Friday, March 24, 2023

राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे


असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खातरी केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. 
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे कार्य आजच्या तरुणाईपर्यंत पोहचायला हवे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुण्य नगरी, शनिवार, दि. 25 मार्च 23

Saturday, March 18, 2023

सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. 
अफाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उंच शिखर म्हणजे मनमोहन हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मनमोहनांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले आणि त्यांचे अनोखे कारनामे जवळून न्याहाळणारे ‘तरणे बॉण्ड कवी’ रमेश गोविंद वैद्य आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विख्यात साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्याकडून मनमोहनांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
कुणी शाईने लिहिली कविता
कुणी रक्ताने लिहिली कविता
करी लव्हाळी लवचिक घेऊन
मी पाण्यावर लिहिली कविता
असे सांगणारे मनमोहन स्वच्छंदी वृत्तीचे होते.
रॉय किणीकर नावाच्या एका बलाढ्य संपादकाने मनमोहनांची पहिली कविता प्रकाशित केली आणि पुढे किणीकर-मनमोहन ही जोडी अजरामर झाली. घरात दारिद्य्राचा सागर वहात असल्याने मनमोहन त्यांच्या मित्रांना ‘मला दहा रूपये उसने देण्याएवढे तुम्ही श्रीमंत आहात काय?’ असा प्रश्न रूबाबात विचारत. त्यांच्या मागणीचा ढंग आणि स्वभावातली सच्चाई बघून त्यांना नकार देण्याची हिंमत कोणालाही होत नसे. अशा परिस्थितीत दिवस काढतानाही त्यांनी लक्ष्मीची उपासना कधी केलीच नाही.
याबाबतीतली डॉ. न. म. जोशी यांनी सांगितलेली एक आठवण फारच बोलकी आहे. लोककवी मनमोहन यांचा तो शेवटचा काळ होता. वृद्धापकाळाने त्यांना घेरले होते. अंथरूणावरून उठून बसणेही त्यांना अशक्य झाले होते. ही वार्ता तेव्हाचे तरूण नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत गेली. शिंदे त्यांच्या लवाजम्यासह तातडीने मनमोहनांच्या सदाशिव पेठेतील निवासस्थानी दाखल झाले. ते म्हणाले, ‘‘कविराज, माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता रेडिओवरून ऐकायचो. गावागावातील यात्रा आणि जत्रात जाऊन लोकांना त्या गाऊन दाखवायचो. लोक मला पाच पैसे, दहा पैसे द्यायचे. त्यातूनच मी शिक्षण पूर्ण केले आणि प्रगती साधली. आज मला कशाचीच कमतरता नाही. मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी काय करू, ते निसंकोचपणे सांगा.’’   
आजारपणामुळे मनमोहनांना बोलता येत नव्हते. त्यांनी खुणेनेच कागद आणि पेन मागवून घेतला आणि त्यावर चार ओळी लिहिल्या. त्यांचा हात थरथरत होता. त्यामुळे अक्षर व्यवस्थित लागत नव्हते. त्यांच्याच शेजारी राहणारे न. म. त्यांचे अक्षर वाचू शकतात म्हणून त्यांना बोलावले. डॉ. न. म. जोशी यांनी त्या कागदावर वाचलेला मजकूर असा होता-
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
आयुष्याच्या संध्याकाळीही कसलीच आसक्ती नसलेला हा राजा माणूस होता, हे या उदाहरणावरून लक्षात येते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणारे मनमोहन जगरहाटीची पर्वा कधीच करत नसत. निःस्पृह वृत्तीचे मनमोहन एकदा त्यांच्या घरासमोर उघडे उभे होते. त्याचवेळी एक नेता त्यांच्या घरासमोरून कार्यकर्त्यांसह जात होता. मनमोहनांची अकारण खोड काढत त्याने त्यांच्या कपड्यावरून मल्लिनाथी केली. कपडे घातल्यावर माणूस कसा रूबाबदार दिसतो यावर प्रवचन दिले. त्याला थांबवत मनमोहन म्हणाले, ‘‘हे बघ मित्रा, तू पुढारी असल्यामुळे तुला कपड्यांची झूल अंगावर वागवावीच लागेल. मी कवी असल्यामुळे आंतर्बाह्य उघडाच असतो.’’ त्या पुढार्‍याला त्यांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. 
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू बाबरपेक्षा
गालिब हृदये वेधित राही
आपल्या पत्नीच्या निधनानंतर वेड्यापिशा झालेल्या मनमोहनांनी  ‘वृंदावनातली तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा’ हे अजरामर शोकगीत लिहिले. मनमोहन इतके भावूक आणि हळवे होते की, त्यांच्या घरासमोर असलेला सुंदर गुलमोहोर कोसळला तर त्याची त्यांनी शोकसभा घेतली. या सभेला रणजित देसाई, बापू वाटवे यांच्यासारखे दिग्गज हजर होते. 
मनमोहनांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. संपूर्ण शिवकाल काव्यात्मक भाषेत उभा केला.
या कलंदर कवीने कविबद्दलच लिहिलेल्या चार ओळी त्यांची ओळख पटवून देण्यास पुरेशा ठरतात.
शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता;
फुले तयावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता.
अशा या सतत जळणार्‍या आणि फुलणार्‍या महाकवीस आमची मानवंदना!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
प्रसिद्दी - दैनिक पुण्य नगरी, रविवार, दि. 19 मार्च 23

Friday, February 24, 2023

मातृभाषा ज्ञानभाषा व्हावी

मातृभाषा ही ज्ञानभाषा झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही. ‘आमच्या मुलाला मराठी वाचता येत नाही’, असं म्हणणार्‍या आया आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळात घालून ‘मराठी भाषा ही सर्वदूर कशी पोहचेल आणि अजरामर कशी होईल’ अशा चर्चा करणारे भुरटे साहित्यिक व राजकारणी आधी दूर करायला हवेत. इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे याची अनेक उदाहरणे आहेत. इंग्रजीत म्हणतात, ‘आय फॉल इन लव्ह.’ म्हणजे ‘मी प्रेमात पडलो’. कोणतीही इंग्रजी कादंबरी असेल किंवा कविता असेल, तिथे ‘पडणे’ असते. 
याउलट आपले संत म्हणतात, ‘माझी इश्वरावर प्रीत जडली’. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात, ‘मराठीत प्रेम जडतं आणि इंग्रजीत पडतं!’ हा दोन संस्कृतीतला फरक आहे. इंग्रजीकडं मराठीच्या तुलनेत शब्दसंग्रह खूप कमी आहे. काका-काकी हे शब्द आपण चुलता-चुलतीसाठी वापरतो. मामा-मामी हे शब्द आईच्या भावासाठी आणि त्याच्या बायकोसाठी वापरतो. इंग्रजीत अशा नातेसंबंधांना एकच शब्द वापरतात. इंग्रजीकडं शब्दसंग्रह कमी असल्यानं असं घडतं. 
मराठीचा भाषिक इतिहास खूप जुना आहे. अँग्लो सॅक्शन टोळ्या ज्यावेळी इंग्लंडमध्ये लढत होत्या त्यावेळी मराठीत म्हाइंभट सरोळेकर लीलाळचरित्राचं तत्त्वज्ञान सांगत होते, ज्ञानेश्वर गीतेवर निरूपण करत होते. मराठी ही शूर आणि पराक्रमी लोकांची भाषा आहे. कोणत्याही भाषेत किती कर्तबगार माणसे झाली यावरून त्या भाषेचं महत्त्व ठरतं. मराठी भाषेनं जगाला सर्व क्षेत्रातील दिग्गज दिलेत. विसाव्या आणि एकविसाव्या शतकाचा जरी त्यासाठी विचार केला तरी क्रिकेटचे महानायक मराठी आहेत, गायनातील सम्राज्ञी मराठीतील आहेत, चित्रपटसृष्टीचे जनक आणि महानायक मराठीतील आहेत. मग प्रश्न पडतो की, ज्या भाषेतील सुपूत्र जगभर लौकिक प्राप्त करत आहेत ती भाषा का मोठी होत नाही? आपल्या भाषेचं सामर्थ्य का वाढत नाही? ती उपेक्षित का राहते? याचा विचार होणं गरजेचं आहे. 
दोन मराठी माणसं बाहेर कुठंही भेटली की हिंदी किंवा इंग्रजीत संभाषण सुरू करतात. हा न्यूनगंड विसाव्या आणि एकविसाव्या शतकात निर्माण झालाय. सोळाव्या किंवा सतराव्या शतकात मराठी माणसात असा न्यूनगंड नव्हता. तसं नसतं तर ज्या ज्या अमराठी भागात आपली मराठी माणसं आहेत ते तिथं तिथं आपापल्या घरी मराठीत बोलत राहिले नसते. तिथं मराठी शब्दांची पखरण झाल्याचं आपल्याला दिसलं नसतं. त्यामुळे मराठी माणसानं भाषेविषयीचा आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे.
कोणाच्या कसल्याही प्रयत्नाशिवाय, कोणत्याही चळवळीशिवाय, कोणत्याही मोठ्या आर्थिक मदतीशिवाय किंवा कसल्या अनुदानाशिवाय मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या जगभर आहे. महाराष्ट्रातील बारा कोटी, भारताच्या अन्य प्रांतातील चार कोटी आणि जगभरातील विखुरलेली मराठी माणसं त्यांचं मराठीपण टिकवून आहेत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेत मराठी दहाव्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ ही सामर्थ्यशाली भाषा आहे. ही भाषा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची संभाषणासाठी वापरली, या भाषेतून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व्यक्त झाले, ही भाषा अभिव्यक्त करण्यासाठी सगळ्यात चांगली आणि सगळ्यात मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यामुळे ही भाषा सामर्थ्यशाली आहे, हे सांगण्यासाठी कुणाचे प्रमाणपत्र कशाला हवे?
आपली भाषा इतकी सामर्थ्यशाली असताना या भाषेतून सर्व शाखांचे शिक्षण का दिले जाऊ नये? आत्ता आत्ता अभियांत्रिकीपासून ते विधीशाखेपर्यंतचे शिक्षण मराठीत उपलब्ध झाले असले तरी त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. हे असं नेमकं का होतं? आपण इंग्रजीतून मराठी करताना किंवा मराठीचं इंग्रजीकरण करताना कोणते शब्द वापरतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे ‘अकॉर्डिंग टू सेक्शन थ्री हंड्रेड अ‍ॅन्ड टू मर्डर इज क्राईम’ हे अनेकांना समजतं. ‘भारतीय दंडसंहितेच्या धारा 302 अन्वये मृत्यूदंड हा दखलपात्र गुन्हा आहे’ हे समजायला अवघड जातं. त्यामुळे ‘भाषेतली क्लिष्टता काढून टाका’, असं आचार्य अत्रे सांगायचे. मराठी भाषेतील अनावश्यक अरबी, फारसी शब्द काढून टाकून छत्रपती शिवाजीमहाराजांनी भाषाशुद्धा केलीय. त्यांनी सामान्य माणसाला कळावं यासाठी व्यवहारकोश तयार केला. त्यामुळं भाषेतला किचकटपणा जाऊ द्यात पण आपल्याकडे रूळलेले इंग्रजी शब्द काढायचे, हिंदी शब्द काढायचे हे काय चाललंय? ऑक्सफर्ड स्वतःचा शब्दकोश काढते. त्यात इतर भाषेतील दीडशे ते दोनशे शब्द दरवर्षी इंग्रजीत वाढतात. आपणही इतर भाषेतले आपल्याकडे रूजलेले शब्द आपल्यात समाविष्ट करून घेण्याऐवजी ते काढून टाका म्हणून ओरड करतो. असे शब्द काढून टाकणं हा भाषा समर्थ, सामर्थ्यशील करण्याचा उपाय नाही. उर्दू शायरी लिहिणारे शायर अन्य भाषेतील अनेक शब्द बिनदिक्कत वापरतात. ‘ये श्याम हो गई, सूरज ढल गया पश्चिम की तरफ। हम भी ढल गये गिलास में’ असं लिहिताना ‘ग्लास’ हा इंग्रजी शब्द ‘आहे तसा’ उचलल्याने त्यांना फरक पडत नाही. त्यामुळे मराठीत आलेले व्हाटसअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल, जिमेल, नेटफ्लिक्ससारखे तंत्रज्ञानाविषयीचे किंवा अन्य रूजलेले, रूळलेले शब्द आपण स्वीकारायला हवेत. त्यावरून भाषाशुद्धीच्या नावावर आकांडतांडव करणार्‍यांमुळे आणखी भीती वाढते. 
जुन्या-नव्या शब्दांचे संशोधन करणारे प्रामाणिक लोक आपल्याकडे कमी झालेत. मराठीत पहिल्यांदा ‘गाढव’ ही शिवी कधी दिली गेली यावर ज्ञानतपस्वी रा. चिं. ढेरेअण्णांनी लिहिलं. चौदाव्या शतकात सर्वप्रथम माणसाला गाढव म्हणून शिवी दिली गेल्याची मांडणी त्यांनी केली. इंग्रजीतील शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधणारे महाभाग मराठीत नव्या शिव्या तयार होत नाहीत याकडे लक्ष देत नाहीत. राग व्यक्त करण्यासाठीचं शिवी हे एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यामुळं शिव्यांचे अर्थ कळायला हवेत. त्याचा आविर्भाव लक्षात घ्यायला हवा. आजकालच्या पोरांना मराठीत धड शिव्याही देता येत नसतील तर भाषासौंदर्याची, भाषाशुद्धतेची मांडणी करणार्‍यांचे हे अपयश आहे.
रिचर्ड बर्टन नावाचा एक ब्रिटिश संधोधक होता. त्याला उत्तम मराठी येत होतं. तो काही काळ मुंबईत रहायला होता. त्यानं सांगितलं होतं, एखादी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेतल्या शिव्या आधी शिका. ‘माणसाला जे योग्य वाटतं ते मनसोक्त करणं म्हणजे पुरूषार्थ’ असं सांगणारा रिचर्ड बर्टनसारखा माणूस सोळा-सतरा भाषा बोलत होता. आचार्य विनोबा भावे मराठीसह अनेक भाषा बोलायचे. पी. व्ही. नरसिंहरावांना अनेक भाषा ज्ञात होत्या. ही मंडळी बहुभाषिक होती. त्यामुळं मराठी भाषेचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर शिक्षणाची ज्ञानभाषा ही मातृभाषा असायला हवी, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावं. ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय त्यांच्यासाठी विविध नोकर्‍यात वीस टक्के जागा राखीव ठेवायला हव्यात. 
भाषेबाबत मानसिकता बदलणं आणि भाषेवर प्रेम करणं आत्यंतिक गरजेचं आहे. जाता जाता इतकंच सांगतो की, दिपीका पादुकोन कितीही सुंदर असली तरी ती आपल्या आईपेक्षा सुंदर असू शकणार नाही. त्यामुळे हिंदी, इंग्रजी, उर्दू, जर्मन, फ्रेंच अशा कोणत्याही भाषा आपल्याला भुरळ घालत असल्या तरी ज्ञान मिळवण्याच्या द़ृष्टिने त्या आत्मसात कराव्यात पण आपली आई मराठी आहे, याचं भान कायम ठेवावं. हे भान ठेवलं की मातृभाषेचा ज्ञानभाषेकडील प्रवास खर्‍याअर्थाने सुरू होईल.
-घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'देशदूत', नाशिक
शनिवार, दि. 25 फेब्रुवारी 23

राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. पटवर्धनबुवा

ही गोष्ट आहे इ. स. 1900 सालातली. हा काळ ऐन वंगभंग चळवळीचा! लाल, बाल, पाल या त्रिमुर्तींनी बंगालच्या फाळणीविरूद्ध रान उठवले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शिरोळ येथील दत्तात्रेय पटवर्धन हे कोलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये (होमियो) डॉक्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण करत होते. तिथे असताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी, महर्षि दादाभाई नवरोजी यांची भाषणे त्यांच्या कानावर पडत. लोकमान्य टिळकांच्या झंजावाती लेखनाचा मनावर मोठा परिणाम होत होता. ‘देशाचा संसार आहे माझ्या शिरी । ऐसे थोडे तरी वाटू द्या हो’ ही सेनापती बापटांची हाक त्यांना राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी खुणावत होती.
दरम्यान, कोल्हापूर संस्थानच्या रोषाला बळी पडल्याने प्रा. अण्णासाहेब विजापूरकरांना कोल्हापूर सोडावे लागल्याने त्यांचे समर्थ विद्यालय सरकारने बंद पाडले. अत्यंत परिश्रमपूर्वक ते नव्याने तळेगावला सुरू झाले. तिथे डॉक्टर म्हणून दत्तोपंत पटवर्धन यांची निवड झाली. हे विद्यालय पुन्हा इंग्रजांच्या रोषाला बळी पडले आणि 1910 साली डॉ. गोपाळराव पळसुले या आपल्या सहकार्‍यासह दत्तोपंतांनी पुण्यात आपला दवाखाना सुरू केला. तेथे प्रसिद्ध वारकरी विष्णुबुवा जोग राहत. त्यांची निरूपणे ऐकत ऐकत दत्तोपंत अभंग म्हणायला लागले. स्वतः कीर्तने, निरूपणे करू लागले. स्वच्छ वाणी, उत्तम गोड आवाज, प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक, पांगारकर, अण्णासाहेब पटवर्धन असे मान्यवर येऊ लागले.
1914 साली लोकमान्य टिळकांनी सांगितले, ‘‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर निःसंशय कीर्तनकार झालो असतो. वर्तमानपत्रे साक्षर लोकांसाठी असतात पण कीर्तनातील अभंग, गाणी, कथा लोकांच्या मनाला स्पर्श करतात. दत्तोपंतांनी आजवर लोकांच्या आरोग्याची सेवा केली. आता त्यांची मने तंदुरूस्त व्हावीत, त्यांच्यात राष्ट्रभक्तिचे स्फूल्लिंग चेतावे यासाठी कीर्तनाचे माध्यम जीवनध्येय म्हणून स्वीकारायला हवे.’’ 
या प्रोत्साहनानंतर पंतांनी दवाखान्याला रामराम ठोकला. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जुलमी ब्रिटिश राज्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य शोधले. राष्ट्रीय आणि ऐतिहासिक नायकांबद्दल उत्तररंग सादर करत ‘राष्ट्रीय कीर्तना’ची परंपरा सुरू केली. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांत, रस्त्यावर धुमधडाक्यात कीर्तने करत त्यांनी ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ म्हणून लौकिक मिळवला. सुखासीन चालू असलेला वैद्यकीय व्यवसाय बंद करून कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी उभ्या महाराष्ट्राला खडबडून जागे केले. स्नेह्यासोबत्यांनी, गणगोतांनी त्यांना नावे ठेवली पण कशालाही न जुमानता त्यांनी या माध्यमातून स्वतःला राष्ट्रीय कार्यात वाहून घेतले. त्यांच्या कीर्तनाला कमीत कमी आठ-दहा हजार श्रोते असत. त्यावेळी गावात नाटक असेल तर बुवांच्या कीर्तनाने ते ओस पडे. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य आणि बहिष्कार ही त्यांच्या कीर्तनाची चुतःश्रुती असे. 1960 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र दणाणून सोडला. टिळकांनी त्यांना सांगितले होते की, ‘‘हे राष्ट्रप्रबोधनाचे माध्यम आहे. त्यामुळे कीर्तन करण्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत.’’ बुवांनी हे वचन कायम पाळले. त्यांनी टिळकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. हाताने दळलेले, हाताने सडलेले धान्य, गाईचे दूध, ताक आणि तूप याशिवाय त्यांनी काही सेवन केले नाही. हे न मिळाल्यास त्यांनी उपवास पत्करले पण व्रतभंग केला नाही. त्यांनी शेवटपर्यंत हातमागावर विणलेली खादी वापरली. ‘नमस्कारप्रियो भानुः’ या शास्त्रवचनावर विश्वास ठेवून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी संकल्प केला की, आयुष्यात एक कोटी सूर्यनमस्कार घालायचे! हा ‘नमस्कारयज्ञ’ त्यांच्या मृत्युदिवसापर्यंत सुरू होता. आयुष्यभर त्यांनी 97 लाख सूर्यनमस्कार घातले. त्यांच्या निधनानंतर बेळगाव येथील ‘नमस्कार मंडळा’ने उर्वरित तीन लाख सूर्यनमस्कार घालून त्यांना आदरांजली अर्पण केली. 
‘शीलवंत लोकच संस्कृतीचे रक्षण करू शकतात,’ असा त्यांचा सिद्धांत होता. भारतीयांची दिनचर्या कशी असावी, पूर्वी आयुरारोग्य व सुखसंपत्ती याचा लाभ घेणारे आर्य कसे वागत असत? यासंदर्भातले आचार्यधर्म लोकांनी तंतोतंत पाळावेत यासाठी त्यांनी ‘आर्यांची दिनचर्या’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री परत बिछान्यात पडेपर्यंत आहार, विहार, विधि, नित्यनेम कसे असावेत? माणसाने प्रतिदिनी कसे वागावे? याबाबत प्राचीन ऋषिमुनींनी कोणते नियम घालून दिले आहेत? मनुष्य आरोग्यसंपन्न व सुखी कसा होईल? याबाबत या पुस्तकात अभ्यासपूर्ण विवेचन आहे. बुवांचे सहकारी पुंडलिकजी कातगडे यांनी त्यांचे ‘राष्ट्रीय कीर्तनकार कै. डॉ. पटवर्धनबुवा विचारधारा आणि शिकवण’ हे चरित्रही लिहिले आहे. त्यांचे हे दुर्मीळ चरित्र आणि ‘आर्यांची दिनचर्या’ हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक पुन्हा वाचकांच्या भेटीस आणावे यासाठी व्यापक, उदात्त हेतूने कळमनुरी येथील श्री. दिलीपराव कस्तुरे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या अथक आणि निःस्वार्थ भावाने ही पुस्तके नव्या स्वरूपात उपलब्ध झाली आहेत. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कराड येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी ते बुवांना म्हणाले, ‘‘येथे कृष्णामाईचे घाटावर पूर्वी तुमची होणारी कीर्तने मी लहानपणापासून ऐकली आहेत. आता या वयातही तुमचे तसेच खडतर कार्य चालू आहे याचे नवल वाटते. तुम्हास काही आर्थिक मदतीची अपेक्षा असेल तर विचार करू!’’
यावर बुवा काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी एक सरकारी कर्मचारी आर्थिक मदतीसाठीचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे आला. तो वाचून बुवा म्हणाले, ‘‘पोटाकरिता अशा रीतिने अर्ज करण्याची कल्पना मला अगदी असह्य होते. हा पटवर्धनबुवा अशी अर्ज करण्याची लाचारी करणार नाही हे वर कळवा आणि अर्ज परत न्या...’’
बुवांचा हा बाणा आज पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावणार्‍या कीर्तनकारांनी लक्षात घ्यायला हवा. 
एका रामनवमीनिमित्त पुण्यात कीर्तनास आले असताना ते नेहमीप्रमाणे टिळकांच्या भेटीस गेले. लोकमान्यांनी त्यांना विचारलं, ‘‘रामाच्या आख्यानात तुम्ही लोकांना काय सांगता?’’
बुवा म्हणाले, ‘‘भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवताराचे महात्म्य वर्णून, त्यांचे देवकोटीतील श्रेष्ठत्व मी सांगत असतो.’’
त्यावर टिळक म्हणाले, ‘‘बुवा, तुम्ही अगदी चुकता आहात. असे खोटे तत्त्वज्ञान सांगू नका. राम हा प्रथम देव नव्हता. साधासुधा देहधारी मनुष्य होता. केवळ परिश्रमाने, त्यागाने, विहित कर्तव्यबुद्धिने म्हणजे कर्म साधून, प्रयत्नांती परमेश्वर या न्यायाने तो शेवटी मनुष्याचा म्हणजे नराचा नारायण कसा झाला ते सांगत जा! नाही तर लोक काय, तो देव म्हणून दहा वेळा त्याच्या फक्त पाया पडतील व बोध न घेता आणि काही त्याग व कर्म न करता केवळ दैवावर हवाला ठेवून पंगू व निष्क्रिय होतील.’’
तेव्हापासून लोकमान्यांचे हे वळण बुवांनी यथाशक्ती गिरवले. 
ज्यांनी देशाला विचारांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तिचे बाळकडू पाजले त्यात दत्तोपंत पटवर्धनबुवांचे योगदान मोठे आहे. आजच्या वारकरी संप्रदायासह सामान्य माणसानेही म्हणूनच त्यांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण ठेवायला हवे.
- घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी - दैनिक 'पुण्य नगरी', 
शनिवार दि. 25 फेब्रुवारी 23

Friday, February 10, 2023

कुणास कळले...कुणास न कळले

जगातले उत्तुंग मनोरे शोधायचे झाले तर त्यात महाराष्ट्राची माती सर्वाधिक सुपिक आहे. इथं अशा काही महान हस्ती होऊन गेल्यात की त्यांची सर कोणत्याही मनोर्‍याला येणार नाही. लोककवी मनमोहन आणि रॉय किणीकर ही जोडीही आपल्या प्रतिभेच्या तेजाने झळाळत होती. सहसा एक कवी दुसर्‍या कवीला मोकळेपणाने दाद देत नाही असे म्हणतात; मात्र मनमोहनासारख्या सिद्धहस्त लेखकानं लिहून ठेवलंय, 
‘‘कधीकाळी दगड स्वस्त होतील 
आणि शिल्पकारही पुष्कळ होतील 
त्यावेळी, पुतळा माझा घडवणार्‍यांनो, 
रॉय किणीकर आधी खोदा, 
असेच मी ‘त्या’ जगातून ओरडून सांगेन...’’ 
मनमोहनांसारख्या कवीला किणीकरांचं खोदकाम करावंसं वाटतंय. कोण होते हे किणीकर? रमेश गोविंदांच्या भाषेत सांगायचं तर - 
तरंगणारा धोतर कुर्ता, शुभ्र धुक्याचा
इथे तिथे फिरताना हृदयी, भाव तुक्याचा
कुणास कळले... कुणास न कळले, फिकीर नाही
दरवळणारा धूप ठेवूनी, फकीर जाई...
शब्द, रंग, स्वर अशा कोणत्याही प्रतिभेचा स्फोट झाला की तिथं किणीकर आनंदानं बागडायला लागत. ‘धरती’, ‘दीपावली’, ‘आरती’ अशा दिवाळी अंकांचे सिद्धहस्त संपादक, उमर खय्याम यांच्या तोडीस तोड रूबायांमुळे मराठीची पताका डौलात फडकत ठेवणारे कवी, प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, एक मनस्वी आणि तितकंच बेभरोशाचं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. 
रॉयसाहेबांनी त्या काळात दीनानाथ दलालांच्या सहकार्याने 'शिरडीचे श्री साईबाबा' हा उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेला चित्रपट काढला. त्याची खूप चर्चा झाली, पुरस्कार मिळाले पण आर्थिकदृष्ट्या तो फसला. त्यावर ते विनोदाने म्हणायचे, ‘‘साईबाबांनी अनेकांना भरभरून दिले, आमच्या खांद्यावर मात्र त्यांनी झोळी दिली.’’
त्यांनी दत्तगुरूवरील चित्रपट केला त्याचा एक धमाल किस्सा आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यात सुरू होतं. प्रसंग असा होता की, दत्त महाराजांचा लवाजमा जातोय. सोबत शिष्य आहेत आणि त्यांच्या मागे कुत्री येत आहे. या शूटमध्ये कुत्री एक तर मागे रहायची किंवा पुढे निघून जायची. एका पाठोपाठ एक बिड्या शिलगावत ते ही गंमत पाहत होते. शेवटी ते जवळ आले आणि त्यांनी सांगितलं, ‘‘दहा मिनिटाच्या शूटसाठी तुम्ही दोन तास घालवले.’’ 
‘‘कुत्री सोबत येत नाहीत त्याला आम्ही काय करणार?’’ संबंधितांनी विचारलं. ते म्हणाले, ‘‘दहा मिनिटाचा ब्रेक घ्या. मी दोन मिनिटात हे शूट पूर्ण करतो!’’
सगळे त्यांच्या या बोलण्यावर वैतागले होते. आम्ही इतका प्रयत्न करतोय तरी जमत नाही हे काय करणार? अशा त्यामागे भावना होत्या. किणीकरांनी स्पॉटबॉयला बोलावलं आणि पाव किलो मटन आणायला सांगितलं. सदाशिवपेठी स्पॉटबॉयनं नाकं मुरडत ते आणलं आणि रॉयसाहेबांकडं दिलं. ते म्हणाले, ‘‘हे मला नको, टाक त्या दत्त महाराजांच्या झोळीत...’’ ही मात्रा लागू पडली! त्या वासानं कुत्री मागोमाग येऊ लागली. खरंच दोन मिनिटात चित्रीकरण झालं. चित्रपटात दत्त महाराजांचा ताफा, सोबत भक्त, मागोमाग येणारी कुत्री हा प्रसंग पाहून भक्त अक्षरशः नतमस्तक व्हायचे. 
कोल्हापूरातल्या एका दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम त्यांच्याकडं आलं होतं. त्यांनी त्या संपादकांकडून प्रवासासाठी म्हणून एक हजार रूपये उचल घेतले. मुंबई गाठली. तिथं जिवाची मुंबई केली. पैसे संपल्यावर ते परत गेले. जयवंत दळवी, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे अशा सर्वांचे लेख, कथा त्यांनी संपादकाला दिल्या. सगळ्या नामवंतांच्या सहभागानं तो अंक दणदणीत झाला. अंक आल्यावर ते प्रत्येकाला भेेटले. अंक दिला आणि त्यांचं साहित्य दमदार झाल्याचं सांगितलं. पु.ल. म्हणाले, ‘‘किणीकर, ही कथा माझ्या स्टाईलची आहे पण मी कधी लिहिलीय आठवत नाही.’’ 
किणीकर म्हणाले, ‘‘आठवत नाही ना? मग मी तुम्हाला फुकटची प्रसिद्धी दिली. हे मीच लिहिलंय आणि त्याचं मानधनही मीच घेतलंय. ते तुम्ही विसरा!’’ आणि ते चालते झाले. त्या पंचवीस कथा-लेखांपैकी प्रत्येकाला त्यांनी हे सांगितलं. अंक जोरात खपतोय म्हणून संपादक खूश होता. हा प्रकार कुणालाही कळला नाही. पुढे एक-दोघांनी त्यांच्याकडं आमच्या नावानं लेखन केलं म्हणून तक्रार केली पण एकाही वाचकाला असं वाटलं नाही. इतक्या समकालिन लेखकांचं साहित्य त्यांच्या त्यांच्या स्टाईलनं लिहिणं म्हणजे केवढी मोठी प्रतिभा! हे काम येरागबाळ्याचं नक्कीच नाही.
असाच प्रसंग त्यांच्या ‘धरती’च्या दिवाळी अंकाचा आहे. त्या वर्षी त्यांनी भारतातल्या विविध प्रांतातील कवींच्या कविता अनुवादित करून दिवाळी अंकात प्रकाशित केल्या. सगळ्या वृत्तपत्रांनी त्याची यथायोग्य दखल घेत कौतुक केलं की ‘यंदाच्या ‘धरती’च्या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रांतातील कवींच्या अनुवादित केलेल्या दर्जेदार कविता!’ म्हणजे बंगालचे कुणी मुखर्जी, काश्मीरचे महंमद! त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी लिहिलं ‘‘अरे, ज्यांच्या नावाने कविता छापल्यात त्या नावाचे कुणी कवी त्या भाषेत आहेत की नाही हे तर बघा. ही सगळी टोपणनावं आहेत आणि या सगळ्या कविता माझ्याच आहेत.’’
असाच प्रकार त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाबाबत. त्यात पहिल्याच पानावर एक रूबाई आहे. 
पूर्वरात्र एक वेदना घेऊन येते
मध्यरात्र एक स्वप्न देऊन जाते
आणि उत्तररात्र म्हणजे,
जागर... यात्रेचे पुन्हा प्रस्तान!
त्याखाली नाव आहे ‘रवीन्द्रनाथ ठाकूर!’ मात्र गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्याच वाटाव्यात इतक्या क्षमतेच्या या ओळी किणीकरांच्याच आहेत हे नंतर कळले.
किणीकरांबाबत पु. ल. देशपांडे लिहितात, ‘‘उत्तररात्र वाचताना वाटलं ह्या अवलियाकडे आपण अधिक आस्थेनं आणि आदरानं पाहायला हवं होतं. त्यांनी स्वतः आदराची किंवा मानसन्मानाची चुकूनही अपेक्षा ठेवली नव्हती. म्हणून काय आपण त्यांना ओळखायला नको होते? आपण ओळखीच्या माणसाबाबतही किती अनोळखी राहतो पहा!’’
मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेत, साहित्यात, संपादनात, चित्रपट-नाटकात गौरवशाली योगदान देणार्‍या रॉय किणीकर यांनी संपूर्ण आयुष्य दारिद्य्रात घालवलं. आपल्या दीड खोलीच्या विश्वात कमालीच्या उपेक्षेत जगत असतानाही त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केलं. ‘कुणास कळले, कुणास न कळले’ हे जरी खरे असले तरी या आणि अशा चरित्रनायकांनी दिलेलं योगदान न विसरणं हीच त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली असेल.
-घनश्याम पाटील
7057292092

प्रसिद्धी - दि. 11 जानेवारी 23
दैनिक 'पुण्य नगरी'

रॉयसाहेबांच्या रुबयांचा हा आविष्कार पहा -

हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण
हा देह जन्मतो वाढत जातो सरतो
ना जन्म मरण ना देहातिल तो म्हणतो
***
ऋण नक्षत्रांचे असतें आकाशाला
ऋण फळाफुलांचे असतें या धरतीला
ऋण फेडायाचें राहुन माझें गेलें
ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेलें
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
पाहिले परंतु ओळख पटली नाही
ऐकले परंतु अर्थ न कळला कांही
चाललो कुठे पायांना माहीत नव्हते
झोपलो परंतु स्वप्न न माझें होते
***
कोरून शिळेवर जन्ममृत्युची वार्ता
जा, ठेवा पणती त्या जागेवर आता
वाचील कोणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास याचे स्मरण
***
पण लिहावयाचे लिहून झाले नाही
पण सांगायाचे सांगून झाले नाही 
संपली कथा जी कुणी ऐकली नाही
संपली रात्र, वेदना संपली नाही
***
आभाळ झिरपते भरलेल्या माठात
अन निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलीकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे
***
गेले पैगंबर, येशु, बुद्धही गेले
श्रीकृष्ण, रामही गेले म्हणजे मेले
चुकणार नसे देवालाही मरण
वाचले कुणी का आभाळाचे पान
***
हे चित्र, शिल्प ही वीणा आणि मृदंग
येतात कोठुनी त्यातील भावतरंग
हे हातावरच्या भाग्य नसे रेषांचे
आहे हे संचित, देणे भगवंताचे
***
जळल्यावर उरते, एक शेवटी राख
ती फेक विडी, तोंडातली काडी टाक
जळण्यातच आहे, गंमत वेड्या मोठी
दिव्यत्व अमरता, मायावी फसवी खोटी
***
अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो अनंत आहे काळ
तुटणार कधीतरी मृत्यूची ती नाळ

Saturday, January 28, 2023

सद्वर्तनाची श्वेतपत्रिका

नोव्हेंबर 1956 ला अलियारपूर येथे रेल्वेचा एक भीषण अपघात झाला. त्यात 144 प्रवासी मरण पावले. या विभागाचे मंत्री असल्याने, ‘‘रेल्वे अपघाताची कसून चौकशी होईल, अपराध्यांना कडक शासन होईल, मृतांच्या कुटुंबियांना सर्व ती मदत करण्यात येईल,’’ असं काही ते सांगत बसले नाहीत. रेल्वेमंत्री या नात्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे मानून रेल्वेमंत्र्यांनी आपला निस्पृहपणा दाखवला आणि रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. बरं, राजीनामा दिल्यानंतर ते मंत्र्यासाठी असलेल्या गाडीने नाही तर सरकारी बसने घरी आले. घरी आल्यावर आपल्या पत्नीला सौ. ललितादेवी यांना सांगितलं की, ‘‘आपल्या घरी जेवणात रोज दोन भाज्या असतात. यापुढे ही अशी ‘श्रीमंती’ आपल्याला परवडणारी नाही. आजपासून रोज एकच भाजी करत जा...’’
आजच्या काळात साध्या ग्रामपंचायत सदस्याचाही तोरा पाहता केंद्रीय मंत्र्याचं हे वागणं अविश्वसनीय वाटेल. हाच प्रामाणिक नेता आपल्या देशाचा पंतप्रधान झाला आणि त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा दिली. लालबहादूर शास्त्री नावाच्या या शांतीदूताचं आपल्या देशाच्या विकासात मोलाचं योगदान आहे.
शास्त्रीजींचं चरित्र म्हणजे सद्वर्तनाची श्वेतपत्रिकाच होती. या विधानाच्या अनुशंगानं एक प्रसंग सांगावासा वाटतो. शास्त्रीजी त्यावेळी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाचे चिटणीस होते. एके रात्री त्यांचा एक मित्र अचानक घरी आला आणि त्यानं सांगितलं की, ‘‘माझ्या बायकोची तब्येत बिघडलीय. तिला इस्पितळात नेण्यासाठी पन्नास रूपये उसने हवेत.’’
शास्त्रीजी एकदम शांत झाले. त्यांनी सांगितलं, ‘‘मला दरमहा पन्नास रूपये मानधन मिळतं. त्यात माझं घर चालतं. बचत अशी काही होतच नाही. त्यामुळं जवळ पैसे तर नाहीत. आणखी काय करता येतं ते आपण बघूया!’’
त्यांचा हा संवाद ऐकत असलेल्या ललितादेवी घरात गेल्या आणि त्यांनी आतून पन्नास रूपये आणून शास्त्रीजींच्या हातावर टेकवले. ते पैसे घेऊन मित्र आनंदाने निघून गेला. तो गेल्यावर शास्त्रीजींनी विचारलं, ‘‘हे पैसे कुठून आणले?’’
ललितादेवींनी सांगितलं, ‘‘तुम्ही मला घरखर्चाला दरमहा तुमच्या मानधनाचे पन्नास रूपये देता. चाळीस रूपयात मी घरखर्च भागवते. अडीनडीसाठी म्हणून दहा रूपये दरमहा बचत करते. अशा अडचणीच्या वेळी कुणाला त्यातून मदत झाली तर आनंदच आहे की...’’
शास्त्रीजींनी आपल्या पत्नीच्या या वृत्तीचं कौतुक केलं. त्या आत जाताच त्यांनी कागद घेतला आणि काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाला पत्र लिहिलं, ‘‘माझं घर दरमहा चाळीस रूपयात चालतं! त्यामुळं पुढील महिन्यापासून माझ्या मानधनाचे दहा रूपये कमी करावेत आणि ते अन्य गरजूंना द्यावेत...’’
एकदा एका सदस्यानं लोकसभेत आक्षेप घेतला की, शास्त्रीजींच्या बंगल्याचं आणि त्यांच्या इमारतीच्या आवाराचं एका महिन्याचं बिल पाचशे रूपये आहे. ते ऐकताच शास्त्रीजी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्या सरकारी बंगल्याचं सर्वच्या सर्व बिल आपल्या खाजगी पैशांतून भरलं!
एक प्रसंग तर खूपच विदारक आहे. त्यांची दीड वर्षाची सुंदर कन्या विषमज्वराने आजारी पडली. तिच्या आईला, सौ. ललितादेवींना अत्यंत काबाडकष्ट करूनही तिच्या उपचारासाठी पैसे जमवता आले नाहीत. या सगळ्यात उपचाराअभावी मंजुचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ राष्ट्रासाठी आपल्या कुटुंबाकडे, मुलांबाळांकडे सुद्धा लक्ष देता आलं नाही म्हणून शास्त्रीजी अस्वस्थ झाले होते.
1920 साली त्यांनी वाराणशी येथे महात्मा गांधी यांचे व्याख्यान ऐकून प्रभावीत झाल्याने देशासाठी आत्मसमर्पणाचा निर्धार केला. त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. कारावास सहन केला. नंतर अलाहाबाद काँग्रेसचे चिटणीस, अध्यक्ष व नंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे चिटणीस झाले. 1937 ला विधानसभेवर निवडून आले. नंतर मुख्यमंत्री, गृह व वाहतूक मंत्री, 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन ते राज्यसभेवर गेले आणि रेल्वेमंत्री झाले. 1957 ला त्यांची लोकसभेवर दुसर्‍यांदा निवड झाली आणि ते दळणवळण व वाहतूक मंत्री झाले. 1961 ला गृहमंत्री असताना आसाम-बंगाल भाषिक दंगल, पंजाब सुभा चळवळ, केरळ काँग्रेस-प्रजा समाजवादी पक्षातील तंटे थांबविण्यात त्यांना यश आले. 1964 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडालेला असताना ते देशाचे पंतप्रधान झाले. पाकिस्तानच्या आक्रमणास त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. ताश्कंद-भारत सलोख्यासाठी ते रवाना झाले. 11 जानेवारी 1966 ला त्यांचे देहावसान झाले. या त्यागी, निःस्पृह, सेवाभावी, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त नेत्यास मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्यात आला.
‘‘अधिकारी किंवा पुढारी बुद्धिमान, हुशार किंवा चलाख असेल पण तो लाचखोर, भ्रष्ट असेल तर तो निरूपयोगी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला बढती किंवा जबाबदारीची कामे देता कामा नये. सार्वजनिक कामात त्याचा स्वीकार करणे अतिशय घातक आहे. त्याच्या वाईट कृत्याला संरक्षण देणे हा राष्ट्रद्रोह आहे,’’ असे ते आग्रही प्रतिपादन करत आणि न डगमगता त्याप्रमाणेच वागत.
पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत ते म्हणाले होते, ‘‘पाकबरोबर शांततेने नांदायची आमची मनापासूनच इच्छा आहे पण त्यासाठी आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा बळी आम्ही देणार नाही. आम्हाला कोणाचा इंचभर प्रदेश नको पण आमचाही इंचभर प्रदेश कोणी घेतलेला आम्ही बिलकूल खपवून घेणार नाही.’’
कितीही बिकट प्रसंग असला तरी ते विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत आणि त्यांचं म्हणणंही ऐकून घेत. त्यांच्या विचारांचा ते आदर करत. समोरच्याचे ऐकून घेऊन त्यावर सखोल विचार करणे हा आजच्या राजकारणात हरवत चाललेला गुण त्यांच्याजवळ होता. विरोधकांनाही यथायोग्य मान देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. त्यामुळे विरोधकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटायचा.
देशातील अन्नधान्याचा तुटवडा पाहून त्यांनी संध्याकाळचे जेवण वर्ज्य केले होते. स्वतःच्या घरी भात खाणे बंद केले होते. देशातील गरिबी पाहून अस्वस्थ झाल्याने त्यांनी आठवड्यातून एकदा उपवास सुरू केला आणि देशबांधवांनाही त्याचे आवाहन केले. त्यांचा नैतिक अधिकार पाहून या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून सोमवारला ‘शास्त्रीजींचा वार’ म्हणण्याची प्रथा पडली.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून लोककल्याणासाठी तन, मन, धन अर्पण करणारे लालबहादूर शास्त्री यांचे जीवन आणि चरित्र सर्वांसाठीच स्फूर्तिदायी आहे. त्यांच्या स्मृतिस अभिवादन.
- घनश्याम पाटील
7057292092
प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, दि. 29 जानेवारी 2023

Saturday, January 14, 2023

संतांचे कवी - संत महिपती!

हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, ‘‘स्नानसंध्या आटोपून येतो...’’ 
सैनिक म्हणाले, ‘‘असेल तसे या, असा निरोप आहे.’’ 
हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, ‘‘यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी केली तर ती फक्त भगवंताची करेन!’’ 
इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी सांगितलं, ‘‘आपल्या वंशात इथून पुढे सात पिढ्या कुणीही सरकारी नोकरी करू नये! केल्यास तो निपुत्रिक राहील.’’
ते वचन आजची त्यांचे वंशज तंतोतंत पाळतात. ते केवळ भजन, कीर्तन करूनच आपला उदरनिर्वाह भागवतात.
त्यानंतर त्यांनी भगवंतभक्तीसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. महाराष्ट्रातील 168 आणि महाराष्ट्राबाहेरील 116 अशी 284 संतचरित्रे काव्यमय शैलीत लिहिली. या संतचरित्राशिवाय त्यांच्या स्फूट रचनाही मोठ्या आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘पांडुरंग महात्म्य’ अत्यंत भक्तीरसपूर्ण आहे. पांडुरंगाविषयी इतकं लिहून ते समाधानी झाले असं नाही. त्यामुळं त्यांनी ‘पंढरीमहात्म्य’ आणि ‘पांडुरंगस्त्रोत’ही लिहिले. आज आपल्याला असंख्य संतांची चरित्रे कळतात ती त्यांच्यामुळेच! या संतांच्या कवींचं नाव म्हणजे, संत महिपतीबुवा ताहाराबादकर! 1715 ते 1790 हा त्यांचा कालखंड. मात्र त्यांनी जे संतसाहित्य लिहून ठेवलं आहे ते काळाच्या खूप पुढचं आणि म्हणूनच अजरामर ठरणारं आहे.
त्यांचे मूळ आडनाव कांबळे. वडिलांचे नाव दासोपंत. मंगळवेढ्याचे कांबळे नगर जिल्ह्यातील ताहाराबादला स्थायिक झाले. मुलबाळ नसल्याने ‘आपल्यानंतर पंढरीची वारी कोण करणार?’ असा प्रश्न पडून ते अस्वस्थ झाले. अत्यंत आर्ततेनं त्यांनी त्यांचं गार्‍हाणं पांडुरंगापुढं मांडलं आणि वयाच्या साठीनंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव ‘महिपती!’ याच मुलानं पुढे वारकरी संप्रदायात भरीव योगदान दिलं. जे कोणी संत हयात असतील त्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांची काव्यमय चरित्रं लिहिली. जे हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांना, नातलगांना, मित्रांना भेटून त्यांनी आपलं लेखनकार्य पुढं नेलं. आपले गुरू संंत तुकाराम महाराज यांनी आपल्या स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला आणि त्यांनी फर्मावलं की ‘तू संतचरित्रे वर्णन कर’ म्हणून मी इकडे वळलो असं त्यांचं म्हणणं.
संत महिपतींनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत गोरोबा, संत चोखोबा, संत कबीर, बोधलेबुवा, गणेशनाथ उद्धव, चिद्घन, विसोबा खेचर, संत सेना महाराज, संत रोहिदास अशा संतांची रसाळ चरित्रे लिहिली आहेत. त्यांचे भक्तविजय, कथा सारामृत, भक्तलीलामृत, संतलीलामृत, संत विजय हे आणि असे अनेक ग्रंथ वारकरी संप्रदायात प्राथःस्मरणीय आहेत. शिवाय त्यांनी  लिहिलेलं पंढरी महात्म्य, अनंतव्रतकथा, दत्तात्रेय जन्म, तुळशी महात्म्य, गणेशपुराण, पांडुरंगस्त्रोत, मुक्ताभरणकथा, ऋषिपंचमी महात्म्य, अपराधनिवेदन स्त्रोत या स्फुटांसह अनेक अभंग, आरत्या, पदे, सारांश ज्ञानेश्वरी असं लेखन केलं.
पूर्वी आपल्याकडे देवांची चरित्रे गायली जात. महिपतींनी देवांचे मूर्त रूप असलेल्या संतांची चरित्रे गायिली. त्यामुळेच ते ‘संतांचे कवी’ झाले. मराठी संतसाहित्यात त्यांनी जे अवर्णनीय योगदान दिलं ते म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.
वारकरी संप्रदायात त्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. दादोपंतांची पंढरीची वारी महिपतीबुवांनी पुढे चालू ठेवली. वृद्धावस्थेत ते पंढरपूरला वारीला गेले. त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी आर्तपणे सांगितलं की, ‘‘हे पांडुरंगा, यापुढे म्हातारपणामुळे वारीसाठी तुझ्या दर्शनास येण्यास अंतरेल असे वाटते. तेव्हा मला क्षमा कर व तुझ्या दर्शनाची माझी आसक्ती कायम अशीच राहू दे...’’
त्यानंतर विठ्ठलाने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘आषाढ शूद्ध एकादशीस भक्त मला भेटावयास पंढरपूरला येतात. आषाढ वद्य एकादशीस मी तुला ताहाराबादेस येऊन दर्शन देईन!’’
त्यानंतर सकाळी बुवांनी चंद्रभागेत स्नान केले. त्यावेळी त्यांना चंद्रभागेत श्री विठ्ठलाची वाळुमिश्रीत पाषाणाची मूर्ती सापडली. ती त्यांनी ताहाराबादला आणून, प्राणप्रतिष्ठापना करून विठ्ठलाचे मंदीर बांधले. आजही ही मूर्ती ताहाराबाद येथे पाहावयास मिळते. भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव ही कल्पनाच तर आपल्या वैभवशाली परंपरेचा भाग आहे.
महिपतींनी श्री विठ्ठलाला जे पत्र लिहिले त्यात त्यांची आर्त भक्ती दिसून येते. ते लिहितात, ‘‘विठ्ठला, चित्तवृत्ती तुझे पायी ठेवली आहे. त्रितापाचे आघात या देहाने किती सोसावेत? ते या पत्रात किती लिहावेत? शरीरात शक्ती नाही. इतका क्षीण झालो आहे की, हातात लेखणी धरवत नाही. देवा, या देहाचा संबंध तोड. तुझ्या पायाशी ठाव दे. वाचेने आणखी बोलता येत नाही. मागे अंतकाळी जसा भक्तास पावलास तसा मला पाव.’’
संत महिपतींनी 1790 साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी श्रावण वद्य द्वादशीला ताहाराबाद येथे समाधी घेतली. आषाढ वद्य त्रयोदशीला तेथे फार मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तिथे जमून महिपतींच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. तिथे त्यांच्या नावाने एक ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून सुंदर मंदिर बांधले आहे.
आजही वारकरी संप्रदायात संत महिपतीबुवांचे दाखले दिल्याशिवाय कीर्तनकारांना पुढे जाता येत नाही. जर संत महिपती नसते तर कित्येक संतांची कामे सोडा त्यांची नावेही आपल्याला कळली नसती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे म्हणताना ही संत परंपरा जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणार्‍या संत महिपती बुवांविषयी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लेखन केले आहे. प्राचार्य डॉ. रमेश आवलगांवकर, डॉ. वा. ना. उत्पात, विद्याधर ताठे, महिपतींचे वंशज अविनाश कांबळे, माझे स्नेही दत्तात्रय नाईकवाडे, दत्तात्रय गायकवाड अशा काहींनी वेळोवेळी प्रसंगानुरूप त्यांच्याविषयी लिहिले आहे. राहुरी येथील श्री. ज्ञानेश्वर आणि शामबाला माने यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर एक चित्रपटही निर्माण केला होता. मात्र तरीही अनेक संतांना प्रकाशझोतात आणणारे संत महिपती आजच्या पिढीपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे आपले दुर्दैव आहे. किमान वारकरी संप्रदायातील काही जाणकारांनी पुढाकार घेत संत महिपतींच्या नावे काही उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारीही काही प्रयत्न झाले तर या थोर संत चरित्रकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल.
- घनश्याम पाटील
7057292092
(प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, 15 जानेवारी 2023)