Tuesday, May 24, 2016

विवाहसंस्थेतील ‘स्फोट’क ‘अतिरेक’ टाळा!



परवा पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणारे काही मुलेमुली 'चपराक' कार्यालयाला भेट द्यायला आले होते. तेव्हा अवांतर चर्चा करताना अनिल काळभोर नावाच्या एका विद्यार्थ्याने एक किस्सा सांगितला.
पुण्याजवळील लोणी काळभोर येथे बापूसाहेब गणपत गाडे नावाचे एक गृहस्थ होते. लोणी गावात मंडईजवळ त्यांचा चहा विक्रीचा गाडा होता. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायु झाला होता. बापू पत्नीची खूप सेवा करायचे. स्वयंपाक बनवण्यापासून ते पत्नीला आंघोळ घालणे, नंतर साडी नेसवणे हे सारे ते आनंदाने करायचे. एके दिवशी दुपारी पत्नीशी बोलत असताना ती काहीच प्रतिसाद देईना. जवळ जाऊन बघितले तर त्यांनी देह सोडलेला! बापू अस्वस्थ झाले. त्यांनी पत्नीला आंघोळ घातली. आपल्या लग्नातील नऊवारी साडी नेसवली. मळवट भरला. सर्व दागदागिने घातले. तेवढ्यात शेजारची एक लहान मुलगी आली. आजीला त्यांनी इतके सजवलेले बघून तिने त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी शांतपणे त्या मुलीच्या हातात दहा रुपये दिले आणि तिला भेळ आणायला पिटाळले. मुलगी घराबाहेर जाताच त्यांनी स्वतः गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येचे आम्ही कधीही समर्थन करत नाही. आम्हाला हा पळपुटेपणा वाटतो; मात्र आपल्या आजारी पत्नीची इतकी सेवा करणारा आणि त्या वियोगात स्वतःला संपवणारा माणूस पाहून हेलावून गेलो. बापूंच्या पत्नीनिष्ठेला आमचे वंदन! समाजात असलेली अशी माणसे हेच आपल्या संस्कृतीचे बलस्थान आहेत. सहजीवनातील ही एकरूपता आणि एकमेकांवरील निस्सीम प्रेम, श्रद्धा कुणालाही लुभावणारी आहे. मुमताजसाठी थडगं बांधणार्‍यापेक्षा बापू गाडे यांचे प्रेम सर्व पातळ्यांवर म्हणूनच श्रेष्ठ ठरते. सध्या विवाहसंस्था, कुटुंबसंस्था धोक्यात आल्या असताना अशी दुर्मीळ उदाहरणे ऐकून वाळवंटातही पाण्याचा झरा दिसतो.
मध्यंतरी कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलूर शहरातील एक बातमी वाचण्यात आली. एका उच्चशिक्षित मुलीचे लग्न ठरले. लग्नासाठी वरपक्षाकडील वर्‍हाडी मंगल कार्यालयात आले. रात्रीच्या जेवणात त्यांना मटण बिर्याणी हवी होती; मात्र वधुपक्षाने तीस किलो चिकन बिर्याणी मागवली. वरपक्षाने मटण बिर्याणीची फर्माइश केली. आता एवढ्या रात्री मटण कुठे मिळणार नाही म्हणून वधुपक्षाने कशीबशी समजूत घातली. दुसर्‍या दिवशी सकाळीही चिकण बिर्याणीच खायला दिल्याने कडाक्याची भांडणे सुरू झाली. मटण उपलब्ध नसल्याने वधूपक्ष हतबल झाला होता आणि ते मिळत नसल्याने वरपक्ष हातघाईवर आला होता. दोन अडीच तास त्यावरून खडाजंगी झाल्यानंतर नवरी मुलगी पुढे आली आणि तिने सांगितले, ‘अशा भांडकुदळ लोकांच्या घरी मी लग्न करून जाणार नाही.’ मुलीचा हा आक्रमक पवित्रा पाहून वरपक्ष शांत झाला आणि लग्नमुहूर्त टळून गेल्याने अक्षता टाकण्यासाठी त्यांनी आग्रह धरला; मात्र मुलगी आपल्या हट्टावर कायम राहिली आणि वरपक्षाला अपमानित होऊन उपाशीपोटीच परत जावे लागले. तीस किलो मटण बिर्याणीसाठी लग्न मोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
पुण्यातील अलका सिनेमागृह चौकात भारती विद्यापीठाची इमारत आहे. त्या इमारतीत कौटुंबीक न्यायालय आहे. तिथे घटस्फोटासाठी येणार्‍या जोडप्यांशी संवाद साधला तर आश्‍चर्य वाटते. लग्न होऊन केवळ दीड महिना झालेला. नवरा कामावरून परत येत असताना गाडी चालवत असल्याने त्याने घरून आलेला बायकोचा फोन घेतला नाही. झाले! एवढ्याशा कारणावरून बायकोने घटस्फोट मागितला. लग्नापूर्वी महाविद्यालयीन जीवनात एका कार्यक्रमात समूह फोटो काढताना आपली बायको एका मुलाच्या अगदी जवळ थांबलीय, या कारणाने एका मुलाने बायकोला सोडचिठ्ठी दिल्याचे प्रकरणही कानावर आले होते. अशा फुटकळ कारणावरून वेगळे होणारे महाभाग बघितले की, बापूंच्या पत्नीनिष्ठेला सलाम करावाच वाटतो.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात पैसा खुळखुळतोय. नवरा बायको दोघेही कमावते. कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. घरी आल्यानंतरही मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून कार्यालयीन आणि व्यावसायिक घडामोडी सुरूच असतात. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. एकमेकांना समजून घेता येत नाही. मुलींच्यात निर्णयक्षमता आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याची जाणीवही आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कारणास्तव तडजोड करण्यास तयार नसतात. मुलेही काहीवेळा अति ताणतणावामुळे व्यसनाच्या आहारी जातात. पुण्यामुंबईसारख्या महानगरात तर रोज मद्यपान आणि धुम्रपान करणार्‍या मुलींची संख्याही कमी नाही.
अशा सर्व परिस्थितीत घरातील ज्येष्ठांनी दिलेले सल्लेही यांना पटत नाहीत. ‘आमच्या मर्जीचे आम्ही मालक’ या भूमिकेतून ही नवविवाहीत मंडळी वावरत असतात. ज्येष्ठांचीही एक गफलत होते. सर्व पालकांना त्यांच्या मुलींच्या जन्मानंतर पक्के ठाऊक असते, की एक दिवस ही लग्न करून दुसर्‍याच्या घरी जाणार. त्यामुळे त्यांची तशी मानसिकता झालेली असते; मात्र आपला मुलगा त्याच्या लग्नानंतर त्याच्या संसारासाठी म्हणून वेगळा राहिल हे सत्य पचवणे त्यांना जड जाते. जर तुम्ही मुलीच्या संसारासाठी त्यांची सासरी पाठवण करता तर एखाद्या मुलाला वेगळे रहावेसे वाटले तर आडकाठी कशासाठी? एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व न जाणणार्‍या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार अवश्य वेगळे राहू द्यावे. त्यातूनच त्यांना जगरहाटी कळेल. अर्थात तरूण मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना वेगळे करावे, असे आम्हास म्हणायचे नाही! मात्र जर अशा कारणामुळे कुटुंबच उद्ध्वस्त होणार असेल, तर एकत्र राहून तरी काय फायदा? वेगळे राहून जर एकमेकांतील प्रेम, जिव्हाळा जोपासता येत असेल, नाती टिकवता येत असतील तर अशा गोष्टींचा बागुलबुवा कुणीही करू नये. ‘जन्मताना एकटाच आलोय आणि जातानाही एकटाच जाणार’ हे चिरंतन सत्य प्रत्येकाने ध्यानात ठेवावे.
स्त्री-पुरूष संबंध ही शारीरिक गरज तर आहेच; पण त्याहून अधिक ती मानसिक गरज आहे. शरीराच्या गरजा भागवताना मनाच्या कोंडमार्‍याचा विचार कुणी फारसा गांभिर्याने करताना दिसत नाही. आपल्यासाठी सर्व नाते सोडून आलेली मुलगी किती महान असणार? तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हे मुलाचे कर्तव्यच आहे! आणि आपल्याला आयुष्यभराची साथ देणारा मुलगाही किती मोठा असणार? त्याचे मन जपणे, दोघांनीही एकमेकांचे नाते आणि नातेवाईक जपणे, सुखदुःखात भक्कम साथ देणे हेच तर सांसारिक जीवनाचे खरे यश आहे. एखाद्याला ‘कॅन्सर’ झाला तरी तो आयुष्यातून ‘कॅन्सल’ होतोच असे नाही, मात्र एखाद्याचा ‘घटस्फोट‘ झाला तर आपल्या संस्कृतीच्या आणि नैतिकतेच्या चिंधड्या उडवणारे ‘स्फोट‘ मात्र नक्कीच घडतील! विवाहसंस्था उद्ध्वस्त करू पाहणार्‍यांनी बापूसाहेब गाडे यांच्यासारख्यांचे आदर्श ठेवून जीवनातील अतिरेक टाळावा, हेच बरे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Friday, May 13, 2016

गडहिंग्लजचा ‘समाजभान पॅटर्न’!


काळाप्पान्ना तोरगल्ली! कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावचे एक निवृत्त कर्मचारी. त्यांना वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याचा छंद. त्यातून ते विधायक कार्य करणार्‍या लोकांची यादी तयार करत. आपल्या दैनंदिनीत त्यांची नावे आणि कामाचे स्वरूप यांचा तपशील लिहायचा त्यांचा नित्यक्रम. पुढे त्यांना अर्धांगवायू झाला. मग त्यांनी ठरवले, आजवर ज्यांच्या कामाची दखल दैनंदिनीत घेतलीय त्यांना आपली संपत्ती दान करायची. झाले! त्यांनी घरात हा निर्णय सांगितला. पत्नी विजयाबाई आणि घरातील इतर सदस्यांनी कसलीही खळखळ न करता तो मोठ्या मनाने मान्य केला. मग काय? ही जबाबदारी आली सूनबाईंवर. त्यांनी त्याचे नियोजन करावे.
उत्तूरचे निवृत्त प्राध्यापक, लेखक आणि उत्तम समाजभान असलेले प्रा. श्रीकांत नाईक हे या सूनबाईंचे शिक्षक. त्यामुळे त्यांनी नाईक सरांकडे धाव घेतली. आपल्या सासर्‍यांना काही संपत्ती विविध सेवाभावी संस्थांना दान करायची असल्याचे त्यांनी सांगितले. नाईक सरांनी हे काम करावे अशी त्यांची अपेक्षा. त्यांची तळमळ बघून नाईक सर काळाप्पाना भेटायला गेले. त्यांना वाटले दहा-वीस हजार ते एखाद्या संस्थेला देणार असतील!
काळाप्पांनी त्यांची दैनंदिनी दाखवली. अर्धांगवायूमुळे त्यांचे लेखन थांबले होते. मात्र ते वृत्तपत्रे आणि मासिके कुणाकडून तरी वाचून घेत आणि विधायक कामे करणार्‍यांच्या नोंदी ठेवत. त्यांनी नाईकांना आपली डायरी दाखवली आणि काही व्यक्ती व संस्थांना मदत करायचे असल्याचे सांगितले. ही मदत नाईकांनी संबंधितांपर्यंत पोहोचवावी अशी गळ घातली. नाईकांनी कागद बघितला. त्यावर काही नावे आणि रकमा लिहिल्या होत्या. आनंदवन पन्नास हजार, सिंधुताई सपकाळ पन्नास हजार, विकास आणि प्रकाश आमटे प्रत्येकी पन्नास हजार, नगरजवळील राजेंद्र धामणे पंचवीस हजार, हेल्पर्स ऑफ हॅन्डीक्राफ्ट या कोल्हापूरातील संस्थेला पन्नास हजार.... अर्धांगवायूमुळे शरपंजरी पडलेल्या या माणसाचा हा निग्रह आणि समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव पाहून नाईक थक्क झाले.
त्यांनी विचार केला, या सगळ्यांना ही मदत नेऊन देण्याऐवजी जर आपल्याला या मान्यवरांना काळाप्पांची भेट घालून देता आली तर...? ते कामाला लागले. या सर्वांना ही परिस्थिती सांगितली. आमटे बंधू आले. सिंधूताई आल्या. ‘मंदिर-मस्जिदींच्या दगडविटांच्या कामाला मदत करण्याऐवजी या लोकांच्या कामात देव दिसल्याने त्यांना हातभार लावायचाय...’ असे काळाप्पाना नाईकांना सांगत. या ‘देवां’ची समक्ष भेट त्यांना घडली. आपण ज्यांना फुल ना फुलाची पाखळी देणार आहोत त्यांना आपल्या घरी आलेले बघून काळाप्पाना भारावले.
पुढे काळाप्पांना देवाघरी गेले. मागे पत्नी श्रीमती विजयाताई तोरगल्ली आहेत. काळाप्पांनी शेवटच्या क्षणी शब्द घेतला, या दैनंदिनीत ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांना जमेल तशी मदत करा. तुम्हाला आणखी कुणी सकारात्मक काम करणारे दिसले तर त्यांनाही मदत करा... विजयाताईंनी त्यांना वचन दिले. आजही त्या वचनाची पूर्ती करत आहेत. काळाप्पानांच्या निधनानंतरही त्यांनी त्यातील अनेकांना मदत केली. प्रा. श्रीकांत नाईक त्यांना याकामी मदत करतात. बटकडल्ली आडनावाच्या एका विद्यार्थ्याला दिल्लीहून एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सोबत लॅपटॉप असणे बंधनकारक होते. त्याच्या वडिलांची अचानक नोकरी गेलेली. परिस्थिती बेताचीच. केवळ लॅपटॉपअभावी त्याची ही संधी जाणार हे कळताच विजयाताईंनी नुकतेच त्याला बोलवून घेऊन तीस हजार रूपये दिले. तो दिल्लीला गेला आणि त्याच्या आयुष्याचेही सोने झाले. आता त्यांना अभय बंग यांना पन्नास हजार रूपये द्यायचे आहेत; मात्र बंग तालुक्यातील एका संस्थेच्या पूर्वीच्या काही गैरसमजामुळे गडहिंग्लजला यायचे टाळत असल्याचे कळते. डॉ. बंगांवर प्रेम करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? एखाद्या संस्थेमुळे ते आम्हाला का अव्हेरतात? असा सवाल प्रा. नाईक करतात. या माध्यमातून कै. काळाप्पांनाचा दृष्टिकोन आणि त्यांच्या पवित्र भावना त्यांच्यापर्यंत जाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.
या काळाप्पांनाकडून प्रेरणा घेतल्यानंतर प्रा. नाईकही जिद्दीला पेटले. मुळातच त्यांचा धडपड्या स्वभाव. वंचित, उपेक्षित यांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर. त्यात हा पर्वतासमान माणूस जवळून बघितलेला. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, लेखक सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, उद्योजक बाळासाहेब हजारे, बँकेतील निवृत्त कर्मचारी पी. एस. कांबळे या मंडळींनी समाजसेवेचा धडाका लावलाय. ‘कमी तिथे आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे त्यांचे सूत्र. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात या मंडळींनी विधायक कामाचा आदर्श ठेवलाय. त्याचा कसलाही गाजावाजा ते करत नाहीत. या ‘समाजभान अभियाना’त त्यांना त्यांचे अनेक विद्यार्थी मदत करतात. हा ‘गडहिंग्लज पॅटर्न’ राज्यभर राबवला गेला पाहिजे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता जर असे काही प्रयत्न केले गेले तर राष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल.
काय आहे हा पॅटर्न? या मंडळींनी असे कोणते प्रयत्न केले?
काही उदाहरणे पाहूया!
चांगल्या कामाला मदत करायची वृत्ती असावी लागते. ती असेल तर मोठ्यात मोठे काम उभे राहू शकते अशी यांची श्रद्धा! त्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी एक योजना राबवली. प्रत्येकाने ‘दाता’ व्हावे, त्याच्यात समाजभान निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही प्रत्येकी एक रूपया सामाजिक कार्याला द्यायचा. त्यापेक्षा जास्त रक्कम कुणाकडूनही स्वीकारली जाणार नाही. हा रूपया का द्यायचा हे मुलांनी त्यांच्या पालकांना घरी सांगायचे. गलेलठ्ठ पगार घेणार्‍या शिक्षकांनीही प्रत्येकी फक्त एक रूपया द्यायचा. भविष्यात या एक रूपयाला स्मरूण जिथे जिथे काही विधायक काम सुरू आहे आणि आपण सहज मदत करू शकतो तिथे मदत करायची, असा संकल्प प्रत्येकाने करायचा. एकेक रूपया गोळा करणे सुरू केले आणि बघता बघता तब्बल एकेचाळीस हजार रूपये जमले. ते मग त्यांनी ‘आनंदवन’ला पाठवले.
दुसरा उपक्रम रद्दीचा! ‘रद्दीतून बुद्धिकडे’ हे सूत्र. त्यांनी आवाहन केले की, तुमच्याकडील रद्दी टाकून देऊ नका. त्यातून तुम्हाला फार काही मिळत नाही. ती आमच्याकडे द्या. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्यातून आम्ही विधायक कार्य करू! गरजूंना मदत करू! या आवाहनातून तब्बल पस्तीस हजार रूपयांची रद्दी जमली. ते पैसे त्यांनी हेमलकसा येथील आश्रमशाळेला पाठवले.
श्रीकांत नाईकांनी त्यांच्या मित्रांना आवाहन केले. शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री यांनी दर सोमवारी भात खाणे सोडण्याचे आवाहन देशबांधवांना केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आपण दिवसभरातील अर्धा कप चहा सोडूया! अर्धा कप चहाला किमान पाच रूपये लागतात. म्हणजे वर्षभरात 1825 रूपयांची बचत. यातून ‘समाजभान’ ठेऊन प्रत्येकाने ते पैसे त्याला हवे त्याप्रमाणे विधायक कार्यासाठी खर्च करायचे. ते कुणाला द्यायचे? किती द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे; पण वर्षात एकदा बैठकीत त्याने त्याचा तपशील सांगावा. साधारण दोन हजार रूपये प्रत्येकी ‘समाजधन’ मिळू लागले. यातून त्यांचे ‘समाजभान’ दिसू लागले.
गडहिंग्लजचे साधारण वीस व्यापारी आहेत. या मंडळींनी त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितले, तुम्ही महिन्याला फक्त शंभर रूपये समाजासाठी द्या. अन्य कोणत्याही धार्मिक उत्सवाची वर्गणी दिली नाही तरी चालेल; पण महिना फक्त शंभर रूपये समाजधन द्या! या सामाजिक ऋणातू
उतराई व्हा! व्यापारी बांधवांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या परिसरातील निवृत्त कर्मचार्‍यांचे या मंडळींनी संघटन केले. प्रत्येकाला सांगितले, आता तुम्ही नोकरीत नाही. तरीही सरकारच्या कृपेमुळे तुम्हाला निवृत्ती वेतन मिळते. त्याचा विनियोग विकासकामासाठी करा. प्रत्येकाने वर्षाला फक्त पाचशे रूपये द्या. त्यातून आपण काही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ. गरजूंना मदत करू. कलाकारांना व्यासपीठ देऊ. जे आजारी आहेत आणि ज्यांची क्षमता नाही त्यांना वैद्यकीय मदत, वैद्यकीय उपकरणे देऊ. ही योजनाही फळाला आली. ‘रसिका तुझ्याचसाठी’सारखा बहारदार कार्यक्रम त्यातून सुरू झाला. निवृत्तांना आनंद मिळेल असे कार्यक्रम यातून सुरू झाले. कुणी सभासदाने एखाद्याची गरज सांगितली तर सगळे मिळून त्याला मदत करू लागले.
प्रा. श्रीकांत नाईक यांनी आणखी एक फार मोठे कार्य केले. मुळात ते शिक्षक. त्यामुळे वाचनाची त्यांना न आवरण्याइतकी हौस. यातून त्यांना तालुक्यात काही ग्रंथालये असावित असे वाटू लागले. मग त्यांनी त्यांच्या हितचिंतक आणि विद्यार्थी मित्रांना त्यासाठी तयार केले. छोट्या गावात ग्रंथालय सुरू करायला किमान तीनशे पुस्तके लागतात. नाईक सरांनी या सगळ्यांना पदरमोड करून प्रत्येकी दोनशे पुस्तके दिली. पन्नास वर्षात त्यांनी जी दुर्मीळ पुस्तके जतन करून ठेवली होती तो ठेवाही त्यांनी या ग्रंथालयांकडे सुपूर्त केला. रविंद्र पिंग्यांनी नाईकांना सांगितले होते, ‘वाचून झालेल्या पुस्तकांची रद्दी घरात नको. जी पुस्तके पडून राहणार आहेत ती इतरांना वाचायला द्यावीत...’ हा मंत्र ध्यानात घेऊन नाईक सरांनी थोडी थोडकी नव्हे तर चार लाख रूपयांची पुस्तके दान केली. त्यातून ही ग्रंथालये उभी राहिली. त्यांच्याकडे आज हजारो पुस्तके झालीत. सरकारचे अनुदान मिळतेय. या परिसरात ही ज्ञानकेंद्रे अनेकांची वाचनाची भूक भागवतात. श्रीकांत नाईक हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.
आजरा तालुक्यातील चिमणे हे एक छोेटेसे गाव. तेथील परेशराम कांबळे हा नाईक सरांचा विद्यार्थी. तो खाऊन-पिऊन सुखी आहे. नाईकांनी त्याला सांगितले, ‘काम प्रामाणिक केले की लोक आठवण ठेवतात. तू ग्रंथालय सुरू कर. सगळी संदर्भ पुस्तके उपलब्ध करून दे. ललित, वैचारिक पुस्तके ठेव. दर्जेदार पुस्तकांसाठी आणि कोणत्याही संदर्भासाठी या परिसरातील विद्वानांनी तुझ्याकडे आले पाहिजे.’
कांबळेंनी सल्ला ऐकला. त्याने गुरूऋण दाखवत आग्रहाने नाईक सरांनाच या ग्रंथालयाचा अध्यक्ष केले. नाईक सरांनी चेन्नईतील राजाराम मोहनरॉय ग्रंथालयाकडे पाठपुरावा करून या ग्रंथालयाच्या इमारतीसाठी साडेचार लाख रूपये मिळवले. आज चिमणे गावात ‘सकाळ सार्वजनिक वाचनालया’ची स्वतःची इमारत उभी आहे. या ग्रंथालयाला नाईक सरांनी एक लाख रूपयांची पुस्तके दिली.
आजरा तालुक्यातील मलिगरे हे असेच एक छोटेसे गाव. लोकवस्ती साधारण हजाराची. या गावात रमेश इंगवले हा सरांचा विद्यार्थी राहतो. त्याचा सिमेंटचा छोटासा व्यवसाय आहे. गावात शेती आहे. त्याच्या घरात लग्न, बारसे, वाढदिवस असा कोणताही कार्यक्रम असेल तर तो किमान पाचशे पुस्तके इतरांना भेट देतो. या दर्जेदार पुस्तकांवर वाचक तुटून पडतात. नाईक सरांनी कोल्हापूरच्या ‘अभिनंदन प्रकाशन’च्या मदतीन या तीन तालुक्यात साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या किमान एक लाख प्रती वाटल्या आहेत. उत्तुरला ते दरवर्षी ‘संत ज्ञानेश्‍वर लोकशिक्षण व्याख्यानमाले’चे आयोजन करतात. साधारण दीडएक हजार लोक त्याचा लाभ घेतात. इतके उत्तम वक्ते आणि त्यांना दाद देणारे दर्दी ‘कानसेन’ हे चित्र उत्तुरमध्ये दिसते.
आज आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठीही सरकारवर अवलंबून राहतो. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना दुषणे देतो. मात्र या देशाचे ‘सजग नागरिक’  म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत की नाही? इतक्या छोट्या छोट्या कृतीतूनही मोठे काम उभे राहू शकते हे गडहिंग्लजच्या मंडळींनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा आदर्श इतर तालुक्यांनी घ्यायला हवा. त्यातूनच आपल्या राष्ट्राची संपन्नतेकडे वाटचाल सुरू राहणार आहे. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, बाळासाहेब हजारे, पी. एस. कांबळे आणि त्यांना सहकार्य करणार्‍या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा ‘समाजभान’ पॅटर्न राज्यभर, देशभर राबवला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Sunday, May 8, 2016

अपेक्षांचे ओझे घातक!


प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाने खूप शिकावे. रग्गड पैसा कमवावा. बंगला बांधावा, आलिशान सदनिका विकत घ्यावी. परदेशी बनावटीची गाडी त्याच्या घरासमोर असावी. ‘इंडिया विरूद्ध भारत’ या स्पर्धेत तो ‘इंडिया’तच असावा आणि गर्भश्रीमंतीत त्याने त्याचे आयुष्य व्यतिथ करावे.
पाल्याचे हित चिंतणे, त्याला त्या दृष्टिने घडविणे, तशा अपेक्षा ठेवणे यात गैर ते काय? मात्र सध्या या अपेक्षांच्या ओझ्याने कोवळ्या वयातच मुलांची कंबरडी मोडत आहेत. त्याची क्षमता न पाहता त्याच्याकडून इतक्या अपेक्षा केल्या जातात की, या स्पर्धेत कुबड्या घेऊन चालणेही त्याला अशक्य व्हावे! त्यात नैराश्याने ग्रासून आलेले मानसिक पंगुपण कायम राहते.
मुलं सुसंस्कृत झाले काय किंवा न झाले काय, त्यांनी सुशिक्षित मात्र झालेच पाहिजे असा कल दिसतो. आपल्या पाल्याने आयआयटीत जावे यासाठी चाललेली पालकांची धडपड पाहून आश्‍चर्य वाटते. राजस्थानातल्या कोटा शहरात अशा वर्गांचे पेव फुटले आहे. त्याठिकाणी तब्बल दीड लाख विद्यार्थी विविध वर्गातून आयआयटीची तयारी करतात. त्यांच्यात जीवघेणी स्पर्धा असते. या स्पर्धेतून तिथे गेल्यावर्षी 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मग आपली दिशा कोणती? पालकांना नेमके काय हवे? रविकुमार सुरपूर हे तिथले जिल्हाधिकारी. त्यांनी शिकवणी वर्गांच्या प्रमुखांसाठी भावनिक आवाहन करणारे एक पत्रक काढले. मुलांनी स्पर्धेचा अतिरेक करू नये, आपली आवड पाहून क्षेत्र निवडावे, आयुष्य मोलाचे आहे आणि आयआयटीतून अभियंता होणे म्हणजेच सर्वकाही नाही, हे त्यांनी ठासून मांडले आहे. तरीही पालक जागे होत नाहीत. अवास्तव अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलं जिकिरीला येतात. त्यासाठी अट्टाहास करतात आणि तोंडघशी पडतात.
सध्या मुलांना सुट्ट्या सुरू आहेत. पूर्वी सुटट्यात आपली धमाल असायची. मामाच्या गावला जाऊन चंगळ करायचे हे दिवस.  विविध शारीरिक खेळ, बौद्धिक गमतीजमती असे सारे काही चालायचे. मात्र आजची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलीय. फेसबुक, व्हॉटस् ऍप, इंटरनेटवरचे खेळ यातच त्यांना स्वारस्य वाटते. सुटीच्या काळात खेळापेक्षा पुढच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जातेय. पूर्वी या दिवसात काही शिबिरे व्हायची. त्यांची जागाही अशा अभ्यासक्रमांच्या शिकवणी वर्गांनी घेतलीय. यातून मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास कसा घडणार?
ध्येयवादी तरूणांपेक्षा दिशाहीन तरूणांचे प्रमाण अधिक जोमाने वाढतेय. शिस्त आणि अभ्यासाच्या नावावर पालक या भरकटलेपणाला खतपाणीच घालतात. त्यांना मोठमोठी स्वप्ने दाखवतात. ते पूर्ण करण्यासाठी मग वाटेल त्या मार्गांचा अवलंब करायचा. एक साधे निरीक्षण पाहा. व्यसनाधीन मुला-मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढलेय. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण. आठवी-नववीच्या मुलामुलींच्याही जोड्या जुळलेल्या असतात आणि त्यांच्यात अनेक विषयांवर ‘सखोल’ चर्चा होते. दूरचित्रवाणी मालिका आणि नवनवे चित्रपट यामुळे काहीजण काही ‘प्रयोग’ही करतात. त्यांच्या ‘अनुभवसंपन्नते’ची पुसटशी जाणिवही पालकांना नसते. ते मात्र त्यांच्याकडून अव्वल शालेय कामगिरीची वाट पाहत असतात.
आपल्या देशाला जशी ‘पुस्तकी किड्यां’ची गरज नाही; तशीच ‘अशा’ अनुभवसंपन्नतेचीही गरज नाही. संस्कार आणि संस्कृतीची बंधने त्यांच्यावर नकोच; मात्र त्याचे महत्त्वही त्यांना ठाऊक असायला हवे. एकीकडे देशाच्या महासत्तेच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे उद्याच्या उज्ज्वल राष्ट्राचे भवितव्य असलेल्या मुलांच्या भावनेशी खेळ खेळायचा. हे आता थांबायला हवे. आपण एका विचित्र टप्प्यावर आहोत. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी मुलांचे संघटन केले. त्यांच्यावर शिस्तीचे संस्कार केले. साने गुरूजींनीही मुलांचे गोष्टीतून प्रबोधन केले. आपल्या फसलेल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादणारे पालकच सध्या बिथरले आहेत तिथे या नव्या पिढीला संस्कार कोण देणार? त्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्‍याने यांचे भावविश्‍व बदलत चालले आहे.
बदलत्या शैक्षणिक धोरणांमुळे दहावीपर्यंतची गाडी एका लयीत येते. पुढे मात्र प्रत्येकांची दिशा वेगळी. मुलांची स्वप्ने आणि पालकांच्या अपेक्षा यात त्यांच्या आयुष्याचे मातेरे होते. मुलांनी अभियंता व्हावे, वैद्यकीय क्षेत्रात जाऊन खोर्‍याने पैसा ओढावा अशीच अनेक पालकांची अपेक्षा असते. मुलांपुढे काहीच ध्येय नसताना देखील त्यांच्या मनावर या क्षेत्राची लालसा बिंबवली जाते. त्यातूनच सुरू होते जीवघेणी स्पर्धा. या स्पर्धेचा निकाल कधीच लागत नाही. आयुष्यभर फक्त पळत रहायचे. ‘आणखी हवे, आणखी हवे’ चा जयघोष सुरूच ठेवायचा. मानसिक समाधान, तृप्ती, आत्मानंद या गोष्टी दुर्मीळ होत चालल्या आहेत. फक्त पैसा उकळणारी यंत्रं आपल्याला हवीत. आपला देश चालवणारे बहुतेक राज्यकर्ते, स्पर्धा परीक्षांद्वारे पुढे गेलेले प्रशासकीय अधिकारी, घटनातज्ज्ञ विधिज्ञ, मुलांना ज्ञानाची शिदोरी देणारे प्राध्यापक-शिक्षक, समाजाचे चित्र धाडसाने मांडणारे पत्रकार असे समाजातील बहुतेक महत्त्वाचे घटक ‘कला शाखेद्वारे’ पुढे येतात. विज्ञान किंवा वाणिज्य विषय न घेतल्याने त्यांचे काही अडत नाही. तरीही पालकांना आपला मुलगा अभियंता व्हावा, डॉक्टर व्हावा, बँकेत लागावा असेच वाटते. हे वाटणे गैर नाही. त्यांच्या त्यांच्या कलानुसार मुले त्या त्या क्षेत्रात आपले भवितव्य गाजवतीलही! मात्र त्यांच्यावर ते लादणे आणि त्यातून विपरीत घडणे आपल्याला परवडणारे नाही.
18 ते 30 या वयोगटातील मुलामुलींच्या मृत्युचे प्रमाण बघा. शालेय जीवनात अपयश आल्याने आत्महत्या, नैराश्याने मृत्युला कवटाळले, प्रेमप्रकरणातून जीवनयात्रा संपवली, व्यसनाच्या आहारी जाऊन अखेर, नशेत गाडी चालवल्याने अपघातात मृत्यू या व अशा कितीतरी बातम्या रोजच पाहून अक्षरशः चर्र होते. तरूणाई हे राष्ट्राचे भवितव्य आहे. अशा घटना म्हणजे आपल्या राष्ट्राचे फार मोठे नुकसान आहे. पालकांनी तरूण मुलामुलींचा मृत्यू डोळ्याने पाहणे यापेक्षा भयंकर दुःख कोणते? त्यातून त्यांना सावरणे शक्य नाही. काहीजण तसे ‘दाखवत’ असले तरी ते सत्य नाही. ती स्वतःची फसवणूक असते. शत्रूराष्ट्राकडून होणारे आक्रमण जितके घातक आहे त्याहून आपल्या तरूणाईचे असे मृत्यू भीषण आहेत. हे थांबायला हवे. निमय बनवून किंवा धाकधोपटशाहीने हे चित्र बदलणारे नाही. पालकांनी त्यासाठी सजग असायला हवे.
साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प, अभिनय अशा कोणत्याही क्षेत्रात मुलांना काम करू द्या! त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नकात. यावर अनेकांनी लेखन केले, चित्रपटाद्वारे प्रबोधन केले. तरीही आपली आसक्ती संपत नाही. आजजी मुलं उद्याच्या बलशाली राष्ट्राचा आत्मा आहेत. आपल्या फुटकळ महत्त्वाकांक्षेपोटी आपण त्यांचा गळा घोटतोय. हे पातक थांबायला, थांबवायला हवे. आत्मकेंद्रीत वृत्ती सोडून मनाचे व्यापकत्व दाखवले नाही तर पश्‍चातापाशिवाय हाती काहीच राहणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, ‘साहित्य चपराक’, पुणे
7057292092