकूर समाजमाध्यमातून फिरवला जातो. मला वाटले कोणीतरी आगाऊपणा केलेला दिसतोय. त्यामुळे त्याला मी शांतपणे संदर्भ विचारले. तो म्हणाला, ‘‘या अमुक अमुक लेखात तुम्ही लिहिलंय की, शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसला...’’ मग तो ‘पॉलिटिकल मर्डर’ होता हे त्याला इंग्रजीत सांगेपर्यंत कळले नाही... विशिष्ट वर्गातले हे चित्र नक्कीच दुर्देवी आहे.
मध्यंतरी एक वाक्य वाचण्यात आलं होतं. ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा, मी तुम्हाला ‘ममी’ म्हणणारे हजारो हिंदुस्थानी दाखवेन!’ किती खरे आहे हे! विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या आहारी जाऊन आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत होत चालल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं तरी आपण सुधरायला तयार नाही.
मराठीला इंग्रजीचा जितका धोका आहे तितकाच, नव्हे त्याहून अधिक धोका ‘हिंदी’चा आहे. हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे या अज्ञानातून आणि भ्रमातून आपण बाहेर पडायला तयार नाही. आपल्या राज्यघटनेत भारताला राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही केवळ ‘संपर्क भाषा’ आहे. ‘संस्कृत’ ही राष्ट्रभाषा व्हावी असा अनेकांचा आग्रह असताना पंडित नेहरू यांनी त्याला विरोध केला आणि हिंदीचा हट्ट धरला. ‘उत्तर प्रदेशपेक्षा कोणतेही राज्य मोठे नसावे आणि हिंदी सर्वांवर लादली जावी’ असे त्यांचे मत होते. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. त्या वादात भारताला कोणतीही ‘राष्ट्रभाषा’ नाही हे सत्यच आपण विसरलो. म्हणूनच अनेक हिंदी शब्द आपल्याकडे सर्रासपणे वापरले जातात. बरं, हिंदी चित्रपटातून दाखवले जाते तेही अस्खलित हिंदी नसते. ज्याला हिंदीचे उमाळे दाटून येतात त्याने आपल्या प्रशासकीय कामकाजातील हिंदी वाचावी आणि त्याचे अर्थ लावावेत. एकेकाची भंबेरीच उडेल.
मराठी भाषा दिन हा एका दिवसापुरता ‘साजरा’ होऊ नये! आपण आपले मराठीपण रोज जगायला हवे. तसे वागायला हवे. भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर आपले राष्ट्र पुन्हा बेचिराख होईल. भाषा शुद्धिकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्यासाठी आपण आता पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने किमान मराठीत बोलणे सुरू केले तरी खूप फरक पडेल. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ आपली मातृभाषा आहे. ही राजभाषा आहे. आपण आता सजगपणे हालचाल केली नाही तर आपल्याच मातृभाषेचा खून आपणच केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे. मराठी माणूस इतका अविवेकी आणि कृतघ्न नक्कीच नाही. आपण सर्वांनी म्हणूनच मराठीतच बोलावे, मराठीतच लिहावे, मराठी वाचावे, मराठीतच व्यक्त व्हावे या शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, February 18, 2017

संवेदनशील कल्पनारम्यतेचा परिणामकारक आविष्कार

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणे, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारे असावे. असे लेखन करणार्‍या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे समीर नेर्लेकर! कवी, कथाकार, तंत्रज्ञ, चित्रकार अशा अनेक भूमिकांतून ते सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांची ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ व ‘हसण्यावर टॅक्स नाही’ ही पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली. त्यांचा हा लघुकथा संग्रहही वाचनीय आणि तितकाच उद्बोधक आहे. वाचकांना उपदेशाचे डोस न पाजता साध्या-सोप्या भाषेत त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करणे ही नेर्लेकरांची खासीयत असल्याने हा कथासंग्रह सर्वांना हवाहवासा वाटेल.
यात एकूण बारा कथा आहेत. प्रत्येक कथा म्हणजे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान. त्यात नेर्लेकरांची स्वतंत्र शैली. त्यांची भाषा हेच तर त्यांचे सामर्थ्य. प्रत्येकाला वाचावेसे वाटेल आणि त्यातून वाचनानंदाबरोबरच काहीतरी हरवलेले गवसल्याचे समाधान वाटेल असे त्यांचे लेखन. मराठी कथा सशक्त होण्यासाठी असे प्रयोग व्हायलाच हवेत.
‘पांढरी बट’ ही कथा वरकरणी रूक्ष व खडूस वाटणार्‍या ‘बॉस’ची आहे. असे अनेक वरिष्ठ आपल्या आजुबाजूला असतात आणि अशा ‘नारळा-फणसा’सारख्या माणसांची खरी ओळख व्हायला आपल्याला अनेकदा बराचसा काळ जावा लागतो. ऐन पंचवीशीतले ज्युनिअर सिनेमा पाहण्यासाठी ‘शॉर्ट लिव्ह’ मागायला बॉसच्या केबिनमध्ये जमतात. बॉसचा गंभीर चेहरा पाहून सगळ्यांच्या नजरा खाली जातात. पुढे काय घडणार आणि आपल्या सुटीचे काय होणार या विचारात असतानाच बॉस मात्र पंचवीस वर्षापूर्वीच्या इतिहासात जातात. जेव्हा उमेदवारीच्या काळात बॉसला अशी सुट्टी हवी असते तेव्हा त्याची बॉस त्यांना कशी वागणूक देते याची आठवण जागी होते आणि कथानक फुलत जाते. पंचवीस वर्षांनीही तिची ‘पांढरी बट’ बॉसला ‘माणुसपणाची’ शिकवण देते.
मनुष्य हा मुळातच प्रयोगशील प्राणी आहे. त्यात आजची पिढी तर आणखी चंट! ही मूलं काय काय करत बसतील हे भल्याभल्यांना कळणे शक्य नाही. रविवारच्या रम्य सकाळी वामनरावांच्या घरात अचानक पाणी येणे बंद होते. नळाला पाणी येत नसल्याने सौभाग्यवती त्यांना साखर झोपेतून उठवतात. ते एका प्लंबरला बोलावतात. तोही संपूर्ण पाईपलाईन बदलण्याचा सल्ला देतो. खरेतर वामनरावांच्या चिरंजीवाने केलेला हा प्रताप! गोट्या त्याची करामत सांगतो आणि वामनरावांच्या घरातील पाणीप्रश्‍न सुटतो. म्हटले तर अगदी साधे कथासूत्र असलेले ही कथा; पण नेर्लेकरांनी ज्या शैलीत ती मांडलीय ती पाहता मराठी कथेच्या भवितव्याची कोणीही चिंता करण्याचे कारण नाही.
जसं मुलांचं तसंच बायकांचंही! त्यादृष्टिने त्यांची ‘पियानो वाजवणारी राजकन्या’ ही कथा पहायला हवी. ‘स्त्री म्हणजे काय?’ असा सवाल एक शिष्य त्याच्या गुरूला करतो आणि अंतरात्म्याला साद घालत, सर्व ज्ञानकोश उलगडूनही त्यांना त्याचे उत्तर मिळत नाही. तो साधू, तो शिष्य आणि त्यांच्या शोधाचे साधन असलेली ती राजकन्या यापैकी कोणीही आज हयात नाही; मात्र कथाकार नेर्लेकर यांच्यासह वाचकही या प्रश्‍नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत.
‘वधुपिता आणि मी’ हा मेलोड्रामा आजच्या परिस्थितीवर चपखल भाष्य करतो. प्रत्येक वधुपिता उत्तम जावयाच्या शोधात असतो. जवळपास प्रत्येकाला आपला जावई धनाड्य, कमावता असावा असेच वाटते. ते स्वतः ‘आपण किती शून्यातून वर आलोय’ याच्या फुशारक्या मारत असतात; मात्र जावई मात्र स्थिरस्थावर असलेलाच लागतो. ‘तुमचे लग्न झाले तेव्हा तुमच्याकडे काय होते? तुम्हीदेखील अंगावरच्या कपड्यानिशी खेड्यातून या शहरात आला होता, असं तुमची मुलगी सांगते’ असं थेट वधुपित्याला सुनावण्याचं धारिष्ट्य नेर्लेकरांच्या कथानायकात आहे. आजच्या तमाम तरूणाईचं प्रतिनिधित्व करणारा हा नायक अशा तरूणांना त्यांचा ‘बुलंद’ आवाज वाटल्याशिवाय राहणार नाही. वस्तुस्थितीवर अचूक बोट ठेवत समाजातली, दोन पिढ्यातली, परिस्थितीतली विसंगती दाखवून देण्यात नेर्लेकर पटाईत आहेत. हे काम ते इतक्या खुबीने करतात की, मनातली अढी कधी आणि कशी दूर झाली, अजिबात न दुखता हा काटा कधी आणि केव्हा निघाला हेही संबंधितांना कळत नाही. ‘एक दिवस माझी नायिका प्रेक्षकांमधून धावत येईल रंगमंचावर, माझ्या दिशेने बाहू पसरून...’ असा आशावाद त्यांनी पेरलाय. हा आशावाद म्हणजे आजच्या तरूणांच्या मनातला हुंकारच जणू!
‘पोस्टमार्टम’, ‘स्पर्श’ या कथाही त्यांच्या भावभावनांचं प्रगटीकरणच आहेत. या कथा आजच्या पिढीच्या आहेत. त्यांनी त्या वाचायलाच हव्यात. त्यांच्याच मनातील भावना नेर्लेकरांनी शब्दबद्ध केल्यात. एखादा गुलाब नशिबवान असतोच. तो कुणाच्या हायहील्सच्या सँडलखाली तुडवला जात नाही किंवा त्याचं पोस्टमार्टमही होत नाही. तो टेबलावरच्या फुलदाणीत रूबाबात बसतो!!
‘स्पर्श’ ही एक रहस्यकथा आहे. कथांचे सगळे फॉर्म एकाच पुस्तकात समर्थपणे आणि पूर्ण सामर्थ्यासह हाताळण्याचा यशस्वी प्रयोग नेर्लेकरांनी केलाय. ही कथा वाचताना वाचक स्तब्ध होतात. ‘पुढे काय’ हा कथेचा आत्मा असतो. ही उत्कंठा शेवटपर्यंत जिवंत ठेवण्यात ‘स्पर्श’ यशस्वी ठरलीय. या स्पर्शाचे हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा मुळातूनच वाचायला हवी.
‘ती सध्या काय करतेय?’ हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. ‘ती’च्या बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असणे हा मानवी स्वभावाचा गुणधर्मच आहे. मात्र वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू असताना ‘ती’चा खूप वर्षांनी अचानक एका ‘मीटिंग’साठी मेल येतो. ही ‘ती’ म्हणजे ‘ती‘च आहे हेही नायकाला माहीत नसते. तिला वाटते आपण खरे सांगितले तर कदाचित तो येणार नाही. म्हणून तिही अशा पद्धतीने त्याला बोलवून घेते. मग या ‘मीटिंग’मध्ये नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
या कथामाळेतील ‘शिरोमणी’ म्हणजे ‘है क्या आव्वाज’ ही कथा. प्रत्येक बापाने वाचावी आणि आपल्या मुलांना वाचायला द्यावी अशी ही ‘दमदार’ कथा. सध्या अनेकांना ‘स्वत्त्वा’चाच विसर पडतो. हे स्वत्त्व जागे करण्यासाठी ‘है क्या आव्वाज’ म्हणजे मैलाचा दगड ठरेल. अनेक सुप्त गुण, क्षमता आपल्यात मुळातच असतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात आणि जीवनाच्या रहाटगाड्यात आपल्याला त्याचा विसर पडतो. मग अगदी किरकोळ आणि फुटकळ घटकही आपला गैरफायदा घ्यायला  लागतात. कुणाला रॅगिंगसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कुणाला सहकार्‍यांचा, इमारतीतील सदस्यांचा त्रास सहन करावा लागतो तर कुणाला दहशतीला, गुंडगिरीला सामोरे जावे लागते.  हतबलतेतून आलेले नैराश्य आणि अन्याय सहन करायची वृत्ती यामुळे आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’चा जप करतो. थोडेसे धाडस अंगी बाळगले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात याचाही विवेक आपल्यात उरलेला नसतो. हा विवेक जागा करण्याचे काम नेर्लेकरांची कथा करते. शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत सगळे काही बरबटलेले असताना त्यावर सामान्य माणूस काय ‘तोडगा’ काढू शकतो यावर ती भाष्य करते.
सिंडल आणि मेगा समुद्रतळावर जेव्हा एकत्र येतात... मग काय घडत असावे? त्यासाठी ‘शिंपला’ ही कथा अवश्य वाचा. इमारतीच्या पॅसेजमधून डक्टमध्ये भिरकावलेला तो शिंपला अजूनही तिथेच तरंगतोय! कथा नायकाच्या घराबाहेर!!
‘अडगळ’ वाचताना तर आपण हेलावून जातो. आपल्या सासूबाई ठणठणीत बर्‍या व्हाव्यात यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करणारी सूनबाई बघितली की ‘धन्य’ व्हायला होते. असे नातेवाईक बघितले की ‘नातेवाईट’ असतात यावर कोणीही विश्‍वास ठेवेल. म्हातारीची ‘काळजी’ घेण्यासाठी मुलगा आणि सून किती खालच्या थराला जाऊन त्यांना ‘ऍडमिट’ करतात हे वाचून संताप अनावर होतो. काळ कितीही बदलला तरी मुला-सुनेची ही हरामखोरी आपणाला अस्वस्थ करतेच. हेच अस्वस्थलेपण आपल्या माणूसपणाची, जिवंतपणाची साक्ष देतात. अशा कथांतून परपिडा समजून घ्यायला मदत होते.
‘सप्तमातला केतू’ आणि ‘मुखवटा’ या लघुकथाही समीर नेर्लेकर यांच्या क्षमतेची चुणूक दाखवून देतात.
‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हे संग्रहाचे शीर्षक देण्यामागचा त्यांचा उद्देशही मजेशीर आहे. त्यांच्या आयुष्याचे त्यांनी पंधरा पंधरा वर्षाचे तीन टप्पे केलेत. या प्रत्येक टप्प्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. खरेतर नेर्लेरांनी त्यावर आत्मचरित्रात्मक लेखन करायला हवे. त्यांचे वडील स्व. सुधाकर नेर्लेकर यांनी ‘पहाट प्रकाशन’ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अनेक लेखक-कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा ‘उद्योग’ ही नेर्लेकरांची ‘वंशपरंपरागत’ वृत्ती आहे. त्यात स्वार्थाचा लवलेश नसतो. त्यामुळेच माणूस म्हणून असलेले त्यांचे सच्चेपण भावते. याच निरागस आणि निर्मळतेतून त्यांचे साहित्य आल्याने त्याला पावित्र्याची झालर असते. मुख्य म्हणजे या संग्रहाचे आकर्षक, सूचक मुखपृष्ठ दस्तुरखुद्द समीर नेर्लेकरांनीच साकारले आहे. लेखक आणि मुखपृष्ठकार एकच असण्याचा दुर्मीळ योग या पुस्तकाने साधलाय.
समीर नेर्लेकर हे मराठी साहित्यातलं एक चिंतनशील बेट व्हावं आणि भविष्यात त्यांनी उत्तमोत्तम लेखन करून त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवावा यासाठी त्यांना तहे दिल से शुभेच्छा देतो!!

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

केतकीची सुरक्षा आणि आयोजकांना मनस्ताप

मराठीत उत्तमोत्तम बालकलाकार निर्माण होतात. अंगभूत कला आणि अत्यंत कठोर परिश्रम, त्यातील सातत्य यामुळे अनेकजण पुढच्या आयुष्यात यशस्वी होतात; तर काहीजण काळाच्या ओघात कुठे हरवले ते लक्षातही येत नाही. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाटे, रोहित राऊत या व अशा टीव्ही शोमुळे पुढे आलेल्या कलाकारांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. आर्या आंबेकर, रोहित राऊत हे यशस्वी होताना दिसतात. कार्तिकीच्या वडिलांनी सतत कार्यक्रमाच्या सुपार्‍या घेऊन तिला संपवले असाही आक्षेप घेतला जातो. सध्या ‘सैराट’मुळे चर्चेत आलेले रिंकु राजगुरू, आकाश ठोसर हे कलाकारही पुढे कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हे सारे मांडण्याचे कारण म्हणजे ‘टाईमपास’मुळे थोडेसे वलय प्राप्त झालेली कलाकार केतकी माटेगांवकर! जळगावमध्ये बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या केतकीला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागला. या मनस्तापाला वैतागून तिच्या वडिलांनी म्हणजेच पराग माटेगांवकरांनी एक पत्र लिहून थेट राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्याकडेच तक्रार नोंदविली आहे. तिथे घडलेल्या प्रकारामुळे केतकीला आणि तिच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचेही त्यांनी सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे
पुन्हा कोणत्याही महिला कलाकारासोबत अशी घटना घडू नये’ अशी मागणीही त्यांनी महासंचालकांकडे केली आहे. प्रथमदर्शनी ही तक्रार रास्त वाटत असली तरी नाण्याची दुसरी बाजुही पडताळून पहायला हवी.
केतकीची आई सुवर्णा माटेगावकर या उत्तम गायिका आहेत. विविध क्षेत्रातील लोकांच्या साठी-पासष्ठीनिमित्त गाणे गाऊन उपस्थितांचे मनोरंजन करण्याचे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेत. त्यानंतर त्यांचे गाण्याचे अनेक अल्बमही गाजले. अशा कार्यक्रमात अर्थातच केतकीची अनेकदा त्यांना साथ असायची. त्यातूनच कलाकार म्हणून तिची जडण-घडण झाली. असे ‘कमर्शिअल’ कार्यक्रम करणारे कलाकार आपल्याकडे कमी नाहीत. या क्षेत्रावरील निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे माटेगांवकर मायलेकींप्रमाणे काहींना यश मिळते. त्यातून असंख्य चाहते निर्माण होतात. समाजमाध्यमांमुळे सध्या अनेक कलाकारांचा बोलबाला होतो. युवापिढी त्यांच्याकडे आकर्षित होते. त्यातून काहीवेळा अशा घटना घडतात. घसघशीत मानधन देऊन अशा कलाकारांना कार्यक्रमासाठी बोलवणारे आयोजक मात्र तोंडघशी पडून बदनाम होतात.
केतकी सध्या एक वलयांकित कलाकार आहे. हे वलय किती काळ राहील हे कोणीही सांगू शकत नाही. जळगावात बहिणाबाई महोत्सवात तिला पाहुणी म्हणून बोलावल्यानंतर तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आयोजकांचे कर्तव्य होते. त्यात निश्‍चितपणे ते कमी पडले असतील; मात्र आपल्याकडील लोकांची मानसिकता केतकीला आणि तिच्या सोबत आलेल्या तिच्या वडिलांना माहीत नाही असे कसे म्हणता येईल? गलेलठ्ठ मानधन घेऊन विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करणारे असे कलाकार स्वत:चे सुरक्षारक्षक का नेमत नाहीत? जळगावात केतकीभोवती जो गराडा पडला तो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा होता. प्रामुख्याने त्यातील तरूणींना दूर सारणे आयोजक, कार्यकर्त्यांना शक्य झाले नाही. बहिणाबाई महोत्सवात बचत गटातील महिलांचे आणि विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणार्‍या महिलांचे सत्कार केतकीच्या हस्ते करण्यात आले. तिने आयोजकांना जो वेळ दिला होता त्याच्या आधीच तिथून ती निघाली. या कार्यक्रमासाठी तिने तब्बल दीड लाख रूपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. हा कार्यक्रम ठरल्यानंतर जवळपासच्या विविध संस्थांचे चार-पाच कार्यक्रम ऐनवेळी तिने स्वीकारल्याने बहिणाबाई महोत्सवातून लवकर निघण्याची घाई तिला झाली. त्यामुळे आयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांकडे लक्ष द्यावे की तिला बाहेर सोडावे हेच कळत नव्हते. तेथील काही महिलांनी आणि ढोल पथकाच्या मुलींनी कडे करून केतकीला सुखरूप बाहेर काढले. भांडून, आग्रह करून मानधन भरगच्च घ्यायचे आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघायचे हे काही बरे नाही. चित्रपट आणि अन्य क्षेत्रातीलही अनेक कलाकार असेच करतात.
त्यातील आणखीन एक गोष्ट खटकते. साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना आपल्याला वलयांकीत कलाकारच लागतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हणूनच अमिताभ बच्चन, आशा भोसले, सुबोध भावे अशा कलाकारांना बोलवले जाते. मग त्यांचेही नखरे सुरू होतात. अमिताभ बच्चनचे मराठी साहित्यातले योगदान काय? हा प्रश्‍न मात्र कोणीही विचारत नाही. उलट अशा वलयांकित लोकांमुळे कार्यक्रमास गर्दी होते असे आयोजकांकडून सांगितले जाते. मुळात बहिणीबाई महोत्सवात केतकीसारख्या नवख्या कलाकारास बोलवणे हीच मोठी चूक होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार तिच्या हस्ते करणे अशोभनीय होते. पोलीस कमिशनरचा सत्कार कॉन्स्टेबलच्या हातून करावा किंवा आदर्श प्राचार्यांचा सत्कार एखाद्या बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिपायाच्या हस्ते करावा अशातला हा मामला. केतकीला कलाकार म्हणून अजून स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे एका छोट्याशा कारणावरून थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार करणे म्हणजे केतकीच्या वडिलांच्या अविवेकाचे आणि डोक्यात हवा गेल्याचे लक्षण आहे. चाहते आहेत म्हणून कलाकार आहेत. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम, मिळणारे प्रोत्साहन हा सर्वोच्च पुरस्कार असतो. म्हणूनच ‘सेल्फीवरून मनस्ताप झाला’ असे गळे काढत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍यांची कीव कराविशी वाटते. पराग माटेगांवकर यांच्या तक्रारीनंतर माध्यमांनी बातम्या दिल्या आणि काहींनी केतकीविषयी सहानुभूतीही दाखवली. जळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप तिवारी यांनी याबाबतचे सत्य मांडून माटेगांवकर कुटुंबियांकडून कसा आक्रस्ताळेपणा केला जातोय हे दाखवून दिले. जळगावकरांना अकारण बदनाम करण्याचे त्यांचे कारस्थान दिलीप तिवारी यांनी हाणून पाडले.
शोलेसारखा चित्रपट इतक्या वर्षांनीही चर्चेत राहतो तो त्यातील अभिनयामुळे! याउलट चार-सहा महिन्यांपूर्वी सर्वोतोमुखी असलेला ‘सैराट’ आज अनेकांच्या विस्मृतीतही गेला. हा उच्च अभिरूची असलेल्या कलाकृतीचा आणि त्यातील प्रतिभावंत कलाकरांचा विजय असतो. कलाकारच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील यशस्वीतांचे जीवन आपल्याकडे खाजगी राहत नाही. त्यामुळेच ते कायम चर्चेत असतात. एखाद्या गाढवावरून डोंगराळ भागात मूर्ती नेताना आजुबाजूचे लोक त्या मूर्तिला झुकून नमस्कार करतात. त्यावेळी त्या गाढवाचाही अहंकार सुखावला जातो. कलाकारांचा मान-सन्मान हा त्यांच्या कलेला असतो. म्हणूनच हुरळून जाऊन कलाकारांनी कोणताही गाढवपणा करू नये. शाहरूख खानसारखा कलाकार जेव्हा सुरक्षारक्षकावर हात उगारतो तेव्हा आपले कलाकार किती गाढवपणा करतात याची प्रचिती येते.
पुण्यामुंबईसारख्या महानगरात केतकीसारखी एक कलाकार शोधायला गेल्यास शंभर मिळतात. इकडे यांना कोणीही विचारत नाही. म्हणूनच अन्य ठिकाणी गेल्यास त्यांचा अहंकार सुखावतो. आयोजकांनी चार-दोन पोलीस सुरक्षेसाठी बोलवले नाहीत तर हे लगेच कांगावा सुरू करतात. आपल्या देशात अनेक विचारवंत, संशोधक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते राजरोसपणे, निडरपणे फिरत असताना केतकीसारख्या तुलनेने अगदीच नवख्या कलाकारांना त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण देणे म्हणजे जणू व्यवस्थेची चेष्टाच आहे. स्वत:चे पगारी सुरक्षारक्षक ठेवायचे नाहीत, मनात येईल तितके मानधन घ्यायचे, प्रवास, निवास, भोजनासह सर्व सुविधा अव्वल असाव्यात यासाठी आग्रह धरायचा आणि त्यावर कडी म्हणजे चाहत्यांनी सेल्फी काढण्यासाठी त्रास दिला म्हणून गावगन्ना करायचा हे कोणत्याही सुसंस्कृत आणि सभ्य परंपरेला शोभणारे नाही. हा व असा मनस्ताप सहन होणार नसेल तर कार्यक्रम घेऊच नयेत, खुशाल घरी झोपून रहावे. आपल्या कृत्यामुळे आणि मिरवण्याच्या लालसेमुळे व्यवस्था वेठीस धरली जाते याचे भान प्रत्येक कलावंतांनी सदैव ठेवले पाहिजे.

- घनश्याम पाटील
7057292092

Monday, February 13, 2017

विद्यार्थी साहित्य संमेलन

घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'

घनश्याम पाटील यांचे अध्यक्षीय भाषण

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो,
सस्नेह नमस्कार!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन होतंय ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. यानिमित्ताने आजचे जे अनेक उत्तमोत्तम लेखक आहेत ते जोमाने फुलतील, पुढे येतील, अशी मला आशा वाटते. भारत हा असा एक देश आहे जिथे सध्या सर्वाधिक तरूणांचं प्रमाण आहे. ‘तरूणांचा देश’ अशी आपल्या राष्ट्राची ओळख आहे आणि इथली आदर्श संस्कृती आपणा सर्वांना माहीतच आहे. साहित्य संमेलनं ही अखिल भारतीय स्तरावरची होतात, विभागीय, उपनगरीय होतात. वेगवेगळ्या प्रांतांची, जाती-धर्माची आणि भाषेचीही होतात. या सगळ्या साहित्य संमेलनातून साहित्यच हरवत चाललंय, अशी खंत जाणकारांकडून व्यक्त केली जातेय. म्हणूनच अशा वातावरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे येते आणि विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन घेते ही खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे.
मित्रांनो, मगाशी साठे सरांनी ‘चपराक’ काय आहे हे सांगितलं. तर आपली चपराक ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला आहे. आमच्या संस्थेची ‘चपराक’ ही आद्याक्षरे आहेत. चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! आज या व्यासपीठावर आल्यावर मला अतीव आनंद वाटला; कारण माझ्याच वयाची मुलं पुढं येऊन साहित्यासाठी काहीतरी करत आहेत. खरंतर आपण कायम विद्यार्थीच असतो. आपल्या शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच असते. मी आठवीच्या वर्गात असताना दै. ‘तरूण भारत’ला वार्ताहर होतो. दहावीत शिकत असताना दै. ‘संध्या’ला उपसंपादक होतो आणि बारावीच्या वर्गात शिकत असताना ‘चपराक’ सुरू केलाय. हा विद्यार्थी शक्तीचा विजय आहे. हे यश माझ्या एकट्याचे नाही. आज ‘चपराक’चे सहा राज्यात सभासद आहेत. ‘चपराक’मुळे अनेक प्रतिभावंत महाराष्ट्रासमोर आलेत. त्यातलं एक उदाहरण याच व्यासपीठावर आपल्या समोर आहे, ते म्हणजे सागर कळसाईत! सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. पुण्यातल्या प्रकाशकांनी अर्थातच नेहमीप्रमाणे दोन कारणे सांगितली. बावीस हे काही कादंबरी लिहिण्याचे वय नाही आणि दुसरे म्हणजे तू पुण्यातला नाहीस! ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली आणि प्रकाशक या नात्याने, सागरचा मित्र या नात्याने सांगायला अभिमान वाटतोय की, मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या संपल्या असून आता पाचवी आवृत्ती येतेय. लवकरच सागरच्या कादंबरीवर चित्रपटही येतोय. इतकंच नाही, तर ‘सकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मध्यंतरी एक सर्व्हे केला की, ‘आजचे तरूण वाचतात तरी काय?’ आणि त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या महाविद्यालयात तरूणांशी संपर्क साधून त्यांच्या सर्व आवृत्यांना त्याचे निष्कर्ष पहिल्या पानावर छापले होते. त्यात पहिल्या क्रमांकाला सुहास शिरवळकरांची ‘दुनियादारी’ होती, दुसर्‍या क्रमांकाला ‘शाळा’ होती आणि तिसर्‍या क्रमांकाला आमच्या सागरची ‘कॉलेज गेट’ होती. आजचे तरूण काय वाचतात, काय लिहितात यासाठी हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
आता आपण थोडंसं मागं जाऊया! 12 जानेवारी 1863! या दिवशी एका महान युगपुरूषाचा आपल्याकडे बंगालमध्ये जन्म झाला. त्यांच्या प्रतिमेचं आत्ताच पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. 1880 चा तो कालखंड. हा तरूण त्याच्या गुरूकडे गेला. गुरू कालिकादेवीच्या पूजेत मग्न होते. त्याने गुरूंना वंदन करून सांगितलं, ‘‘गुरूवर्य, सध्या मी खूप अस्वस्थ आहे. माझ्या वडिलांचं निधन झालंय. मला प्रचंड नैराश्य आलंय. हे जग सोडून कुठंतरी दूर निघून जावंसं वाटतं.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘का तुला असं वाटतं? तू तर एक संन्यस्त वृत्तीचा राष्ट्रप्रेमी तरूण आहेस... हा विचार तुझ्या मनात का यावा?’’
त्या तरूणानं सांगितलं, ‘‘हे दुःख, या वेदना फक्त माझ्यासाठी नाहीत. मला माझ्या आईच्या वेदना पाहवत नाहीत. बहिणीच्या डोळ्यातले अश्रू अस्वस्थ करतात. त्यातून मी प्रचंड बेचैन झालोय.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘ठीक आहे. आत कालिकादेवीच्या समोर जा आणि तुला हवं ते माग. तुझं हे दुःख दूर व्हावं यासाठी कालिकामातेकडे साकडं घाल. ही माता तुला दुःखमुक्त करेल. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल.’’
हा तरूण पुढं गेला. डोळे भरून कालिकादेवीला बघितलं. त्याला स्वत्वाचा विसर पडला आणि भारावून जात त्यानं मागणं मागितलं, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’
गुरूंनी विचारलं, ‘‘काय रे, आईचं, बहिणीचं दुःख दूर कर, असं तू देवीला सांगितलंस का?’’
तो म्हणाला, ‘‘मी हे विसरूनच गेलो.’’
गुरूंनी सांगितलं, ‘‘पुन्हा आत जा. तुला जे हवं ते माग...’’
पुन्हा हा तरूण आत गेला. कालिकादेवीकडं पाहत त्याच्या तोंडून तेच शब्द बाहेर पडले, ‘‘माते मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे...’’ आणि त्यातूनच भगवान रामकृष्ण परमहंसांनी त्याला सांगितलं, ‘‘नरेंद्रा, तुझा जन्म मानवी कल्याणासाठी आहे. तू राष्ट्राला नवा विचार देऊ शकतोस. अनेकांचा उद्धारकर्ता होऊ शकतोस. तू नेहमी स्वतःचा नाही तर समाजाचा, राष्ट्राचाच विचार करशील...’’ आणि आपण सर्वांनी त्यांनी पुढे घालून दिलेला आदर्श बघितलाच आहे.
मगाशी संस्काराचा विषय निघाला. साठे सरांनी सांगितलं, आजचे हे विद्यार्थी संस्कार जिवंत ठेवत आहेत. खरंय हे! ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात. काहीवेळा माणसंही मरतात! मात्र जिथं संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताच मरते. त्यामुळे हा संस्कारांचा दुष्काळ पडू नये यासाठी आपण तरूणांनीच पुढं येणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेनं एक पाऊल पुढं टाकलंय ही म्हणूनच आत्यंतिक अभिमानाची बाब आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेचं हे पहिलंच साहित्य संमेलन आहे. ही परंपरा पुढं कायम चालू रहायला हवी. यात सातत्य रहायला हवं. पुढच्या वर्षी तुम्ही या संमेलनाचं आणखी चांगलं नियोजन करा. आमचं ‘चपराक‘चं पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल. एक मोठ्ठं साहित्य संमेलन, राज्यस्तरीय, ज्यात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थी सहभागी होताहेत आणि येरवडा शाखा त्यासाठी पुढाकार घेतेय असं चित्र दिसायला हवं. आपल्यापैकी जे लिहिते हात आहेत त्यांना बळ मिळायला हवं. त्यांची पुस्तकं या विद्यार्थी साहित्य संमेलनात प्रकाशित व्हायला हवीत. प्रकाशक या नात्यानं मी नक्कीच त्यात पुढाकार घेईन, हे या निमित्तानं सांगतो.
आपण सारेजण विद्यार्थी आहोत म्हणून काही गोष्टी मांडतो. आता ग्रीस देशाकडे वळूया. ग्रीसमध्ये उत्तमोत्तम नाटके व्हायची. ही नाटकं करताना पात्र कुणाचं आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे राजा कोण, प्रधान कोण, राणी कोण, सेवक कोण हे कसं ओळखायचं? मग त्यासाठी ‘पर्सोने’ तयार केले गेले. पर्सोना म्हणजे मुखवटा. हे मुखवटे सगळ्यांना दिले गेले. हा राजाचा मुखवटा, हा राणीचा मुखवटा, हा प्रधानाचा तर हा शिपायाचा मुखवटा. त्यातून कळायला लागलं की हे पात्र नक्की कुणाचं आहे ते! हा जो ‘पर्सोना’ आहे त्यातूनच पुढं ‘पर्सनॅलिटी’ हा शब्द आला. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्त्व! आपल्या सगळ्यांना एक व्यक्तिमत्त्व असतं. ते वैचारिक, बौद्धिक तर असतंच पण शारीरिकही असतं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं एक व्यक्तिमत्त्व असतं. एक चेहरा, मुखवटा असतो. इथं जमलेल्या प्रत्येकाला एक मुखवटा आहे, व्यक्तिमत्त्वही आहे. त्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार अशा संमेलनाच्या माध्यमातून व्यक्त होतो. यातून तुमचं व्यक्तिमत्त्व पुढं यायला हवं. यातूनच चांगले लेखक, कलाकार भेटतील.
साठे सर बीएमसीसीला प्राध्यापक आहेत. कालच मला सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर सरांचा फोन आला. त्यांना बोलताना मी सहज सांगितलं की, ‘‘उद्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं साहित्य संमेलन आहे आणि मी संमेलनाध्यक्ष आहे.’’ त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांनी माझं अभिनंदन केलं. तेही बीएमसीसीला प्राचार्य होते. आजचे त्यांचे वय 88! आजही ते सातत्याने उत्तमोत्तम लिहितात. त्यांनी सांगितलं, ‘‘संदीप खर्डेकरला माझा नमस्कार सांगा...’’ आता संदीप खर्डेकर राजकारणात सक्रिय होऊन खूप दिवस झालेत. आज ते विद्यार्थी परिषदेतही नाहीत, पण ही ओळख विद्यार्थी परिषदेमुळे अशा नेत्यांना मिळते. यातूनच अनेक नेते तयार होतात. हे या विद्यार्थी परिषदेचं यश आहे. म्हणूनच यातून आणखी प्रज्ञावंत, कलावंत पुढे यायला हवेत. तुमचं क्षेत्र कोणतंही असेल, तुम्ही कुठलंही काम करा. माणूस म्हणून असलेलं ‘चांगुलपण‘च तुम्हाला तारून नेणार आहे एवढं लक्षात ठेवा. असं चांगूलपण ही खरी गौरवाची बाब असते.
आज याठिकाणी तुम्ही कवी संमेलन ठेवलं आहे. पथनाट्य सादर करत आहात. लघुचित्रपट आणि चित्रांची आर्ट गॅलरीही आहे. ही खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. यानिमित्तानं मुलांमधलं टॅलेंट पुढं येतं. तुम्ही लिहित रहा, वाचत रहा, नाचावंसं वाटतं नाचत रहा, गावंसं वाटतं गात रहा. ज्याला जे जमेल त्याने ते करावे. क्षमता असूनही काहीच न करणे हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे आणि आपण सर्वजण तो सातत्यानं करतोय. गाणं सुंदर गाता येतं पण गात नाही. वेळच नाही आपल्याकडं. छान कविता करता येते पण करत नाही. उत्तम कादंबरी लिहिता येते पण लिहित नाही. मग आपण दोष कुणाला देणार?
मगाशी सरांनी सांगितलं की, इथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची क्षमता आहे. हो, आहे! निश्‍चितच आहे! पण ती क्षमता दिसायला हवी ना? त्याची अभिव्यक्ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं तुमच्या क्षमता दाखवून द्यायला हव्यात. संस्कार जिवंत ठेवायचं पवित्र कर्तव्य आपण सार्‍यांनी मिळून पार पाडायला हवं. तरूणाई म्हणजे एक जाज्ज्वल्य आविष्कार, जबरदस्त उन्मेष! आपल्यात खूप काही आहे. प्रचंड ऊर्जा आहे. या ऊर्जेचा आपण राष्ट्राच्या भल्यासाठी उपयोग करायला हवा. सध्या हे चित्र दुर्मीळ दिसतंय. आपल्या जातीय अस्मिता अत्यंत टोकदार झाल्यात. धर्माधर्मात आपण वाटले गेलोय. देश विकलांग होत चाललाय. म्हणजे आपण हे जातीय मोर्चे पाहतोय. कुणाचा थांगपत्ता कुणाला नाही. सगळ्या विचारधारा... त्याही लादल्या जातात. शब्दशः कुठल्याही विचारधारेला बळी पडू नकात. सगळे काही पडताळून पहा आणि मग अनुनय करा. म्हणजे, स्वामीजीच म्हणायचे, ‘‘आपल्या राष्ट्राला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही.’’ तर असे बौद्धिक क्षत्रिय खरोखर निर्माण व्हायला हवेत. म्हणजे धर्म कशात आहे? खरा धर्म कोणता? स्वामीजीच सांगतात, ‘‘धर्म हा मतमतांतरात, धर्मग्रंथात वा शब्दात साठलेला नाही. धर्म म्हणजे आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार!’’ स्वतःची ओळख पटणं, स्वतःच्या क्षमतांची जाणीव होणं तो खरा धर्म! स्वतःतल्या क्षमता ओळखायला हव्यात. त्या आणखी विकसित करायला हव्यात आणि त्यातून व्यापक राष्ट्राची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास आणायला हवी. म्हणजे अब्दुल कलामांनी सांगितलं, 2020 ला आपला भारत हा महासत्ता असेल. अरे, कसा असेल? आपण त्यासाठी निश्‍चित काय करतोय? आपले काय प्रयत्न आहेत? कोण कुठला कन्हैया कुमार उगवतो आणि राष्ट्रविरोधी घोषणा देतो. सैनिकांवर आरोप करतो. देश पेटवतो. त्याचे पडसाद पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीतील फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत उमटतात. हे कसले भिकार लक्षण आहे? हे सगळं थांबायला हवं. आपली प्रत्येकाची ती नैतिक जबाबदारी आहे.
सध्या सगळ्या क्षेत्रांचं बाजारीकरण झालंय. हे बाजारीकरण थांबायलाच हवं. म्हणजे मी अनेक ठिकाणी फिरत असतो. बरेचजण मला विचारतात, ‘‘तुमचे आईवडिल तुमच्याकडेच राहतात का?’’ मी सांगतो, ‘‘नाही, मी माझ्या आईवडिलांकडे राहतो.’’ स्वतःचे कुटुंब, आईवडील यांचीही आपण पर्वा करत नाही आणि जगाशी संपर्क वाढवायला निघालोय. मग भाजी बिघडलीय असं नवर्‍यानं सांगितलं तर बायको म्हणणारच, ‘‘असं कसं, याच भाजीला मला 300 लाईक आणि 102 कमेंट आल्यात. अनेकांच्या तोंडाला पाणीही सुटलंय.’’ घरात काय चाललंय, आजुबाजूला काय चाललंय, गावात काय चाललंय हे माहीत नसतं आणि यांच्या जगभरच्या चर्चा सुरू असतात. बराक ओबामानं असं करावं, नरेंद्र मोदींनी हे केलं, मायावती हे करताहेत, ममता बॅनर्जी ते करताहेत! अरे, आता तू काय करतोस हे जास्त महत्त्वाचे आहे. म्हणजे आपलं पडणारं प्रत्येक पाऊल विकासाच्या दृष्टिनं जायला हवं. आपण आधी ‘माणूस‘ म्हणून संपन्न व्हायला हवं. त्यासाठी आपले मुळात काय प्रयत्न आहेत? आपण सर्वजण विद्यार्थी आहोत म्हणून बोलतो... सगळ्यात मोठं ज्ञानकेंद्र कोणतं? तर विद्यापीठ!! महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या फक्त कुलगुरूंची नावं तुमच्यापैकी एकानं जरी सांगितली तरी मी माझं भाषण इथंच थांबवतो. एकही शब्द मी पुढं बोलणार नाही. कसले सल्ले देणार नाही, युवा पिढीची चिंता करणार नाही. कितीजण ही सगळी नावं सांगू शकतील? आहे तुमच्यापैकी कुणाला माहीत? मग ही शोकांतिका नाही का? यादृष्टिने काही विचार होणार का? ज्ञानकेंद्र दुर्लक्षित आहेत... इंग्लंडसारख्या राष्ट्रात तुम्ही गेलात तर ते सांगतील, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू; पण आमचा शेक्सपिअर आणि आमचं क्रिकेट आम्ही कुणालाच देणार नाही...’ याला म्हणतात अस्मिता! आपली भाषा, आपली संस्कृती, आपले खेळ यासाठी आपण काय करतोय? इथले मराठमोळे खेळ जिवंत रहावेत यासाठी कोणी काही प्रयत्न करतंय का? क्रिकेटवर तुम्ही जरूर प्रेम करा पण कबड्डीची काय अवस्था आहे हेही बघा. आपल्या खेळाडूंची, इथल्या मातीतल्या कलावंतांची काय उपेक्षा आहे ती बघा. याला कोणीच काही उत्तर देत नाही तर ही जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. म्हणजे ही माझी जबाबदारी नाहीच! पण तसं नाही मित्रांनो! आपलं टॅलेंट ओळखायला हवं. आपल्यातल्या क्षमता जास्तीत जास्त विकसित व्हायला हव्यात. एक चांगलं राष्ट्र, एक चांगलं राज्य, एक चांगलं गाव आणि एक चांगलं कुटुंब निर्माण व्हायला हवं. अर्थात याची सुरूवात आपल्यापासून, आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी. मला खात्री आहे, तुम्ही नक्कीच या दृष्टिनं एक पाऊल पुढं टाकाल. उत्तमोत्तम लिहित रहा. अभिव्यक्ती महत्त्वाची. तुमच्या साहित्याला ‘चपराक‘च्या माध्यमातून एक सशक्त व्यासपीठ मिळेल. साठे सर, मगाशी तुम्ही आजच्या विविध ‘डे’ज विषयी जे सांगितलं त्याचा मला अनुभव नाही. दहावीत असताना मी उत्तम वार्तांकन करत होतो आणि बारावीत असताना मी ‘चपराक’ सुरू केला. त्यामुळं परीक्षेपुरताच कॉलेजात गेलो. कॉलेजशी तसा काही फारसा संपर्कच नव्हता. म्हणून या सर्व ‘डे’ज पासून दूर राहिलो.
तुम्ही जर चांगलं शिकलात तर अशा उत्तमोत्तम संमेलनांचं आयोजन करू शकाल! आणि शिकण्याबरोबरच स्वतःतल्या क्षमता विकसित केल्या तर तुम्हाला माझ्यासारखं अध्यक्ष म्हणून या खुर्चिवर बसता येतं. अर्थात, शिक्षण महत्त्वाचंच आहे. विनोदाचा भाग सोडून द्या पण स्वतःला घडवा. आजकाल कुणीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही. आता कोणताही परमेश्‍वर तुमच्या भल्यासाठी येणार नाही. आपण जे काही उत्तमोत्तम करू तेच सत्य आणि चिरंतन असणार आहे. ‘राष्ट्र’ ही संकल्पना खूप व्यापक असते. ती आपण सातत्याने समजून घेऊ! सुरूवात स्वतःपासून करू!
आपल्यापैकी कितीजण रोज किमान दहा मिनिट व्यायाम करतात? म्हणजे श्‍वासोच्छ्वास आपण कुणाला विचारून करतो का? तो ठरवून करत नाही तर ती एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच रोज व्यायाम ही सुद्धा एक गरज आहे. रोज किमान अर्धा तास अवांतर वाचन ही गरज आहे. याच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. सगळ्या जगाचा ठेका माझ्याकडेच आहे, मलाच जग सुधारायचंय अशा आविर्भावात आपण असताना आपण स्वचिंतन करत नाही. स्वविकास साधत नाही. स्वतःकडं आपण लक्षच देत नाही, ही शोकांतिका आहे. ती थांबवायला हवी. या संमेलनातून ते साध्य होईल, तुमच्यात ती जागृती निर्माण होईल, अनेक कलाकार पुढे येतील, त्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या तरूणाईचा हा हुंकार आहे. तो सर्वदूर पोहोचेल. यातून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी अशी संमेलने होतील अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या येरवडा शाखेला धन्यवाद देतो आणि थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, February 11, 2017

प्रसारमाध्यमातील ‘कागदी काटे’



वृत्तपत्र हा लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या क्षेत्रात काम करणारा पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असतो. अन्याय-अत्याचाराविरूद्ध सातत्याने आवाज उठवणारा हा घटकच दुर्लक्षित राहतो. काळानुरूप बदलत गेलेल्या पत्रकारितेत काही कुप्रथा निर्माण झाल्या असल्या तरी वृत्तपत्रीय लेखनावर अजूनही लोकांचा विश्‍वास आहे. छापून आलेली बातमी समाजमन घडविण्यात मोठा वाटा उचलते. जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करून जाणार्‍या पत्रकारांची लेखणी झोपलेल्यांना जागे करते आणि अपप्रवृत्तींना झोपवतेही! म्हणूनच पत्रकारांचे अनुभवविश्‍वही समृद्ध असते. या क्षेत्राची ओळख करून देणारा आणि पत्रकारिता जीवनाचे विविध रंग उलगडून दाखवणारा कवितासंग्रह म्हणजे ‘कागदी काटे.’ बेळगाव ‘तरूण भारत’चे पुण्यातील संपादकीय प्रमुख प्रशांत चव्हाण यांनी हा अभिनव प्रयोग केलाय. केवळ पत्रकारिता क्षेत्रावरच्याच कवितांचा संग्रह हा मराठीतील बहुधा पहिलाच प्रयोग असावा. एक तपापासून पत्रकारितेत यशस्वीरित्या कार्यरत असलेल्या प्रशांत चव्हाण या संवेदनशील कवीने ही किमया साध्य केलीय.
‘जमत नसेल तुम्हाला जर काही
तर पत्रकार बनण्यास काहीही हरकत नाही’

असं सांगणार्‍या प्रशांत चव्हाण यांनी या क्षेत्रातील वास्तव अधोरेखित केलं आहे. अत्यंत तटस्थवृत्तीने कार्यरत असलेल्या चव्हाण यांनी पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. नवनवीन मुलांना लिहिते केले आहे. आक्रमक असूनही तितकीच सभ्य आणि सर्वसमावेशक अशी त्यांची शैली आहे. सर्व क्षेत्रांचे वार्तांकन करताना त्यांनी कधीही दुजाभाव, कुणाला झुकते माप किंवा कुणाविषयी आकस बाळगला नाही. किंबहुना ‘विरोधी विचारधारेचे’ही तितक्याच उमदेपणाने स्वागत करणारे प्रशांत चव्हाण निष्ठेने या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणूनच या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर ते कवितेच्या माध्यमातून प्रहार करतात. हे सारे धाडसाने आणि स्पष्टपणे मांडण्याचे नैतिक अधिष्ठान त्यांच्याकडे आहे. या क्षेत्रातील त्यांनी कवितेच्या माध्यमातून दाखवलेला आरसा पाहता कुणीही अस्वस्थ होईल. हा कवितासंग्रह पत्रकारितेविषयी मुलभूत विचार करण्यास भाग पाडतो आणि हेच प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे यश म्हणावे लागेल. हे ‘कागदी काटे’ खोचकपणे रूततात; मात्र ते कुणाला ‘शब्दबंबाळ’ करीत नाहीत. तरीही सत्य मात्र नेमकेपणे सांगतात.
‘आम्ही बातमीदार’ ही या संग्रहातील दुसरीच कविता पत्रकारांचे जीवन शब्दबद्ध करते. सदा न कदा बातमीच्याच मागे असलेल्या पत्रकारांची उपासमार कशी होते, ठरलेले बेत आणि योजना यावर ‘पाणी’ कसे पडते, वैकुंठाच्या दिशेनेही कसे ‘आशेने’ पहावे लागते आणि काहीवेळा ‘जाण्यापूर्वी’च कशी बातमी तयार असते, डोक्यावर ‘मेमो’ची टांगती तलवार आणि पोरगी द्यायलाही कुणी बाप होईना तयार, मानाचेच धनी असणार्‍यांचा कसा वाढणार पगार असे प्रश्‍न, या क्षेत्राची तोंडओळख प्रशांत चव्हाण यांची कविता करून देते. या क्षेत्रातील प्रत्येकाला या आपल्याच वेदना वाटतील आणि प्रशांत चव्हाण यांच्या लेखणीचे हेच तर वैशिष्ट्य आहे.
इथून तिथून आमच्यावरच, बौद्धिक अत्याचार
आम्हीच आमचे मारेकरी, तक्रार कुठे करणार?


असा रोखठोक सवाल ही कविता करते.

पत्रकारिता हे वेड, की निव्वळ वेडाचा झटका
कुणी काहीही म्हणो, आल्यानंतर येथून ना सुटका...!

हेही सांगायला हा कवी विसरत नाही. ज्यांच्या रक्तातच पत्रकारिता असते ते इतर कसल्याही त्रासाला जुमानत नाहीत, कौटुंबिक आयुष्याची पर्वा करत नाहीत. ‘बातमी’हाच त्यांचा धर्म असतो. या धर्माला जागत ते अहोरात्र धडपडत असतात. दोन-चार  रूपये देवून विकत घेतलेला कोणत्याही वृत्तपत्राचा अंक वाचताना वाचकांना तो त्यांच्या हातात येईपर्यंत केवढी यंत्रणा कार्यरत असते याचा अंदाज असतोच असे नाही. त्यामुळे पडद्यामागच्या या कलाकारांचे जीवन काव्यात्म शैलीत मांडण्याचे मोठे काम प्रशांत चव्हाण या धडपड्या पत्रकाराने केले आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच!
केवळ पत्रकारांचे जीवन, या क्षेत्रातील भल्याबुर्‍या गोष्टी मांडण्यापर्यंतच त्यांची कविता मर्यादित राहत नाही; तर चक्क धोरणात्मक निर्णय, संपादकीय बैठका, मालकशाही, पत्रकार-पोलिसांचे संबंध, क्षेत्र पत्रकारिता (बीट रिपोर्टिंग), भाषा, साहित्य संमेलने, पत्रकारांचे वैयक्तिक आयुष्य या सर्वांवर ही कविता समर्पक भाष्य करते. विशेषतः यातील अभंगसदृश्य रचना मनाचा ठाव घेतात, वाचकांना अंतर्मुख करतात. त्यांचे कार्यालय ‘वैकुंठ स्मशानभूमीजवळ’ असल्याने त्याचेही प्रतिबिंब एका कवितेत उमटले आहे. वृत्तपत्रीय जगाचा आवाका समजून घ्यायचा असेल तर प्रशांत चव्हाण यांच्या ‘कागदी काटे’ला पर्याय नाही.
कसली अभिव्यक्ती, कसले स्वातंत्र्य
अजुनी पारतंत्र्य, सभोवती
अयोग्य ठिकाणी, टीकेचा आसूड
तरी तिळपापड, सत्तांधांचा
स्तंभाचे हक्क, हेच हिरावती
वरून लादती, हक्कभंग
निषेधाचा सूर, कधी हल्लाबोल
सत्य लिहिता तोल, ढासळतो

स्तुतिसुमने अन् गोडाची फोडणी
हवी यांना लेखणी, गुळचट
व्वा रे लोकशाही, निव्वळ आभास
स्तंभच ओलीस, यांच्याकडे

अशी ‘अभिव्यक्ती’ प्रशांत चव्हाण यांनी मांडली आहे. सत्य लिहायला ते कचरत नाहीत. या क्षेत्रातील दुष्प्रवृत्तीकडे ते डोळेझाकही करत नाहीत. म्हणूनच प्रशांत चव्हाण यांचे कागदी काटे ‘काट्याने काटा‘ काढण्याचे काम करतात. जखम बरी व्हायची असेल तर अशा शस्त्रक्रिया तटस्थपणे करायलाच हव्यात. जे काम प्रसारमाध्यमांवर विविध परिसंवाद आयोजित करून, अनेक पुस्तके लिहून, पुरवण्या काढून होणार नाही ते काम प्रशांत चव्हाण यांच्या कविता करतात.
सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केलेली पाठराखण, प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी कल्पकरित्या साकारलेले मुखपृष्ठ आणि कवीचे शब्दसामर्थ्य यामुळे ‘कागदी काटे’चे संदर्भमूल्य मोठे आहे. कवी प्रशांत चव्हाण यांच्या पुढील साहित्यिक कारकिर्दीस माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा!
कागदी काटे
कवी - प्रशांत चव्हाण (9325403220)
प्रकाशक - सहित प्रकाशन, गोवा
पाने - 67, मूल्य - 70

- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२



आपण 'समजदार' आहोत!

आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’; मग जे दुसर्‍या पक्षातून आपल्याकडे येतात त्यांचं काय?
‘ते त्यांचं ‘हृदयपरिवर्तन’ होय!’
अशीच काहीशी अवस्था सध्या सर्वत्र निर्माण झालीय. सकाळी ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करणारा कार्यकर्ता संध्याकाळी ‘भाजप’च्या उमेदवारीचे ‘तिकिट’ घेऊन आलेला असतो. हे सारे आजच्या काळात आश्‍चर्यकारक नसले तरी नैतिकतेच्या मात्र सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. पक्षनिष्ठा, श्रद्धा, विचारधारा हे व असे सारे निकष कधीच मातीमोल झाले आहेत. राजकारण म्हणजे पैसा खाण्याचा अड्डा झाल्याने कुणालाच कसली चाड राहिली नाही. आपल्या लोकशाहीप्रधान देशाचं हे दुर्दैवच खरं!
‘पार्टी विथ डिफरंट’ अशी जाहिरात करणार्‍यांना सांगावेसे वाटते, बाबांनो, वेश्येने पतीव्रता धर्म शिकवू नये! तुम्हाला ज्या काही खटपटी करायच्या आहेत, त्या करा! फक्त आता समाजसेवेचा, राष्ट्रनिष्ठेचा आव आणू नकात! नीतिमत्तेचे धडे आता तुमच्याकडून घ्यायची आम्हाला गरज नाही. ‘देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला’ अशी काहीशी या लोकांची अवस्था झालीय. ज्या पक्षात नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर असे चारित्र्यसंपन्न नेते आहेत त्याच पक्षाची ही साठमारी पाहून कोणत्याही सामान्य माणसाला आत्यंतिक वेदना झाल्यावाचून राहणार नाहीत.
मागे मी एका उमेदवाराचे उदाहरण दिले होते. तो निवडणुकीतील प्रचारसभेत भाषण देत असतो. तो म्हणतो, ‘मित्रांनो, मागच्या खेपेला तुम्ही मला निवडून दिलं त्यायेळी माझ्याकडं काई बी नव्हतं. अंगावरच्या कपड्यानिशी मी गावाकडून आलतो. तुमचे आशीर्वाद मिळाले अन् नगरसेवक झालो. आज मला कशाचीबी कमतरता नाय. दोनशे एकर जमीन हाय, तीन चार बंगले हाईत, गाड्या हाईत. आख्खा पेट्रोल पंप हाय, हॉटेल हाय. तुमच्याकडं रोज पाण्याचा टँकर बी म्याच पाठवतो. म्हणून तुम्हास्नी इनंती हाय, यंदाबी मलेच निवडून द्या. म्हंजी मी आता तुमची कामं करू शकंल... अन् ध्यानात ठेवा, तुम्ही माझ्याबिगर कुणालाबी निवडून दिलं तरी त्याला माझ्याएवढं संमध करण्यात पुढची पाच वर्षे अशीच निघून जातील. त्यामुळं तुम्ही मला अजून एक संधी द्या... आता तर मी तुमची कामं करू शकंल...’
अशीच काहीशी आपली अवस्था झालीय. कालपर्यंत जे गावगुंड म्हणून आपल्याला माहीत होते, ज्यांच्या नावाचाही तिरस्कार वाटत होता ते सारेच्या सारे आज ‘कमळाबाई’ सोबत आहेत. हातातलं घड्याळ काढून त्यांनी कमळाचा पंचा गळ्यात अडकवलाय. ‘अर्ध्या चड्डीतले आणि दंड हातात घेऊन संचलनात सहभागी झालेले’ फोेटोही त्यांनी गावभर लावलेत. याला काय म्हणावे?
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. जी कामं आपल्याला वेळेअभावी करता येत नाहीत, ती करावीत म्हणून आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो. त्यांनी यंत्रणेकडे पाठपुरावा करावा, जनहिताचे, लोककल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी आपली रास्त अपेक्षा असते. मात्र होतेय उलटेच. हे ‘सेवक’च ‘मालक’ बनू पाहत आहेत. ज्याच्याकडून ‘दान’ घेतलं त्या धन्याला लुबाडण्याचे उद्योग सातत्याने सुरू आहेत. आम्हालाही त्याची ना खंत, ना खेद. दरवर्षी पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
सातत्याने ‘बौद्धिक’ वर्गात गुंतलेल्या आणि संस्कारांचा टेंभा मिरवणार्‍या भाजपात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतले सारे गुंड गोळा झालेत. इतर पक्षातली जी संघटीत गुन्हेगारांची टोळी होती ती सारीच्या सारी आता भाजपमध्ये दाखल झालीय. ज्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली, ज्यांनी दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लालमहालातून काढून टाकला ते आज भाजपसोबत आहेत. एकेकाळी ‘हुसेनभाई बिफ मार्केट’चे उद्घाटन करणारे गिरीश बापट आज पुण्याचे पालकमंत्री आहेत. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात किती शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्या, किती जनावरे मेली’ याचे पाढे ते जनतेसमोर वाचत आहेत. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहराच यामुळे पुढे येत आहे.
आमच्या पुणेकरांनी आठ आमदार आणि एक खासदार भाजपचा दिला. ज्यांच्याविरूद्ध हा रोष प्रकट झाला ते सारेच्या सारे आज भाजपमध्ये आहेत. आमदार अनिल भोसले, त्यांच्या पत्नी, बावधनचे दिलीप वेडे, किरण दगडे अशी काही उदाहरणे प्रातिनिधिक म्हणून घेता येतील. बावधन आणि परिसरात गोरख दगडे नावाचा एक उमदा कार्यकर्ता आहे. जेव्हा इथले आमदार, खासदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य सर्व काही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले होते तेव्हापासून हा पठ्ठ्या भाजपचे निस्पृहपणे काम करतोय. हा माणूस मोठ्या मताधिक्याने नगरसेवक होणार असा सगळ्यांचा समज होता. मात्र पुण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असलेला, ज्याची दारूची दुकाने हाच मुख्य धंदा आहे, ज्याने सेना-भाजपला कायम कडवा विरोध केला असा उमेदवार काही दिवस आधी भाजपात आला. पक्षाच्या आणि स्थानिक नेतृत्वाच्या ‘सर्व’ मागण्या मान्य केल्या आणि आज त्याला उमेदवारीही मिळाली. हाच प्रकार कित्येक ठिकाणी घडलाय. त्यामुळे यंदा सर्वत्र भाजपची मोठ्या प्रमाणात वाट लागेल हे सांगायला कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
मुख्यमंत्री रोज प्रचाराच्या आखाड्यात सहभागी होत आहेत. खरेतर घटनात्मकदृष्ट्या विचार केल्यास ते एका राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना राज्यातील सर्वच लेकरे सारखी. मात्र रोज ते घसा ताणून ताणून भाजपचा प्रचार करत आहेत. भाषण करताना किती घोट पाणी प्यालो हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आणि शिवसेनेला सांगत आहेत. हा सारा पोरखेळ पाहून लोक यंदा त्यांना ‘पाणी’ पाजणार हे मात्र नक्की! असे म्हणतात की, माणसाने हजार चुका कराव्यात; मात्र एकच चूक हजारवेळा करू नये! लोकांनी चूक केली. ती पुन्हा घडणार नाही, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने यांची ‘नौटंकी’ रोज रोज पहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस मनोरंजनाचे हे केंद्र सुरूच राहील. आता मात्र आपण सावध व्हायला हवे. आपले एक मत आपल्या परिसराचा, देशाचा चेहरा बदलू शकते. सुशिक्षित, सुसंस्कृत, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या, जाती-धर्माचे राजकारण न करणार्‍या, तळागाळातील लोकांशी संबध ठेवून असलेल्या, निर्व्यसनी आणि चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच निवडून द्या! तुमचे एक मत पुढच्या पिढीच्या भवितव्याची नांदी असणार आहे हे लक्षात ठेवा.
या व्यवस्थेवर चिडलेले आणि मतदानाचे गांभीर्य नसलेले अनेकजण मतदानच करत नाहीत. असेही करू नकात. तुम्ही हतबल न होता योग्य उमेदवाराला मतदान करणे हाच राष्ट्राच्या संपन्नतेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आपल्या शहरातील, गावातील विविध कामांचे नियोजन करणारे, विकासकामे पूर्णत्वास नेणारे आपले लोकप्रतिनिधी कणखर आणि स्वच्छ चारित्र्याचे असायला हवेत. त्यासाठी आपली जबाबदारी मोठी आहे. वर्षानुवर्षे आपण ज्यांच्या नावाने खापर फोडतोय ते सर्वजण आपल्यातूनच निवडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नावे ठेवण्याऐवजी आपण आपल्यात आधी बदल घडवू आणि परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकू. शेवटी एकच सांगावेसे वाटते,
आपण आमदार नाही, खासदार नाही; मात्र ‘समजदार’ आहोत!
ही समज योग्य ठिकाणी दाखवली तर आणि तरच हे चित्र बदलू शकेल!
- घनश्याम पाटील, पुणे 

7057292092

Monday, February 6, 2017

मराठीला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण!

डोंबिवली येथे झालेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘नवोदित लेखन : अपेक्षा आणि आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मनस्विनी लता रवींद्र, प्रशांत आर्वे, रवी कोरडे आणि ‘चपराक’चे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील यात सहभागी झाले होते. सचिन केतकर या सत्राचे समन्वयक होते. या चर्चासत्रातील घनश्याम पाटील यांचे भाषण खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी.

सर्वांना नमस्कार!
आज मी ‘चपराक प्रकाशन’चा प्रकाशक, संपादक, लेखक, वाचक, पत्रकार आणि ग्रंथ विक्रेता या सगळ्या भूमिकेतून माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करणार आहे. खरं तर या परिसंवादासाठी निमंत्रण देणारा पहिला फोन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा आला, त्यावेळी मला आश्‍चर्यच वाटले! कारण मागची पंधरा वर्षे आम्ही ‘चपराक’ हे मासिक, साप्ताहिक आणि प्रकाशन संस्था साहित्यिक निष्ठेने चालवतोय. या क्षेत्रात काम करणार्‍यांची दखल साहित्य संस्था कधीही घेत नाहीत. इथे फक्त कंपुशाही असते. प्रसिद्धी हे असं एक अन्न आहे की, जे मेल्यावरच मिळतं. त्यामुळं प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘‘तुम्ही चर्चासत्रात आणि तुमचे सहसंपादक माधव गिर निमंत्रितांच्या कवी संमेलनात निमंत्रित आहात’’ असे सांगितल्यावर आश्‍चर्य वाटले. म्हणजे साहित्य संस्थात आता ‘परिवर्तन’ घडतेय असे समजायला वाव आहे. असो! मी मुख्य विषयावर येतो.
नवोदितांचे लेखन, त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी प्रकाशक या नात्याने मी संक्षिप्त स्वरूपात मांडणार आहे.  ठोकळेबाज विचारसरणीचे प्रस्थापित लेखक, प्रकाशकांची मुजोरशाही, समीक्षकांचे दुर्लक्ष आणि नवोदितांना त्यातून आलेला न्युनगंड हे सारेच क्लेशकारक आहे. जुन्या पिढीने नव्या पिढीला
विचार’ द्यायचा असतो. नेमका त्याचाच आपल्याकडे दुष्काळ दिसतो. बालकवी ठोंबरे, आचार्य अत्रे, भाऊसाहेब खांडेकर, शिवाजीराव सावंत असे मराठीतील लेखक कमी वयात उत्तमोत्तम लिहित होते. या लेखकांनी प्रयत्नपूर्वक स्वविकास साधला. इतकेच नाही तर यांनी अनेक नवोदितांना पुढे आणले. भाऊसाहेबांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कुसुमाग्रजांचा विशाखा’ कवितासंग्रह प्रकाशित केला. आचार्य अत्र्यांनी शांता शेळके, अनंत काणेकरांपासून ते सोपानदेव चौधरींपर्यंत अनेक लेखक-कवी पुढे आणले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांची मृत्युंजय’ ही कादंबरी कोणीही प्रकाशित करायला तयार नव्हते. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवल्यानंतर त्यांनी त्यातील काही प्रकरणे ग. दि. माडगूळकर यांच्याकडे पाठवली. ती वाचल्यानंतर गदिमांनी कॉन्टिनेंटल’च्या कुलकर्णींना फोन केला आणि सांगितले,  ‘‘मुलगी गुणवान आहे. तुम्ही करून घ्यायला हरकत नाही’’ त्यानंतर मृत्युंजयने इतिहास घडविला आणि मराठीला एक सशक्त लेखक मिळाला. ‘एकवेळ माझे साहित्य बाजूला ठेवा पण हे लेखक वाचाच’ अशी या लेखकांची भावना होती. यातच त्यांचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. सध्याचे लेखक मात्र संकुचित मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत. ते पूर्णतः आत्मकेंद्री तर झालेले आहेतच पण नवोदितांविषयी त्यांच्या मनात असलेला आकस वेळोवेळी दिसून येतो. विशेषतः प्रतिसादशून्यतेचं ग्रहण मराठी साहित्याला लागलंय. नवीन लेखकांनी कितीही सकस, अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्वक लिहिले तरी त्यांना प्रतिसाद द्यायचाच नाही, असा अलिखित नियम त्यांनी केलाय. हे ग्रहण न सुटल्यानेच अनेक उमलते अंकुर फुलण्यापूर्वीच खुडले जात आहेत. त्यामुळे मराठी साहित्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे. कुठं ते भाऊसाहेब खांडेकर, कुठं ते अत्रे? आजच्या  प्रस्थापित साहित्यिकांत तुम्हाला ते दिसतात का? तर याचं उत्तर दुर्दैवानं अत्यंत निराशाजनक आहे.
यांना प्रतिसादशून्यतेचा रोग जडलाय. नवोदितांनी काहीही लिहू द्या... ते चांगलं असेल किंवा वाईट असेल...! त्याविषयी मतंच मांडायची नाहीत अशी यांची भूमिका! अरे वाईट आहे तर वाईट म्हणा! कौतुक नकात करू; पण प्रतिक्रियाच द्यायची नाही. का? तर त्यांच्यापेक्षा अस्सल साहित्य सध्या मराठीत येतेय....
‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी आवई काही प्रकाशक जाणिवपूर्वक सातत्याने उठवतात. ही वस्तुस्थिती नाहीये. म्हणजे आम्ही जवळपास सव्वाशे पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यातली पन्नास-साठ लेखक मंडळी तरूण आहेत. त्यांची पहिलीच पुस्तके असूनही त्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्यात. आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत. अगदी दोन उदाहरणं घ्यायची तर माझ्यासमोर सागर कळसाईत आणि निलेश सूर्यवंशी बसले आहेत. सागरने वयाच्या बावीसाव्या वर्षी ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. जवळपास पन्नासएक प्रकाशकांनी त्याला नकार दिला. ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. मागच्या तीन वर्षात त्याच्या पाच आवृत्त्या झाल्यात आणि त्याच्यावर आता चित्रपट येतोय. निलेश सूर्यवंशीचेही असेच. निलेश सूर्यवंशीने 2009 ला कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांचे उंबरठे झिजवले. कोणीही ती प्रकाशित करायला तयार नव्हते. त्यानंतर त्यानं ठरवलं की, ‘मी लिहिणारच नाही... माझं जर कोणी छापणारच नाही तर लिहून उपयोग काय?’ मध्यंतरी सोलापूरला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेचा आमच्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार मिळाला. त्यावेळी आम्ही गेलेलो असताना ‘दिव्य मराठी’ने अँकर स्टोरी केली. त्यात आम्ही सांगितलं की, ‘नवोदितांना आम्ही प्राधान्याने व्यासपीठ देतोय.’ निलेश सूर्यवंशी माझ्या संपर्कात आले. त्यांची ‘आभाळ फटकलं’ ही कादंबरी परवाच 19 जानेवारीला आम्ही समारंभपूर्वक प्रकाशित केली.
मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याविषयी मी ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ असा जळजळीत अग्रलेख केला. त्यावर ‘नवाकाळ’सारख्या वृत्तपत्राने पहिल्या पानावर मुख्य बातमी करून माझा अग्रलेख पुनर्मुद्रित केला. त्यांनी तब्बल तीन पानं त्यासाठी मला दिली होती. इतर काही वृत्तपत्रांनी माझ्या अग्रलेखांवर अग्रलेख केले. वृत्तवाहिन्यांवर चर्चा झाल्या. सबनीसांनी मात्र त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण ते देऊच शकत नाहीत. मी जे लिहिलं होतं त्यातला शब्द न शब्द खरा होता. पूर्वीचे लेखक नवोदितांना पुढं आणायचे. हे सर्व लेखक त्यासाठी काय करतात? श्रीपाल सबनीस असतील, सदानंद मोरे असतील किंवा आत्ताचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे असतील! यांनी मराठीला किती नवे लेखक दिले याचे मूल्यमापन केले तर हातात काय येणार? साहित्यबाह्य विषयांवरून कायम वादग्रस्त विधाने करायची आणि चर्चेत राहायचे हेही आजच्या साहित्यापुढील मोठे आव्हान आहे. यातून आपण मराठीचा विकास कसा साधणार? प्रतिसादशून्यतेबरोबरच सबनीसांसारख्या लेखक म्हणून मिरवणार्‍यांची वैफल्यग्रस्तता यानेही आजच्या साहित्याचे मोठे नुकसान केले आहे.
प्रकाशकांचं काय चाललं आहे? जे केवळ अनुवादित पुस्तकं प्रकाशित करतात त्यांना प्रकाशक म्हणायचं का? लेखकांकडून पैसे घेऊन तुम्ही पुस्तकं छापता, त्यांना प्रकाशक म्हणायचं का? यात लेखकांचा तर उतावळेपणा दिसून येतोच पण ग्रंथव्यवहारामध्ये नक्की काय चालतं? आमच्या ‘चपराक’च्या फेब्रुवारीच्या अंकात ज्येष्ठ प्रकाशक आणि प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांचा एक अत्यंत सुंदर लेख आहे. ते याठिकाणी आलेले आहेत. त्यांचा हा लेख प्रकाशन क्षेत्राचा बुरखा फाडणारा आहे. तो आपण जरूर वाचला पाहिजे.
आपल्याकडे लिखाण हे कॉर्पोरेट होत नाहीये. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा मालक हा तिशीतला-पस्तीशीतला असू शकतो; मात्र मराठीमध्ये एकाही वृत्तपत्राचा मुख्य संपादक तिशीतला का असू नये? मी वयाच्या सतराव्या वर्षी ‘चपराक’हे मासिक पुणे शहरातून सुरू केलं. का सुरू केलं? तर मला नवोदितांसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं होतं!
 सध्या लेखकांची आर्थिक फसवणूक केली जाते. वीस- वीस वर्षे लिहिणारे लेखकही यांच्यासाठी नवोदितच असतात. का? तर त्यांच्या नावावर एकही पुस्तक नसते, मग या लेखकांकडून पैसे उधळण्याचा धंदा बिनधास्तपणे केला जातो. प्रसिध्दीच्या मागे लागलेले लेखकही या प्रकाराला बळी पडतात. दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की, नवोदित लेखक प्रकाशकांकडे गेले तर प्रकाशक ती संहिता वाचण्यासाठी सुद्धा पैसे घेतात. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पाच-सहा महिने ती संहिता जशास तशी ठेवतात. त्यावरची धुळही झटकली जात नाही. ती संहिता तशीच परत दिली जाते. ही लेखकांची फसवणूक नाहीये का? ह्याविषयी कोण बोलणार? दुसरीकडे लेखक!! म्हणजे मला अनेकजण भेटतात!! म्हणे ‘सर, काल रात्री मी पंचवीस कविता केल्या...’ काय कारखाना आहे? अरे करताय काय नक्की तुम्ही? तुमची दिशा कोणती? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं आपण गंभीरपणे सोडवली तरच ग्रंथव्यवहार पुढे जाऊ शकेल, असं मला वाटतं. प्रकाशकांच्या बाबत दुर्दैवाने सातत्याने नकारात्मक प्रतिमाच पुढे येत असताना अनेक प्रकाशक चांगल्या पद्धतीनेही काम करत आहेत. सगळंच हातातून गेलं नाही, त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही.
मराठीत हजारो प्रकाशन संस्था आहेत, असं सांगितलं जातं. आहेत! नोंदणीकृत हजारो संस्था आहेत. त्यातल्या किती प्रकाशन संस्था ललित आणि वैचारिक साहित्य प्रकाशित करतात? जेमतेम तीस-चाळीस! यात सातत्यानं दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारे प्रकाशक किती? पंधरा-वीस-पंचवीस! ‘चपराक’चा आम्ही शंभर-दोनशे पानांचा नाही तर पाचशे पानांचा दिवाळी अंक प्रकाशित करतो. तोही संपूर्ण रंगीत. सहा राज्यातले सव्वाशे लेखक त्यात सहभागी होतात. यंदाच्या दिवाळी अंकाच्या 32 हजार प्रती विकण्याचा, काऊंटर सेलचा आम्ही विक्रम केलाय. ही जर वस्तुस्थिती आहे तर ‘वाचक नाहीत’ असं आपण कसं म्हणू शकतो?
समीक्षक नवोदितांकडे नेहमी दुर्लक्ष करतात. नवोदितांची दखल घ्यायचीच नाही. वृत्तपत्रांचेही तसेच! नवोदितांच्या पुस्तकांची परीक्षणे छापायचीच नाहीत. यातून आपण बाहेर पडायला हवं? मग काय करायचं? आम्ही आमचाच पर्याय उपलब्ध करून दिला. प्रकाशकाने प्रस्तावना लिहू नये, असा एक प्रघात आहे म्हणे! ते आम्ही खोडून काढलं. मी जवळपास पंचेचाळीस पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. आमचे उपसंपादक माधव गिर उत्तम प्रस्तावना लिहितात. कार्यकारी संपादिका शुभांगी गिरमे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे अशी समीक्षकांची फळीच्या फळीच आम्ही उभी केली. ‘कमी तिथं आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे सूत्र ठेवलं आणि आज मराठीला चांगले लेखक मिळाले. आपल्याला नवोदित-प्रस्थापित असा भेद करायचाय की गुणात्मक दर्जा बघायचाय? म्हणजे एखाद्या लेखकाला नवोदित म्हणून नाकारायचं? अरे, पु. ल. देशपांड्यांची पहिली कथा कोणी छापली नसती तर ते पुढे आलेच नसते. आचार्य अत्र्यांचा पहिला लेख कुणी छापला नसता तर ते पुढे आलेच नसते. त्यामुळं नवोदित-प्रस्थापित हे ग्रहण सुटणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रकाशकांनी पुढाकार घ्यायला हवा. वृत्तपत्रांच्या संपादकांनी आणखी गंभीरपणे पुढाकार घ्यायला हवा. साहित्य संस्थांची परिस्थितीही फारशी वेगळी नाहीये. म्हणजे मिलिंद जोशी नेहमीच म्हणतात, ‘कोणतीच भूमिका न घेणं हीच एक सध्याच्या साहित्यिकांची भूमिका आहे.’ पण सुदैवानं त्यांचं हे विधान त्यांनीच खोडून काढलं आहे. भूमिका घेणारे कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी यांच्यासारखं एक तरूण नेतृत्व साहित्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपल्याला आणखी चांगल्या अपेक्षा ठेवता येतील.
आपल्यापुढं तंत्रज्ञानाचं एक मोठं आव्हान आहे. आजचे लेखक व्हाटस्ऍप, फेसबूक अशा समाजमाध्यमांवर इतका वेळ घालवतात की, लेखणीशी त्यांची नाळ तुटते की काय? अशी भीती मला वाटतेय. ठीक आहे, फेसबूक, व्हाटस्ऍप, ब्लॉग ही समाजमाध्यमं निश्‍चितपणे गरजेची आहेत. त्यामुळं लोकांपर्यंत पोहोचता येतं. पेनने लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. जे आतून येतं, ज्याला आपण ‘अंतर्स्फूर्ती’ म्हणतो ते कागदावर टिपायला हवं. लेखकांनी सातत्याने दर्जेदार लिहायला हवं.
इतरांचं लिखाण न वाचणं ही देखील आपल्या पुढील एक मोठी समस्या आहे. इतरांचं सोडा, लेखक स्वतःचेही लेखन तटस्थपणे वाचत नाहीत. त्यांना प्रसिद्धिची एवढी घाई झालेली असते. ‘प्रसिद्धीची घाई, सिद्धी संपवत जाई‘ असं म्हणतात. म्हणजे एखादी संहिता प्रकाशक म्हणून जेव्हा माझ्याकडे येते तेव्हा लेखक प्रचंड आग्रह करतात. ‘हे तुम्ही प्रकाशित कराच. यावर वाचकांच्या उड्या पडतील, हे पुस्तक हातोहात जाईल’ असे ते सांगत असतात. ते स्वतःच्या कोशात इतके मशगुल असतात की त्यांना वाटते आपण म्हणजे बरनॉड शॉच! अरे भल्या गृहस्थांनो, तुम्ही जे लिहिताय ते पुन्हा पुन्हा वाचा. त्यावर संस्कार करा. मग ते प्रकाशकांकडे द्या! म्हणजे आत्ताच मी सांगितलं, आमचा दिवाळी अंक पाचशे पानांचा निघतो. यंदाच्या दिवाळी अंकासाठी आमच्याकडे तब्बल साडेपाच हजार कविता आल्या. त्यातल्या शंभरएक आम्ही प्रकाशित केल्या. मग इतर कवितांत गुणात्मक दर्जा नव्हता का? इतक्या कविता काळजीपूर्वक वाचाव्या लागतात. ते वाचणं म्हणजे एक दिव्यच असतं. त्यातल्या दीडएक हजार कविता सर्वोत्तम होत्या; मात्र जागेअभावी आम्हाला त्या घेता आल्या नाहीत. मग त्यांना वाटतं आम्हाला कुठं व्यासपीठच मिळत नाही, आमची कुणी दखलच घेत नाही. तर मित्रांनो, असं नसतं! निराश होऊ नकात! जे काही सर्वोत्तम आहे ते सातत्यानं वाचकांना द्या! खूप चांगला प्रतिसाद मिळेल. आधुनिक तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करा. फक्त त्याच्या आहारी जाऊ नकात. आता प्रा. क्षितिज पाटुकले याठिकाणी आलेत. ‘साहित्यसेतू’ नावाची संस्था ते चालवतात. एक करोड वाचक जोडण्याचं त्यांचं ध्येय आहे. अशी स्वप्नं हवीत.
तुमच्या प्रत्येक पुस्तकाचं ई-बुक हे व्हायलाच हवं. ही काळाची गरज आहे. मल्याळममध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सुरूवातीला काही पैसे उभे केले. एकत्र येऊन त्यांनी मल्याळम साहित्याचा विचार केला आणि ठरवले, मल्याळी भाषेत जेवढं साहित्य येतं त्याचा इंग्रजीत अनुवाद करायचा आणि जागतिक स्तरावर ते साहित्य उपलब्ध करून द्यायचं. हा त्यांचा भाषेसाठीचा एक आदर्श प्रकल्प आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. मराठीत इतर भाषेतलं साहित्य मोठ्या प्रमाणात येतंय. काही प्रकाशक गब्बर होत आहेत. आपले मराठी साहित्य मात्र इतर भाषेत जाताना दिसत नाही. त्यामुळे ‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून एक घोषणा आनंदपूर्वक करतोय की, ‘आमच्या चपराकडून जी काही पुस्तके प्रकाशित होत आहेत त्या सर्वांचा इंग्रजी अनुवाद आम्ही वाचकांना उपलब्ध करून देऊ.’ आपलं साहित्य जागतिक भाषेत जायला हवं. इतर भारतीय आणि जागतिक भाषेतील साहित्य मराठीत यायला हवं. फक्त इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करणं, इमारतीच्या इमारती उभारणं, आलीशान गाड्या घेणं म्हणजे प्रकाशन क्षेत्राचं यश नाही, हे ठासून सांगायची वेळ आता आलीय.
संवाद, संघर्ष, सांस्कृतिक अनुबंध, साहित्यिक संचित असे शब्द आपण मागचे वर्षभर सातत्याने ऐकतोय. मराठीत एकाही पुस्तकाची पहिली आवृत्ती दहा हजार प्रतींची निघू नये? हे आपलं केवढं मोठं दुर्भाग्य! अकरा करोडचा महाराष्ट्र! त्यात पुस्तकांची आवृत्ती निघते हजार प्रतींची! तीही खपायला किमान पाच-सहा वर्षे सहजपणे जातात. तर हे कशाचं लक्षण आहे? महाराष्ट्रातले साखर कारखाने वेगवेगळे कार्यक्रम घेतात. तिथं मग तमाशापासून ते अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत सगळे उद्योग होतात. का बरं त्यांनी उत्तमोत्तम पुस्तकं छापू नयेत? किंवा चांगली पुस्तकं विकत घेऊन ती सभासदांना वाटू नयेत?
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून नवोदित लेखकांच्या कलाकृतीला अनुदान दिलं जातं. ज्या लेखकांना हे अनुदान दिलं जातं, दिलं गेलं त्यापैकी किती लेखक आज यशस्वी आहेत? पन्नास प्रती छापायच्या... त्यांचं बील मंजूर करून घ्यायचं... दोघांनी ते पैसे वाटून घ्यायचे असा धंदा सर्रासपणे चाललेला असतो. लेखकही स्वतःचे पैसे टाकून पुस्तकं छापतात. हौस मिरवण्याची! दुसरं काय? मग त्यानं हजार प्रती छापल्या तर पन्नास-शंभर-दोनशे प्रती मित्रांना, नातेवाईकांना भेट म्हणून वाटायच्या आणि उरलेल्या प्रती मग सत्तर ते ऐंशी टक्के कमिशनने ग्रंथालयांना, विक्रेत्यांना द्यायच्या. ग्रंथपालही शंभर टक्के रकमेचं बील घेतात. त्यांना 50-50, 60-60, 70-70 टक्के कमिशन मिळते. असं जर असेल तर मराठीत चांगली पुस्तकं कशी येणार? या सगळ्या आव्हानांचा आपण विचार केला पाहिजे. या खर्‍या समस्या आहेत.
प्रामुख्यानं तरूणांनी लिहितं राहिलं पाहिजे. आपलं भवितव्य उज्ज्वल आहे. मगाशी जॉर्ज बरनॉड शॉचं उदाहरण सांगितलं. शॉ साहेब उत्तमोत्तम लिहायचे आणि लिहिल्यानंतर त्यांची कलाकृती ते चक्क विक्रीला काढायचे. प्रकाशकांकडे लिलाव करायचे कादंबरीचा! ‘ही कादंबरी मी एवढ्या डॉलरला देईन, ती तेवढ्या डॉलरला देईन...’ त्यांना ‘न्युयॉर्क टाइम्स’च्या एका पत्रकारानं विचारलं, ‘‘शॉ साहेब, तुम्ही जगातले एवढे मोठे लेखक आहात. हे असं लिलाव करून कादंबरी विकणं योग्य आहे का?’’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. ते म्हणाले, ‘‘भल्या गृहस्था, जेव्हा मी कोणतीही कादंबरी लिहित असतो तेव्हा मी फक्त लेखक असतो. त्यासाठी मी जास्तीत जास्त संदर्भ गोळा करतो. मी पूर्ण अभ्यास करतो. माझं दिवसरात्र चिंतन सुरू असतं! पण त्या कादंबरीला जेव्हा मी शेवटचा पूर्णविराम देतो तेव्हा मी त्या कलाकृतीचा विक्रेता झालेलो असतो; कारण माझं पोट त्यावर अवलंबून आहे.’’
मराठीमध्ये लिखाण हे उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं का?
तर निश्‍चितपणे होऊ शकतं! खूप चांगले अनुभव आहेत माझे. तुम्ही लिहित रहा. चांगल्या लेखनाला सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तुमचे लेखन प्रिंट, ऑडिओ, व्हिडीओ अशा सगळ्या माध्यमांतून, ई-बुक लोकांपर्यंत येऊ द्यात! एक मोठं मार्केट आपल्यापुढं उपलब्ध आहे. सुदैवाने आमची पिढी खूप बदल पाहतेय. जागतिकीकरण आहे. आपण नोटबंदीचा काळ बघितला. काळा पैसा सगळा बाहेर येतोय. उत्तमोत्तम विषय आहेत. हे आपण कुणीही चांगल्या पद्धतीने मांडत नाहीये. लेखकांचं अनुभवविश्‍व समृद्ध असताना, लिहिण्याच्या क्षमता असताना न लिहिणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तो गुन्हा आपण सातत्यानं करतोय. माळीणसारखी एवढी मोठी दुर्घटना घडते. गावच्या गाव उद्ध्वस्त होतं. त्यावर मराठीत एक चांगलं पुस्तक येऊ नये? आज तुम्ही जे काही लिहिताय तो उद्याचा इतिहास आहे. तो इतिहास आपणच निर्माण करायला हवा. वाचकांना जास्तीत जास्त चांगलं साहित्य द्यायला हवं. कथा, कविता, ललित, वैचारिक, चरित्र, आत्मचरित्र सगळ्या प्रकारची पुस्तकं मोठ्या प्रमाणात यायला हवीत. वाचकांनीही ती विकत घ्यायला हवीत. घर घेताना घराची रचना चार चार वेळा विचार करून आपण करतो. इथं माझं बेडरूम असावं, इथं माझं देवघर असावं.... पण घरामध्ये जोपर्यंत पुस्तकाचा कोपरा कुठं असावा याचं आपण नियोजन करणार नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही. त्या दृष्टिनं प्रयत्न व्हायला हवेत. कुठल्याही कार्यक्रमाला फुले, बुके देण्यापेक्षा तुम्ही पुस्तकं विकत घ्या, पुस्तकं भेट द्या! लग्न, मुंज, वाढदिवस कुठल्याही प्रसंगी जर चांगली पुस्तकं तुम्ही लोकांना दिलीत, प्रत्येक मराठी माणसानं कुठल्याही किमान दोन मासिकांची वर्गणी भरली तरी मासिकं जगू शकतात. सत्य सांगण्याचं काम सध्या फक्त छोटी वृत्तपत्रं करताहेत. मित्रांनो, मोठ्या वृत्तपत्रात आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घ्यावा लागतो, ही शोकांतिका आहे. ‘शोकसत्ता’ होतेय सगळी! तर ही शोकसत्ता थांबवायला हवी.
आधीच्या परिसंवादात एकानं सांगितलं, नवोदित लेखकांचं हे कर्तव्य आहे, ही आपल्या पुढील आव्हानं आहेत, या आपल्या पुढील समस्या आहेत म्हणून मी बोलतोय. बाबासाहेब पुरंदर्‍यांचा विषय निघाला. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्यांना करावं तितकं वंदन कमी आहे. त्यांचं एक वाक्य फक्त घेतलं गेलं. ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि बालशिवाजी यांचं गोत्र एकच...’ हे वाक्य घेऊन राडा केला गेला. महाराष्ट्र पेटवला. भांडारकरसारखी इन्स्टिट्यूट फोडली गेली. ते पूर्ण वाक्य काय होतं? ‘दादोजी कोंडदेव, आऊसाहेब आणि बालशिवाजी यांचं गोत्र एकच, ते म्हणजे सह्याद्री!’
‘ते म्हणजे सह्याद्री’ हे काढायचं आणि हवा तसा अर्थ घेऊन भांडत रहायचं. हा खोटेपणा आजच्या लेखकांनी लेखणीच्या माध्यमातून पुढे आणला तर समाज आणखी निकोप होऊ शकेल. वैचारिक क्रांती घडू शकेल. जगण्याचं बळ आपल्याला त्यातून मिळू शकेल. हे सगळं साध्य होईल! प्रकाशक म्हणून खरंतर खूप काही बोलायचंय; पण वेळेची मर्यादा त्यांनी घालून दिलीय. त्यामुळं फार काही बोलत नाही. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!

- घनश्याम पाटील 
संपादक प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२