Friday, January 22, 2016

चोराच्या उलट्या बोंबा....

 
पिंपरी येथील 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले तरी त्याचे कवित्व काही थांबत नाही. साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे भाषण न छापल्याने संमेलनाध्यक्षांनी ‘महामंडळ ‘सेन्सॉर’ कधीपासून झाले?’ असा सवाल करत हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे सांगितले आहे. हे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल. आक्षेपार्ह मुद्दे असल्याने संमेलनाध्यक्षांचे भाषण छापले गेले नाही, असे सांगण्यात येत असले तरी यात तथ्य नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीपाल सबनीस यांनी निवडणुकीदरम्यान अनेक वाद ओढवून घेतले. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी भाषेत केलेला उल्लेख मोदी विरोधकांनाही आवडला नाही. त्याचवेळी सनातन संस्थेचे वकील पुनाळेकर यांनी त्यांना ‘मॉर्निंग वॉकला जात चला’ असा सल्ला दिल्याने सबनीसांनी थयथयाट केला. खरेतर हा सल्ला पुनाळेकरांनी सबनीसांना आधीच द्यायला हवा होता. कारण या सल्ल्यानंतर काही तथाकथित पुरोगामी संघटनांना सोबत घेऊन त्यांनी ‘मॉर्निंग वाक’ची नौटंकी केली आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. एक दिवस ‘मॉर्निंग वॉक’ला गेल्याने इतकी अक्कल आली; जर ते नियमित चालायला गेले असते तर कदाचित अशी दुर्दैवी वक्तव्ये केलीच नसती! असो.
महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण प्रकाशक या नात्याने छापावे असा रिवाज आहे. यंदा तो खंडित झाला आहे. त्यामुळे सबनीस गळे काढत आहेत. मात्र यातील तथ्य आपण समजून घ्यायला हवे. तब्बल 135 पानांचे हे भाषण सबनीसांनी संमेलनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ग्रंथदिंडी सुरू असताना महामंडळाकडे दिले. याची कबुली खुद्द सबनीसांनीही दिली आहे. त्यामुळे इतक्या कमी काळात हे भाषण छापणे अवघडच आहे. याची जाण त्यांनाही असल्याने त्यांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हे भाषण स्वतःचे पैसे टाकून (किंवा प्रायोजक मिळवून) ‘दिलीपराज प्रकाशन’कडून रातोरात छापून घेतले. एका रात्रीत दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे हे भाषण छापू शकतात तर महामंडळ का नाही? असा खुळचट सवालही सबनीसांनी केला आहे. अध्यक्षीय भाषण होण्यापूर्वीच एखादा प्रकाशक अशा पद्धतीने भाषण छापू शकतो का हेही तपासले पाहिजे; तसेच सबनीस हे भाषण स्वतः पैसे टाकून छापून घेतल्याचे सांगत असल्याने स्वतः पैसे टाकून त्यांनी आणखी काय काय उद्योग केले आहेत हेही समोर यायला हवे.
दिलीपराजची स्वतःची यंत्रणा आहे. ते प्रकाशक आहेत. महामंडळाकडे छपाईबाबत स्वतःची अशी कुठलीही साधने नाहीत. शिवाय संमेलनाची पूर्वसंध्याकाळ म्हणजे महामंडळाचे सर्व पदाधिकारी संमेलनाच्या धावपळीत असणार हेही सत्य नाकारून कसे चालेल? आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन सबनीसांनी वेळीच भाषण लिहून पूर्ण केले असते तर अशी वेळ ओढवलीच नसती. काहीही झाले तरी महामंडळाला नावे ठेवत, त्यांना दूषणे देत स्वतःचा करंटेपणा, नाकर्तेपणा झाकून ठेवायचा याला काही अर्थ नाही.
हे भाषण महामंडळाने न छापल्याने आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा विनोदी खुलासा अध्यक्षांनी केलाय. निवडणुकीच्या दरम्यान झालेले राजकारण आणि यांची हुजरेगिरी स्पष्टपणे मांडत संमेलनाध्यक्षांचा ‘चेहरा आणि मुखवटा’ दाखवून देणारा लेख ‘चपराक’ने प्रकाशित केला. तो ‘चपराक’च्या सदस्यांपर्यंत तर गेला होताच पण फेसबूक, ब्लॉग अशा समाजमाध्यमांबरोबरच राज्यातील अनेक वृत्तपत्रांनीही तो पुनर्मुद्रित केला होता. त्यानंतर संमेलनात ‘चपराक’च्या ग्रंथ दालनात या अंकाची दोन दिवस तडाखेबंद विक्री झाली. यामुळे हबकलेल्या अध्यक्षांनी त्यांची योग्यता सिद्ध केली! संमेलन समितीच्या सदस्यांनी हे अंक जप्त केले. इतकेच नाही तर, हा अंक येथे विक्रीस ठेवला तर दालनाचा परवाना रद्द करू असा दमही भरला.
‘चपराक’ कधीही कुणाच्या वांझोट्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यामुळे आम्ही त्याचा खंबीरपणे सामना केला. वृत्तवाहिन्यांनी हा विषय लावून धरला. ‘साहित्य संमेलनातील सर्वात मोठी बातमी, ‘चपराक’चे अंक जप्त’ अशी बातमी सुरू झाली. झी चोवीस तास, एबीपी माझा, टीव्ही 9, आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र नं. 1, साम टीव्ही अशा आघाडीच्या सर्वच वाहिन्यांनी आमचा आवाज तमाम मराठी बांधवापर्यंत पोहोचवला आणि यांच्या पार्श्‍वभागाला मिरच्या झोंबल्या. अंकातून जेवढी बदनामी झाली त्याहून मोठी नामुष्की या कृत्यामुळे होतेय, हे ध्यानात येताच ग्रंथालय समितीचे प्रतिनिधी रमेश राठिवडेकर यांनी ‘चपराक’चे जप्त केलेले अंक परत आणून दिले आणि आयोजकांच्या वतीने आमची माफी मागितली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा करणारे श्रीपाल सबनीस या प्रकाराच्या वेळी हजार किलो मूग गिळून गप्प होते.
‘विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे’ असे घसा ताणून सांगणारे यावेळी मात्र चिडीचूप होते. प्रसारमाध्यमांच्या दणक्यामुळे जागे झालेल्या आयोजक पी. डी. पाटील यांनी संमेलनाध्यक्षांना सोबत घेऊन मुद्दाम ‘चपराक’च्या दालनाला भेट दिली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत व्हायची तेवढी शोभा झाली होती. ‘नवाकाळ’सारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने तर दुसर्‍या दिवशी पहिल्या पानावर तीन ओळींचे शीर्षक देत, आमच्या फोटोसह आठ कॉलमची बातमी केली. ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ हा आमचा लेख पुनर्मुद्रित केला. अनेक वृत्तपत्रांनी ‘चपराक’च्या भूमिकेला पाठिंबा देत अग्रलेख केले. विशेष लेखात या घटनेचा निषेध नोंदवला. मात्र पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यापैकी कुणीही एका शब्दात याचा निषेध नोंदवला नाही. (अपवाद सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा. ते ‘चपराक’ परिवाराचेच सदस्य आहेत.)
निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ‘अपमान सहन करणार नाही’ असे बंेंबीच्या देठापासून ओरडून सांगणार्‍या सबनीसांना त्यांच्या विक्षिप्तपणामुळे अपमानाशिवाय दुर्दैवाने काहीच पदरात पडले नाही. घुमानच्या संमेलनात सदानंद मोरे यांची खुर्ची कशी बाजूला सरकवली गेली याचे माध्यम प्रतिनिधीसमोर चवीने वर्णन करणार्‍या सबनीसांना पहिल्या रांगेत स्थानही मिळाले नाही. संमेलन परिसरात आणि इतरत्र जे फ्लेक्स लावले गेले होते त्यावर केवळ स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांचाच फोटो होता. नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. संमेलनातील बहुतेक सत्कार पी. डी. पाटील यांच्याच हस्ते करण्यात आले. ‘ऊठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे’ इतकी त्यांची केविलवाणी अवस्था झाली होती आणि ती प्रत्येकाला जाणवत होती. यांची सतत चर्चेंत असणारी ‘तिसरी भूमिका’ अध्यक्षीय भाषणातून कळेल असे वाटत होते; मात्र तीस मिनिटाच्या भाषणातील पंधरा मिनिटे त्यांनी उपस्थितांची नावे घेण्यातच घालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्वसंकेत बाजूला सारून सबनीसांच्या भाषणाच्या आधीच  निघून गेले. आणखी हास्यास्पद म्हणजे, प्रोटोकॉलची माहिती नसलेल्या, किमान अभ्यास नसलेल्या सबनीसांनी मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या दौर्‍याची माहिती भाषणातून दिली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने हे घातक आहे, इतकेही भान त्यांना नव्हते. उदय निरगुडकर यांच्यासारख्या अभ्यासू संपादकाने ‘झी चोवीस तास’ वरून विशेष संपादकीय प्रसारित केले होते. त्याबद्दल अध्यक्षांनी जाहीर खंत व्यक्त केली.
म्हणजे त्यांचा पोलखोल करणारे ‘चपराक’चे अंक दडपशाहीने जप्त करणारे, त्यांच्याविषयी स्पष्टपणे लिहिणार्‍या उदय निरगुडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ संपादकांविषयी खंत व्यक्त करणारे, संमेलनाच्या पूर्वसंध्येला 135 पानांचे भाषण लिहून ते महामंडळाकडे सोपवणारे सबनीस अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या नावे बोंब ठोकत आहेत. हे सारे जितके हास्यास्पद आहे तितका त्यांचा अविवेक, अप्रगल्भता दाखवून देणारे आहे. बरे, आता हे भाषण पुन्हा छापू असे महामंडळाच्या अध्यक्षा असलेल्या वैद्य बाईंनी सांगितले आहे. ते छापले तरी आता साहित्य रसिकांपर्यंत कसे पोहोचणार हे या दोघांनाच ठाऊक. दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण पानेच्या पाने छापणार्‍या माध्यमांनी यावेळी त्यांची फारशी दखल घेतली नाही, यातून सबनीसांनी काहीतरी बोध घ्यायला हवा होता.
आता 26 जानेवारीपर्यंत हे भाषण महामंडळाने छापले नाही तर सपत्निक ते महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. तसा दम त्यांनी पत्रकार परिषदेत भरला आहे. इतकी शोभा होऊनही त्यांचे भाषण छापले जावे आणि ते वाचकांनी वाचावे असा दुराग्रह ते धरत आहेत. अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका छापण्याचा आपल्याकडे रिवाज असला तरी यांचे यावेळी 135 पानांचे पुस्तकच झाले आहे. सरकारी पैशाने ते का छापावे आणि असले कंटाळवाणे लेखन वाचकांनी का वाचावे हाही प्रश्‍नच आहे. सरकारी पैशाची अशी उधळपट्टी करून अमर होण्याचा हट्टाहास कशासाठी? संमेलनाच्या व्यासपीठावरून काही ‘विचार’ दिला असता तर ‘माझे विचार पोहोचवा’ असे म्हणत उपोषणाला बसण्याची वेळच आली नसती. शिवाय आता हे भाषण छापणे म्हणजे लग्न पार पडून मधुचंद्राला गेल्यानंतर सगळ्यांना अक्षता वाटत फिरण्यासारखे विनोदी आहे.
मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवहाराच्या दृष्टिने या चोराच्या उलट्या बांेंबा असून त्या घातक आहेत. साहित्याची, साहित्यिकांची झाली तेवढी शोभा पुरेशी आहे. आता आपली असलेली, नसलेली अक्कल न पाजळता संमेलनाध्यक्षांनी सवंग लोकप्रियतेसाठीची नौटंकी (ड्रेनेज ड्रामा) बंद करून मराठी साहित्यासाठी काही करता आले तर पहावे.


- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092

1 comment:

  1. वास्तविक संमेलनाध्यक्षांनी आपल्या बहुमानीय साहित्य संपदेचा दाखला देताना आपल्या चपराक प्रकाशनाचा उल्लेख केल्याने चपराक त्यांचा समर्थक असेल अशीच सर्वसामान्य भावना होती. आपले त्यांच्या लिखाणाचे अंक जप्त झाल्याची हळहळ वाटली होती, मात्र त्यांची आपल्या शब्दातील हजार किलो मुग गिळून गप्प राहण्याची भूमिका आपल्याला चांगलीच लागली असल्याचे जाणवते. तरीही वरातीमागून घोडे ( आपल्या शब्दात हनिमूननंतर अक्षता वाटण्याचा प्रकार ) अशोभनीय आहे. साहित्य महामंडळानेही अध्यक्षीय भाषण मोडीत काढताना (त्यांच्याकडून वेळीच लिहून घेण्याची जबाबदारी शोभेच्या डामडौलापेक्षा महत्वाची मानायला हवी होती. कारण यंदाचे वाद भयंकर होते तरीही वाद हेच साहित्य संमेलनाचे महत्वाचे भांडवल झाले आहे. तरीही ३ कोटीची पुस्तके खपणे हाही विषय नसे थोडका ! एकूण लेख आगामी साहित्य संमेलनांना, अध्यक्षांना मार्मिकतेने धडा शिकवणारा…।

    ReplyDelete