Tuesday, January 5, 2016

संमेलन सुरळीत पार पाडा!


वाचकमित्रांनो सस्नेह नमस्कार!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्याविषयी आम्ही मागील लेखात लिहिले होते. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’च्या अंकातील अग्रलेख आणि ‘दखलपात्र’ या ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांनी तो मोठ्या प्रमाणात वाचला आणि आमच्याकडे उदंड प्रतिक्रिया आल्या. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
नवनिर्वाचित अध्यक्ष सबनीस यांच्यावर टीका करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तिक आकस किंवा त्यांच्याशी वैरभाव, द्वेष असण्याचे कारण नाही. त्यांची बदललेली वैचारिक भूमिका आणि साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेले राजकारण हे कठोरपणे मांडणे आम्हास गरजेचे वाटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काही पथ्ये पाळायची असतात, ती त्यांनी पाळली नाहीत. आमची झालेली भावनिक फसवणूक आणि त्यांचे बदललेले वर्तन यामुळे आम्हाला नाईलाजाने कठोर भूमिका घेऊन त्यांच्याविषयी सडेतोडपणे लिहावे लागले.
संमेलनाच्या निमित्ताने जे काही राजकारण घडते किंवा निवडून येण्यासाठीच्या क्लृप्त्या, प्रयत्न (युद्धात आणि प्रेमात सगळे क्षम्य असते या म्हणीनुसार) ते सारे काही सबनीसांनी केले आहे. मात्र एकदा संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्या पदाचा डौल आणि त्याचे पावित्र्य सांभाळण्याची जबाबदारीही त्या व्यक्तिवर येऊन पडत असते. हे सतीचं वाण असतं. निवड झाल्यापासून सबनीसांनी वसा सोडला. या पवित्र व्रताचं आचरण करण्याऐवजी चुकीचे वर्तन केल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर टीका करावी लागली.
मात्र सबनीस विरोधकांसाठी ते घबाड मिळाल्यासारखे झाले आहे. अर्थात, कोण कुणाच्या बाजूचा आणि कोण कुणाचा समर्थक यात आम्ही कधीही पडलो नाही. आमच्या बाण्यानुसार (चतुरस्त्र, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष) आम्ही आमची भूमिका कायम मांडत असतो. त्यामुळेच घुमान संमेलनाच्या वेळी प्रकाशक परिषदेने संमेलन विरोधी भूमिका घेतलेली असताना ‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तरी आम्ही येणार’ अशी धाडसी भूमिका आम्ही सर्वप्रथम घेतली. नंतर विरोध करणार्‍यांना आणि इतरांना आमच्या भूमिकेची सत्यता पटली.
ताज्या वादात आम्हाला हेच म्हणायचे आहे. संमेलनाध्यक्षांनी आपल्या पदाचे पावित्र्य राखावे, इतकेच आम्हाला सांगायचे आहे. संमेलनाचे हीत लक्षात घेऊन आणि या प्रकरणी आम्हाला जेवढे सांगायचे होते ते यापूर्वीच्या लेखातून स्पष्ट करून झाले आहे. आमच्या बाजूने हा विषय संपवण्याची सामुहिक शहानपणाची भूमिका आम्ही घेत आहोत. ‘संमेलनावर बहिष्कार’ किंवा ‘सबनीसांना संमेलनाकडे फिरकू देणार नाही’, ‘त्यांचे हातपाय तोडा, त्यांना मारा’ असे म्हणणे हे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने चुकीचे आहे. सबनीस विरोधी काही लोक आम्ही त्यांचे वैरी असल्याप्रमाणे नवनव्या गोष्टी आणि त्यांची प्रकरणे आमच्याकडे पाठवत आहेत. साप्ताहिक, मासिक आणि पुस्तक प्रकाशनाच्या व्यापात व्यग्र असल्याने अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी तूर्तास तरी आमच्याकडे वेळ नाही. संमेलनाध्यक्ष या नात्याने यापुढे त्यांनी काही चुकीची विधाने केली तर नेहमीच्या शैलीत आम्ही त्यांचा समाचार घेऊच; मात्र या लेखामुळे ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात त्यांनी सबनीसांचे कारनामे आमच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या आणि आमच्या वेळेचा अपव्यय करू नये.
‘चपराक’ तर्फे या महिन्यात आठ-दहा दर्जेदार पुस्तके आपल्या भेटीस आणत आहोत. संमेलनाध्यक्ष या नात्याने सबनीसांनी यापुढे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणूस यांच्यासाठी काही करता आले तर करावे, अन्य वादाचे विषय आणि इतरांना कमी लेखणे टाळावे इतकीच माफक अपेक्षा आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’, पुणे

7057292092

No comments:

Post a Comment