Tuesday, November 21, 2017

‘वादे वादे जायते कंठशोषः’



एखादा वारकरी ज्या भक्तीभावानं पंढरीच्या वारीला जातो त्याच ओढीनं मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जातो. तिथं लेखकांच्या, साहित्य रसिकांच्या, वाचकांच्या गाठीभेटी होतात. सगळा गोतावळा जमतो. म्हणूनच 2003 पासून माझी ही संमेलनवारी सुरू आहे. यातल्या सर्वच संमेलनाच्या अनेक आठवणी माझ्या पोतडीत आहेत आणि त्या मी वेळोवेळी विविध माध्यमांतून मांडल्याही आहेत; मात्र गेल्या काही संमेलनातील वाद आणि ‘चपराक’ची भूमिका याविषयी इथे थोडक्यात उहापोह करणार आहे.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वाद आणि वितंडवादाची परंपराच निर्माण झाली आहे. त्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिनं ‘चपराक’नं आग्रही भूमिका घेतली आहे. काहीवेळा मात्र प्रस्थापितांविरूद्ध हंटर उगारणं अपरिहार्य ठरतं. साहित्य संमेलन आणि त्यातील राजकारण याविषयी आम्ही सजगपणं अनेक विषय पुढे आणले आहेत.

महाबळेश्‍वर येथील 82 व्या साहित्य संमेलनात आनंद यादव जेव्हा संमेलनाध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’वरून मोठं वादळ निर्माण झालं. या कादंबरीत त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांविषयी काही आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं आम्ही आवाज उठवला होता. त्यावेळी यादवांनी ‘कादंबरी वाचण्याची एक पद्धत असते; घनश्याम पाटलांना कादंबरी वाचता येत नाही. कादंबरी म्हटले की कल्पनाविलास हा आलाच! तो गृहित धरून ती वाचायला हवी,’ असं विधान केलं. आता यातली मेख अशी होती की, ‘संतसूर्य तुकाराम’च्या पहिल्याच पानावर त्यांनी एक वाक्य ठळकपणे छापलं होेतं. ते होतं, ‘संशोधन सिद्ध करून लिहिलेली वास्तववादी कलाकृती.’ म्हणजे एकीकडं ‘कादंबरी म्हणजे कल्पनाविलास’ म्हणायचं आणि दुसरीकडं ‘वास्तववादी कलाकृती’ असंही म्हणायचं! हा सरळ सरळ दुटप्पीपणा होता. कल्पना आणि वास्तव ही दोन टोकं एकत्र आणणारे यादव हे मराठीतील पहिले लेखक असावेत. म्हणून आम्ही त्याविरूद्ध जोरकस आवाज उठवला. ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्यासारखे काही वारकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘टाळ’ आंदोलन सुरू केलं आणि यादवांनी देहूला जाऊन सगळ्यांची जाहीर माफी मागितली.

खरंतर यादवांनी हे लिहायला नको होतं आणि लिहिलंच तर त्यावर ठाम रहायला हवं होतं. ‘मला संमेलनाध्यक्षपद नको, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे’ असं त्यांनी सांगितलं असतं तर त्यांचा कणखरपणा दिसला असता. मात्र तसं काही घडलं नाही. झुंडशाही आणि दडपणाला ते बळी पडले आणि वारकर्‍यांना शरण गेले. यादवांनी त्यांची चूक मान्य केल्यावर मी त्यांचा विरोध सौम्य केला आणि ‘यांना आवरा, त्यांना सावरा’ असा विशेष लेख लिहिला. त्यात वारकर्‍यांच्या झुंडशाहीला आवरणं आणि यादवांना या परिस्थितीतून सावरणं गरजेचं आहे हे स्पष्टपणे नोंदवलं; पण यादव संमेलनाध्यक्ष होऊनही साहित्य संमेलनाला जाऊ शकले नाहीत. मराठी साहित्याच्या दृष्टिनं ही काळीकुट्ट घटना ठरली.

पुण्याच्या साहित्य संमेलनाचे आयोजक होते पुण्यभूषण संस्थेचे डॉ. सतीश देसाई. ते माझे स्नेहीच आहेत. पुण्याचे उपमहापौर, नगरसेवक, साहित्य परिषदेचे पदाधिकारी, त्रिदल संस्था, पुण्यभूषण या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलंय. मात्र पुण्यातील संमेलन साहित्यबाह्य विषयांवरूनच गाजलं. त्यात अमिताभ बच्चन हे प्रमुख आकर्षण होतं. डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारखा प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष असूनही चर्चा मात्र अमिताभचीच होती. त्यानं मराठीत ‘नमस्कार मित्रांनो’ कसं म्हटलं, त्याचा पेहराव कसा होता, तो व्यासपीठावर कसा आला आणि ‘मधुशाला’च्या ओळी कशा म्हणून दाखवल्या याचीच माध्यमांनी चर्चा घडवली.

तर या संमेलनाच्या आयोजनानंतर आयोजक संस्थेनं महामंडळाला हिशोब द्यायला बराच वेळ घालवला. महामंडळानं सातत्यानं मागणी करूनही त्यांनी टंगळमंगळ केली. शेवटी या संमेलनातून नऊ लाख रूपये उरल्याचं त्यांनी जाहीर केलं. माध्यमांनी आरडाओरड केल्यानंतर मात्र डॉ. सतीश देसाई यांनी तब्बल 82 लाख रूपये परत केले आणि तेव्हापासून त्या निधीतून संमेलनाध्यक्षला वर्षभर साहित्यसेवेसाठी फिरावे लागते, म्हणून एक लाख रूपये देण्याची परंपरा सुरू झाली. 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून हे 82 लाख रूपये मिळणे पुढच्या अध्यक्षांसाठी मोलाचे ठरले. त्यावेळी ‘कुणाचे पुण्य, कुणाचे भूषण?’ असा जळजळीत लेख लिहून मी यावर घाव घातले होते.

86 वं साहित्य संमेलन झालं ते चिपळूणला. या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. त्यांच्याविरूद्ध ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी चांगली लढत दिली होती. साहित्यनिर्मिती आणि कर्तबगारी या पातळीवर हमो कितीतरी पटीने अव्वल होते. मात्र त्यांनी त्यांच्या परिचय पत्रकात ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली होती. आम्ही हमोंच्या पाठिशी ठामपणं उभे होतो; पण ही माहिती त्यांनी देऊ नये असं आम्हास वाटत होतं. त्याविषयी आम्ही त्यांना स्पष्टपणे बोललो पण त्यांचं म्हणणं होतं, ‘‘मी जे केलंय ते मतदारांपुढं मांडायला हवं.’’ ते पत्रक मी सर्वप्रथम ‘चपराक’मधून प्रकाशित केलं आणि त्यावर्षीच्या सर्व मतदारांपर्यंत पाठवलं. अपेक्षेप्रमाणं त्यावरून वाद निर्माण झाला आणि संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना हमोंविरूद्ध रस्त्यावर उतरल्या. चिपळूणच्या आयोजक संस्थेनंही ‘जातीयवादाला खतपपाणी घालणार नाही’ म्हणून हमोंविरूद्ध भूमिका घेतली. खरंतर हमोंची साहित्य कारकिर्द अफाट होती पण झुंडशाहीपुढं त्यांचा निभाव लागला नाही. त्यावेळी ‘मराठ्यांची ढाल व्हा’ असं म्हणत मी त्यांच्या पाठिशी उभा होतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून त्यांना संरक्षण देण्यापर्यंत आमचा पुढाकार होता. माझे मित्र भालचंद्र कुलकर्णी यांनीही त्यावेळी उत्तम संघटनकौशल्य दाखवलं होतं. हमो यांच्यासारखा ताकदीचा साहित्यिक संमेलनाध्यक्ष होऊ शकला नाही याची खंत कायम आहे.

87 वं साहित्य संमेलन झालं ते सासवडला. या संमेलनाचे अध्यक्ष होते कवी फ. मुं. शिंदे. तेव्हाचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांचा त्यांना पाठिंबा होता. फमुंविरूद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी उभे होते. इथेही राजकारण आणि वशीलेबाजीनंच बाजी मारली. मराठीत 85 कादंबर्‍या लिहिणारा संजय सोनवणी यांच्यासारखा बलाढ्य लेखक पराभूत झाला आणि एका रंगमंचीय कवीच्या गळ्यात विजयाची पताका पडली. त्यावेळी मी ‘व्यासपीठावर आई या विषयावर कविता सादर करणारा हा कवी व्यासपीठावरून खाली उतरला की बाईचा विचार सुरू करतो, हे मराठी कवितेचं दुर्दैवच’ अशा स्पष्ट शब्दात हल्ला चढवला होता. 

88 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वार्थानं वेगळं ठरलं. हे संमेलन झालं पंजाबमधील घुमान या खेड्यात. घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी. इकडं माझे मित्र संजय नहार यांचं अफाट काम. त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना साथ मिळाली ती भारत देसरडा या उद्योजक आणि साहित्यप्रेमी मित्राची. दोघांनी नेटानं सर्व व्यवस्था केली. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यावेळी निवडून आले. अर्थातच मोरे यांच्या विजयासाठीही सर्व राजकीय यंत्रणा कामाला लागली होती.

घुमानच्या संमेलनात अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फार वाद घातला नाही. त्यावेळी ठिणगी टाकली ती प्रकाशक परिषदेनं. ‘अमराठी भागात साहित्य संमेलन होत असल्यानं पुस्तक विक्री होणार नाही. त्यामुळं एकही मराठी प्रकाशक या संमेलनात सहभागी होणार नाही’ अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. ‘एकही मराठी प्रकाशक सहभागी होणार नाही’ हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणून मग मी ठाम भूमिका घेतली, ‘‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तरी आम्ही तिथं जाणार! कारण धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा...’’ 

असं ठणकावल्यावर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं त्याची जोरदार दखल घेतली. मुंबई सकाळ, झी 24 तास, साम टीव्ही यांनी विशेष बातम्या करून माझ्या भूमिकेचं समर्थन केलं.

प्रकाशक परिषदेचा हा विरोध मोडून काढताना केवळ त्यांना विरोध अशी मर्यादित भूमिका नव्हती. अमराठी भागात जर साहित्य संमेलन होत असेल तर त्यांना मराठीचं वैभव कळायला हवं. दोन्ही भाषा भगिनीत समन्वय साधायला हवा अशी त्यामागची तळमळ होती. त्यामुळं ‘चपराक’च्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रेल्वेचा डबा भरून पुस्तकं आम्ही घुमानला नेली. ‘चपराक’ची सोळा सदस्यांची टीम त्यासाठी घुमानला गेली. 

या साहित्य संमेलनात पंजाबचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी हजेरी लावली. या संमेलनामुळं त्या गावचा कमालीचा विकास झाला. आज जर कोणी घुमानला गेलं तर या संमेलनाचं महत्त्व त्याच्या लक्षात येईल. यावेळी अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा होत्या डॉ. माधवी वैद्य. त्यांना कमालीची मिरवण्याची हौस. व्यासपीठावर सर्व मान्यवर असताना नऊवारी साडी, नाकात नथ आणि हातात तलवार घेऊन त्यांनी ‘फाटो सेशन’ केलं. त्यात संमेलनाध्यक्ष मोरे पार दुसर्‍या रांगेत मागं ढकलले गेले. तो फाटो प्रकाशित करून मी ‘कॅपशन’ दिली होती, ‘संमेलनाथ नथ दिसली पण नाक मागं गेलंय...’ मोरेंचं अंग अवघडून मागं स्वतःला सावरत थांबणं आणि वैद्यबाईंचं मिरवणं त्यामुळं चांगलंच चर्चेत आलं.

मुख्य म्हणजे ज्या प्रकाशक परिषदेनं या संमेलनाला विरोध केला होता त्याचे पदाधिकारी मात्र इथल्या परिसंवादात सहभागी होते. असो. ‘चपराक’च्या पुस्तकांची प्रचंड विक्री झाली. कवितासंग्रह तर आम्ही ग्राहकांना भेट देण्यासाठीच नेले होते मात्र एकही कवितासंग्रह भेट द्यायची वेळ आली नाही. मराठी प्रकाशकांची इंग्रजी वृत्तपत्रे चार ओळीतही दखल घेत नाहीत, हा इतिहास असताना ‘इंडियन एक्सप्रेस’सारख्या मान्यवर दैनिकानं दिल्ली आवृत्तीला माझी मुलाखत प्रकाशित केली. केवळ एका धाडसी भूमिकेमुळं हे असं सारं वाट्याला आलं. माधवी वैद्य यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत; मात्र या संमेलनातनंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी जाहीरपणे ‘चपराक’च्या भूमिकेचं कौतुक केलं आणि ‘चपराक’नं प्रकाशकांतील तिढ सोडवल्याचं सांगितलं.

89 वं साहित्य संमेलन म्हणजे माझ्यासाठी मोठं मानसिक द्वंद होतं. आमचे तेव्हाचे सल्लागार डॉ. श्रीपाल सबनीस या निवडणुकीला उभे होते. त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र एक केला होता. सातआठ महिने आमची तयारी सुरू होती. त्यांच्या अर्ज भरताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होतो. सबनीस यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र जी मेहनत घेतली होती त्यानुसार त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. 

मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्यापुढं लोटांगण घातलं आणि सांगितलं की, ‘तुम्हाला नमस्कार म्हणजे हा शरद पवारांना नमस्कार. संमेलनाध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला...’ या प्रकारानंतर मी अतिशय अस्वस्थ झालो. त्यांच्या सौभाग्यवती ललिताताई यांनी हातावर बांधलेली राखी उदासपणं पाहत कार्यालयात आलो आणि ‘चपराक’च्या सल्लागार पदावरून त्यांना बडतर्फ केलं. अंकावरून त्यांचं नाव कमी करणं हा माझ्या पद्धतीनं त्यांचा निषेध होता. कालपर्यंत मी त्यांची बाजू समर्थपणं मांडत होतो आणि आज मला आतला आवाज सांगत होता की आपण अयोग्य माणसाला डोक्यावर घेतलं. त्यामुळं मी त्यांच्याविरूद्ध एक शब्दही लिहिला नाही.

पुढं निकाल जाहीर झाल्यावर त्यांचा वारू सुसाट सुटला. ज्यांना ज्यांना त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं त्या त्या मतदारांनी त्यांना अभिनंदनाचे फोन केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘मला तुमच्या शुभेच्छाही नकोत...’’ केवळ माझ्या शब्दाखातर ज्यांनी कसलीही ओळख नसताना यांना मतदान केलं होतं ते त्यामुळं अस्वस्थ झाले आणि मी पेटून उठलो. मग त्यांनी अध्यक्षपदासाठी काय काय उठाठेवी केल्या याचा पंचनामा करणारा एक लेख मी लिहिला. त्याचं शीर्षक होतं, ‘कुत्र्याला खीर पचली नाही.’

हा लेख प्रचंड व्हायरल झाला. त्यावरूनही काही वृत्तपत्रांनी, वृत्त वाहिन्यांनी बातम्या केल्या. पिंपरीत साहित्य संमेलनात हा अंक आम्ही विक्रीसाठीही ठेवला होता. पहिल्या दिवशी या अंकाची बेफाम विक्री झाली. 

दुसर्‍या दिवशी सकाळी मी आवरण्यासाठी म्हणून घरी आलो. तेवढ्यात मला ‘झी 24 तास’चे संपादक उदय निरगुडकर यांचा फोन आला. तो लेख आवडल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल पंधरा मिनिटं ते त्या लेखावरच बोलत होते. त्यांचा फोन मी ठेवला आणि संमेलनातील ‘चपराक’च्या ग्रंथ दालनातून मला फोन आला. त्यांनी सांगितलं ‘‘दादा, आपले अंक आयोजकांनी जप्त केले...’’ हा माझ्यासाठी खरंतर मोठा धक्का होता. मी लगेच निरगुडकरांना पुन्हा फोन केला आणि सांगितलं, ‘‘ज्या लेखाचं तुम्ही तोंडभरून कौतुक केलं त्या लेखाचं बक्षीस मला मिळालं. आत्ताच चपराकचे अंक ग्रंथ दालनातून जप्त केले.’’ त्यांनी तो फोन तसाच त्यांच्या स्टुडिओत जोडला आणि माझा ‘फोनो’ महाराष्ट्राला ऐकवला. मी तसाच ग्रंथ दालनात पळालो. तिथं तोपर्यंत सगळ्याच प्रसारमाध्यम प्रतिनिधींची गर्दी झाली होती. सगळ्यांनी माझ्या लाईव्ह प्रतिक्रिया चालवल्या. ‘चपराक’च्या ग्रंथदालनात तुडुंब गर्दी झाली. थोड्याच वेळात आयोजक पी. डी. पाटील आणि संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस ‘चपराक’च्या दालनात आले आणि त्यांनी ‘अनावधानाने’ झालेल्या प्रकाराबद्दल माध्यम प्रतिनिधींसमोर माफी मागितली. दुसर्‍या दिवशी ‘नवा काळ’सह अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ती मुख्य बातमी केली. माझा संपूर्ण लेख पुनर्मुद्रित केला. काहींनी तर ‘चपराक’वर विशेष अग्रलेख केले. ‘कोण हे श्रीपाल सबनीस?’ असा प्रश्‍न विचारणार्‍यांना ‘सबनीस कोण?’ याचे सणसणीत उत्तर दिले होते.

डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात मी परिसंवादात सहभागी होतो. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृतीला प्रतिसादशून्यतेचं जे ग्रहण लागलंय त्यावर मी जोरकस हल्ला चढवला. त्याचीही प्रसारमाध्यमांनी योग्य ती दखल घेतली. डॉ. अक्षयकुमार काळे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते पण त्यांचा प्रभाव संमेलनात कुठंच दिसला नाही. या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवीसंमेलनात एका कवयित्रीनं अंजली कुलकर्णी यांची कविता ढापली. चक्क साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच साहित्यचोरी झाल्यानं मी आणि माझ्या सहकार्‍यांनी तिथंच आवाज उठवला. माध्यमांनी त्याहीवेळी आमची साहित्य तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

आगरकरांनी त्याकाळातही ‘वादाला का भीता?’ असा सवाल केला होता. वाद व्हायला हवेत. त्यातून चांगले ते बाहेर येते. समुद्रमंथन झाल्याशिवाय त्यातून रत्ने बाहेर कशी येणार? मात्र सध्याचा काळ बदललाय. हे वाद इतके निरर्थक आहेत की त्यात वैयक्तिक मानपान आणि हेवेदावे, मत्सर याशिवाय काहीच नाही. त्यामुळे साहित्य संमेलनांचीही अप्रतिष्ठा होत आहे. हे असेच चालू राहिले तर हा केवळ वेळ आणि पैशाचा अपव्यय ठरेल. भविष्यात साहित्याला आणखी चांगले दिवस यायचे असतील तर या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यापक आणि दीर्घकालिक विचार करायला हवा.

मला नेहमी वाटतं की, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना किमान विधानपरिषदेवर घ्यायला हवं. राज्यकर्त्यांनी त्यांचे पडके वाडे बांधण्याऐवजी मसापचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष यांच्यापैकी कुणाला तरी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून घ्यायला काय हरकत आहे? ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असं म्हटलं जायचं. साहित्य संमेलनात मात्र वाद इतक्या खालच्या पातळीवर जात आहेत की ‘वादे वादे जायते कंठशोषः’ असं म्हणायची पाळी येतेय.

साहित्य क्षेत्राला अजूनही प्रतिष्ठा आहे. साहित्य संमेलनांनी ती जाणिवपूर्वक जपावी. मराठी भाषेच्या सर्जनासाठी ते अत्यावश्यक आहे. 
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’, पुणे 
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - ‘रानफूल’ दिवाळी अंक)

Sunday, November 12, 2017

जो बदलतो तो टिकतो!

एखादा माणूस मेला तर त्या कुटुंबाचे नुकसान होते. तो कर्तबगार असेल तर समाजाचीही ती हानी असते! पण एखादी संस्था संपली तर त्याचा फटका आणि दुःखाची तीव्रता आणखी असते. त्यातही बुद्धिच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन काम करणारी संस्था बंद होणे म्हणजे समाजाचे मोठे नुकसानच! ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि मराठी साहित्यविश्वात बरीच उलट-सुलट चर्चा झाली. एखादे चांगले मासिक बंद होणे हे जितके दुःखद आहे त्याहून वाईट आहे त्यांच्या संचालकांची नकारात्मक मानसिकता! सर्वत्र वाचनसंस्कृती कमी होत असल्याचे चित्र रंगवले जात असताना अशा बातम्या म्हणूनच अनेकांची उमेद संपवणार्‍या ठरतात.

वयानुसार धावपळ होत नाही, एकहाती काम करण्याच्या नादात संस्था पुढे चालवू शकेल असे नेतृत्व निर्माण करू शकलो नाही, आजारपण, अन्य व्याप, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव किंवा बिघडलेले आर्थिक व्यवस्थापन अशा कारणांमुळे एखादे नियतकालिक बंद होऊ शकते; मात्र इथे ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी ते बंद करताना जी कारणे दिलीत त्यातले एक प्रमुख कारण आहे, ‘नवीन लेखक मिळत नाहीत...’

एकीकडे लेखनासाठी व्यासपीठ नाही म्हणून अनेक नवोदित धडपडत असताना ‘लेखक नाहीत’ म्हणणे म्हणजे मोठी विसंगती आहे. ‘आम्ही उच्च सांस्कृतिक अभिरूची जोपासतो’ असे म्हणत नव्याने लिहिणार्‍यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि असे खापर त्यांच्यावर फोडणे म्हणूनच स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासारखे आहे. आजच्या फळीतील उमेदीच्या लेखकांच्या दृष्टिने हे अन्यायकारक आहे.

आजच्या काळात मराठीत कोणते मासिक नव्याने सुरू झाल्याने फार मोठी क्रांती होणार नाही किंवा एखादे मासिक बंद पडल्याने समाज रसातळालाही जात नाही. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे बंद पडल्याने हळहळ वाटावी अशा ‘तत्त्व’ बाळगून असणार्‍या संस्था आजच्या काळात नगण्य आहेत. असे म्हणतात की, आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. तरीही ‘अंतर्नाद’बद्दल अनेकांना दुःख का वाटावे? कारण आपला समाज अजूनही सद्गुणांची पूजा बांधतो. चांगले ते स्वीकारतो आणि वाईट ते अव्हेरतो. 

बावीस-तेवीस वर्षे सुरू असलेल्या मासिकाची साधी वेबसाईटही नसावी यावरून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अकरा कोटीच्या महाराष्ट्रात पाच-दहा हजार लोकांनाही ज्या मासिकाचे नाव माहीत नव्हते ते बंद पडल्याने चर्चेत येणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे. बरे, अशी मासिके स्वतःचे वेगळे वाचक घडवतात, लेखक तयार करतात असेही नाही. वाचकांची साहित्यिक अभिरूची वाढावी, त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे यासाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेत का? मग ठराविक कंपुने ‘मराठी साहित्यावर दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला’ म्हणून गळे काढण्यात काय अर्थ? कोणत्याही भाषेतील, कोणतेही मासिक बंद होणे हे वाईटच असले तरी त्यामुळे त्यांनी वाचकांना किंवा लेखकांना दोष देणे सर्वस्वी चुकीचे आहे.

मागच्या वर्षीची नोटाबंदी, जीएसटी अशा कारणांमुळे यंदा अनेक दिवाळी अंकांना फटका बसल्याच्या ‘अफवा’ अशाच काही ‘नाकर्त्या’ लोकांकडून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे किंमतीत केेलेली लक्षवेधी वाढ, पानांची घटलेली संख्या, कमी दराने वाढवलेल्या जाहिराती हे सारे पहावे लागत आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातला हा प्रकार आहे. महाराष्ट्रात जवळपास सातशे ते आठशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील अडीचशे ते तीनशे अंक शासनाकडे नोंदणीकृत नाहीत. केवळ ठराविक लोकांच्या जाहिराती मिळवणे आणि नफा कमावणे या उद्देशाने निघणारी ही बेकायदेशीर मासिके, नियतकालिके सरकारी धोरणांचा बागुलबुवा करत आहेत. त्यांची साहित्यिक जाणीव आणि लेखनभान तपासून बघितले तर हाती मोठा भोपळा येईल. आरएनआय म्हणजे ‘रजिस्ट्रेशन ऑफ न्युजपेपर्स फॉर इंडिया’ या संस्थेकडून साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, वार्षिक या सर्वांची नोंदणी करणे बंधनकारक असताना अनेकजण हवे ते नाव घेऊन बिनबोभाट ‘धंदा’ करतात. काहींनी कित्येक वर्षांपूर्वी केवळ ‘टेंपररी’ परवाना मिळवला असून अनियमिततेमुळे तो रद्द झालेला असतानाही ही मंडळी कोणतीही सरकारी बंधने, निकष न पाळता ‘अधूनमधून’ अंक काढतात आणि समाजात संपादक, पत्रकार म्हणून मिरवत असतात.

आम्ही ‘चपराक’ हे मासिक 2002 सालापासून चालवतो. सहा राज्यातील मराठी वाचकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले आहे. ज्यांचा शालेय अभ्यासक्रमानंतर वाचनाशी कसलाच संपर्क राहिला नव्हता त्यांची अभिरूची वाढवून आम्ही त्यांना ‘वाचते’ केेले आहे. प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो हे ध्यानात घेऊन त्यातील अनेकांना ‘लिहिते’ही केले आहे. म्हणूनच ज्यांनी आयुष्यात कधी प्रेयसीला साधे प्रेमपत्रही लिहिले नाही असे अनेकजण आज कथा-कादंबर्‍या लिहित आहेत. 

सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही दर्जेदार मराठी मासिके नाहीत. जी आहेत त्यातील बहुतेकजण विविध विचारधारांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे आणि माहिती, मनोरंजन आणि ज्ञान एकाचवेळी देणारे ‘चपराक’सारखे मासिक अल्पावधीत वाचकप्रिय ठरत आहे. लेखकांची आडनावे, गावे बघून आम्ही कधीही साहित्य छापले नाही. गुणात्मकदृष्ट्या जे अव्वल आहे ते दिल्याने वाचकांनी ते स्वीकारले. हीच भूमिका घेऊन काम करणारी एक पिढी सध्याच्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. ‘अंतर्नाद’ बंद पडत असतानाच मुकुल रणभोरसारखा इवलासा पोर ‘अक्षर मैफल’सारखे मासिक सुरू करण्याचे धाडस दाखवतो इकडे आम्ही सोयीस्कर कानाडोळा करतो. नकारात्मक मानसिकता आणि प्रस्थापितांची प्रतिसादशून्यता हे मराठी साहित्याला लागलेलं ग्रहण सुटणं म्हणूनच गरजेचं आहे. 

2002 ला आम्ही ‘चपराक’ मासिक सुरू केले तेव्हा पहिली पंचवार्षिक वर्गणी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी भरली होती. त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरातून त्यांची वर्गणी घ्यायला नकार दिल्यानंतर ते म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला मदत करायची म्हणून मी वर्गणी भरत नाही. ही वर्गणी घेतल्यावर पुढची पाच वर्षे मला अंक पाठवणे ही तुमची नैतिक जबाबदारी असणार आहे. जर तुम्ही पाच वर्षे अंक टिकवला तर ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला थोपवू शकणार नाही.’’

निळुभाऊंचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले. केवळ वाचकांच्या जिवावर चालणारे मासिक म्हणून ‘चपराक’ पुढे आले. ज्या भानू काळे यांनी त्यांचे ‘अंतर्नाद’ मासिक बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय जाहीर केला त्याच काळे यांनीही मध्यंतरी ‘चपराक’ला अनपेक्षितपणे पाच हजार रूपयांचा धनादेश पाठवून आमच्या कामाचा गौरव केला होता. असा गुणग्राहक माणूस जेव्हा नकारात्मक बोलू लागतो तेव्हा ते अधिकच घातक असते. नियतकालिक चालवणार्‍या प्रत्येकाने नव्या काळाची आव्हाने समजून घेणे गरजेचे आहे. ‘जो बदलतो तो टिकतो’ हा डार्विनचा सिद्धांत कुणीही विसरून चालणार नाही. आपल्या तत्त्वावर ठाम राहतानाच नव्याचे स्वागत जो कोणी उदारपणे करेल त्याच्यासाठी या क्षेत्रात असंख्य संधी आहेत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Friday, November 3, 2017

प्रकाशन विश्वातील नकारात्मकतेला चपराक



वाचनसंस्कृती कमी होत असल्याचं सांगितलं जात असताना आणि त्यामुळं प्रकाशनविश्वाला घरघर लागलेली असतानाच काही प्रकाशन संस्था मात्र सातत्यानं वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या पुस्तकांना मागणीही उत्तम असून नवीन वाचक घडविण्याचं काम त्यांनी नेटानं केलंय. आजच्या तरूणाईला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या आणि नकारात्मकतेचं मळभ दूर सारून ग्रंथ व्यवहारात चेतना निर्माण करणार्‍या पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे तरूण संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांच्याशी नगर येथे होणार्‍या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ना. सुर्वे यांनी साधलेला हा संवाद.

* नगरला विभागीय साहित्य संमेलन होतंय. अशी साहित्य संमेलनं कितपत महत्त्वाची आहेत?

- साहित्य माणसाच्या मनाला उभारी देतं, त्याचं नैराश्य दूर सारून त्याला दिशा दाखवतं. त्यामुळं या साहित्याकडं सामान्य माणसाला आकर्षित करून घ्यायचं झालं तर अशा संमेलनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. संमेलनात वाचक-रसिकांना लेखक भेटतात, त्यांचे विचार जवळून ऐकता येतात. छोट्या संमेलनात लेखक आणि वाचकांचा थेट संवाद होतो. त्यामुळं विभागीय साहित्य संमेलनं ही मोलाची आहेत. नगरला होणारं साहित्य संमेलन त्यामुळंच महत्त्वपूर्ण आहे.

* अशी अनेक विभागीय साहित्य संमेलनं होत असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची काय गरज? ते बंद करावं अशी मागणी सातत्याने होते. त्याबाबत तुमचं मत काय?

- अनेक छोट्याछोट्या नद्या एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होतो आणि तो पुढं सागराला मिळतो. त्यामुळं छोट्या नद्या आणि सागराचं महत्त्व कमी होत नाही. दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. या छोट्या नद्या तो तो भाग संपन्न करतात. आजूबाजूच्या जमिनीचं, गावाचं भवितव्य त्यांच्यावर असतं. या नद्यांचं पाणी जसं झिरपत, मुरत येतं तसंच छोट्या आणि विभागीय साहित्य संमेलनामुळं आपली साहित्यिक भूक भागवली जाते. यातूनच चांगले वाचक तयार होतात, लेखक तयार होतात. साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी ही संमेलनं मोठी भूमिका पार पाडतात. त्याचे विशाल रूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते आयोजनापर्यंत आणि जेवणाचे पदार्थ कोणते असावेत इथपासून ते सहभागी लेखक-कवी कोण असावेत इथपर्यंत तिथं सातत्यानं वाद आणि वितंडवाद होत असले तरी या संमेलनांचं योगदान आणि परंपरा मोठी आहे. काळानुसार तिथंही आवश्यक ते बदल होत आहेत. त्यामुळं संमेलनच काय, तर कोणताही विधायक उपक्रम बंद करण्याची मागणी अप्रस्तुत आणि दुर्दैवी आहे.

* वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी ओरड असताना तुम्ही नवनवीन पुस्तकं सातत्यानं कशी काय प्रकाशित करता?

- काही ठराविक प्रकाशकांनी हा बागुलबुवा निर्माण केलाय. वाचक कमी होत असल्याची ‘अंधश्रद्धा’ ‘चपराक’ने प्रयत्नपूर्वक दूर केलीय. आमची सर्व पुस्तकं ‘बेस्ट सेलर्स’ ठरली. त्यामुळं त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जर जुन्या आणि नामवंत प्रकाशकांची पुस्तकं खपत नसतील तर त्यांना काळाबरोबर चालता येत नाही. आजच्या काळाची गरज ओळखून नवे साहित्य पुढे यायला हवे. वाचक कमी झालेत असे म्हणण्यापेक्षा त्यांची वाचनाची अभिरूची आणि माध्यमं बदललीत हे आपण समजून घ्यायला हवं. ‘अंतर्नाद’सारखं एक चांगलं मासिक बंद पडल्याबद्दल आपण हळहळतो; पण त्यांची साधी वेबसाईटही नव्हती किंवा नवे वाचक तयार करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत इकडं आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळं नकारात्मकता बाजूला सारून आपण जोमानं कार्यरत राहिलं पाहिजे. आम्हाला हे जमलं म्हणून आम्ही नवनवीन पुस्तकं प्रकाशित करू शकलो.

* ‘चपराक’चा विस्तार राज्याबाहेरही झाला. तो कसा काय?
- हो! आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत.  शिवाय अनेक अंक, पुस्तके देश-विदेशात पोहोचली. मराठी माणूस जगभर विखुरलाय. आपण त्यांचा कधी विचारच करत नाही. त्यांचीही साहित्यिक भूक मोठी आहे. त्यासाठी ते आसुसलेले असतात. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही एखादे मासिक प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. त्यामुळं इतर तर त्यांच्या खिजगणतीतही नसतात. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बेळगाव, गुलबर्गा, हैद्राबाद, बेंगलुरू, कारवार, अमृतसर, दिल्ली, इंदूर, भोपाळ, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, पणजी अशा महत्त्वाच्या शहरातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यातील अनेकजण सध्या लिहितेही झाले आहेत. प्रत्येक वाचकांमध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला जागे करण्याचे काम ‘चपराक’ने केेले.

* मराठी मासिकांची पिछेहाट का झाली? 
- मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणं नवे वाचक तयार व्हावेत यासाठी कोणीही फार प्रयत्न केले नाहीत. अनेक मासिकं विविध विचारधारांत अडकून पडली. कोणी समाजवादी आहे तर कोणी हिंदुत्त्ववादी. मग तेच तेच विचार वाचकांच्या माथी मारले जातात. त्यामुळं ती मासिकं कोणी वाचत नाही. सत्तर वर्षांची पंरपरा सांगायची आणि सात हजार वाचकांपर्यंतही पोहोचायचं नाही हे त्यामुळंच होतं. मग ठरलेल्या विचारधारांचा उदोउदो करायचं, पाककृतीपासून मेहंदीपर्यंत विशेषांक काढायचे आणि आलेला दिवस ढकलायचा अशी यांची गत होणे स्वाभाविक आहे; पण त्यामुळे नवे वाचक नाहीत किंवा मासिकांची पिछेहाट झालीय असे म्हणता येत नाही. फक्त पर्याय बदललेत. ‘चपराक’सारख्या अनेक मासिकांचा उदय आणि त्यांना भरभरून मिळणारा वाचकाश्रय हेच सिद्ध करतो.

* वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते प्रयोग केले?
- एकतर आम्ही भारतातील सर्व प्रमुख शहरात गेलो. तिथल्या मराठी लोकांशी संवाद साधला. अगदी इंदूरसारख्या शहरात जाऊन तिथंही ‘चपराक’चा साहित्य महोत्सव घेतला. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशकांची कोंडी फोडली. लिहित्या हातांना बळ दिलं. ते करताना त्यांचं नाव, गाव, प्रांत, धर्म, लिंग याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळं केवळ ‘चपराक’मध्ये तुम्हाला साहित्याचं इतकं वैविध्य दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी ‘चपराक’चाही साहित्य महोत्सव घेतो. त्यात एकाचवेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातल्या लेखकांची, वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील पुस्तके प्रकाशित होतात. परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन, अभिवाचन, अभ्यासपूर्ण व्याख्यानं, इतर दिवाळी अंकांचा गौरव असे उपक्रम त्यात असतात. मुख्य म्हणजे त्यात वाचकांचाही सहभाग घेतला जातो. त्यामुळं अल्पावधीत ‘चपराक’ वाचकाभिमुख झालाय.

* पाचशे पानांचा दिवाळी महाविशेषांक काढण्यामागची संकल्पना काय?
- आम्ही पहिल्या अंकापासून म्हणजे 2002 पासून दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो. गेल्या काही वर्षात चर्चा होती की, नव्यानं कोणी फारसं चांगलं लिहित नाही, दिवाळी अंकांचं दिवाळ निघतंय. ते बंद पडत आहेत. या व अशा नकारात्मक चर्चेला उत्तर म्हणून आम्ही ‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक करायचा ठरवलं. त्याला वाचक आणि लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नवोदित आणि प्रस्थापित यांचा समन्वय साधत आम्ही सर्वोत्तम ते वाचकांना दिलं. त्यामुळं अनेकजण नव्यानं लिहिते झाले. वाचकही म्हणतात, दहा दिवाळी अंक घेण्यापेक्षा ‘चपराक’चा एकच दिवाळी महाविशेषांक घ्यावा! म्हणजे पैसेही वाचतील आणि दर्जेदार साहित्य वाचल्याचे समाधानही मिळेल.

* नवीन लेखकांना काय सांगाल?
- उत्तमोत्तम वाचत रहा, लिहित रहा. लिखाणाचं स्वयंपाकासारखं आहे. रोज केलात तर चपात्या उत्तम होतील. कधीतरीच करायला गेलात तर जगाचा नकाशा होणे अटळ आहे. सध्या समाजमाध्यमासारखं महत्त्वाचं शस्त्र तरूणांच्या हातात आहे. अनेक युवकांच्या ब्लॉगला लाखो वाचक मिळतात. त्यामुळं कोणी दखल घेत नाही म्हणून हतबल होऊ नकात, निराश होऊ नकात. तुमची दखल त्यांनी स्वतःहून घ्यावी इतके स्वसामर्थ्य बाळगा. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार लेखन करणार्‍यांना आणि त्यात सातत्य ठेवणार्‍यांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं केवळ हौस म्हणून न लिहिता उत्तमतेच्या ध्यासातून कार्यरत रहा म्हणजे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.

Saturday, October 28, 2017

वाचेल तो टिकेल!

मुद्रित माध्यमाच्या भवितव्याविषयी सध्या सातत्याने चर्चा होते. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय,’ ‘आणखी काही वर्षांनी वृत्तपत्रे बंद पडणार’, ‘सध्याचा जमाना ऑनलाईन असल्याने कोणी फारसे वाचत नाही’ ही व अशी वाक्ये सतत ऐकायला मिळतात. या सर्व प्रकारच्या चर्चा म्हणजे निव्वळ थोतांड आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

पूर्वी महानगरातला वाचक सकाळी घरी किंवा प्रवासात वृत्तपत्र वाचायचा. हे चित्र जाऊन सध्या बहुतेकांच्या हातात मोबाईल दिसतो हे खरे आहे. फेसबुक, व्हाटस ऍपसारख्या माध्यमांमुळे ‘वाचणे ही सुंदर सवय’ अशी वाक्ये माग पडत चालल्याचे सांगितले जाते. मात्र हे पूर्ण सत्य नाही. 

मुळात समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे आणि मुद्रित माध्यमे यात प्रचंड तफावत आहे हे आपण समजून घ्यायला हवे. समाजमाध्यमात किंवा दृकश्राव्य माध्यमात अभ्यास नसलेली माणसे खपून जातात. मुद्रित माध्यमात मात्र अभ्यासू माणसे लागतात. कारण सर्वाधिक विश्वासार्हता मुद्रित माध्यमांचीच आहे. रात्री क्रिकेटचा सामना वृत्तवाहिनीवर बघितला तरी सकाळी वृत्तपत्रात ती बातमी वाचण्याची मजा काही औरच असते. ‘विराटचे विराट शतक’ ही बातमी वाचताना जितकी मजा येते तो आनंद अनेकदा तो सामना पाहतानाही येत नाही.
 
वृत्तपत्रात संपादकीय लेख असतात. त्यासाठी संबंधित संपादकाला चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. वर्तमानाचे आणि भूतकाळाचे संदर्भ त्याला माहीत असावे लागतात. भविष्यात काय परिणाम साधले जातील याचा अभ्यास असावा लागतो. त्याउलट वृत्तवाहिन्यांवर ज्या चर्चा होतात त्यात बहुतेकदा वादावादीच असते. इथे निवेदकाचा संबंधित विषयाचा अभ्यास असावाच लागतो असा दंडक नाही. त्यामुळे चर्चेतले लोक मुख्य विषय सोडून काहीही बोलत असतात. एकमेकांना उचकावत असतात. कार्यक्रमाची सुरूवातच गोंधळाने करायची असा त्यांचा खाक्या असतो. म्हणूनच या चर्चा कुणी फार गंभीरपणे घेत नाही. ‘या वृत्तपत्राने अमक्या तमक्याला अग्रलेखातून चांगलाच चोपला’ अशी चर्चा होते. तशी गंभीर चर्चा वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाबाबत होताना दिसत नाही. कारण वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम टिकून आहे.

सध्याचा जमाना धावपळीचा आहे. त्यामुळे ‘गतिमान आयुष्य नको’ असे वाटणारा एक मोठा वर्ग तयार होतोय. त्यांना आक्रस्थाळेपणा नकोय. निवांतपणा हवाय, शांतता हवीय. ही शांतता दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत. वृत्तपत्रातील महिलांविषयक, आरोग्यविषयक, पुस्तकविषयक, क्रीडाविषयक, चित्रपटविषयक मजकूरावर चर्चा होते. बोधकथेपासून विनोदापर्यंत आणि व्यंग्यचित्रापासून प्रासंगिक लेखापर्यंत हवा तो मजकूर वृत्तपत्रात वाचता येतो. शब्दकोड्यासारखी ज्ञानवर्धक आणि रंजक साधने दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत.

न्यूज आणि व्ह्यूज दोन्ही हवे असेल तर वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. एखादी महत्त्वाची बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर प्रेक्षक चॅनेल बदलतात आणि ती बातमी खरी आहे का याची खात्री करून घेतात. वृत्तपत्रांबाबत सहसा असे होत नाही. छापील बातमीवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. वृत्तपत्रातील भाषा लोकांना सोपी आणि सरळ वाटते.
एखादी बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर ती अचानकच गायब होते. त्याउलट एखाद्या वृत्तपत्राने काही महत्त्वाचा विषय हाताळला तर तो तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी, संपादकांनी लेखनासाठी मोठी किंमत मोजली. सरकारविरोधी रोष व्यक्त केला म्हणून लोकमान्य टिळकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्याउलट सहकारी बाईवर बलात्कार केला म्हणून तरूण तेजपालसारख्या संपादकाला तुरूंगाची हवा खावी लागली. काही अपवाद वगळता माध्यमात काम करणार्‍या लोकांच्या गुणवत्तेतला हा फरक आहे. अर्थात, दृकश्राव्य माध्यमात काम करणार्‍या सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा माझा मानस नाही; परंतु वृत्तपत्रातील लोकांविषयी अजूनही व्यापक विश्वासार्हता आहे हे मान्य करावेच लागेल.

स्थानिक घडामोडींची प्रभावी दखल अजूनही वृत्तपत्रांद्वारेच घेतली जाते. रस्त्यावर पडलेले खड्डे असोत किंवा गावातील अखंड हरीनाम सप्ताह... या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येणे तितकेसे सोपे नसते. स्थानिक समस्या वृत्तपत्रांतून मांडल्यानंतर प्रशासनही त्याची योग्य ती दखल घेते. वृत्तपत्रांत काम करणार्‍या लोकांचा संबंध भाषेशी येतो. त्यामुळे ते सरस्वतीचे भक्त असतात. विविध सदरे, प्रासंगिक लेख, बातम्या हे तर सोडाच पण ‘स्वयंपाकी हवा’, ‘घरकामाला बाई पाहिजे’, ‘पेस्ट कंट्रोलवाला हवा’, ‘विविध कामासाठी गरजू लोक हवेत’ अशा लोकोपयोगी छोट्या जाहिराती सुद्धा केवळ आणि केवळ वृत्तपत्रांतच वाचावयास मिळतील. सामान्य माणसाला मदत होणे आणि त्याच्या दैनंदिन समस्या सोडविण्यास हातभार लावणे हेच वृत्तपत्रांचे ध्येय असते. गावातील लोकांच्या ‘निधन वार्ता’सुद्धा देऊन वृत्तपत्रे वाचकांची सहवेदना अनुभवतात. त्यामुळे वृत्तपत्रांचे वाचकांशी अनोखे बंध निर्माण होतात. कामगार दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी अशा जेमतेम चार सुट्ट्या घेतल्या आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्र आले नाही तरी अनेकांना चुकल्याचुकल्या सारखे होते. हेच तर मुद्रित माध्यमांचे मोठे यश आहे.

एक अखबार हूँ, अवकात ही क्या है मेरी
लेकिन पुरे शहर आग लगाने काफी हूँ 

असे वृत्तपत्रांबाबत म्हटले जाते ते उगीच नाही. कोणताही विषय ठामपणे मांडणे ही त्यांची खासियत असते. तरीही सध्या अनेक छोटी आणि विशेषतः जिल्हा दैनिके अडचणीत आहेत. सरकार दरबारी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील वार्ताहर तुटपुंज्या मानधनावर काम करतात, पण त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सोडला नाही. बातम्यांसाठी ते कठोर परिश्रम घेतात. मिळेल त्या साधनांद्वारे प्रवास करतात. लोकांशी बोलतात. खरेखोटे पडताळून पाहतात. आपल्या लेखनातून कुणावर अन्याय होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतात. त्याउलट ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावावर अनेक वाहिन्या वाटेल तशा बातम्या चालवतात. बहुतेकांना फक्त ‘टीआरपी’शी देणेघेणे असते.

सध्या दुर्दैवाने काही वाङमयीन नियतकालिके बंद पडत आहेत. नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यवस्थापनात नाही. असे असले तरी राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांची जनमत घडवण्यातली ताकत मोठी आहे. त्यांची सर कुणालाच येणार नाही. म्हणूनच वाचनसंस्कृती कमी होतेय, भाषा संपत चाललीय असे नकारात्मक सूर लावण्यात अर्थ नाही. केवळ आणि केवळ विश्वासार्हतेच्या बळावर मुद्रित माध्यमे चिरकाल तग धरून राहतील याबाबत माझ्या मनात कसलाही किंतु नाही. मुद्रित माध्यमांच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना सांगावेसे वाटते,

ना तोफ से, ना बंदुक से
जो होता नही तलवार से
होता है अखबार से!
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

Saturday, October 21, 2017

अजूनी चालतोची वाट....!



ही गोष्ट आहे 2001 सालातली. माझे वय होते सतरा! मी मराठवाड्यातल्या एका छोट्याशा खेड्यातून येऊन पुण्यासारख्या महानगरात दाखल झालो होतो. ध्येय होते पत्रकारिता करण्याचे. त्यापूर्वी वृत्तपत्रविक्रेता, ग्रामीण वार्ताहर म्हणून बरीच उलथापालथ केलेली. अर्थात, त्याच्या परिणामांची चिंता नव्हती! ती मी का करावी? ज्यांना माझे लेखन झोंबायचे आणि ज्यांचा पोटशूळ उठायचा ते त्या परिणामांची मीमांसा करत असायचे. मी आपला उडाणटप्पू! 

पुण्यात आल्यावर सर्व प्रस्थापित वृत्तपत्रांचे उंबरठे झिजवले. ‘वय कमी’ आणि ‘पत्रकारितेची पदवी नाही’ म्हणून सर्वांनी झिडकारले. काहींनी, ‘बेटा आधी शिक्षण पूर्ण कर, पदवी घे आणि मग आमच्याकडे ये...’ असेही सांगितले. मात्र तितका धीर कोण धरणार? काहीही करून या क्षेत्रात नशीब आजमावयाचेच हा निर्धार पक्का होता. परतीचे दोर कापून टाकलेत असे वाटत होते. म्हणूनच जंग जंग पछाडले.

त्याचवेळी दै. ‘संध्या’चा अंक हाती पडला. हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं सायंदैनिक. त्यात जाहिरात होती, ‘वृत्तसंपादक, उपसंपादक, बातमीदार, अंक विक्रेते नेमणे आहेत.’ म्हटलं बघावं प्रयत्न करून! पत्ता होता टिळक रस्त्यावरच्या ‘व्हाईट हाऊस’चा. तेव्हा माझा मुक्काम होता सारसबागेच्या फूटपाथवर. तिथून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर. 

मग गाठले ‘संध्या’चे कार्यालय. सगळेजण आपापल्या कामात व्यग्र. कुणाशी बोलावे काहीच सुचेना. घाबरतच एकाला सांगितले, ‘‘संपादकांना भेटायचे आहे...’’ त्यांनी समोरची केबिन दाखवली. थेट आत गेलो. त्यांनी बघितले आणि विचारले, ‘‘काय रे बाळा? काय काम काढलंस?’’ त्यांना वाटलं, कुणीतरी विद्यार्थी दिसतोय. कसलीशी मदत हवी असणार!

मी नमस्कार केला आणि बसलो त्यांच्या समोरच्या खुर्चिवर! त्यांना म्हणालो, ‘‘मी पत्रकार व्हायला आलोय. तुम्ही काही सहकार्य करू शकाल का? तुमची आजच्या अंकातली जाहिरात बघितली म्हणून इथवर आलोय.’’

ते हसायला लागले. म्हणाले, ‘‘हे इतकं सोपं नसतं. शिक्षण काय तुझं? पुढं काय करायचं ठरवलंय?’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी गेल्या चार वर्षापासून लिहितोय. ही मी लिहिलेल्या लेखांची आणि बातम्यांची फाईल. बहुतेक लेखन नावासह प्रकाशित झालेले आहे. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याचा लौकिक मोठा आहे. माझ्या खेडेगावात फारशा संधी नाहीत. तिथल्या सामान्य माणसाची, शेतकर्‍यांची दुःख मोठ्या प्रवाहात मांडली जात नाहीत. त्यामुळं मला संपादक व्हायचंय. तुम्ही पत्रकारितेची संधी दिलीत तर एक यशस्वी संपादक व्हायची जबाबदारी माझी...’’

ते असे काही बघू लागले की, जणू आफ्रिकेच्या जंगलातला एखादा अजस्त्र प्राणी त्यांच्या दालनात दाखल झालाय.

मग त्यांनी विचारलं, ‘‘इथं काय करू शकशील?’’

त्यांना म्हणालो, ‘‘अंक विक्रीपासून ते जाहिराती मिळवण्यापर्यंत आणि बातमी लिहिण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत तुम्ही जे सांगाल ते...’’

त्यांनी माझ्या हातातली लेखांची फाईल घेतली. त्यावर नजर टाकत म्हणाले, ‘‘हा घनश्याम पाटील तूच कशावरून? हे लेखन प्रौढ माणसाचे वाटतेय...’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी खूप सामान्य आहे... पण आज इथे संत ज्ञानेश्वर आले तरी तुम्ही म्हणाल, तू तर खूप लहान दिसतोस. हे तुझे उमेदवारीचे वय नाही. शिक्षण घे, पदवी घे... शिवाय हे तूच लिहिलंय हे सिद्ध कर...’’

मग ते हसायला लागले. त्यांच्यासमोरचा पॅड त्यांनी माझ्यासमोर ढकलला आणि म्हणाले, ‘‘तुला सद्य स्थितीतील ज्या विषयावर लिहावे वाटते ते लिही.’’

त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही विषय सांगा. लिहिण्याचा प्रयत्न नक्की करीन!’’

त्यांनी सांगितले, ‘‘आण्विक अस्त्रांविषयी लिही.’’

मी कागद घेतला आणि लिहित सुटलो.

‘देशाला आण्विक अस्त्रांची गरज...’ 
त्यात अटलजींविषयी, त्यांच्या धोरणाविषयी आणि आण्विक अस्त्रांच्या आवश्यकतेविषयी जे वाटेल ते खरडले. त्यांनी त्यावर नजर टाकली. हातातल्या लाल पेनने दोन-चार ठिकाणी व्याकरणाच्या दुरूस्त्या केल्या आणि सांगितले, ‘‘तू लाग कामाला.’’

त्या दिवशी जग जिंकल्याचा आनंद झाला. 
माझी दै. ‘संध्या’मधली बातमीदारी सुरू झाली.

नंतर मला कळले, मी ज्यांच्याशी बोलत होतो ते दै. ‘संध्या’चे संस्थापक, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य वसंतराव काणे होते. त्यांना सर्वजण ‘तात्या’ म्हणायचे. काही दिवसातच मी त्यांच्या खास मर्जीतला पत्रकार झालो. त्यांनी मला आश्चर्यकारक जबाबदार्‍या दिल्या.

‘संध्या’ला लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मला अग्रलेख लिहायची संधी मिळाली. पान एकसाठीच्या बातम्या निवडू लागलो. विविध विषयांवरील पुरवण्यांचे नियोजन करून त्या साकारू लागलो. महानगपालिकेचे वार्तांकनही त्यांनी माझ्यावर सोपवले. माझे आयुष्य झपाट्याने बदलले. लेखनस्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे माझा वारू सुसाट सुटला. 

त्यांचं सांगणं असायचं, ‘‘बातम्यांची शीर्षकं मसालेदार असावीत. त्यात रंजकता असावी. हे करताना वस्तुनिष्ठपणे सत्य मांडले पाहिले. वाचकांची विश्वासार्हता कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये.’’

मग मी अनेकांना ठोकत रहायचो. नंतर ते हळूवारपणे संबंधितांना त्याची चूक लक्षात आणून द्यायचे.

महादेव बाबर नावाचे एक स्थानिक नेते शिवसेनेचे उपमहापौर होते. त्यांचा कोंढवा हा मतदारसंघ बर्‍यापैकी मुस्लिमबहुल. त्यामुळं त्यांची आणि पक्षाची धोरणंही अनेकदा विसंगत असायची. त्यांच्यावर मी एक लेख लिहून शिवसैनिकांनाच वाटणारी असुरक्षितता, त्यांची नाराजी व्यक्त केली. त्याचे शीर्षक होते, ‘शिवसेनेचे उपमहापौर महादेव आहेत की बाबर?’ तो विषय खुपच चर्चेला आला. बाबर आम्हाला भेटायला ‘संध्या’च्या कार्यालयात आले. ‘एवढासा पोर’ पाहून त्यांचा राग निवळला. त्यांनीच मोठ्या कौतुकानं चहा पाजला.

आणखी एका महापौरांनी त्यावेळी त्यांच्या गाडीच्या चालकाच्या खानाखाली वाजवली. 'महापौरांची कर्मचार्‍यांना मारहाण' म्हणून माध्यमांनी त्यांच्यावर टीकेचे प्रहार केले होते. त्यावेळी मी एक विनोदी लेख लिहिला होता. त्याची सुरूवात दोन कर्मचार्‍यांच्या संवादातून होती.
पहिला कर्मचारी मार बसल्यामुळं रडत असतो. दुसरा त्याला समजावणीच्या सुरात म्हणतो, ‘‘जाऊ दे यार. ही मोठी लोकं. आपण परिस्थितीनं गरीब. सहन केलं पाहिजे. आपल्या पोटाचा प्रश्न आहे. त्यांचं आपण काही वाकडं करू शकत नाही.’’

त्यावर पहिला उसळून म्हणतो, ‘‘काय म्हणून सहन करायचे? एक टेंपररी माणूस एका परमनंट माणसाला मारतो म्हणजे काय?’’

त्यावेळी हा लेख चांगलाच चर्चेत आला होता.

अशीच गंमत ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्याविषयी केली होती. 
मोहन धारिया प्रसिद्धीबाबत फार जागरूक होते. कितीही छोटा कार्यक्रम असला तरी ती बातमी फोटोसह यावी यासाठी त्यांचा आग्रह असायचा. एकेदिवशी मी त्यांच्यावर लिहिले,

‘पत्रकार या नात्यानं एखाद्या बड्या नेत्याची मुलाखत घ्यावी असा विचार मनात आला आणि मी मोहन धारियांचा बंगला गाठला. बंगल्याचे फाटक ढकलूत आत गेलो. घरात प्रवेश केला आणि समोरचे दृश्य पाहून अचंबितच झालो. आदरणीय मोहन धारिया एका स्टुलावर उभे होते. त्यांच्या हातात मोठा दोर होता. ते गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीराम गोमरकर त्यांना परोपरीनं समजावून सांगत होते. ‘अण्णा, तुम्हाला कसला त्रास होतोय का? कोणी काही बोलले का? नैराश्य आलंय का? साने गुरूजींप्रमाणं समाजातील अरिष्ट बघवत नाही का? तुम्ही असा अविचार का करताय? आम्हाला तुमची गरज आहे. असं आम्हाला पोरकं करण्याचा अधिकार तुम्हाला नाही...’

तेवढ्यात मोहन धारियांनी गोमरकरांना आमच्या डोळ्यादेखत बाजूला ढकललं आणि ओरडले, ‘‘मला मरू दे श्री... अरे आज पुण्यातल्या एकाही वृत्तपत्रात माझ्यावर चार ओळीही छापून आल्या नाहीत तर जगून करू काय?’’

त्यावर खूप चर्चा झाली. अण्णांनी ‘संध्या’च्या ऑफिसमध्ये फोन करून मला झापझाप झापडलं. पुढे भेटायलाही बोलावलं. मी गेलो. त्यांच्यासमोर बसून ओळख दिली आणि सांगितलं, ‘‘छोट्या छोट्या बातम्यांसाठी तुमच्या कार्यालयाकडून चार चार फोन येतात त्यामुळं केली थोडीशी गंमत. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. खोड्या लहानांनी नाही तर तुमच्यासारख्या मोठ्यांनी काढाव्यात काय?’’

ते हसू लागले. त्यांनी संध्याच्या संपादकांना फोन करून सांगितलं, ‘‘आता तुमचा पेपर जोरात पुढे येणार. तुमच्या खपाची चिंता मिटली.’’

पुढं धारियांनी माझ्यावर विलक्षण प्रेम केलं.

अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांतून, लेखनातून घडत होतो. काहीवेळा अडखळत होतो. मात्र लहान मुलाचं रांगणं पाहूनही मोठ्यांना कौतुकच वाटावं तशा माझ्या चुका झाकल्या जात होत्या. एक छोटासा मुलगा कुणाचीही भीड न बाळगता, मुलाहिजा न राखता बिनधास्त लिहितोय याचंच अनेकांना कौतुक वाटायचं.

असं सगळं सुरू असतानाच ‘संध्या’चं व्यवस्थापन बदललं. नव्या व्यवस्थापनाशी जुळवून घेणं मला कठीण गेलं आणि पडलो बाहेर. आता पुढं काय हा विचार त्याक्षणी तरी आला नव्हता.

‘संध्या’मध्ये भावनिकदृष्ट्या खूप गुंतलो होतो. त्यामुळं चांगलाच त्रास झाला. एखादा जवळचा नातेवाईक जावा, त्याप्रमाणं रडून घेतलं. आठ-दहा दिवस बेचैनित गेले. मग ठरवलं, आता नोकरी करायची नाही. जे काही करायचे ते स्वतः करायचे. नोकरी सोडल्याचे दुःख होणार नाही. स्वतःचा प्रयत्न फसला तर वाईट वाटणार नाही कारण तो आपला नाकर्तेपणा असेल. त्यात यश-किंवा अपयश जे काही येईल ते स्वतःचे असेल.

दरम्यान, पुण्याच्या पत्रकारिता वर्तुळात चांगली ओळख निर्माण केली होती. त्यामुळं मी ‘संध्या’तून बाहेर पडलोय हे कळताच अनेकांच्या ‘ऑफर’ आल्या. सुरूवातीला ज्यांनी झिडकारले होते तेही आग्रह करत होते. मात्र माझा निर्धार पक्का होता.

अलका टॉकिज चौकात त्यावेळी ‘दरबार’ नावाचं हॉटेल होतं. तो आमच्या सर्वांचाच अड्डा! मी, माझ्या ज्येष्ठ सहकारी शुभांगी गिरमे, महेश कोरडे, महेश मते आम्ही सर्वजण तिथं बसलो होतो. कोरडे यांनीही माझ्या आधी काही दिवस ‘संध्या’ सोडला होता. काहीकाळ आम्ही शुक्रवार पेठेतल्या एका खोलीत ‘कॉट बेसीस’वर एकत्र राहत होतो. माझी फरफट होऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळं मी ‘संध्या’ सोडू नये, पुन्हा तिथंच जावं यासाठी ते आग्रह करत होते.

त्यांना निश्चयानं सांगितलं, ‘‘आता जे काही करायचं, ते स्वतंत्रपणे करायचं. मी स्वतःच दैनिक सुरू करणार. तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या! मी तुमचं कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही...’’

माझं वय आणि परिस्थिती पाहता सर्वांनाच हे ‘अति’ वाटत होतं. त्यातला फोलपणा दिसत होता. शेवटी कोरडेंनी विचारलं, ‘‘त्यासाठी मोठं भांडवल लागतं. तुझ्याजवळ किती पैसे आहेत?’’

खिशात हात घातला आणि एकशे अडतीस रूपये मी टेबलवर ठेवले. सगळेजण हसू लागले.

कोरडेंना म्हणालो, ‘‘आपल्याला दैनिक सुरू करायला किती भांडवल लागेल? तुम्ही जेवढा आकडा सांगाल त्यापेक्षा एक लक्ष रूपये मी जास्त गोळा करतो. ते आल्यावर तरी तुम्ही साथ द्याल का?’’

शुभांगी गिरमे यांनी सांगितलं, ‘‘मी इथंही पैशासाठी काम करत नाही. माझे चार तास मजेत जातात. तुझ्या ठिकाणी माझा भाऊ असता तर मी नक्कीच त्याच्या पाठिशी राहिले असते. तू कर धाडस. पुढे जे काही हाईल ते होईल.’’

झालं! ठरलं! मला एक भक्कम सहकारी मिळाला. आता माघार नाही! 

नेमकी दिवाळी तोंडावर आलेली. जर दिवाळी अंकापासून सुरूवात केली तर चांगल्या जाहिराती मिळण्याची शक्यता होती. आम्ही एखाद्या अर्थपूर्ण नावाचा विचार सुरू केला. त्याची तयारीही चालवली. मात्र आम्हाला कळलं की ही किमान दीड-दोन महिन्यांची प्रक्रिया आहे. तितका वेळ तर हातात नव्हता. काय करावे काहीच सुचत नव्हते...

आमची तगमग पाहून महेश कोरडेंनी एक पर्याय सुचवला. आमचे आणखी एक रूममेट म्हणजे शिवाजी शिंदे. ते एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करायचे. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. शिंदे आणि कोरडे दोघे मिळून फलटणहून ‘चपराक’ नावाचा दिवाळी अंक काढत होते. तो चालवणे त्यांना शक्य नव्हते. तो मी विकत घ्यावा, असा पर्याय त्यांनी दिला. 

‘चपराक’ हे नाव थोडे वेगळे होते. माझ्या लेखनवृत्तीशी मिळतेजुळतेही होते. 

आम्ही व्यवहार पूर्ण केला. शिवाजी शिंदे यांनी एका शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेरवर लिहून दिले की, ‘मी पूर्ण शुद्धीत आणि स्वमर्जीने लिहून देतोय की, यापुढे चपराकचे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने सर्व अधिकार श्री. घनश्याम पाटील यांच्याकडे असतील. माझा त्यावर कसलाही अधिकार नाही. चपराकचे संपादन, वितरण, जाहिरात अन्य मालकी हे सर्व घनश्याम पाटील यांच्याकडेच असेल.’ त्यावर कोरडे, ननावरे अशा आमच्या रूममेटसनी ‘साक्षीदार’ म्हणून सह्या केल्या.

(आमच्या मूर्खपणाचा तो पुरावा अजूनही मी जपून ठेवलाय.)

पुढे मग मी खूप पळालो. शुभांगी गिरमे यांची त्यांच्या वेळेनुसार साथ होतीच. मुख्य म्हणजे भावनिक आधार होता.

पहिल्या अंकासाठी मी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलाखत घेतली. सदानंद भणगे यांच्यापासून अनेक दिग्गज लेखकांचे साहित्य मागवले. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. जाहिरातीही दणकून मिळाल्या.

ठरल्याप्रमाणे निळूभाऊंच्या हस्ते प्रकाशन झाले. ते सहा तास ‘चपराक’च्या कार्यालयात येणार्‍या जाणार्‍यांशी गप्पा मारत बसले. 

वृत्तपत्रांनी दिवाळी अंकाची जोरदार दखल घेतली.

सुरूवात तर धडाक्यात झाली. त्यावेळी हे फक्त ‘वार्षिका’चे रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे त्याचे मासिकात रूपांतर करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. त्यांना अंक दिला. शिवाजी शिंदे यांनी लिहून दिलेला स्टॅॅम्प पेपर दाखवला.

ते पाहून ते हसू लागले. त्यांनी सांगितले, असे लिहून देऊन मालकी मिळत नसते. ही प्रक्रिया दिल्लीहून होते. वृत्तपत्रांचा विभाग केंद्र सरकारशी संबधित येतो.

मग त्यांनी आमचे ‘टायटल’ बघितले. खरा धक्का तर आता आम्हाला बसला. हे टायटल अनियमिततेमुळे 1997 लाच रद्द झाले होते.

म्हणजे ही पूर्णपणे फसवणूक होती. रोज एका ताटात जेवत असताना त्यांनी असे का केले? म्हणून मी महेश कोरडेंना खूप बोललो! पण यात कुणाचीच चूक नव्हती. शिंदे-कोरडे यांनाही याबाबतची वस्तुस्थिती माहीत नव्हती. जे झाले ते झाले म्हणून आम्ही नव्यानं सुरूवात करायची ठरवली. 

हा धक्का कसाबसा पचवल्यानंतर दुसरे नाव घेऊन पुन्हा सुरूवात करायची असा प्रस्ताव पुढे आला. मात्र ‘चपराक’शी पुन्हा भावनिक नाते निर्माण झाले होते. एकदा मूल दत्तक घेतल्यावर त्याचीही नाळ तोडता येत नाही. 

मग आम्ही ‘चपराक’ या नावाचाच आग्रह धरला. त्यासाठी थेट दिल्लीला गेलो. अनेकांची मदत घेतली. हे नाव आधीच रद्द झालेले असल्याने त्यासाठी फार काही अडचण आली नाही. ‘संस्थापक, संपादक’ या नात्याने ‘चपराक’ हे नाव आम्हाला मिळाले. त्याचा आनंद आम्ही धडाक्यात साजरा केला.

त्यानंतर सर्व क्षेत्रातली असंख्य माणसं जोडत गेलो. पुणे शहराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं चांगल्याला चांगलं म्हणणारी लोकं आहेत. त्यांना स्पष्टपणा आवडतो. इथं टिकायचं तर सातत्यानं चुकीच्या गोष्टींवर टीका करावी लागते. ‘टीका करतो तो टिकतो’ हे या शहराचं सूत्र आहे; मात्र हे करताना सद्गुणांची पूजा बांधायचा संकल्पही केला. जे जे चांगले वाटेल त्याला शब्दशः डोक्यावर घेऊन नाचलो. जिवाला डागण्या देणार्‍या अंनत अडचणी आल्या. एकेक रूपया बैलगाडीच्या चाकासारखा वाटत होता. ज्येष्ठ पत्रकार कै. गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या माणसांनी खूप जीव लावला. सत्य लिहिण्यासाठी, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार केले. 

आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर,  गोपाळराव बुधकर, वसंतराव काणे आणि मुरलीधर शिंगोटे हे माझे या क्षेत्रातले आदर्श आहेत. 

पुढे सर्व विचारधारांचा अभ्यास सुरू केला. तो आयुष्यभर पुरा होईल असे वाटत नाही. मात्र विद्यार्थी असण्याचे सुख त्यामुळे सातत्याने अनुभवता येते. ‘चांगलं ते स्वीकारायचं आणि वाईट ते अव्हेरायचं’ हा आमचा मूलमंत्र. त्याच्याशी प्रामाणिक राहत चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या ‘चपराक’च्या आद्याक्षरांप्रमाणं आमची वाटचाल सुरू आहे.

सध्या एक अत्यंत प्रभावी साप्ताहिक, परिणूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यावर आमचं काम चालतं. अनेक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या सातत्यानं ‘चपराक’चे संदर्भ देत आमच्या लेखनावर बातम्या देतात, कार्यक्रम प्रसारित करतात. ‘चपराक’चे अग्रलेख आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवतात. आणखी काय हवं?

‘चपराक’ने सहा राज्यातील वाचक जोडले आहेत. लेखक तयार केले आहेत. नव्यानं लिहिणार्‍यांची फळीच त्यामुळे निर्माण झालीय. विक्रीचे उच्चांक केलेत. अनेक दिवाळी अंकांचे दिवाळं निघत असताना आम्ही पाचशेहून अधिक पानांचा दिवाळी महाविशेषांक प्रकाशित करतो.

‘मराठवाडा आणि भीती’ ही विसंगती आहे. त्यामुळं या मातीच्या मुशीतून आलेला बेडरपणाच माझी निर्भयता जपून ठेवतो. 

‘चपराक’च्या झाडाला अनेक फळं लगडली असली तरी हा बहर ओसरणार आहे आणि पुन्हा पुन्हा पालवीही फुटणार आहे याचा विश्वास आहे. तो विश्वासच मला कार्यरत ठेवतो. 

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - 'दिलासा' दिवाळी अंक २०१७)

Friday, October 20, 2017

स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही देशभक्ती!



सध्या आपण विचित्र स्थित्यंतरातून जात आहोत. सर्व माध्यमातून देश पुढं जात असल्याचं दाखवलं जात असताना आपण किती मागं आलोय हे अनेकांना माहीत नाही. या पार्श्वभूमीवर देशभक्तीची व्याख्या ठरवणं हे म्हणूनच कठीण काम आहे. कवितेसारख्या सर्वोच्च साहित्यप्रकाराची व्याख्या करणं तुलनेनं खूप सोपं आहे पण देशभक्तीची व्याख्या करण्यासाठी कोणते तराजू जवळ बाळगावेत?

आपल्या जाज्ज्वल्य इतिहासाचा थोडासा धांडोळा घेतला तर ही व्याख्या ठरवणं थोडसं सुसह्य होईल. आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनवलं; तेव्हा एकानं त्यांना प्रश्न विचारला, ‘‘तुमचं ध्येय साध्य झालं. आता यापुढं तुम्ही काय करणार?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता चाणक्य म्हणाले, ‘‘मी मूळचा शिक्षक आहे. पुन्हा विद्यादानाचं काम करणार.’’ याला देशभक्ती म्हणतात.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी अमानुष गोळीबार झाला. त्यावेळी ‘मुस्लिम पळून गेले’ असा आक्षेप घेतला गेला. खान अब्दुल गफार खां यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी धारातीर्थी पडलेल्या मुस्लिमांची तपासणी करण्याची मागणी केली. त्यावरून 76 मुस्लिमांचे मृतदेह तपासले गेले. अर्थातच त्यांना गोळ्या लागलेल्या होत्या. याला देशभक्ती म्हणतात.

सावरकर त्यावेळी म्हणाले होते, ‘‘इंग्लंडची राणी मेली तर मी तिच्या श्रद्धांजली सभेला जाणार नाही...’’ या बाणेदार उत्तराला देशभक्ती म्हणतात.

सावरकरांनी माफी मागितली, ते पळून आले असे काहीजण सांगतात. या इतक्या मोठ्या देशभक्तावर शंका घेणारे मात्र दुर्दैवानं आज देशभक्त ठरतात. राष्ट्रासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण समजून न घेता आपण जात, धर्म, प्रांत, विचारधारा अशा फूटपट्ट्या लावून ‘देशभक्त कोण?’ ते ठरवतो.

1666 ला शत्रूच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर पुढची चार वर्षे छत्रपती शिवाजीमहाराज गप्प होते. त्यांनी अनेक तह केले. वेळप्रसंगी माघार घेतली. त्यांचा आदर्श सांगणारे काहीजण मात्र सावरकरांना सहजपणे ‘माफीवीर’ ठरवतात.

‘वंदे मातरम्’ न म्हणणार्‍यांना आपल्याकडे राष्ट्रद्रोही ठरवलं जातंय. इथला सच्चा मुसलमान रोज पाच वेळा नमाज पढतो. तो नमाज पढताना ज्या ज्या वेळी जमिनीवर डोकं टेकवतो ते त्याचं ‘वंदे मातरम्’च असतं, हे आम्ही समजून घेत नाही. समाजवाद्यांनी, हिंदुत्त्ववाद्यांनी किंवा आणखी कोणी घालून दिलेले नियम पुढं रेटणं हीच अनेकांना देशभक्ती वाटतेय. 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे तीन मागण्या करण्यात आल्या होत्या. ‘फितुरांची नावे दे, तुझे सगळे किल्ले दे आणि तुझ्या वडिलांचा म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा सर्व खजिना दे...’ त्यावेळी त्यांनी शत्रूंना धुडकावून लावलं. ‘माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे माझं नाही तर ते रयतेचं आहे’ हे ठणकावलं. अत्यंत निश्चयानं, धैर्यानं हा राजा मृत्युला सामोरा गेला. याला म्हणतात देशभक्ती! राष्ट्रभक्तीच्या सर्वोच्च त्यागाचं हे जिवंत उदाहरण आम्ही सोयीस्कर विसरतो.

निजामानं पुणं जाळलं. त्यावेळी मल्हारराव रास्ते यांनी त्यांना काही धनाढ्यांची घरं दाखवली. ते वाडे लुटले गेले, जाळले गेले. माधवराव पेशवे यांनी त्यांना शिक्षा दिली. सामान्य माणसाचं हे नुकसान भरून देण्याचे आदेश दिले. स्वतःच्या मामाला त्यांनी माफ केलं नाही. माधवरावांच्या आईनं त्यांना विरोध केला. स्वतःच्या भावासाठी शनिवारवाडा सोडण्याचीही धमकी दिली. पुढं त्यांची आई शनिवारवाडा सोडून गेली सुद्धा! पण माधवराव पेशवे त्यांच्या न्याय आणि विवेकापासून दूर गेले नाहीत. असं स्वतःच्या मतापासून न ढळणं म्हणजेच देशभक्ती! 

रामशास्त्री प्रभुणे यांचा न्यायनिवाडा आपणास माहीत आहेच. असं ‘देहान्त प्रायश्चित’ देण्याची शिक्षा आजकाल कोणती न्यायव्यवस्था देईल काय? तकलादू लोकांच्या हातात व्यवस्था गेलीय. लोकशाहीचे चारही स्तंभ भुसभुशीत झालेत. म्हणूनच देशभक्तीची व्याख्या ठरवण्यासाठी आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल, भाजप किंवा एमआयएमची मदत घ्यावी लागते.

अशावेळी पुन्हा आचार्य चाणक्य आठवतात. त्यांना एकानं विचारलं, ‘‘तुम्ही सिंहासन बदलवू शकता. मग तुुम्ही स्वतःच राजे का होत नाही? तुम्ही उत्तम राज्य प्रशासन देऊ शकाल.’’

त्यावेळी चाणक्यांनी सांगितलं, ‘‘राज्यकारभार करण्यासाठी लग्न करावं लागतं. कुटुंबवत्सल असावं लागतं. त्याला सामान्य माणसाची, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातली सुखदुःखं कळावी लागतात. ती मला कळत नाहीत म्हणून मी राज्यकारभार करू शकत नाही.’’

देशातली आजची परिस्थिती पाहता असंच वाटतं. आपल्या राजाला सामान्य माणसाची सुखदुःखं कळतात का? जसोदाबेन यांना ते बायको म्हणूनही ओळख देत नाहीत. स्वतःच्या बायकोला ओळख देणं ही सुद्धा देशभक्तीच ठरावी! 

ग्यानी झैलसिंग असोत व्यंकटरमण असोत किंवा आपल्या मराठमोळ्या प्रतिभाताई पाटील! या सर्वांनी त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला की तिथून ट्रक भरभरून सामान आणलं. प्रतिभा पाटील यांच्याकडं तर राष्ट्रपती भवनातून त्यांच्या काही सामानाची परत मागणी करण्यात आली होती. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात सैन्यदलाची जागाही ढापली. तो विषयही चर्चेत आला. असं सारं असताना एपीजे अब्दुल कलाम नावाचा एक फकीर शास्त्रज्ञ राष्ट्रपती भवनातून केवळ दोन सुटकेस हातात घेऊन बाहेर पडला. रामेश्वरला एकेकाळी हिंदू बांधवांचे पर्यटन घडविणारा, त्यांना गाईड करणारा हा मुलगा राष्ट्रपती झाला आणि त्यानं त्याच्या साधेपणानं जगाला देशभक्ती दाखवून दिली. ती आम्हाला दिसत नाही..

1965 च्या आणि 1971 च्या युद्धात संपूर्ण समुदाय एकत्रितपणं उभा राहिला होता. अडचणीच्यावेळी सर्वांनी असं एकत्रं येणं आणि आपली सामुहिक शक्ती दाखवून देणं ही सुद्धा देशभक्तीच आहे. त्यासाठी जागतिक योग दिन साजरा करणं आणि शक्तीप्रदर्शन घडविणं गरजेचं नाही.

आपल्याकडं आपण नैतिक शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार नवीन पिढीला देण्यात कमी पडलोय. प्रत्येक गोष्टीचं राजकारणच सुरू आहे. पंडित नेहरू यांच्याबाबत अनेकांची मतमतांतरे असू शकतात; मात्र त्यांच्या मंत्रीमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पाच बिगर कॉंग्रेसी मंत्री होते. पूर्ण बहुमत असताना संयुक्त राष्ट्रसंघात आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी इंदिरा गांधींनी तेव्हाच्या विरोधी पक्षनेता असलेल्या अटलबिहारी वाजपेयींना पाठवलं होतं. इंदिराजींनी असा निर्णय घेणं आणि अटलजींनी त्यांचा मान राखणं ही देशभक्ती होती. पक्षीय राजकारण बाजूला सारून सध्या असं काही होताना दिसतं का बरं!

देशभक्तीची व्याख्या करणं तसं खरचं खूप अवघड झालंय. समाजमाध्यमावर सरकारविरोधी लेखन केलं म्हणून सध्या अनेकांना नोटीसा येत आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी होतेय. अशी जबरदस्ती करणार्‍यांकडून आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांकडून आपण राष्ट्रभक्ती शिकावी का? 

इंग्रज लोक सांगतात की, ‘एकवेळ आम्ही आमचं साम्राज्य देऊन टाकू, पण आमचं क्रिकेट आणि आमचा शेक्सपिअर आम्ही कुणालाही देणार नाही...’ स्वतःच्या खेळाविषयी, साहित्याविषयी असं प्रेम असणं याला राष्ट्रभक्ती म्हणतात. त्याउलट आम्ही क्रिकेटसारख्या खेळावर कोट्यवधी रूपयांचा सट्टा लावतो. भारत-पाकिस्थान मॅच झाल्यावर उन्माद दाखवतो, खेळाडूंची आई-बहिण काढतो. याला देशभक्ती म्हणतात?

माता आणि माती यात केवळ एका वेलांटीचा फरक असतो. या दोन्हीविषयी आपण केवळ ‘दिखाऊ’ प्रेम दाखवतो. आपल्याच शासनानं आपल्यासाठीच केलेले साधेसाधे नियमही आपण पाळत नाही. रोज सर्रासपणे वाहतुकीचे नियम मोडणारे, मान्यता नसलेल्या विद्यापीठातून पदव्या घेणारे, स्वतःच्या मुला-मुलीचे परीक्षेतले गुण वाढवणारे, शेतकर्‍यांच्या नावावर बनावट कागदपत्रं देऊन कर्ज काढणारे आणि ते पैसे निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरणारे आज आपल्याला मोठ्या जोशात देशभक्तीची प्रवचनं देतात.

आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, सर्व नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करणं हे सर्व दूरच राहिलं! किमान रोज शालेय वर्गात जी प्रार्थना म्हणत आलोय तिचं पालन केलं तरी खूप काही बदल दिसून येऊ शकतील.

इथला राजकारणी असेल, कलाकार असेल, साहित्यिक असेल, कामगार असेल किंवा देहविक्रय करणारी एखादी अबला असू शकेल... प्रत्येकाच्या मनात कारूण्याचे भाव प्रगट होणं म्हणजेच देशभक्ती! त्यापुढं जाऊन सांगायचं झालं, तर आपण करत असलेलं काम प्रामाणिकपणे करणं हेच देशभक्तीचं द्योतक आहे. देशभक्तीची व्याख्या ठरवण्यात वेळ घालवणं म्हणूनच सध्याच्या काळात अवघड झालंय. विविध धर्मिय बांधवांच्या सण-उत्सव, परंपरांविषयी आदर बाळगून सांगावसं वाटतं, की तुमच्या धार्मिक भावनांचं प्रगटीकरण करताना जो अतिरेकी उत्साह दाखवला जातो आणि त्यामुळं सामान्य माणसाची जी दैना होते ती थांबवणं ही सुद्धा मोठी देशभक्तीच आहे.

स्वतःच्या कल्पनाशक्तीशी द्रोह न करता आपल्याला आपलं काम करता आलं पाहिजे. हे ज्याला जमेल आणि त्यासाठी जो स्वतःशी प्रामाणिक राहील तोच खरा देशभक्त, तीच खरी देशभक्ती! 
- घनश्याम पाटील
प्रकाशक, ‘चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी : दैनिक 'पुढारी' दिवाळी अंक २०१७)

Sunday, October 15, 2017

इवलासा वेलू... गेला गगनावरी!


सध्याचे दिवस वाचनसंस्कृतीसाठी अत्यंत पोषक आहेत. तरूण पिढी त्यादृष्टिनं सजग आहे. मराठी साहित्यात कधी नव्हे इतका वाचक तयार होतोय आणि हे केवळ नव्यानं लिहिणार्‍यांमुळं शक्य होतंय. दीपस्तंभ ठरावी अशी एक पिढी बाजूला पडून आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक तयार होत आहेत आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या दृष्टिनं हे चित्र अत्यंत सकारात्मक असं आहे. काही जुने लेखक आणि प्रकाशक ‘वाचतं कोण?’ असा अप्रस्तुत प्रश्न सातत्यानं उभा करत असतानाच मराठीतील सशक्त साहित्य जोमात पुढं येत आहे. हा बदल लक्षात न आल्यानं ‘अंतर्नाद’सारखी काही दर्जेदार नियतकालिकं उचक्या घेत आहेत. काहींनी केव्हाच माना टाकल्यात. वाचकांची ही बदलती अभिरूची लक्षात घेणारे, स्वतःचा नवा वाचक तयार करणारे, बदलत्या तंत्रज्ञानाची आव्हानं स्वीकारणारे मात्र यशस्वी घोडदौड करत आहेत. सर्व नकारात्मकता बाजूला सारून ‘मासिक’ या संकल्पनेलाच ऊर्जितावस्था देण्यात ‘चपराक’नंही खारीचा वाटा उचलला आहे.

एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’ सर्वदूर पोहोचला आहे. त्यात ‘चपराक‘चा दिवाळी महाविशेषांक म्हणजे तर शिरोमणीच असतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्व प्रमुख शहरात आणि इतर काही देशातही ‘चपराक’चे वाचक आहेत. मायमराठीची ही पताका डौलात फडकत असताना वाचनसंस्कृतीची कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. 

मराठी साहित्याला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण नवं नाही. प्रस्थापितांची उदासीनता कायम मारकच ठरत आलीय. त्यामुळं कुणालाही न जुमानता स्वतःची जागा स्वतः तयार करणं हाच आजच्या साहित्यिकांपुढील पर्याय आहे. समाजमाध्यमांचा वाढता आवाका ध्यानात घेता हे मुळीच अवघड नाही. तरूणांचे लाखोंनी वाचले जाणारे ब्लॉग याची साक्ष पटवून देतात. शिवाय ‘चपराक’सारखी नियतकालिकं नवोदित लेखकांच्या पाठिशी भक्कमपणं उभी आहेत. सध्या भूमिका घेणारी वृत्तपत्रं, मासिकं, साहित्यिक, साहित्यसंस्था दुर्मीळ होत चालल्यानं मराठी साहित्याचं मोठं नुकसान होत आहे.

विषय कोणताही असो, सर्वत्र गुडीगुडीचा मामला. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ असं चित्र! मराठीत ‘समीक्षा’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती. ज्या दगडांना शेंदूर फासून ठेवलाय त्यांचंच सातत्यानं महात्म्य, त्यांचीच पूजा! नव्यांसाठी मात्र कायमस्वरूपी ‘प्रवेश बंद’चा अलिखित फलक! वर उमलते अंकुर फुलत नाहीत, नवोदितांचं दर्जेदार लेखन पुढे येत नाही, वाचक कमी होत चाललेत अशी नेहमीची रड आहेच. या बजबजपुरीत अनेकजण आपापल्यापरीनं धडपडत आहेत, स्वतःचं विश्व निर्माण करत आहेत ही म्हणूनच सुखावह बाब आहे.

उत्तुंगतेचा ध्यास घेताना जुन्यांचा आदर्श  ठेवला पाहिजे. त्यांनी जे ‘मनोरे’ उभारलेत त्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. मात्र ही कृतार्थता जपताना आपल्याला आणखी पुढं जाता आलं पाहिजे. आपण त्यातच अडकून पडतो. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मंगेश पाडगांवकर अशांच्या कर्तृत्वाविषयी मनात श्रद्धाभाव जरूर असू द्या; त्यांचा आदर्श ठेवा पण ‘त्यांच्यापेक्षा भारी कोणी होणारच नाही’ हा न्यूनगंड काढून टाका. जे जे अचाट आहे ते ते मराठी माणूस करतो. साहस त्याच्या रक्तातच आहे. त्याला कसल्याच सीमा नाहीत. त्याला कोणी रोखू शकत नाही. मूठभर मावळे हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय ज्या मातीत होऊन गेलेत ती माती पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. आपण फक्त भक्कमपणं उभं राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे मानदंड रचण्यासाठी तरूणाईनं सज्ज झालं पाहिजे. आजच्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन मार्गक्रमणा केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसानं इतकं अफाट योगदान दिलं पाहिजे की त्याचा जगालाही हेवा वाटावा. हा विश्वास जागविण्यासाठीच ‘चपराक’ कार्यरत आहे.

आपल्याकडची राजकीय अस्थिरता कधीही संपली नाही, संपणार नाही. लोकशाही व्यवस्थेत ती संपेल असं गृहितही धरता येणार नाही. आपल्यावर सातत्यानं निसर्ग कोपतोय. काही ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळही पडतोय. सरकारची उदासीनता याला खतपाणीच घालते. ‘देश आगे बढ रहा है’, ‘सब का साथ, सब का विकास’ असं म्हणत आपण किती मागे जातोय याचा पत्ताही नाही. बरं, तूर्तास तरी याला काही पर्यायही दिसत नाही. कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या लोकांनी परिवर्तन घडवलं. हे परिवर्तन मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा फारसं वेगळं नाही. 
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सध्याच्या विरोधकांची सर्वात मोठी कर्तबगारी कोणती? तर त्यांनी आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार केल्या. कालपर्यंत सत्तेत असणारे आज सामान्य माणसाचा, त्याच्या जगण्याचा विचार करत असल्याचं भासवू लागले. ज्यांनी कोमात ढकललं तेच ‘बघा बघा माय, कसा मरणाला टेकलाय...’ म्हणून गळे काढू लागले. वेश्येनं पतिव्रता धर्म शिकवणं म्हणतात ते यालाच! सामान्य माणूस म्हणून आपलं दुर्दैव इतकंच की, ही परिस्थिती बदलावी म्हणून आपण ज्या विश्वासानं नव्या राज्यासाठी नवे गडी निवडले तेही याच माळेचे मणी निघाले. त्यांचा शिरोमणी त्यातल्या त्यात बराय एवढंच! 

मोदी सरकारनं मागच्या वर्षी नोटाबंदी केली. सामान्य माणसाला त्याचा मोठा फटका बसला. त्यानं तो कसलीही कुरबूर न करता सहन केला कारण त्यामागं पंतप्रधानांनी दाखवलेली स्वप्नं होती. काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचाराला चाप बसेल या भावनेनं कुणीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वकमाईच्या छोट्या छोट्या रकमा हातात येणं ही देशभक्ती वाटू लागली. त्यातून पुढं काय साध्य झालं या फक्त चर्चेच्याच गोष्टी ठरल्या.

नंतर जीएसटीनं कंबरडं मोडलं. त्यातूल ‘आर्थिक शिस्त’ लागेल असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात मात्र अनेकजण कोलमडून पडलेत. छोट्या उद्योजकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागलीय. केवळ ‘चपराक’बाबत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी झालेल्या नोटबंदीमुळं दिवाळी अंक विक्रीवर वाईट परिणाम झाला. जाहिराती रोडावल्या. नंतर डोंबिवलीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आजवरच्या इतिहासात प्रथमच असं झालं की संमेलनात प्रकाशकांचा वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यात ‘संमेलनात पुस्तक ‘प्रदर्शन’ असतं. प्रदर्शनात फक्त पुस्तकांच्या एक-दोन प्रती आणून त्या दाखवायच्या असतात’ असं विधान करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी प्रकाशकांच्या जखमेवर मीठ चोळलं. ‘संमेलनात ग्रंथप्रदर्शन आणि ‘विक्री’ असते’ याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला. म्हणूनच सामान्य वाचकांकडून, रसिकांकडून दहा-दहा रूपयांची मदत वारंवार मागूनही साहित्य महामंडळाला मराठी माणसानं ठेंगा दाखवलाय.

ग्रंथव्यवहाराच्या दृष्टिनं नोटाबंदी, साहित्य संमेलन यानंतर पुढचं अरिष्ट आलं ते जीएसटीचं. या काळात पुस्तकांची विक्री मंदावलीय. कागदाचे, शाईचे दर वाढलेत. अनेक दिवाळी अंक त्यामुळं नेहमीपेक्षा कमी पानांचे झालेत. काहींना किंमती वाढवाव्या लागल्यात. आर्थिक गणितं जुळवणं भल्याभल्यांना कठीण गेलंय.

असं सारं चित्र असताना ‘चपराक’ला मात्र वाचकाश्रय मिळालाय. या काळात ‘चपराक’ तगून राहिला तो वाचकांच्या निर्व्याज प्रेमामुळं. अंकाच्या वर्गण्या येण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. जाहिरातदारांनीही नेहमीप्रमाणं विश्वास दाखवलाय. पुस्तकांच्या दुकानातून अत्यल्प विक्री होत असली तरी थेट ‘चपराक’च्या कार्यालयातून, ऑनलाईन विक्री मात्र वाढलीय. शालेय जीवनानंतर ज्यांचा वाचनाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता त्यांच्या डोक्यात आम्ही नवनवे विषय घातले. त्यांना लिहितं केलं, बोलतं केलं. त्यांची अभिरूची जागृत करून संबंधित पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या अनुषंगानं त्यांनी इतर पुस्तकांचंही वाचन सुरू केलं. ‘चपराक’नं असा स्वतःचा वाचक निर्माण केलाय. ज्यांना ‘मासिक’ म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं किंवा ज्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय एकाही ललित, वाङमयीन पुस्तकाला कधीच हात लावला नव्हता त्यांच्याकडं आज ‘चपराक’चे सर्व अंक आहेत. आपल्या पुस्तकांचा संच त्यांच्या घरी त्यांनी अभिमानानं ठेवलाय. ती पुस्तकं त्यांनी वाचलीत आणि त्यावर ते वेळोवेळी चर्चाही करतात. ही आमची खरी उपलब्धी! सहा राज्यातील अशा नव्या मराठी वाचक आणि लेखकांपर्यंत ‘चपराक’चा विस्तार झालाय. यंदाच्या या दिवाळी महाविशेषांकाचीही विक्रमी स्वरूपात पूर्वनोंदणी झालीय. इवलासा वेलू गगनावर गेलाय. चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारलेलं या अंकाचं मुखमृष्ठ हेच तर सुचवतं.

समाजानं साहित्याभिमुख झालं पाहिजे असं म्हणताना साहित्यिकांनीही समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना कागदावर उतरल्या तरच तो तुम्हाला स्वीकारेल. हातात लेखणी किंवा एखाद्या वाहिनीचा बूम आहे म्हणून कुणाचे तरी लांगुलचालन केलेच पाहिजे, त्यांची तळी उचललीच पाहिजे असा काही नियम नसतो. सत्याची चाड असणारे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारे अनेक पत्रकार आपल्याकडं होऊन गेलेत. त्यांच्याच पुण्याईमुळं आपली थोडीफार विश्वासार्हता टिकून आहे. अन्यथा लोकांनी आजच्या पत्रकारांना धोबीपछाड केलं असतं.

‘मराठीतला सगळ्यात विक्रमी दिवाळी महाविशेषांक’ अशी गेल्या काही काळात ‘चपराक‘ची ओळख झालीय. नव्या-जुन्या लेखकांचा संगम साधत आम्ही सर्वोत्तम ते दिलेय. या अंकात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक अकिलन, डॉ. द. ता. भोसले, सदानंद भणगे, विद्या बयास, अमर कुसाळकर, अविनाश हळबे, चंद्रलेखा बेलसरे, सरिता कमळापूरकर यांच्या कथा दिल्यात. प्रा. बी. एन. चौधरींची अहिराणी कथा दिलीय. दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘चपराक’ परिवाराचे लेखक ह. मो. मराठे यांची ‘श्रद्धांजली’ ही व्यंग्यकथा. त्यांची ही शेवटची कथा ठरावी आणि त्यांनाच ‘श्रद्धांजली’ वहावी लागावी ही फार वेदनादायी बाब आहे. ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

रमेश वाकनीस यांची संपूर्ण कादंबरी या अंकात दिलीय. ती आपणास निश्चितच आवडेल. व्यक्तिचित्रण विभाग सशक्त आणि प्रेरणादायी झालाय. डॉ. माधव पोतदार, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, सुनिताराजे पवार, लक्ष्मीकांत देशमुख, शुभांगी गिरमे, अर्चना डावरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदाशिव शिवदे, सुरेखा शहा आदींनी त्यासाठी हातभार लावलाय. शंभरहून अधिक कविता दिल्यात. प्रस्थापितांबरोबर नवोदितांनाही हक्काचं व्यासपीठ दिलंय. भाऊ आणि स्वाती तोरसेकर, डॉ. न. म. जोशी, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, उषा मंगेशकर, उमेश सणस, श्रीराम पचिंद्रे, उद्धव कानडे, प्रिया धारूरकर, संजय क्षीरसागर, संजय वाघ, अनिरूद्ध जोशी, श्रीपाद ब्रह्मे अशा सर्वच मान्यवरांचे लेख आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करतील. किमान पंधरा पुस्तकांचा खाऊ या एकाच दिवाळी महाविशेषांकात दिलाय. त्यामुळं तो आपल्या पसंतीस उतरेल याची संपादक म्हणून खात्री आहे. 

आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या शुभेच्छा देतो, सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आगामी काळातही ‘चपराक’ कायम विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांवर तुटून पडेल, चांगले ते स्वीकारेल आणि वाईट ते अव्हेरेल याची ग्वाही देतो आणि थांबतो.
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२


Tuesday, September 19, 2017

कृतघ्न नको; कृतज्ञ राहा!


राजकारणात कुणी आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेले तर ते ‘गद्दार’ ठरतात आणि दुसर्‍या पक्षातून आपल्या पक्षात आले तर ते त्यांचे ‘हृदयपरिवर्तन’ असते! 

हा नियम खरे तर आता प्रत्येक क्षेत्रात लागू पडतोय. त्यासाठी राजकारणच कशाला हवेय?

माणूस इतका स्वार्थी झालाय की तो प्रत्येक घटनेचा, कृतीचा, निर्णयाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून मोकळा होतो. बोलीत आणि करणीत इतकी मोठी दरी निर्माण झालीय की आयुष्य विसंगतीनेच व्यापून गेलेय.

हे सारे लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यातील नितेश राणेंचे विधान! 

कोण आहेत हे नितेश राणे?

तर त्यांची स्वतःची अशी काही विशेष ओळख नाही. त्यांचे तीर्थरूप, महाराष्ट्राचे एकेकाळचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते सु(?)पूत्र! राणे कुटुंबातील सदस्य इतर राजकारण्यांप्रमाणेच अधूनमधून वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. नाहीतर अशा उपटसुंभांना कोण विचारणार?

तर त्याचं झालं असं, की या राणेपुत्रानं, श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आव्हान दिलंय...! 
काय आव्हान आहे? तर ‘तुम्ही एकटे बाहेर फिरून दाखवा...’

बाबासाहेबांचे सध्या वय आहे, शहाण्णव! 
राणे पितापुत्रांचे वय एकत्र केले तरी ते इतके व्हायचे नाही! असो.

तर या निमित्तानं आम्हाला काही वर्षापूर्वीची एक घटना पुन्हा आठवली.

श्रीपाल सबनीस नावाचे एक गृहस्थ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे होते. त्यावेळी ‘सनातन’चे वकील असलेल्या पुनाळकरांनी त्यांना सल्ला दिला होता की, ‘‘रोज मॉर्निंग वॉकला जात जा...’’ 

त्यावरून प्रचंड गहजब माजला. निखिल वागळेसारख्या पुरोगामी पत्रकारांनी त्या विधानावर खास ‘शो’ केले. त्यात अनेकांनी पोपटपंची केली. सगळ्यांना म्हणे ती खूप मोठी धमकी वाटली.

ऍड. पुनाळकरांचे म्हणणे होते, ‘‘श्रीपाल सबनीस यांना मी कधी भेटलो नाही. त्यांच्याशी माझा परिचयही नाही, पण ते संमेलनाध्यक्षपदासाठी उभे आहेत. वृत्तपत्रात, वाहिन्यांवर त्यांचा चेहरा बघितला. प्रत्येकवेळी ते खूप गंभीर दिसतात. आमच्या कोकणात पोट साफ होत नसेल तर असे विकार होतात असे मानले जाते. अशावेळी आम्ही सांगतो, ‘जरा मॉर्निंग वॉकला जात जा.’ त्याने अशा व्याधी कमी होतात. पोट साफ झाल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. त्याच्याकडे बघून समोरच्याला आनंद मिळणे राहू द्या पण किमान दिवस खराब जात नाही. माणूस ‘मंद आणि मठ्ठ’ वाटत नाही. ते साहित्यक्षेत्रातील महत्त्वाची निवडणूक लढवत असल्याने त्यांना हा प्रेमाचा सल्ला दिला.’’

पण हे विधान कुणाला कळले नाही किंवा पुनाळकरांचा प्रामाणिक उद्देशही कुणी ध्यानात घेतला नाही. जमाते पुरोगामींची फौज रस्त्यावर उतरली. सबनीसांनी ‘सामुहिक मॉर्निंग वॉक’ केले. 
वर ‘इथून पुढे मी रोज ‘सकाळी’ मॉर्निंग वॉकला जाणार’ असेही  विनोदी विधान केले. त्यांचा तो संकल्प किती दिवस टिकला हे माहीत नाही, मात्र त्यावरून प्रसारमाध्यमांनी हा विषय अनेक दिवस चवीने चघळला होता.

हे सांगण्याचे कारण म्हणजे त्यावेळीही हे नितेश राणे सबनीसांसाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या कुमठेकर रस्त्यावरील निवासस्थानी जाऊन त्यांनी सबनीसांना ‘धीर’ दिला होता. ‘पुरोगामी महाराष्ट्रात अशा धमक्या सहन करणार नाही' असे म्हणत त्यांच्यासोबत ‘मॉर्निंग वॉक शो’ही केला होता. सबनीसांनी त्यांच्या सवयीप्रमाणे नितेश यांचा शाल घालून सत्कार केला होता आणि त्यांना ‘मानलेला’ मुलगाही जाहीर केले होते. हेच नितेश राणे आता बाबासाहेबांना एकटे फिरण्याची धमकी देत आहेत आणि सबनीसांसारखे सगळे तथाकथित लेखक त्याविरूद्ध ब्रही काढत नाहीत. जमाते पुरोगामींच्या फळीतील पत्रकारांना यावर चर्चा घडवावी वाटत नाही, कारण बाबासाहेब अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत. 

बाबासाहेबांवर टीका केल्याने त्यांचे योगदान कमी होणार नाही. शिवचरित्रासाठी समर्पित आयुष्य घालणारे इतके त्यागी दुसरे व्यक्तिमत्त्व दाखवा. बाबासाहेब या वयातही शिवकालच जगतात. त्यांचा तो ध्यास आहे, श्वास आहे. ज्यांना शिवचरित्रावर काही करावेसे वाटते त्यांनी इतके निरोगी आणि समाधानी दीर्घायु जगावे. हे काम व्रत म्हणून स्वीकारावे. बाबासाहेब कुठे कमी पडलेत असे वाटत असेल किंवा त्यांनी काही चुकीचे लिहिलेय असे वाटत असेल तर संशोधनातून, अभ्यासातून ते खोडून काढावे. मात्र त्यासाठी परिश्रम करावे लागतात. त्याला चिंतन लागते. गड, कोट, किल्ले पालथे घालावे लागतात. घरदार सोडून सातत्याने भ्रमंती करावी लागते. डोळ्यात तेल घालून इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. हजारो-लाखो कागदपत्रे वाचावी लागतात, अभ्यासावी लागतात. त्यासाठी भाषेचाही अभ्यास लागतो. नितेश यांच्यासारख्या कुणालाही बाबासाहेब चुकीचे वाटत असतील तर त्यांनी पोकळ धमक्या देण्याऐवजी हे करून दाखवावे. त्यातून प्रत्येकाला आपली ‘उंची-खोली’ लक्षात येईल. काहीच नाही झाले तर किमान श्रीमंत कोकाटेसारखा ‘विनोदी’ इतिहास तरी लिहावा. ‘शिवाजी’ या नावातच इतकी जादू आहे की त्यांच्याविषयी काहीही काम केले तरी त्या माणसाच्या आयुष्याचे सोनेच होते. नाहीतर कोकाटेसारखी माणसे महाराष्ट्राला कळली तरी असती का?

शिवाजीराजांचा पराक्रम समजून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी एक पायवाट तयार केलीय. भविष्यात त्या वाटेवरून कुणी गेले तर आनंदच आहे. मात्र केवळ टीका-टिपन्नी करून अशा विषयात राजकारण साधता येत नाही. एकेकाळी शिवसेनेसोबत संसार करताना हेच राणे कुटुंबिय बाबासाहेबांना ‘दैवत’ मानत. खुद्द नितेश राणे यांनीच बाबासाहेबांचे ‘आशीर्वाद’ घेतानाचे फोटो ट्विट केले होते. आता त्यांचा घटस्फोट झालाय. आता कॉंग्रेसबरोबरही त्यांचा घरोबा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे त्यांना होऊ घातलेल्या नव्या कुटुंबातले नियम, रूढी, परंपरा जपाव्या लागतात. नवर्‍याची खप्पामर्जी होईल असे काहीही करण्यास कोणतीही बायको सहजासहजी धजावत नाही.  ती आवडती असेल, नावडती असेल... पण तिला आपले पातिव्रत्य दाखवून देण्यासाठी धडपड करावीच लागते. नितेश यालाही अपवाद ठरले नाहीत. त्यांच्या तीर्थरूपांची राजकीय ससेहोलपट होत असली, घुसमट चालू असली तरी हा मांडलेला ‘संसार’ तर टिकवायला हवाच! म्हणून तर मग बाबासाहेबांसारख्या तपस्वी माणसांवर काहीबाही बोलण्याचे धाडस करावे लागते. नाहीतर त्यांना त्यांची स्वत:ची योग्यता माहीत नाही असे थोडेच आहे? महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस ही अगतिकता समजून घेऊ शकतो.
  
नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरभरून दिलेय. दगडाचा देव केल्यानंतर त्याने आपले ‘देवपण’ जपले पाहिजे. इथे हा ‘दगड’च स्वयंभू झाल्याच्या आविर्भावात वावरू लागला आणि म्हणूनच मोठी समस्या निर्माण झाली. दगड तो दगडच! तो निर्मितीच्या कामाला आला तर त्याचे वेगळे महत्त्व असते! इथे मात्र विध्वंसच दिसतो. ज्यांनी निर्मिती करायला हवी ते तोडण्या-मोडण्याची भाषा करू लागतात तेव्हा त्यांचे अस्तित्व संपते. राणे कुटुंबियांचेही तसेच झाले आहे. द्वेषाने पछाडलेल्या मानसिकतेतून ते फक्त आरोप करत सुटले आहेत, धमक्या देत सुटले आहेत.

जाताजाता आचार्य अत्रे यांचे एक विधान सांगावेसे वाटते. अत्रे साहेब म्हणाले होते, ‘‘भविष्यात जर कुणाला माझी समाधी उभारावीशी वाटली, तर त्यावर एक वाक्य हमखास लिहा. हा माणूस अविवेकी असेल, प्रमादशील असेल मात्र हा माणूस कृतघ्न कधीही नव्हता! कारण कृतज्ञता हे मानवी आयुष्याला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे आणि कृतघ्नता हा सर्वात मोठा शाप!’’

राणेसाहेब, महाराष्ट्राने तुम्हाला आजवर भरभरून दिले आहे. त्याविषयी तुम्ही कधी कृतज्ञता व्यक्त केल्याचे स्मरत नाही; निदान वाटेल ती विधाने करून कृतघ्नपणा तरी दाखवून देऊ नकात!
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२ 

Monday, September 4, 2017

'जुलूस' आणि महाराष्ट्रभूषण!


अर्चना डावरे या परभणीच्या लेखिका. त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘दादा, मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायचंय.’’ त्यांना म्हणालो, ‘‘या, भेटूया.’’

त्या काल पुण्यात आल्या. सोबत त्यांचे पती श्री. गिरीशही होते. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो. सगळ्यांची ओळख करून दिली. छान गप्पा झाल्या. 

बाबासाहेेब नुकतेच दिल्लीला जाऊन आले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. साहजिकच त्या विषयावर चर्चा सुरू झाली. 
ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांकडं माझं काहीच काम नव्हतं. मीच त्यांचा भेटीसाठी वेळ घेतला. आम्हाला ‘जाणता राजा’चा प्रयोग दिल्लीत करायचाय. त्यासाठी त्यांनी उपस्थित रहावं अशी विनंती करायची होती. ते त्यांच्या व्यग्रतेतून पाच मिनिटांसाठी आले तरी आनंद होता. भेट झाली. त्यांना निमंत्रण दिलं. त्याबरोबर ते म्हणाले, ‘‘जाणता राजा’चा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 ला झाला होता. त्यासाठी मी अहमदाबादहून पुण्याला आलो होतो. आता तर दिल्लीतल्या दिल्लीत यायचं आहे. नक्की येईन.’’ त्यांनी अस्खलित मराठीत असं बोलल्यावर मी अवाकच झालो. आता 6 फेब्रुवारी 2018 ला दिल्लीत ‘जाणता राजा’चा प्रयोग होतोय.’’

हे सारं ऐकून आम्ही स्तंभित झालो. अर्चनाताई लेखिका. त्यात निवेदिका. त्या गप्प थोडेच बसतील? त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. आम्ही शांत! अर्चनाताई म्हणाल्या, ‘‘बाबा, आम्हाला शिवाजीराजे कळले ते तुमच्यामुळं. इतिहास कळला तोही तुमच्यामुळं. आमचं बालपण त्यामुळं संपन्न झालं; पण तुमच्यात इतिहासाची आवड कशी निर्माण झाली?’’

ते हसले. म्हणाले, ‘‘माझ्या वडिलांमुळं. त्यांनी आम्हाला ही समज दिली. अभ्यासाची दृष्टी दिली.’’

नंतर त्यांनी त्या आठवणी जागवल्या. ते बोलत होते. आम्ही नेहमीप्रमाणं मंत्रमुग्ध.

‘‘आता वयाच्या 96 व्या वर्षी काय बोलणार? पण नव्या पिढीत अभ्यासाची दृष्टी विकसित झाली पाहिजे. आमचा ऐतिहासिक चित्रांचा प्रकल्प सुरू आहे. त्यातली 106 चित्रं तयार झालीत. आम्ही आता चित्रमय शिवकाल साकारत आहोत. त्यातून तरी नवी पिढी इतिहासाकडं आकर्षित होईल.’’

सोबतचे सारेजण ऐकत होते. अर्चनाताई अधूनमधून काही प्रश्न विचारून त्यांना बोलतं करत होत्या. त्यांनी खास परभणीहून आणलेली शाल त्यांच्या अंगावर चढवली. ते खुश झाले. शाल पाहत म्हणाले, ‘‘फार सुंदर आहे...’’ नंतर अर्चनाताईंनी त्यांचा ‘जुलूस’ हा कथासंग्रह त्यांना भेट दिला. मागच्या ‘चपराक साहित्य महोत्सवा’त आम्हीच तो प्रकाशित केलाय. मी त्यांना म्हणालो, ‘‘आणखी एक प्रत घ्या आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घ्या.’’  ‘जुलूस’ची दुसरी प्रत त्यांच्या हातात दिली. त्यावर त्यांनी मोडी लिपित सही केली. सगळे खूश!

थोडावेळ चौफेर गप्पा झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. सगळेजण भारावलेल्या अवस्थेत. या वयातही त्यांचा उत्साह, इतिहासाचं प्रेम, शिवमय जगणं, नवोदितांची आस्थेनं दखल आणि महत्त्वाचं म्हणजे तल्लख स्मरणशक्ती... सगळंच अचंबित करणारं!

आम्ही बाहेर पडलो. त्यांच्या घराजवळील एक छोटंसं हॉटेल. तिथं आमच्या गप्पा सुरू झाल्या. आमच्यासोबत नगरचे लेखक सदानंद भणगे हेही होते. त्यांचीही पुस्तकं ‘चपराक’नंच केलेली. बाबासाहेबांना भेटायचं म्हणून त्यांनाही अतीव आनंद झालेला. शिवाय अर्चनाताईंच्या ‘जुलूस’ची प्रस्तावनाही आम्ही त्यांच्याकडून आग्रहानं लिहून घेतलेली.
आमच्या गप्पा सुरू असतानाच मला बाबासाहेबांचा फोन आला. जेमतेम 15 मिनिटांपूर्वीच त्यांच्या घरातून बाहेर पडलो होतो. त्यांनी विचारलं, ‘‘कुठे आहात? जवळपास असाल तर परत पाच मिनिटांसाठी येऊ शकाल का?’’

त्यांना म्हणालो, ‘‘आम्ही सगळेच तुमच्या घराबाहेर आहोत. आलोच.’’

पुन्हा आमचा ताफा त्यांच्या घराकडं वळला. सगळ्यांच्याच मनात विचारचक्र सुरू झालं. त्यांनी परत का बोलावलं असावं? 

आत जाताच त्यांनी अर्चनाताईंना जवळ बोलावलं. ते म्हणाले, ‘‘मी आता ‘जुलूस’ची प्रस्तावना आणि तुमची ‘जुलूस’ ही शीर्षककथा वाचली. त्यावर मला काही बोलायचं आहे...’’

अर्चनाताई भांबावून गेलेल्या.

बाबासाहेब म्हणाले, ‘‘ही कथा सुंदर झालीय. यातील हिंदी आणि उर्दू शब्द तुम्हाला कसे सुचले?’’

ताई म्हणाल्या, ‘‘माझे वडील हैद्राबाद मुक्ती संग्रामात होते. आमच्याकडे मराठी बोलतानाही हे शब्द सहजपणे येतात. त्यामुळे वापरले.’’

मग त्यांनी एकदोन उर्दूमिश्रीत हिंदीतली वाक्यं सांगितली. त्याचा अर्थ विचारला. तो सांगितल्यावर म्हणाले, ‘‘मागच्या तीन महिन्यापासून मला जी चिंता होती त्यातून मी मुक्त होईन. तुम्ही एक काम कराल का? ते तुमच्याकडून 99 टक्के होईल. ‘जाणता राजा’चे आजवर 1200 प्रयोग झालेत. त्यात हिंदीत 200 प्रयोग झालेत. तुम्ही सोप्या भाषेत आणि भाषेचा लहेजा राखत याचे रूपांतर करा.’’

सगळे अवाक! ताई तर भारावूनच गेल्या. केवळ त्यांची एक भेट मिळावी म्हणून त्यांचा अट्टहास चाललेला. इथं तर त्यांनी इतकी मोठी जबाबदारी सोपवली... लगेच बाबासाहेबांनी ‘जाणता राजा’ची एक प्रत त्यांना भेट दिली. त्यातील चारपाच पानांचा अनुवाद करायला सांगितला. अर्चनाताई रात्री परभणीला परतणार असल्यानं तो माझ्यासोबत द्यायला सांगितला. तो कसा वाटतोय यावर पुढची दिशा ठरणार होती. 

‘‘मराठवाड्यात इतके प्रकाशक असताना पुण्यातून पुस्तक प्रकाशित करायची काय गरज?’’ असा प्रश्न त्यांना काहींनी विचारला होता. त्याच पुस्तकानं आज अर्चनाताईंचे आदर्श असलेल्या बाबासाहेबांच्या हृदयात घर केलं होतं. त्यांच्याकडून लेखनाला, भाषेला, आशयाला दाद मिळाली होती. दर्जेदार लेखनाचं आणि ते संबधितांपर्यंत पोहोचवल्याचं असं समाधान असतं...

अर्चनाताईंनी त्यांचं परभणीला परत जाण्याच्या प्रवासाचं आरक्षण रद्द केलं. त्यातील काही भागाचा समर्थ अनुवाद केला. आज (सोमवार) तो घेऊन आम्ही पुन्हा त्यांच्याकडं गेलो. तो त्यांनी वाचला. सगळ्यांच्या मनात धडकी भरली होती. ते मात्र खुश झाले. म्हणाले, ‘‘मी आता हे कावळ्याच्या दृष्टिनं वाचलं. थोड्यावेळानं आस्वादक रसिकाच्या भूमिकेतून वाचेल. हे काम तुमच्या हातून घडेल. त्यासाठी तुम्हाला परत यावं लागेल. काही शब्दांवर आपल्याला चर्चा करावी लागेल...’’ 

लगेच त्यांनी ‘जाणता राजा’च्या हिंदी प्रयोगाची सिडी मागवली. ती आज संध्याकाळी आम्ही सगळेजण ऐकणार आहोत. त्यांचं म्हणणं असं की, अर्चनाताईंची भाषा रसाळ आहे. त्यात मराठवाडी गोडवा आहे. त्या त्याचा हिंदी अनुवाद आणखी ताकदीनं करू शकतील...

एका लेखिकेची केवळ एक कथा वाचून त्यांनी हा केवढा मोठा विश्वास दर्शविला! अर्चनाताई पूर्ण सामर्थ्यासह हा प्रकल्प यशस्वी करतील याविषयी माझ्या मनात अजिबात किंतु नाही.

लेखकानं लिहित राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमचं साहित्यच यश, कीर्ती, समाधान, पैसा सारं काही मिळवून देईल. त्यासाठी अनेकदा वाट पहावी लागते. संधीनं दरवाजा ठोठावला की तो तुम्ही उघडला पाहिजे. 

अनेकजण नैराश्यानं ग्रासतात. ‘लेखनानं मला काय दिलं?’ म्हणून चिंताक्रांत होतात. कुणाचं नशीब कसं उघडेल हे सांगता येत नाही! पण आपलं लेखन हा आपल्या हौसेचा नाही तर जीवननिष्ठेचा भाग झाला पाहिजे. ते झालं की पुढचं सगळं सोपं होतं. 

तूर्तास मात्र आम्ही ‘जाणता राजा’च्या मराठवाडी शैलीतील उर्दूमिश्रीत हिंदी आवृत्तीची वाट पाहत आहोत.
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092