Friday, February 27, 2015

लाभले आम्हास भाग्य...!


एक पंडित होता. त्याला अनेक भाषांचे उत्तम ज्ञान होते. तो ज्या भाषेत बोले तीच त्याची मातृभाषा वाटे. प्रत्येक भाषेवरील त्याचा व्यासंग अफाट होता. एकदा तो राजाच्या दरबारी आला. राजाने त्याच्या भाषाज्ञानामुळे त्याला मोठे इनाम दिले. मात्र पंडिताचा अहंकार वाढला होता. त्याने राजाला आव्हान दिले की, त्याच्या दरबारातील किंवा प्रजेतील कुणीही विद्वान असेल तर त्याने त्याची मातृभाषा ओळखावी. अनेकांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून बघितले. मात्र तो ती भाषा इतक्या सफाईदारपणे बोले की कुणालाही त्याची मातृभाषा कळली नाही. राजाने शेवटचा पर्याय म्हणून बिरबलाला निरोप धाडला. बिरबल आला. त्याने त्या पंडिताला विनम्रतेने नमस्कार केला आणि सांगितले की, ‘‘तुम्ही आमचे पाहुणे आहात. आज रात्री मुक्काम करा. उद्या आपण चर्चा करू.’’
बिरबलाने त्या पंडिताची सर्वप्रकारची व्यवस्था केली. त्याचा योग्य तो पाहुणचार केला. पंडितही त्यामुळे सुखावला. रात्री मिष्ठान्नाचे सेवन केल्यानंतर पंडित आलिशान गालिचावर झोपी गेला. तो झोपलेला असताना अचानक एक मोठा आवाज झाला. पंडित घाबरून उठला. त्याच्या निद्रेत व्यत्यय आल्याने बिरबलाने त्याची अंतःकरणपूर्वक माफी मागितली. 
दुसर्‍या दिवशी दरबारात प्रवेश करताच बिरबलाने ठामपणे सांगितले की हा पंडित कन्नड भाषक आहे. पंडितही अवाक् झाला. त्याची मातृभाषा आतापर्यंत कोणीही ओळखू शकले नव्हते. त्याने आपली मातृभाषा मान्य करत बिरबलाने ती कशी ओळखली हे विचारले. बिरबल म्हणाला, सोपे आहे. रात्री जेव्हा तुम्ही घाबरून उठलात तेव्हा तुम्ही कानडी भाषेमध्ये बोलत होतात. संकटाच्या काळी आपल्याला आपली मातृभाषाच आठवते.
भाषेविषयी जागृती करणारी, स्वाभिमान पेरणारी ही बालकथा अनेकांना माहिती असेल. मात्र आज काय परिस्थिती आहे? आपण आपल्या मातृभाषेतच बोलत नाही. मराठी बोलणे आपल्याला कमीपणाचे वाटते. खरेतर भारताला राष्ट्रभाषा नाही. लोकशाही व्यवस्था मान्य करणार्‍या बहुतेक राष्ट्रांना राष्ट्रभाषा नाही. केवळ हुकूमशाही राष्ट्रातच राष्ट्रभाषा लादली गेली आहे. 
संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. मात्र केवळ उत्तर प्रदेशपुरता संकुचित विचार करणार्‍या पंडित नेहरूंनी हिंदीसाठी आग्रह धरला. शेवटी हिंदीला ‘संपर्क भाषा’ म्हणून मान्यता मिळाली. त्या धबडग्यात राष्ट्रभाषेचा मुद्दा बाजुलाच पडला. हिंदुस्तानाच्या सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी माय मराठी आज मरणासन्न अवस्थेत आहे. 
खरेतर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात मराठी आहेच; मात्र कर्नाटकातही मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. बडोदा, झांशी, ग्वाल्हेर, तंजावर अशा प्रांतातही मराठी प्रशासक होते. त्यामुळे त्या त्या प्रांतातही मराठी भाषकांचे प्रमाण लक्ष्यवेधी होते. मध्यप्रदेश सारख्या ठिकाणी आजही मराठी वाचक मोठ्या संख्येने आहे. इतकेच काय, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधून ‘केरळ पर्यटन’ नावाचे मराठी मासिक प्रकाशित व्हायचे आणि त्याचे त्याकाळी तब्बल 3200 सभासद होते. याचा अर्थ केरळमध्ये मराठी वाचता येणारे असंख्य लोक होते. एखाद्या मासिकाची सभासद संख्या 3200 म्हणजे वाचकसंख्या किमान त्याच्या पाचपट नक्की असणार! भारतात तर सोडाच पण इस्त्राईल सारख्या देशातही मराठी बांधवांचे प्रमाण लक्ष्यवेधी आहे. 
बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बाबतीत मराठी माणूस आघाडीवर आहे. नवीन पिढी वाचनापासून दूर जातेय, असा जावईशोध काहींनी लावला असला तरी त्यात तथ्य नाही. आजचे तरूण झपाट्याने वाचत आहेत. त्यांची वाचनाची अभिरूची बदलली असेल, मात्र सकस आणि दर्जेदार साहित्य न वाचण्याचा करंटेपणा ते कधीही करत नाहीत. इतके सगळे असूनही माय मराठीचे अस्तित्व धोक्यात का येतेय, तर खोट्या प्रतिष्ठेपायी आपण मराठी बोलणे टाळतोय. हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या दुराग्रहामुळे आपण मराठी बोलण्याबाबत आग्रही राहत नाही. सरकारही त्यादृष्टिने ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत, नवीन शाळांना परवानगी मिळत नाही, अनुदान मिळत नाही आणि दुसरीकडे गल्लीबोळात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होत आहेत. 
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणारी बहुतेक मराठी मुले नालायक निघतात, असा एका विश्‍वसनीय सर्वेक्षणाचा निकाल आहे. कारण या मुलांना मातृभाषा असलेली मराठीही जमत नाही आणि परकीय भाषा असलेल्या इंग्रजीचेही धड ज्ञान घेता येत नाही. या कोंडमार्‍यात त्यांचे मोठे नुकसान होते. त्याऊलट मराठी माध्यमातून उत्तम दर्जाचे शिक्षण घेवून अनेक जागतिक कंपन्यात महत्त्वाच्या हुद्यावर समाधानाने कर्तव्य बजावणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. जिथे आई आपल्या चिमुकल्याला प्यायला दूध दिल्यानंतर तो तिला ‘थँक्स ममा’ म्हणतो तिथेच आपली संस्कृती संपतेय! 
भाषा, संस्कृती याविषयी जागृत न राहता पाश्‍चात्य राष्ट्रांची भलावण करणारे महाभाग हे खरे राष्ट्रद्रोही आहेत. आपण शेक्सपिअरचा अभ्यास जरूर करू; मात्र तो करताना आपल्याला आपल्या महाकवी कालीदासाचा विसर पडत असेल तर ते आपले दुर्दैव आहे. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त प्रत्येकाने आता मराठीतच बोलण्याचा संकल्प करायला हवा. इंग्रजी नववर्षाच्या संकल्पाप्रमाणे त्याचे बुडबुडे न उडता तो अंमलातही आणायला हवा. मराठी भाषा, मराठी संस्कृती जगवण्यासाठी आपण किमान मराठीत बोलणे सुरू ठेवायला हवे. मराठी भाषेबाबत आग्रही असणारेच आजच्या काळात मराठीचे तारणहार ठरू शकतील!

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Tuesday, February 24, 2015

माझ्या मातीचे गायन...!

सध्या सर्वत्र मराठी भाषा सप्ताह साजरा होत आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, राजकीय पक्ष यानिमित्ताने विविध कार्यक्रम घेत आहेत. माझ्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘झुळूक आणि झळा’ या अग्रलेख संग्रहातील माय मराठीचा जागर घालणारा हा लेख खास तुमच्यासाठी!!


‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे आम्ही नुकतेच एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आम्हाला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्ही कधीही खोटे लिहित नाही. मात्र पवार साहेबांनी खरेच वसंतदादा पाटलांचा ‘मर्डर’ केलाय का हो?’’
अज्ञानापोटी झालेल्या त्याच्या गैरसमजाबद्दल हसावे की रडावे हेच आम्हाला कळत नव्हते. मराठी माणसाविषयी सातत्याने कोकलणार्‍यांना मराठी भाषा, मराठी संस्कृती या दृष्टिने इथल्या व्यवस्थेने दिलेली ही चपराकच होती. ‘खंजीर खुपसणे म्हणजे ‘मर्डर’ करणे’ हे पक्के ठाऊक असणार्‍या एका महाविद्यालयीन युवकाला मराठी भाषेचे ज्ञान देणे यासारखे आव्हानात्मक काम दुसरे कोणते असू शकते काय?
गलेलठ्ठ पगार घेऊन शाळा-महाविद्यालयातून आजची ही पिढी बरबाद केली जात आहे. भाषेचे गर्भितार्थ, उपहास, व्यंग्य, अर्थच्छटा हे सारे त्यांच्या डोक्यावरून जाते. विशेषतः ग्रामीण जीवनाचा परिचय नसल्यानेही अनेक घोटाळे होतात.  कृषी संस्कृतीशी तर या पिढीला काहीच देणेघेणे नाही. नांगरणी, पेरणी, कोळपणी, खुरपणी, बैलगाडी, कासरा, जू, रान, पिकं, धसकटं, वाफे, धार या व अशा गोष्टी तर त्यांच्या गावीही नसतात. ‘खुरप्याच्या तोंडी पिकाचं अमृत असतं’  असं मी म्हणालो तर मित्रानं लगबगीनं विचारलं, ‘हा खुरपं नावाचा प्राणी आपल्याला कसा मिळवता येईल?’ मुंबईत मध्यंतरी ‘दूध कोठून येते?’ या प्रश्‍नाचे उत्तर एका विद्यार्थ्याने ‘दुधवाल्या भैय्याकडून’ असे दिले होते. गाय, म्हैस, शेळी याविषयी ऐकून घेण्यासही तो तयार नव्हता.
परवा एका निरागस चिमुकल्याने गव्हाच्या ओंब्यासोबत आपले छायाचित्र काढून घेतले आणि ‘पोळीच्या झाडासोबत’ म्हणून  त्याच्या पालकांनी मोठ्या कौतुकाने ते फेसबुकवर टाकले. अर्थात, त्यात विनोदाचा आणि गमतीचाच भाग अधिक असल्याने सगळ्यांनी त्याचे कौतुकच केले; मात्र आजच्या मुलांना या सर्व गोष्टी कळेनाशा झाल्या आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. 
याबाबत एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. मध्यंतरी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात त्यांचा नातू नील तिथे आला. गाडगीळांनी चिमुकल्या नीलला आमच्यासमोर संस्कृत श्‍लोक म्हणून दाखवायला सांगितला. तो ऐकत नाही हे पाहून त्यांनी निवेदनाच्या शैलीत गमतीने सांगितले, ‘‘आता नील गाडगीळ सादर करतील एक संस्कृत श्‍लोक...’’ आणि त्याने खरेच एकदोन श्‍लोक म्हणून दाखवले. त्याचे पाठांतर आणि स्पष्ट शब्दोच्चार पाहून आम्हास आश्‍चर्य वाटले. त्याविषयी विचारले असता गाडगीळांनी दिलेले उत्तर मार्मिक तर आहेच पण प्रत्येकाने विचार करावा असेच आहे.
ते म्हणाले, ‘‘मूल जन्मल्यापासून आपण उगीच त्याच्याशी बोबडे बोलतो. अलेले... माझं गोड्ड बाल... असं म्हणत बसण्यापेक्षा त्याच्याशी स्पष्टपणे बोलावे. त्याच्या बालमनावर चांगल्या भाषेचे संस्कार करावेत. उगीच बाललीलेच्या नावाखाली भाषेची वाट लावण्याऐवजी त्याच्या कानावर उत्तमोत्तम आणि अर्थपूर्ण शब्द पडतील याची काळजी घ्यावी, म्हणजे तो तसाच वागेल, बोलेल!’’ 
गाडगीळांचे हे तत्त्वज्ञान खरोखरी प्रत्येकाने आचरणात आणावे असेच आहे. सध्या अनेक कुटुंबात पालकच पाल्याशी व्यवस्थित बोलत नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि काही ठिकाणी अन्य भाषेचेही शब्द बोलण्यात सर्रासपणे वापरले जातात. त्याचे गांभिर्य कुणाच्या गावीही नसते. मग भाषाशुद्धी कशी होईल? महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे बघा. ते हिंदीत बोलताना फक्त हिंदीतच बोलतात. इंग्रजीत बोलताना अस्खलीत इंग्रजीतच बोलतात. त्यांच्या बोलण्यात भाषेची सरमिसळ नसते. भेसळ तर नसतेच नसते! म्हणूनच त्यांनी असंख्य लोकांवर मोहिनी घातली. त्यांचा आवाज, त्यांची भाषा हीच त्यांची ओळख आहे. मराठीच्या नावावर राजकारण करणार्‍यांनी त्यांचा हा एवढा एक गुण जरी आत्मसात केला तरी खूप काही साध्य होईल.
सध्या शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही बहुसंख्य पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी धडपडत असतात. त्यासाठी वाटेल तितका निधी द्यायचीही त्यांची तयारी असते. ‘इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे’ आणि ‘इंग्रजी ही जागतिक भाषा आहे’ या दोन ‘अंधश्रद्धा’तून मानसिकदृष्ट्या खचलेले लोक इंग्रजीचे स्तोम अकारण माजवतात. मातृभाषेत शिक्षण न झाल्याने या मुलांची प्रगती खुंटते. त्यांना धड इंग्रजीसारखी ‘मागास’लेली भाषा आत्मसात करणे जमते ना मराठीतला गोडवा कळतो! बरे, हे ध्यानात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपापल्या मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांनीच यशाचे नवनवे मानदंड तयार करत विक्रम नोंदवले आहेत. मराठीतच काय अन्य कोणत्याही भाषेत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही.
इतर जातींचा, इतर धर्मांचा तसेच इतर भाषेचा द्वेष करू नकात! मात्र आपली मातृभाषा तरी धडपणे बोलणार की नाही? मध्यंतरी कोणीतरी सांगितले होते, ‘तुम्ही मला ‘आई’ म्हणणारा एक इंग्रज दाखवा; मी तुम्हाला ‘मम्मी’ म्हणणारे लाखो हिंदुस्थानी दाखवेन!’ ही वस्तुस्थिती आहे. विदेशी भाषा आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपल्या पायातील शृंखला आणखी मजबूत झाल्या आहेत. इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले, तरीही आम्ही सुधारायला तयार नाही. याला काय म्हणावे? 
मराठी भाषेला इंग्रजीपासून धोका आहेच आहे; पण त्याहून अधिक धोका हिंदीपासून आहे. आपण सहजपणे बोलतानाही हिंदीचा आधार घेतो. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी ती गोष्ट आम्ही अभिमानाने करतो. खरे तर या अर्धवट शहाण्यांना हिंदीही व्यवस्थित येत नाही. प्रशासकीय कामकाजातली हिंदी भाषा कळणारे कितीजण आहेत? चित्रपटाच्या माध्यमातून दाखवली जाणारी भाषा, हिंदी भाषा म्हणून खपवली जाते. मात्र त्या भाषेत अन्य भाषिक शब्दांचाच भरणा अधिक असतो. मध्यंतरी एकदा एका हिंदी सिनेमाचे कथानक वाचल्यानंतर एका हिंदी अभिनेत्रीने सांगितले होते की, ‘‘मी इंग्रजी सिनेमात काम करणार नाही...’’ या चित्रपटात खरेच निम्मे संवाद इंग्रजीत असतात, हिंदुस्तानातल्या विविध प्रांतातले काही शब्द घुसडले जातात आणि हिंदी या नावाखाली ते आमच्यावर लादले जातात. म्हणूनच ‘सहज बोलली अन् चव गेली’ अशी आमची अवस्था होते.
मराठी भाषेतले आशयसंपन्न असणारे विविध शब्द, त्यांच्या अर्थच्छटा आजच्या तरूणाईला कळत नाहीत. संगणक महाजाल, भ्रमणध्वनी या माध्यमांतून तर वेगळीच भाषा निर्माण होत चालली आहे. इतर भाषेतले अनेक शब्द मराठीत रूजले आहेत, आपण ते सामावूनही घेतले आहेत. तरीही भाषेबाबत कोणी आग्रही असल्याचे दिसत नाही. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही भाषा अंथरूणाला खिळल्याचे चित्र आहे. भाषेबाबत आग्रही असणारे पुणेकर सध्या अनेकांचे चोचले पुरवता पुरवता या व्यवस्थेचाच एक भाग बनत चालले आहेत.
पुण्यातल्या एक विदुषी अनेक साहित्यिक व्यासपीठावर दिसतात. ‘अमुक लेखकाची मुलगी आणि अमुकची आई’ अशीच त्यांची सर्वत्र ओळख करून दिली जाते. प्रत्यक्षात त्या कोण आहेत, हे महत्त्वाचे असताना अशा गोष्टींचाच उहापोह केला जातो. त्यांचा परिचय करून देताना बर्‍याचवेळा ‘सुप्रसिद्ध महिला लेखिका’ असाच भाषाप्रयोग केला जातो आणि पुणेकरही निमूटपणे ऐकून घेतात. लेखिका म्हटल्यावर त्या महिला आहेत याचे तुणतुणे का वाजवावे लागते? ‘गोल सर्कल’, ‘पिवळे पितांबर’, ‘गाईचे गोमूत्र’, ‘लेडिज बायका’, ‘चुकीची मिस्टेक झाली’ असे काही शब्दप्रयोगही सर्रासपणे ऐकायला मिळत आहेत.
भाषा संपली तर संस्कृती संपेल आणि संस्कृती संपली तर राष्ट्र बेचिराख होईल, याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भाषा शुद्धीकरणाची आणि भाषा संपन्नतेची चळवळ राबवण्याच्या दृष्टिने प्रत्येकाने आता मराठी भाषेत बोलण्याबाबत आग्रही रहायला हवे. आपल्या नाकापर्यंत पाणी आले आहे. आता हालचाल केली नाही तर स्वतःसह आपल्या मातेची हत्या केल्याचे पातक आपल्याला लागणार आहे!!

Saturday, February 21, 2015

दखलपात्र Dakhalpatra: दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रय...

दखलपात्र Dakhalpatra: दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रय...: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात ...

दाभोलकर-पानसरे यांच्या तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न?





अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास 18 महिने पूर्ण झाले. त्यांच्या खुन्याचा तपास करण्यात तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर भाजप सरकारलाही सपशेल अपयश आले. या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नसतानाच डाव्या चळवळीचे पितामह अशी ओळख असलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्याच पद्धतीने हल्ला करण्यात आला. महाराष्ट्रासाठी निश्‍चितच हा मोठा कलंक आहे. 
या दोन्ही प्रकरणात हल्लेखोरांनी सकाळच्या वेळी दुचाकीवरून येऊन गोळ्या घातल्या. दाभोलकरांच्या हत्येनंतर तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही मिनिटांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, ‘यामागे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा हात आहे.’ कोणताही पुरावा नसताना मुख्यमंत्री महोदयांनी हे जे तारे तोडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विचलित झाला. पृथ्वीराज चव्हाण यांना दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाची दिशा बदलायची होती की काय? अशी शंका येण्यास मोठा वाव आहे. यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते तर आजपर्यंत त्यांना अटक का झाली नाही? पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांना पाठीशी तर घातले नाही ना? राज्याचा जबाबदार मुख्यमंत्री अशी विधाने करून तपासकामात अडथळे आणतो हे दुर्देवी आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या म्हणीप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असणार्‍या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची नावे चव्हाणांनी जाहीर करावीत.
गोविंदराव पानसरे यांच्या हत्येनंतरही धर्मवादाचे राजकारण करत हिंदुत्ववाद्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. हे जर खरे असेल, तर आरोप करणार्‍यांनी तसे पुरावे देऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्यावी. उगीच आरोप करून किंवा निषेधाचे काळे झेंडे फडकवून काहीही साध्य होणार नाही. विचारवंतांवरील, सामाजिक कार्यकर्त्यांवरील असे हल्ले दुर्देवी आहेत. त्यामागील खरी कारणे शोधून काढण्यासाठी आणि हल्लेखोर पकडण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करावे. 
वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा प्रमुख स्तंभ असतो. मात्र, काही भांडवलदार वृत्तपत्रे अशा घटनांचे भांडवल करून समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहेत. समाज किती असंवेदनशील आहे, पोलीसयंत्रणा किती सुस्तावलेली आहे हे सिद्ध करण्यासाठी दैनिक ‘लोकमत’ने पुण्यात काल एक स्टींग ऑपरेशन केले. कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, सुप्रसिद्ध विचारवंत हरी नरके, पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्यावर पाळत ठेऊन, हल्ल्याचा प्रयत्न करून ‘लोकमत’सारख्या जबाबदार वृत्तपत्राने काय सिद्ध केले हे कळायला मार्ग नाही. आपल्या शहरात कुणालाही, कधीही, कसेही मारता येते याचे प्रात्यक्षिकच ‘लोकमत’ने दाखवून दिले आहे. विद्या बाळ यांच्यावर हल्ला करताना वापरलेल्या दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहिलेेले स्पष्टपणे दिसते, तर विश्‍वंभर चौधरी यांना गोळ्या घालणारा हल्लेखोर हसताना दिसतो. हे सारेच क्लेषकारक आहे. आपले शहर असुरक्षित असल्याने काहीही होऊ शकते अशी भीतीची भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली आहे. 
वृत्तपत्रांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेला सहकार्य करायला हवे. त्यात काही त्रुटी असतील तर त्या लक्षात आणून द्यायला हव्यात. लोकाना निर्भय करायला हवे. मात्र, घडतेय ते उलटेच! प्रसारमाध्यमे लोकाच्या मनातील भीती वाढवत आहेत. यंत्रणेचे हसे करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, तथाकथीत विचारवंत कोणतीही घटना घडल्यानंतर हिंदुत्ववाद्यांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, कायद्याचा धाक निर्माण व्हावा, असे कुणाला गंभीरपणे वाटते की नाही?
जवखेडा प्रकरणात ‘दलित अत्याचार’ म्हणून राज्य धुसमुसत असताना हल्लेखोर त्यांच्याच नात्यातील निघाले. ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे. कोणत्याही जातीत किंवा कोणत्याही धर्मात सगळेच चांगले अथवा सगळेच वाईट असूच शकत नाहीत. जे चुकीचे आहेत, समाजद्रोही आहेत, त्यांना कठोर शासन अवश्य करावे, मात्र यानिमित्ताने कोणत्याही धर्माला बदनाम करू नये ही विनंती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे हे सर्वांसाठी वंदनीय होते. त्यांचे कार्य खरोखरीच अफाट होते. स्वामी विवेकानंदांनीही हिंदू धर्मातील काही चुकीच्या गोष्टी ठामपणे दाखवून दिल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कुणी हल्ला केला नाही. दाभोलकर, पानसरे हेसुद्धा समाजातील कुप्रवृत्तींविरूद्ध संघर्ष करत होते. त्यांचा संघर्ष द्वेषमूलक नव्हता, हे त्यांच्या अनुयायांनी लक्षात घ्यावे. अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी समाजानेही दक्षता घ्यायला हवी. आपल्या आजूबाजूला जे काही चालले आहे, ते जागरूकपणे पहावे आणि कुप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. विचारांची लढाई विचारानेच लढली गेली तर ती खरी अशा विचारवंतांना श्रद्धांजली ठरेल.
घनश्याम पाटील,
संपादक, प्रकाशक, ‘चपराक‘, पुणे
7057292092

Thursday, February 19, 2015

‘झुळूक आणि झळा’ - सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांची प्रस्तावना

‘झुळूक आणि झळा’ हा घनश्याम पाटील यांच्या साप्ताहिक ‘चपराक’मधील झंझावाती अग्रलेखांचा संग्रह. संग्रहाच्या नावात जरी झुळूक हा शब्द असला तरी ही झुळूक झंझावातातील समाजाबद्दलच्या प्रेमाची, अनुकंपेची ग्वाही देते. झळा या प्रखर विचारांच्या आहेत. झोपी गेलेल्यांना जागवण्यासाठी आहेत. अग्रलेखांचे, अगदी मोठमोठ्या वृत्तपत्रांतूनही घसरत चाललेले महात्म्य पाहता, पुस्तक व्हावे, त्याबद्दल प्रकाशनाआधीच लोकांच्या मनात उत्सुकता असावी, पुन्हा पुन्हा एकत्र वाचण्याचा आनंद मिळावा अशी भावना असावी यातच पाटील यांच्या खंद्या विचारशैलीची ताकद आहे. मला वाटते, या अग्रलेख संग्रहाचे तेच महत्व आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेखांचे संग्रहित हे पहिलेच पुस्तक नाही. पुर्वीच त्यांचे ‘दखलपात्र’ हे एक ‘चपराक’मधील अग्रलेखांच्या संग्रहाचे पुस्तक निघाले होते. त्याचे प्रचंड स्वागतही झाले. अनेक नामवंत माध्यमांनी त्याची दखल घेतली. एकेकाळी आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे आणि नीलकंठ खाडीलकरांच्या धारदार अग्रलेखांनी महाराष्ट्रीय वृत्तपत्रांना समाजप्रबोधक, राजकीय तसेच मराठी अस्मितेची दिशा दिली. काळ बदलत असतो तसे सामाजिक प्रश्नही बदलत जातात. प्रश्नांचे संदर्भही बदलत जातात. प्रासंगिक घटनांवर नुसते वरकरणी भाष्य वाचकांच्या बौद्धिक गरजा पूर्ण करायला असमर्थ ठरत जाते. प्रश्नाचे सर्व पैलू पाहिले जाणे, त्यातील धागेदोरे उलगडत समाजजीवनाशी ते कसे परिणाम करणारे ठरणार आहेत यावर वैचारिक भाष्य करणे अभिप्रेत असते. श्री. पाटील ते करण्यात यशस्वी होतात, आणि म्हणूनच त्यांचे अग्रलेख वाचनीय व संग्राह्य होतात, कारण ते वाचकाच्या विचारविश्वावरही परिणाम करण्यात यशस्वी होतात.
पाटील यांच्या अग्रलेखातील सर्वच मते मान्य व्हायला हवीत असा त्यांचाही आग्रह नसावा. काही अग्रलेखांतून, सामाजिक घटनांतून आलेला संताप, उद्वेग प्रखर भाषेत प्रकटताना दिसतात पण त्यात व्यक्तिगत राग-लोभ नसतात, उलट बदल घडावा ही आर्त भावना दिसते.
या संग्रहात अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भाषिक, धार्मिक व साहित्यिक विषय हाताळले गेलेले आहेत. अग्रलेख लिहिण्याचे कारण तात्कालिक प्रसंगात असले तरी त्यावरील पाटलांचे भाष्य हे त्या-त्या क्षेत्रातील समुदायांना विचार करायला भाग पाडणारे आहे यात शंका नाही. उदा. ‘लोकसंख्यावाढीची मुक्ताफळे’ या अग्रलेखात ते अलीकडेच ‘शंकराचार्यांनी हिंदुंनी दहा-दहा मुले प्रसवावीत’ अशा केलेल्या विधानावर सडकून टीका करताना ‘स्त्री हे फक्त प्रजननाचे साधन नाही, तिच्याकडे केवळ मादी म्हणून पाहू नये’ असा स्त्रीवादी विचार मांडताना मुस्लिम स्त्रियांच्याही आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ‘त्यांचे प्रबोधन का केले जात नाही?’ असा मुलभूत प्रश्नही उपस्थित करतात. खरे तर मुस्लिम द्वेषाची एक लाट निर्माण होऊ पाहत असताना समन्वयवादी आणि प्रबोधनवादी भूमिका घेणारे पाटील नक्कीच अभिनंदनीय ठरतात.
‘यशाचे हजार बाप’ या अग्रलेखात ते म्हणतात, ‘...मात्र इतर धर्मांचा द्वेष करणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करणे यातच मोठमोठी साम्राज्ये भुईसपाट झाली आहेत.’ ते एका अग्रलेखात ‘परभाषेचाही द्वेष करू नका’ असे सुचवतात. मला वाटते हे विधान भारतात तरी सार्वकालिक आहे. मुळात द्वेषाची भूमिका वाईटच. त्या द्वेषाला धर्मांधतेचे किंवा अंध भाषिक अस्मितेचे स्वरुप आले तर, धर्म कोणताही असो, त्यातून राष्ट्र कधीही उभे राहू शकत नाही हे वास्तव भारतीयांनी नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. बोकाळत्या असहिष्णुतेला तिलांजली दिली पाहिजे व द्वेषाची ऊर्जा सकारात्मकतेत बदलत एकमेकांचा विकास कसा होईल, अनिष्ट प्रथा-परंपरांचा त्याग करत हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे. असे सार्थ विवेचन करत असताना ते भाजपाला, मोदींना व अमित शहांनाही आपल्या टीकास्त्रातून सवलत देत नाहीत. ‘कट्टरतावादाचा अतिरेक’ या अग्रलेखात ते मोदींनी केजरीवालांना ‘नक्षली चळवळीत जावे’ असा सल्ला दिल्याबद्दल धारेवर धरतात व ‘हा सत्तेतून आलेला मस्तवालपणा आहे’ असे सुनवायलाही कमी करत नाहीत.
मराठी भाषेबद्दल पाटलांना अर्थातच आत्मियता आहे. मराठी माध्यमांच्या शाळा धडाधड बंद पडत आहेत हे वास्तव आहे आणि ते संतापजनक वास्तव ते ‘मराठीच्या मारेकर्‍यांना मारा’ या अग्रलेखात प्रखरपणे मांडतात. मराठीच्या प्रचाराला वाहून घेतलेले आमचे सन्मित्र प्रा. अनिल गोरे उर्फ मराठी काका यांच्या कार्याचे व त्यांनी घडवून आणलेल्या परिणामांची (आणि त्यांचे श्रेय लाटलेल्या गणंग पुढार्‍यांचे) सार्थ दखल घेत त्यांनी या अग्रलेखात मराठीच्या भवितव्याबद्दल आपले विचार मांडले आहेत. ते नक्कीच मननीय आहेत.
पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्राच्या माथ्यावरील कलंक म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांची दिवसाउजेडी झालेली हत्या आणि अद्यापही त्यांचे खुनी पकडता आलेले नसणे. ‘दुर्दैवीच!’ या अग्रलेखात त्या निंद्य घटनेची दखल घेत असतानाच मरणोत्तर दाभोळकरांवरच शाब्दिक बाण चालवणार्‍यांवर त्यांनी खरपूस टीका केली आहे. अर्थात दाभोळकरांच्या अज्ञात हत्यार्‍यांना ‘पंडित नथुराम गोडसेच्या यादीत नेवून बसवू पाहणारे चूक करत आहेत’ असे विधान करत त्यावर विवेचन करताना गांधीजींच्या हत्येमागील कारणांचे जे स्पष्टीकरण दिले आहे ते अनेकांना, मलाही, रुचणारे नाही.
पाटील मराठवाड्यातील असल्याने त्यांचा मराठवाड्याबद्दलचा जिव्हाळा, तेथील विकासाचे तुंबलेले प्रश्न व त्यावरील खेद व उपाययोजनांची त्यांनी केलेली शिफारस महत्वाची आहे. हे खरेच आहे की मराठवाडा हा अत्यंत दुर्लक्षित भाग आहे. सपाट भाग असल्याने तेथे रेल्वेचे जाळे करायला हवे होते, त्यामुळे विकासाचा वेग आपोआप वाढला असता हे त्यांचे मत महत्वाचे आहे. खरे तर मुळात महाराष्ट्राचाच विकास अत्यंत विषम पद्धतीने झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रालाच पाणी ते उद्योगधंदे याबाबत झुकते माप दिले गेल्याने इतर भाग आजही पडीक राहिलेले आहेत. आता नवीन सरकार आले आहे. त्याने तरी प्रादेशिक समतेचे तत्व अंमलात आणत पश्चिम महाराष्ट्रावर वाढवलेले नको तेवढे उद्योगांचे ओझे कमी करत मराठवाड्याकडे वळवले पाहिजे. संतुलित विकासाचे धोरण अंगिकारत, तेथील बेरोजगारीचे प्रश्न सोडवत पुणे-मुंबईवर विस्थापितांचा येणारा ताणही कमी केला पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांचे मूळ हे असंतुलित विकासात आहे हे आता तरी राज्यकर्त्यांच्या लक्षात यावे.

या वानग्यांवरून वाचकांच्या लक्षात आले असेलच की पाटील यांनी हाताळलेल्या विषयांची व्याप्ती खूप मोठी आहे. तरूण वयातच एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता त्यांना लाभली आहे. पुण्यासारख्या शहरात कोवळ्या वयातच, परांगदा म्हणता येईल असा आलेला हा तरुण पुण्याच्या साहित्यिक आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करतो हीच गोष्ट मुळात सर्वच तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
घनश्याम पाटील यांच्या अग्रलेख लेखनाची शैली वेगळी आहे. कधी खेळकर, कधी किस्से सांगत सुरुवात करत तर कधी पहिल्या शब्दापासून आक्रमक होत ते विषयाच्या अंतर्गर्भापर्यंत जावून पोहोचतात. एका अर्थाने ही अन्यत्र दिसणार्‍या रुक्ष अग्रलेखीय शैली नव्हे तर तिला लालित्याचा लोभस स्पर्श आहे. त्यामुळे काही मते पटली नाहीत तरी अग्रलेख वाचनीयच होतो आणि माझ्या मते हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे.
खरे तर एकूणातच, अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर वैचारिकतेचाही र्‍हास होत असलेल्या काळात, विकल्या गेलेल्या पत्रकारितेचे रोज वाभाडे निघण्याच्या काळात, कोणाची तरी तळी उचलत नामघोष करण्याच्या काळात पाटलांची पत्रकारिय वाटचाल ही दिशादर्शक आहे. महाराष्ट्राची वैचारिकता मेलेली नाही, आजही ती तेवढ्याच समर्थपणे उभी आहे, राहू शकते व येणार्‍या पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकते, लोभसवाणी झुळूक ठरु शकते याचे दमदार चिन्ह म्हणजे हा झुळूक आणि झळा अग्रलेखांचा संग्रह वाचायलाच हवा!
  संजय सोनवणी
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!

महाराजांचा पराक्रम समजून घ्यायचाय? मग शिवशाहीरांना भेटा!


मागच्या आठवड्यात पुण्यात ‘चपराक साहित्य महोत्सव’ दणक्यात झाला. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, इतिहासलेखक उमेश सणस आणि सुप्रसिद्ध पत्रकार विनायक लिमये हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी बोलताना शिवशाहीरांनी सांगितले की, ‘शिवाजीराजांचे विचार आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करा. शिवजयंतीवरून भांडणे कसली करता? ज्याक्षणी कोणत्याही निमित्ताने शिवाजीराजांचे नाव तुमच्या ओठावर येईल, त्यांचा पराक्रम आठवेल, हृदयात शिवरायांविषयींचे प्रेम जागे होईल, त्या क्षणी शिवाजीमहाराजांचा जन्म तुमच्या मनात झालेला असेल. शिवजयंतीवरून भांडणे करण्याऐवजी शिवाजीमहाराजांनी घालून दिलेल्या नैतिक मूल्यांचे पालन करा. त्यांच्यासारखा पराक्रम गाजवा.’ 
‘महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काही होत नाही. त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालवा. अद्वितीय सामर्थ्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे शिवराय. त्यांचा पराक्रम आठवा. तो स्वतःत बाणवा आणि मग बघा, जगातील कोणत्याही संकटाला तुम्ही कसे सहजपणे सामोरे जाऊ शकाल,‘ असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ‘शिवप्रतापकार’ उमेश सणस म्हणाले, ‘चपराक’च्या माध्यमातून आज ज्या बारा पुस्तकांचे प्रकाशन होत आहे ते लेखक खरोखरी नशीबवान आहेत; कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या अभ्यासू महापुरूषाच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ‘आज जर आपल्याला शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सहकार्‍यांची भेट झाली तर आपण त्यांना शिवचरित्राविषयी विचारू शकू! शिवाजी महाराज किंवा त्यांचे सहकारी हंबीरराव मोहिते, हिरोजी फर्जन, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर अशा कुणाचीही आपली भेट झाली आणि आपण त्यांना आग्य्राहून सुटका, प्रतापगडची भेट, शाहिस्तेखान अशा कोणत्याही प्रसंगाविषयी विचारले तर ते सांगतील, आधी तुम्ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेटा, त्यांना या सर्व प्रसंगाविषयी विचारा. ते तुम्हाला सारे काही सांगतील; आणि त्यातूनही काही राहिलेच तर आम्हाला विचारायला या!’ 
‘चपराक’च्या पहिल्या साहित्स महोत्सवाला ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे उपस्थित होते तर दुसर्‍या ‘चपराक साहित्य महोत्सवा’च्या अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. या दोन्ही अफाट प्रतिभेच्या बेफाट माणसांचे आशीर्वाद आम्हास लाभले. यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते?  
आज सर्वत्र शिवजयंती उत्सव साजरा होत असताना आपण महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलतोय याचा आनंद वाटतोय. एका कवीने म्हटलंय, ‘पुतळे उभारून स्फूर्ती कधी मिळते का?, सरावाचे झाल्यावर नजर तरी वळते का?’ अगदी हाच संदेश शिवशाहीरांनी ‘चपराक’ च्या व्यासपीठावरून दिला. महाराजांचे विचार आमच्या अल्प कुवतीप्रमाणे आचरणात आणण्यासाठी, ते समाजात रूजवण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलू, हेच या निमित्ताने नम्रपणे सांगावेसे वाटते. 
आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! शिवरायांना मानाचा मुजरा!!



Wednesday, February 18, 2015

‘चपराक साहित्य महोत्सवा’त एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन

लिहा! लिहा! लिहा! वाचक निश्‍चित भेटतील
‘चपराक साहित्य महोत्सवा’त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी): बाबासाहेब म्हणाले, ’’आजच्या काळात लेखन करणं आवश्यक आहे, असं ज्या व्यक्तिला वाटतं त्या व्यक्तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शेतकरी असो, मजूर असो वा उद्योजक असो; प्रत्येकाची अंगभूत प्रतिभा बाहेर आलीच पाहिजे. आजही समाजाची वाचनाची भूक कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक लेखक, कवीने थांबता कामा नये.’’ समाजातातील महापुरूषांची ओळख सर्वसामान्यांना करून देण्यासाठी लेखक, कवींनी लिहावं असा वडिलकीचा सल्ला देत असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले. या प्रकाशन सोहळ्यात सदानंद भणगे यांचा ‘ओविली फुले मोकळी’ हा ललित संग्रह, घनश्याम पाटील यांचा ‘झुळूक आणि झळा’ हा निवडक अग्रलेखांचा संग्रह, संजय वाघ यांचा ‘गंध माणसांचा’ हा व्यक्तिचित्रण संग्रह, सौ. चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘सत्यापितम्’ हा कथासंग्रह, प्रभाकर तुंगार लिखित ‘शांतिदूत - लालबहादूर शास्त्री’ हे चरित्र, सागर सुरवसे यांचे ‘एकनाथजी रानडे - जीवन आणि कार्य’ हे चरित्र, विनोद पंचभाई यांचा ‘मुलांच्या मनातलं’ हा बालकथासंग्रह, हणमंत कुराडे यांची ’दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही कादंबरी तर माधव गिर यांचा ‘नवं तांबडं फुटेल’, संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’, प्रभाकर चव्हाण यांचा ‘सुंबरान’ आणि शांताराम हिवराळे यांच्या ‘दाटून येताहे काळोखी काहूर’ या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. 
‘‘ज्या बिटिशांच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा आपण भारतीयांनी प्रचार केला त्यांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले. मात्र आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या महापुरूषांची आपण चेष्टा करतो. आपण फक्त गप्पा मारतो; थोर पुरूषांचे अनुकरण करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तुरूंगात असताना त्यांना लेखन करायला कागद उपलब्ध करून दिले जात नव्हते. अशावेळी त्यांनी भिंतीवर लेखन केले. ते पाठ केले आणि आपल्यासोबत असणार्‍या परंतु दोन महिन्यानंतर सुटका होणार असलेल्या कैद्याला ते पाठ करायला लावले आणि बाहेर जाऊन ते लिखाण मुर्तरूपात आणायला त्यांनी सांगितले. ते प्रतिकूल परिस्थितीत लिहू शकत असतील तर आपण का लिहू शकत नाही?’’ असा सवालही बाबासाहेबांनी केला. 
प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘घनश्याम पाटील यांची धडपड बघितल्यावर माझ्या उमेदीचा काळ आठवतो. कालांतराने माझ्या लेखणीची धार कमी होत गेली तरी घनश्याम पाटील यांच्या लेखणीची धार कायम आहे. घनश्याम पाटील हे गावाकडच्या लेखक, कवींचं प्रतिनिधीत्व करतात. चॅनेल, मोठी वृत्तपत्रे सोडून पत्रकार ‘चपराक’कडे येत आहेत.’’ 
‘शिवप्रताप’कार उमेश सणस म्हणाले, ‘‘आज तानाजी मालुसरे यांना सिंहगड कसा जिंकला हे विचारायला जाल तर ते ‘‘आधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहास विचारा; नंतर काही शंका असतील तर आमच्याकडे या’’ असे ते म्हणाले असते. अशा बाबासाहेबांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणे हे या लेखक, कवींचे भाग्य आहे. आज दिल्लीत भाजप आणि कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. कवींचं नाव मोठं नसेल तर प्रकाशक त्याला उभंही करत नाहीत. अशा स्थितीत चार कवितासंग्रहांचे प्रकाशन होणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घनश्याम पाटील हे प्रकाशनविश्‍वातले ‘केजरीवाल’ आहेत. माणसाचा माणुसपणाकडे प्रवास सुरू राहणे हे सदानंद भणगे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे’’ असेही ते म्हणाले.
विनायक लिमये म्हणाले, ’’तंत्रज्ञान बदललं तरी पुस्तकांचं महत्त्व अबाधित राहणार आहे. आज मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत पुस्तकं आली आहेत. ‘चपराक’च्या या 12 पुस्तकांमध्ये माणुसकीचा ओलावा, सत्याचा वास आहे. ही सर्व पुस्तके काळाशी सुसंगत आहेत. घनश्याम पाटील यांच्या ‘झुळूक आणि झळा’ या  अग्रलेखांचा संग्रह असलेल्या पुस्तकात संपादकांची परखड आणि रास्त भूमिका दिसून येते. तर कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या मराठी मुलांना मराठीची ओळख होण्यासाठी संदिपान पवार यांचा ‘अक्षरगाणी’ हा काव्यसंग्रह उपयुक्त ठरणार आहे.  चांगुलपणा शोधणारी नजर असली की चांगलंच होतं’’ असेही लिमये यावेळी म्हणाले.
सदानंद भणगे म्हणाले, ‘‘वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे असे बोलले जात आहे. मात्र, अशा स्थितीत एकाचवेळी 12 पुस्तकांचे प्रकाशन ही असे बोलणार्‍यांना सणसणीत ‘चपराक’ आहे. घनश्याम पाटील हे एक धाडसी संपादक, प्रकाशक आहेत. इतर सर्व प्रकाशकांनी बहिष्कार टाकला असताना ‘घुमानलाच काय अफ्रिकेच्या जंगलात जरी मराठी साहित्य संमेलन असलं तरी जाणार’ हे सांगणारे घनश्याम पाटील एकमेव प्रकाशक आहेत. त्यांच्या लेखणातून ते आपली ठाम भूमिका मांडतात.’’
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन माधव गिर यांनी तर शुभांगी गिरमे यांनी आभार मानले. 


प्रकाशनादिवशीच आवृत्ती संपली

या सोहळ्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीची हातोहात विक्री झाली. यात ‘झुळूक आणि झळा’, ‘नवं तांबडं फुटेल’, ‘एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य’, ‘गंध माणसांचा’, ‘सुंबरान’,  ‘शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री‘ या पुस्तकांचा समावेश आहे. बाणेर येथील योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्‍वर तापकीर, सुप्रसिद्ध उद्योजक आणि स्प्रेजा इंडस्ट्रिजचे संचालक एस. डी. सोनवणे, आरंभिनी इंडस्ट्रिजचे श्रीपाद भिवराव, तळेगाव नाट्य परिषद यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल

या प्रकाशन सोहळ्यात ‘शिवप्रताप’कार उमेश सणस यांनी दिल्लीत भाजप, कॉंग्रेसची जशी अवस्था आहे तशी अवस्था मराठी कवितांची झाली आहे. मात्र, घनश्याम पाटील हे मराठी प्रकाशनविश्‍वातले केजरीवाल असल्याची कोटी केली.